एकनाथी भागवत/अध्याय अठरावा

<poem> एकनाथी भागवत - आरंभ ॥श्रीगणेशाय नमः ॥श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो कर्मप्रकाशका । सद्विद्याविधिविवेका । कर्मधर्मप्रतिपाळका । जगन्नायका गुरुवर्या ॥१॥ वर्णाश्रमादि मर्यादा । त्याचा सेतू तूं गोविंदा । तूं कारण वेदानुवादा । विवादसंवादा तूं मूळ ॥२॥ तूं शब्दसृष्टीचा अर्कु । तूं वेदगुह्यप्रकाशकु । तूंचि एकला अनेकु । व्याप्य व्यापकु तूंचि तूं ॥३॥ तूंचि तूं विधि विधान । तूं बोलका तूंचि मौन । एका आणि जनार्दन । दोनी संपूर्ण तूं गुरुराया ॥४॥ यालागीं श्रीभागवता । तूंचि अर्थ तूं कविता । तूंचि अर्थावबोधकता । हेंही बोलविता तूंचि आम्हां ॥५॥ जैशीं आपुलींचि उत्तरें । पडसादें होतीं प्रत्युत्तरें । तेवीं माझेनि मुखांतरें । तूं कवित्वद्वारें बोलका ॥६॥ बोलका श्रीभागवतीं । tश्रीकृष्ण कृपामूर्ती । तेणें वर्णाश्रमउंत्पत्ति । यथास्थिती सांगितली ॥७॥ सप्तदशाध्यायीं सुगम । सांगितले ब्रह्मचर्य-धर्म । गृहस्थाचें स्वधर्मकर्म । नित्यनेम निरूपिले ॥८॥ आतां अष्टादशाध्यायीं जाण । वानप्रस्थाश्रमलक्षण । संन्यासधर्माचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥९॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

श्रीभगवानुवाच- वनं विविक्षुः पुत्रेषु भार्यां न्यस्य सहैव वा । वन एव वसेच्छान्तस्तृतीयं भागमायुषः ॥१॥

आतां क्रमेंचि निरूपण । वानप्रस्थाचें आलें जाण । त्यासी वनास निघावया कारण । आयुष्यलक्षण विभाग ॥१०॥ `शतायुःपुरुष'-मर्यादा श्रुती । त्याच्या तृतीयभागाची स्थिती । सासष्टी क्रमिल्याअंतीं । वनाप्रती निघावें ॥११॥ निघावया वनाप्रती । भार्या देऊनि पुत्राचे हातीं । आपण निघावें शीघ्रगतीं । वानप्रस्थीं वनवासा ॥१२॥ भार्या साध्वी पतिव्रता सती । ईश्वरस्वरूप मानी पती । भ्रतार निघतां वानप्रस्थीं । जे पुत्राप्रती राहेना ॥१३॥ सांडितां भ्रतारसेवेसी । कल्पांत हों पाहे जिसी । जे भ्रतारचरणांची दासी । ते सवें वनासी आणावी ॥१४॥ जो पुरुष स्त्रीसमवेत । वनीं झाला वानप्रस्थ । तेणें स्त्रीकामासी अलिप्त । व्हावें दृढव्रत ते आश्रमीं ॥१५॥ जो वानप्रस्थवनवासी । तेणें दृढ धरावी शांति मानसीं । नातळावें कामक्रोधासी । हेही व्रत त्यासी आवश्यक ॥१६॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

कन्दमूलफलैर्वन्यैर्मेध्यैर्वृत्तिं प्रकल्पयेत् । वसीत वल्कलं वासस्तृणपर्णाजिनानि च ॥२॥

वनींचीं कंदमूळफळें । जीं निपजलीं ऋतुकाळें । तींही अतिपवित्रें निर्मळें । आहार तेणें मेळें करावा ॥१७॥ वनवासीं वस्त्रें जाण । वल्कलें व्याघ्रमृगाजिन । अथवा नेसावें केवळ तृण । कां पर्णाभरण वृक्षांचें ॥१८॥ वानप्रस्थीं नेमग्रहण । ऐक त्याचेंही लक्षण । त्या नेमाचें निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥१९॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

