श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ डिसेंबर

२ डिसेंबर

अखंड नामस्मरणात राहणे म्हणजेच उपासना.



देवाच्या आड काय येत असते ? आपल्याला देवाची प्राप्ति होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो. आपण लोकांना त्याबद्दल दोष देत असतो, पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःच आड येत असतो, हे थोडा विचार केला असता समजुन येईल. ज्याला आपले म्हणायला पाहिजे होते त्याला आपले न म्हणता, आपण दुसर्‍या कोणाला तरी आपले म्हणत असतो. आपला मुलगा, बायको, भाऊ, या सर्वांना आपले म्हणत असतो. हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात. परंतु देवाला जर आपले म्हटले, तर तो सदासर्वकाळ आपलाच असतो, आणि आपल्याला तो मदत करायला तयार असतो. तुम्हा सर्वांना द्रौपदीची गोष्ट माहीत आहे ना ? आपले भ्रतार आपले रक्षण करतील असे तिला वाटत होते. परंतु त्या कोणाकडून काही होणे शक्य नाही असे तिला दिसले, तेव्हा तिने अनन्यतेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तेव्हांच कृष्ण तिच्याकरिता धावून आले. म्हणजे काय, की आपण ज्याला आपले म्हणत असतो ते खरे आपले नसतात. आपण परमात्म्याला आपले म्हणावे, 'मी त्याचा आहे' अशी सदासर्वकाळ आठवण ठेवावी, आणि जे जे घडत असते ते ते सर्व त्याच्या इच्छेने होत असते ही भावना ठेवावी. अशी भावना होण्याकरिता आपण त्याची उपासना करायला पाहिजे. उपासना करणे म्हणजे तरी काय ? आपण देवाचे आहोत, आपण नेहमी त्याच्या सान्निध्यात आहोत, असे वाटणे. असे वाटण्याकरिता त्याच्या नामस्मरणात राहणे जरूर आहे. आपण त्याच्या नामस्मरणात राहिलो म्हणजे तो सदासर्वकाळ आपल्या जवळ राहतो. तुम्ही कोणाचे नाव घेतले म्हणजे त्याची मूर्ति जशी तुमच्या ध्यानात येते, त्याप्रमाणे देवाचे नाव घेतले म्हणजे तो तुमच्याजवळ असतो. देव कसा आहे हे विचारले तर कसे सांगता येईल ? तो नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी सांगितले आहे. नाम हे त्याचे रूप, म्हणून नामस्मरण केले म्हणजे देवाला तुमच्याजवळ येणे भागच पडते. हे नामस्मरण कसे करावे ? समर्थांनी सांगितले आहे की, 'काहीच न करूनि प्राणी ॥ रामनाम जपे वाणी । तेणे संतुष्ट चक्रपाणी । भक्तालागी सांभाळी ॥' आपण नाम घेताना काहीच करीत नाही का ? आपण त्या वेळी संसाराची काळजी करीत असतोच ना ? म्हणजेच त्या वेळी आपण मीपणा ठेवून नामस्मरण करीत असतो ! मीपणारहित जो नामस्मरण करील त्यालाच देव सांभाळित असतो; आणि जो स्वस्थ राहील त्याचा योगक्षेम चालवीत असतो.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.