सप्तशती गुरूचरित्र/अध्याय चाळीसावा

एक वेदज्ञ ब्राह्मण । श्वेतकुष्टें व्यापून । गुरुप्रति येऊन । म्हणें दीननाथा तारीं ॥१॥

झालों दैवें कुष्टी म्हणून । तोंड हें न पाहती जन । ह्यांचें करीं तूं शमन । नातरीं प्राण सोडीन मी ॥२॥

पुरश्वर्यादिकें पाप । न जाता हो उलट ताप । देवा तूंची मायबाप । माझें पाप शमवीं हें ॥३॥

आश्वासन देती गुरु । तंव आला एक नर । शुष्ककाष्ठ डोईवर । घेवोनि ठरला तो तेथें ॥४॥

अपूर्वैक चमत्कार । करुं इच्छी गुरुवर । सांगे विप्रा घे झडकर । संगमावर रोवीं काष्ठा ॥५॥

अविरत सेवीं यासी । पाला येतां शुची होसी । द्विज रोवी त्या काष्टासी । सद्भावें जल शिंपी ॥६॥

लोक हसुनि वारिती । नायके तो गुरुप्रती । ते येवोनी तें सांगती । गुरु म्हणती भाव फले ॥७॥

अप्रमेय भावफल । धनंजयवाक्यें सुशील । लिंगा चिताभस्म दे भिल्ल । एकदां लब्ध न हो भस्म ॥८॥

इच्छी वपू जाळावया । मला जाळी म्हणे भार्या । भस्म दे, तिला जाळुनियां । प्रसाद ध्याया आली तीच

तयेवेळीं प्रगटे हर । तया देई इष्ट वर । असा भावाचा प्रकार । म्हणूनी गुरु जाती तेथें ॥१०॥

त्या उद्योगातें पाहून । करितीं काष्ठा प्रोक्षण । आले अंकूर फुटोन । विप्र स्वर्णवर्ण झाला ॥११॥

बरवे अंकुर फुटले । कुष्ठ सर्व मावळलें । द्विजें स्तवना आरंभिलें । तैं उदेले अष्टभाव ॥१२॥

शांतदांत इंदुकोटिकांदीप्त अत्रिनंदना । देंववृंदवंद्यपाद दत्त भक्तचित्तरंजना ॥१३॥

पापतप्ततापभंजना सनातना जनार्दना । मायिकांधकारसूर्य दत्त भक्तचित्तरंजना ॥१४॥

दत्तकृत्तकामरोष वेषधारि भिक्षु तूं जना । इष्ट देसि धर्म पासि दत्त भक्तचित्तरंजना ॥१५॥

राग द्वेष दोष वारिं, तारिं सूर्यचंद्रलोचना । भक्तकामधेनु तूंची दत्त भक्तचित्तरंजना ॥१६॥

हस्तिंदण्ड कुंडि घेसि देसि जीव वीतजीवना । रक्तपद्मपत्रनेत्र दत्त भक्तचित्तरंजना ॥१७॥

तूंचि विश्वहेतु मंतु सोसि होसि मायबाप ना । नित्य शुद्ध बुद्ध मुक्त दत्त भक्तचित्तरंजना ॥१८॥

तूंचि देव योगि होसि नासिं दैन्यदुःखकानना । न्यासि होसि कृष्नावासि दत्त भक्तचित्तरंजना ॥१९॥

ब्रह्मवस्तु तूं अनादिमध्यनाश खास वासना । वारिं, भक्ति देयिं तारिं दत्त भक्तचित्तरंजना ॥२०॥

तयाचा भाव जाणुनि विप्रा । विद्यासरस्वतीमंत्रा । देऊनियां सकलत्रा । राहवि मित्रापरी गुरु ॥२१॥

इति श्री०प०प०वा०स०वि सारे विप्रकुष्ठहरणं नाम चत्वारिंशो०


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]