श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/६ एप्रिल

६ एप्रिल

संत हे चालते-बोलते देवच आहेत.


व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा, आणि सद्‌गुरू आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. माझ्या मुखी राम आला यापरते दुसरे भाग्य ते कोणते ? हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो; मग आमच्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे ?

तुम्ही मला उपनिषदांतले सांगा म्हटले तर कसे सांगू ? ज्याने जे केले तेच तो सांगणार. एक गुरू आज्ञापालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही, तर मी दुसरे काय सांगणार ? संताचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. आपण साधूला व्यवहारात आणतो, आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो ! संत हे देहाचे रोग बरे करीत नसून, त्या रोगांची भिती नाहीशी करतात. संत हे चालते-बोलते देवच आहेत. संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वांत मोठा उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय. संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्रांच्या उलट असणे शक्यच नाही. संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात, पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे.

श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कींव येते, त्याप्रमाणे मनुष्यजन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. एकूण योनी इतक्या आहेत की, त्यांमध्ये मनुष्यजन्म येणे कठीण आहे. मनुष्यजन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे. म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा, त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे; पडण्याची, अडखळण्याची भितीच नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे. संतवचनावर विश्वास ठेवू या, म्हणजे भगवत्प्रेम लागेलच. ते लागल्यावर विषयप्रेम कमी होईल. म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.