श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० ऑक्टोबर

३० ऑक्टोबर

ठेवतां रामावर एक विश्वास । त्यालाच समाधान हमखास ॥


<poem>

रामाचा हात माझ्यामागे हें ठेवावें मनांत । व्यवहार सांभाळून वागावे जगांत ॥

दुष्ट मतीची उत्पत्ति । ही दुर्जनाची संगति ॥

भावे धरितां रघुपति । सर्व संकटे दूर जाती ॥

भोगांत नामाचे न व्हावे विस्मरण । याकरितां राखावें समाधान ॥

देहाचे भोग देहाचे माथी । त्याची न मानावी खंती ॥

विश्वास ठेवावा रामापायीं । सर्व कांही चांगले होऊन जाई ॥

आपला भार घेतला रामानें । विश्वासाने सत्य मानणें खरे ॥

सद्‌गुरुआज्ञा प्रमाण । हेंच साधनांतील साधन जाण ॥

जो जो प्रसंग येईल जैसा । तो तो सान्निध्य जाणावे रघुपतीचा ॥

शरीर आहे दों दिवसांचे । वायां न जाऊं द्यावें साचे ॥

रामकृपा त्याजसी होई । ज्यानें नांव ठेवले हृदयी ॥

मुखीं नाम, हृदयीं राम, । त्याने जोडला आत्माराम ॥

गुरुचरणी ठेवावा विश्वास । निर्भयता त्यानें येते खास ॥

जें जें होणार ते होतच जाते । विनाकारण मन कष्टी होते ॥

माझे प्रपंची नाहीं सुखदुःख । असे ज्याने जाणले चित्तीं । त्याचा संसार झाला सुखाचा निश्चितीं ॥

ज्याने दिली रामाची संगति । त्याचा विषाद न मानावा चित्तीं ॥

उद्विग्नतेचें कारण । साधनाचे विस्मरण ॥

मुख्य करितां रामाची भक्ति । आपोआप गळते विषयाची आसक्ति ॥


भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास । तो करतो हेंच हिताचे मानावें खास ॥

अंतकाळी भगवंताचे नाम । त्याला करीन माझेसमान ।

हें भगवंताचे वचन जाण । त्याच्यावर ठेवावा विश्वास ॥

म्हणून रामावांचून जगती । आतां माझा असें न म्हणावें चित्तीं ॥

दुःख जाण्यास उपाय सांगती साधुजन । आसक्तीत न गुंतावें आपण ॥

म्हणून, सर्व कांही करावे । पण मीपणाने कोठें न राहावे ॥

याला उपाय एकच जाण । सदा राखावे रामाचे अनुसंधान ॥

याहून दुजें नाही साधन । हे मानावे प्रमाण ॥

ठेवतां रामावर एक विश्वास । त्यालाच समाधान हमखास ॥

म्हणून रामाचा चित्तीं ठेवावा विश्वास । वळण द्यावें व्यवहारास ॥

साधन असें काही असावे । ज्याने साध्याला सहज पोहोचावे ॥

राम म्हणावा आपला । साधनांतील साधनाचा लाभ झाला ॥

शुद्ध असावे आचरण । पवित्र करावें मन ॥

नामस्मरण ज्याच्या मुखीं । रामकृपें तोच एक सुखी ॥

एकच देव, एकच गुरु, एकच साधन ।

यांवर ठेवतां विश्वास । कृपा करील ईश्वर खास ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.