केशरोमनखश्मश्रु मलानि बिभृयाद्दतः । न धावेदप्सु मज्जेत त्रिकालं स्थण्डिलेशयः ॥३॥

केश म्हणिजे मस्तकींचे । श्मश्रु बोलिजे मुखींचे । रोम ते कक्षोपस्थींचे । छेदन यांचें न करावें ॥२०॥ मस्तकीं न करावें वपन । न करावें श्मश्रुकर्म जाण । न करावें रोमनखच्छेदन । दंतधावन न करावें ॥२१॥ स्नान मुसलवत् केवळ । अवश्य करावें त्रिकाळ । प्रक्षाळावे ना शरीरमळ । व्रत प्रबळ वनस्था ॥२२॥ केवळ भूमीवरी शयन । सदासर्वदा करावें जाण । तळीं घालावें ना तृण । मग आस्तरण तें कैंचें ॥२३॥ यापरी वानप्रस्थें जाण । दृढ धरूनि व्रतधारण । करावें तपाचरण । तें तपलक्षण अवधारीं ॥२४॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

ग्रीष्मे तप्येत पञ्चाग्नीन् वर्षास्वासारषाड्वले । आकण्ठमग्नः शिशिर एवं वृतस्तपश्चरेत् ॥४॥

उष्णकाळीं पंचाग्नीं । अग्निकुंडे चहूं कोणीं । पांचवा रवि माध्याह्नीं । ऐसा पंचाग्नी साधावा ॥२५॥ माळा करोनि उच्च प्रदेशीं । धन वर्षतां धारावर्त्तेंसीं । तेथ व्हावें आकाशवासी । वर्षाकाळीं ऐसी तपप्राप्ती ॥२६॥ आलिया हेमंतऋतूसी । आकंठमग्न जळावासी । जळ वास करावा निशीं । हे वानप्रस्थासी तपक्रिया ॥२७॥ हे तपक्रिया प्रतिवरूषीं । विहित वानप्रस्थासीं । वयसापरत्वें भक्षणासी । हृषीकेशी सांगत ॥२८॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

अग्निपक्वं समश्नीयात्कालपक्वमथापि वा । उलूखलाश्मकुट्टो वा दन्तोलूखल एव वा ॥५॥

अगीस्तव पाका आलीं । कां काळें जीं परिपक्व झालीं । तीं तापसालागीं भलीं । आहारीं विहिलीं उदरार्थ ॥२९॥ दांत असलिया बळी । फळें खावी तेणें सगळीं । कां गेलिया दांत समूळीं । कांडूनि उखळीं सुखे खावीं ॥३०॥ जरी उखळ न मीळे वनीं । तरी खावीं दगडें ठेंचुनी । नाहीं चाड गोडपणीं । क्षुधानिवारणीं आहारार्थ ॥३१॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

स्वयं सञ्चिनुयात्सर्वमात्मनो वृत्तिकारणम् । देशकालबलाभिज्ञो नाददीतान्यदाहतम् ॥६॥

ऋतुकाळीं फळें संपूर्णें । तीं कालांतराकारणें । संग्रहो सर्वथा न करणें । व्रतधारणें वनस्था ॥३२॥ पूर्वदिवसीं फळें आणिलीं । अपरदिवसीं जरी उरलीं । ती अवश्य पाहिजे त्यागिलीं । नाहीं बोलिलीं आहारार्थ ॥३३॥ प्रत्यहीं आहारार्थ जाण । फळें आणावीं नूतन । जीर्ण फळांचें भक्षण । निषिद्ध जाण वानप्रस्था ॥३४॥ आणिकें फळें जीं आणिलीं । तीं अंगीकारा निषिद्ध झालीं । जीं स्वकष्टें अर्जिलीं । तींचि वहिलीं आहारार्थ ॥३५॥ देश काळ वर्तमान । इत्थंभूत कळलें ज्ञान । तरी संग्रह न करावा जाण अदृष्टधारण निर्धारें ॥३६॥ पराचा प्रतिग्रहो पूर्ण । सर्वथा न करावा आपण । प्रतिग्रह घेतां जाण । व्रतखंडन वानप्रस्था ॥३७॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

वन्यैश्चरुपुरोडाशैर्निर्वपेत्कालचोदितान् । न तु श्रौतेन पशुना मां यजेत वनाश्रमी ॥७॥

जो वानप्रस्थ स्त्रीसमवेत । त्यासी अग्निहोत्र झालें प्राप्त । तेव्हां कर्म जें वेदोक्त । तें करावें समस्त वनवासीं ॥३८॥ वनीं जीं फळें ज्या ऋतूस । तोचि कल्पावा चरुपुरोडाश । तेणें यजावा मी यज्ञपुरुष । सावकाश मंत्रोक्त ॥३९॥ यापरी श्रौतकर्मविधान । यागार्थ पशुहनन । तें वानप्रस्थासी नाहीं जाण । वनफळीं यजन यागाचें ॥४०॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

