श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० नोव्हेंबर

<poem> २० नोव्हेंबर

रामापरतें सत्य नाही ॥


मी कोणाचा कोण ? । मी आलो कोणीकडून ? ।

तू आहेसी अजन्म आत्माचि निधान ।

आत्म्यासी नाही जन्ममरण । हे आहे सत्य जाण ॥

आत्म्यास नसे जन्ममरण । तरी तो देहांत आला कैसा कोण ? ॥

आत्मा निर्गुण निराकारी । त्यास नाही जन्ममृत्युची भरी । तो सत्तामात्र वसे शरीरी ॥

आत्मा नाही कर्ता हर्ता । तो कल्पनेच्या परता ॥

तूं आहेस आत्मा । सर्व व्यापूनी वेगळा तो परमात्मा ॥

सर्व पोथ्यांचे सार । सर्व साधू्-संतांचा विचार । परमात्मा एकच सत्य जाण ॥

रामापरते सत्य नाही ।श्रुतिस्मृति सांगतात हेचि पाही ॥

रामसत्तेविण न हाले पान । हे सर्व जाणती थोर लहान ॥

श्रीरामरूप ब्रह्मस्वरूप, निर्गुण सगुण, सुंदर । तयासी माझे अनंत नमस्कार ॥

रामाविणें सत्य काही । सत्य जाण दुजें नाही ॥

दुःखाचा हर्ता व सुखाचा कर्ता । परमात्म्यावाचून नाही कोणी परता ॥

रामापरते हित । सत्य सत्य नाहीं त्रिभुवनांत ॥

आजवर जें जें कांही केले । तें भगवच्चिंतनाने दूर झाले ॥

विषय मला मारी ठार । हा जेव्हां झाला निर्धार । तेव्हांच तो होईल दूर ॥


सर्व कांही पूर्ववत् चालावें । तरी पण मन रामाला लावावे ॥

वैभव, संपत्ति, मनास वाटेल तशी स्थिति, । ही भगवत्-कृपेची नाही गति ॥

न व्हावे कधी उदास । रामावर ठेवावा विश्वास ॥

स्वार्थरहित प्रेम । हीच परमात्म्याची खूण ॥

जसा सूर्याला अंधार नाही । तसें परमात्म्याशी असत्य, अन्याय, नाही ॥

परमात्मा न्यायरूप आहे । म्हणजे परमात्मा सत्य आहे ॥

रामाविण सत्य सत्य कांही । सत्यत्वाला उरले नाही ॥

आपले आधी आला । आपले संगत राहिला ।

आपले मागे उरला । त्याची संगत धरतो भला ॥

रामाचा आधार जन्माआधी आला । पण माझे-मीपणानें सोडून गेला ॥

सर्व स्थिति-लय-कर्ता । एकच प्रभु माझा राम त्राता ॥

राम सर्वव्यापी भरला । तो माझेपासून दूर नाही जाहला ॥

परमात्मा सर्व ठिकाणी भरला । त्याचेविण रिता ठाव नाही उरला ॥

सर्व जीव पराधीन । सर्व परमात्म्याचे अधीन ॥

म्हणून जें जें घडेल कांही । तें तें त्याचे सत्तेनेंच पाही ॥

चातुर्य, बुद्धी, देहभाव, वासना, कल्पना । ही मायाच अवघी जाणा ॥

माया बहुत जुनाट । तिनें बहुतास भोगविलें कष्ट ॥

मुख्य देहबुद्धी अविद्यात्मक । अविद्या पराक्रम साधी फार ।

तिची शक्ति फार मोठी । आत्मदर्शन न होऊं देई भेटीं ॥

म्हणून जें जें दिसतें तें तें नासते । हा बोध घेऊन चित्ति ।

सज्जन लोक जगीं वर्तती ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.