सप्तशती गुरूचरित्र/अध्याय सहावा

कथा असी परिसून । नामधारक करी प्रश्न । म्हणे सर्व क्षेत्रें त्यजून । ये गोकर्णक्षेत्रीं कां हा ॥१॥

शैव धर्में रावणमाता । कैलासाची धरुनि चिंता । मृन्मयलिंग पूजिता । ये श्रीमत्ता सुता खेद ॥२॥

तो आश्‍चर्य मानून । म्हणे कैलास आणून । देतों, दे हीमाती त्यजून । असें म्हणून चालिला ॥३॥

बळें मूळासह कैलासा । उचलितां हाले सहसा । भिवूनिगौरी वदे गिरिशा । प्रळय कसा हा वारी ॥४॥

तैं कैलासा चेपी हर । खालीं रगडे निशाचर । मरणोन्मुख हो करी स्तोत्र । तेणें हर प्रसन्न हो ॥५॥

त्वदन्य न मला त्राता । तूंचि माझा प्राणदाता । दयाळू तूं राखें आतां । असें म्हणतां सोडी शंभू ॥६॥

त्वां अनुमान न करितां । शिवा सोडविलें आतां । असें म्हणूनी तो गीता । गाता झाला सप्तस्वरें ॥७॥

गायी संम्यक्‌ रागरागिणी । निजशिर छेदुनि । त्याचा वीणा करुनी । काल साधुनि प्रेमानें ॥८॥

शिव तयाच्या गाण्यासी । भुलोनी ये तयापाशीं । आत्मलिंग देउनि त्यासी । म्हणे होसी तूंच शंभू ॥९॥

ये हाता अमरता । तीन वर्षें हें पूजितां । लंका कैलासचि ताता । होईल आतां निःसंशय ॥१०॥

अवनिवरी मध्यें जरी । ठेवितां न ये करीं । येणें परी नेई पुरीं । काय करिसी कैलासा ॥११॥

शिवा करुनी नमन । पुरा जाई रावण । त्वरें नारद जाऊन । करी कथन सर्व इंद्रा ॥१२॥

अधर्मा त्या जाणून । इंद्र ब्रम्ह्या दे सांगून । तोही विष्णूसी कथून । ये घेऊन शिवाप्रती ॥१३॥

त्या अनुचितकर्मे हर । पश्चात्तापें म्हणे विसर । पडला झाला पाव प्रहर । गेला क्रूर येथोनियां ॥१४॥

देव बंदींत पडले । विष्णू म्हणे तुज कळलें । तरी कां हें असें केलें । जड ठेलें पुढें मज ॥१५॥

जो आधी मारी जीव । तया केला चिरंजीव । वरदान सांगे शिव । म्हणे उपाय करीं तूं ॥१६॥

ऐसें निगुती ऐकून । नारदा दे पाठवून । विष्णू करावया विघ्न । धाडी विघ्ननायकातें ॥१७॥

मुनी मनोवेगें तया । गांठुनि लोटी काळ वायां । धाडी संध्या करावया । गणराया तव आला ॥१८॥

त्या मानुनी ब्रह्मचारी । तो न घेतां त्याचे करीं । रावण दे लिंग तरी । अवधारी म्हणे बटू ॥१९॥

स्वपोष्य मी अतिदीन । तीन वार बोलावीन । जड होतां खालीं ठेवीन । दोष ने मग मला ॥२०॥

स्वर्गलोकीं सुर पाहतां । बोलावी त्या अर्घ्य देतां । तीन वेळ तो न येतां । तो स्थापिता झाला लिंग ॥२१॥

त्यानें केलें तें स्थापन । रावणा न हाले म्हणून । महाबळी हो गोकर्ण । क्षेत्र जाण भूकैलास ॥२२॥

इति श्री०प०प०वा०वि० गोकर्णमहाबळेश्वरप्रतिष्ठापनं नाम षष्ठो०


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]