श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ मे

१९ मे

भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी.


जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवितात, आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे, प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले, तर परस्परप्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भितीचा धाक असू नये. जसे आई आणि मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावे. असा नियम आहे की, ज्याला आतबाहेर भगवंताचे प्रेम आले, तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसर्‍याला झाला, की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे; ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा ! एक भगवंताचे प्रेम लागले, की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर, पोटामध्ये भूक असूनसुद्धा, त्याला खाता येत नाही, किंवा अन्नाची चव लागत नाही. त्याचप्रमाणे, आतमध्ये भगवंताचे प्रेम असूनसुद्धा, आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे, त्याचप्रमाणे, नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ति कमी करावी. ही प्रपंचाची आसक्ति सोडणे किंवा कमी करणे, हे फार कठीण काम आहे. त्याकरिता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान, आणि सत्संग हेच तीन उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत. ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील, पण या सर्व साधनांच्यामध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे. भगवंताचे प्रेम येईल, तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील. खरोखर, भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नामाला नीति हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल, त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभसाध्य आहे. जो हीनाहून हीन आणि अडाण्यांतला अडाणी आहे, त्यालासुद्धा मिळणारा असा भगवंत आहे.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.