श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० डिसेंबर

१० डिसेंबर

राम ठेवील त्यांत समाधान राखावें ।


<poem>

प्रपंची राहून समाधान । हेंच मोठें ज्ञानाचें ज्ञान ॥

भगवंताचे हात जेथे । समाधान सुख राहते तेथें ॥

राम ठेवील त्यांत समाधान राखावें । हाच सुखी होण्याचा मार्ग जाण ॥

रामापायीं अनन्य झाला । समाधान चालत येईल घराला ॥

ज्याचे अंतःकरणांत समाधान । तेथें भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ति जाण ॥

आपलें असमाधान होण्याचें कारण । रामाहून दुसर्‍याचें झालो आपण ॥

उपाधिरहित रामास पाहावें । मध्यंतरीं चित्त कोठें न गुंतवावें ॥

चित्त गुंततां मध्यस्थळीं । परमात्म्याची प्राप्ति दुरावली ॥

भगवंताचे स्मरण । तसेंच भगवंताचे आगमन । पुण्याशिवाय घडत नाही जाण ॥

श्रीराम सर्वव्यापी हा ठेवून विश्वास । समाधान राखावें खास ॥

दाता एक रघुनंदन । हा भाव ठेवावा मनांत । त्यास दैन्यपण न येईल जगांत ॥

धर्माचें रक्षण । ठेवतां परमात्म्याचें स्मरण ॥

राम आपल्या दासावरी । नित्य कृपा करी ॥


राम परमात्मा कृपा करतो । सर्व चुकीची क्षमा करतो ॥

पुन्हा वाईट न वागावें । याबद्दल जबाबदारीनें वर्तावें ॥

'अंतीं घेतां माझें स्मरण । मी उद्धरीन त्यास आपण' ।

हे खुद्द भगवंताचे वचन । तेथें नसावें शंकेचें कारण ॥

रघुनाथावांचून सुखी झाला । असा नाहीं कोणी पाहिला, ऐकिला ॥

मीपणाचा सोडावा अभिमान । तोच एक भगवंताचा जाण ॥

राजाची भेट झाली । खालच्यांचे नाहीं महत्त्व तेथें । तैसें जगन्नियंत्या प्रभूस करावें आपलें ॥

आजवर रामानें सांभाळ केला । तो आजही नाहीं निजलेला ॥

पण त्याची जागृति । असे आमचें हातीं ॥

काळावर ज्याची सत्ता । त्याचे चरणीं ठेवावा माथा । मग धोका नाहीं ही मानावी सत्यता ॥

राम ज्याच्या हृदयीं करी वास । तेथें ऋद्धिसिद्धि पडल्या ओस ॥

निःस्वार्थापाशीं भगवंत । हा जाणावा सिद्धांत ॥

राम कर्ता हा ठेवावा भाव । कमीपणाला नाहीं ठाव ॥

कर्तव्य करावें निःस्वार्थबुद्धीनें । राम खूष होईल त्यानें ॥

ज्याला नाहीं दुसरा उपाय । तेथें मागावें भगवंताचें साहाय्य ॥

परमात्मा ज्याचा साह्यकारी । त्यास धोका नाहीं तिळभरी ॥

देह आहे परतंत्र । मन राखावें भगवंताशीं स्वतंत्र ॥

विषयविरहित मारावी हांक । तुमचे समोर माझा दाशरथि राम ॥

रामानें करावें सर्वांचे कल्याण । दुष्टास सुबुद्धि देऊन जाण ॥

दीनदयाळु परमात्मा राम खास । न ठाव द्यावा विकल्पास ॥

त्याच्याशीं वागावें सत्य । कृपा करील भगवंत ॥

अखंड करा नामस्मरण । जेणें कृपा करील रघुनंदन ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.