वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

नशीबीं दगड गोटे
काट्याकुट्याचा धनी
पायाले लागे ठेंचा
आलं डोयाले पानी

वरून तापे ऊन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फोड आली रे पायीं

जानच पडीन रे
तुले लोकाच्या साठीं
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
दिवस ढयला रे

पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट
उतार चढनीच्या

दोन्हि सुखादुखांत
रमव तुझा जीव
धीर धर मनांत
उघडूं नको आतां

तुझ्या झांकल्या मुठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
'माझेज भाऊबंद
धाईसनी येतीन!'

नको धरूं रे आशा
धर एव्हढं ध्यान
तुझ्या पायानें जानं
तुझा तुलेच जीव

लावीन पार आतां
तुझी तुलेच नाव
मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
वार्‍याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यातं झुकीसनी

चुकुं नको रे वाट
दोन्ही बाजूनं दर्‍या
धर झुडूप हातीं
सोडूं नको रे धीर

येवो संकट किती
येऊं दे परचीती
काय तुझ्या ललाटीं
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.