श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० एप्रिल

३० एप्रिल

जेथे भगवंताचें नामस्मरण । तेथे सर्व संतांचें ठाण ॥


<poem>

जोंवर धरिली जगाची आस । तोंवर परमात्मा दूर खास ॥

परमात्म्याची प्राप्ति । न होई राखता विषयासक्ति ॥

जग विषयाकार राहिले । तेथे प्रेम केले ते घातासी आले ॥

विषयी एकजीव झालो जाण । सुटता न सुटे आपण जाण ॥

मान, अपमान, जगाचे सुख-दुःख । हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण ॥

अभिमानांत परमात्म्याचे विस्मरण । हें जीवपणाचें मुख्य लक्षण ॥

सुख-दुःख, विपत्ति-आपत्ति, । ही माया प्रपंचाची ओहोटी भरती ॥

आत्मनिश्चय बाणल्यावांचून माया न हटे न सुटे जाण ॥

आता करी शूर मन । मायेसी हटवावे आपण ॥

जैसें जैसें बाहेर दिसलें । त्याचें बीज आपणाशीच उरलें ॥

एकच वस्तूची ओळखण जाण । पूर्ण होते समाधान ॥

ज्याच्यांत मानावे मी सुख । त्याच्यातच उद्‌भवतें दुःख ॥

नराचा होय नारायण । जर न चुकला मार्ग जाण ॥

जेथे ठेवावी आस । त्याचे बनावें लागते दास ॥

देह तो पंचभूतांचा । त्याचा भरवसा न मानावा फारसा ॥

मी तुम्हांस सांगतो हित । दृश्यांत न ठेवावें चित्त ॥

दृश्य वस्तु नाशिवंत असते । भगवत्कृपेने समाधान येते ॥


परिस्थिति नसे बंधनास कारण । असे आपलेच मनाची ठेवण ॥

देवास पाहावें ज्या रीतीनें । तसाच तो आपणास दिसतो जाण ॥

विषयाचा नाही झाला जोंवर त्याग । तोंवर रामसेवा नाही घडत सांग ॥

आपलें प्रेमयुक्त चाले धणी । त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी ॥

द्रव्यदारावर्जित जाण । ही खरी संताची खूण ॥

सृष्टी पाहावी भगवदाकारी । प्रेम ठेवील त्याचेवरी । त्याला नाही दुसरी सरी ॥

आल्यागेल्यास द्यावे अन्नदान । मुखानें भगवंताचें नाम ॥

हृदयांत रामाची प्रीति । यासच थोर म्हणती जीवन्मुक्ति ॥

न धरावी जगाची आस । तोच होऊ पाहे रामदास ॥

नामांत संत । नामीं भगवंत ॥

वृत्ति राखावी अत्यंत शांत । हेंच संताचें मुख्य लक्षण जाण ॥

जेथे भगवंताचें नामस्मरण । तेथे सर्व संतांचें ठाण ॥

अगरबत्ती जळून गेली । परि सुवासाने राहिली ॥

तैसी रामचरणी झाले जे लीन । तेच खरे जिवंत जाण ॥

संतचरणीं झाला लीन । त्याला भाग्यास नाहीं दुजें उणें ॥

संताची संगति । भगवन्नामानें साधतें ॥



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.