अग्निहोत्रं च दर्शश्च पूर्ण्मासश्च पूर्ववत् । चातुर्मास्यानि च मुनेराम्नातानि च नैगमेः ॥८॥

पूर्वीं अग्निहोत्रकर्में जैसीं । गृहीं होतीं गृहस्थासी । तींचि चालवावीं वनवासीं । वेदाज्ञेसीं वनस्थें ॥४१॥ आम्नायें आगमनिगमांसी । जाणोनि करावें यागासी । दर्शपौर्णमासचातुर्मास्यांसी । निष्कामतेसी वेदाज्ञा ॥४२॥ ऐसा मुनीश्वर वनवासी । तपस्वी तेजोराशी । त्याचिये फळप्राप्तीसी । स्वयें हृषीकेशी सांगत ॥४३॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

एवं चीर्णेन तपसा मुनिर्धमनिसन्ततः । मां तपोमयमाराध्य ऋषिलोकादुपैति माम् ॥९॥

ऐसें वेदोक्त तप साचार । आस्तिक्यभावें अत्यादर । साक्षेपें करितां निरंतर । अस्थिमात्र देह उरे ॥४४॥ शुष्कशरीरपांजरा । त्वचेनें झांकिलिया शिरा । परी सामर्थें अति खरा । न सरे माघारा तपोनिष्ठें ॥४५॥ ऐसें यावज्जन्म करितां तप । तो सबाह्य झाला निष्पाप । लाहोनि ज्ञान सद्‌रूप । माझें निजस्वरूप तो पावे ॥४६॥ अवशेष वासना असतां । सूक्षरूप प्रतिबद्धकता । तपाभिमानें तत्त्वतां । देहअपहंता अणुमात्र ॥४७॥ परी फळाशा पोटीं नाहीं । ऐसेनि निमाला जो देही । तो पावोनि ऋषिलोकाच्या ठायीं । तेथोनि पाहीं मज पावे ॥४८॥ जो ऋषिलोकातें पावला । तो क्रमें मुक्तीच्या मार्गा आला । तेथूनि क्रमेंचि मज पावला । यापरी उद्धरला वनस्थ ॥४९॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

यस्त्वेतत् कृच्छ्रतश्चीर्णं तपो निःश्रेयसं महत् । कामायाल्पीयसे युञ्ज्याद्बांलिशः कोऽपरस्ततः ॥१०॥

एवं वानप्रस्थ अतिकष्टीं । तपादिसाधनसंकटीं । भोगफळाशेच्या तुटीं । मोक्षपरिपाटी पावले ॥५०॥ जें हाता आलें मोक्षफळ । आविरिंच्यादि मंगळ । तें तपादिसाधन निर्मळ । कामार्थ केवळ कल्पिती ॥५१॥ जेवीं कां चिंतामणीचियेसाठीं । मागे चातीलागीं खापरखुंटी । कां परीस देवोनि पालटीं । काळी गोमटी वीट मागे ॥५२॥ तेवीं मनुष्यपणाचिये स्थितीं । उत्तम जन्में तपःप्राप्ती । ते तपःक्रिया व्यर्थ करिती । काम वांछिती ते मूर्ख ॥५३॥ त्या मूर्खांचें मूर्खपण । किती सांगावें गा गहन । मोक्षप्राप्तीचें साधन । कामलिप्सा जाण नाशिलें ॥५४॥ असो हें मूर्खाचें कथन । वानप्रस्थाचेंचि लक्षण । पूढील सांगेन संपूर्ण । शस्त्रार्थ जाण सुनिश्चित ॥५५॥ जो वानप्रस्थ आपण । तपादि साधनीं अतिक्षीण । झाला तरी वैराग्यज्ञान । ज्यासी जाण नुपजेचि ॥५६॥ पन्नास वर्षें गार्हस्थ्य । दोनी द्वादशें वानप्रस्थ । झाला तरी जो अप्राप्त । वैराग्ययुक्त निजज्ञाना ॥५७॥ आयुष्याचे तीन भागवरी । वेंचलें गा ऐशापरी । आतां चतुर्थ भाग उरल्यावरी । क्षीण शरीरीं जर्जर ॥५८॥ ऐसें शरीर झालिया क्षीण । अल्पही वैराग्य झाल्या जाण । करावें संन्यासग्रहण । कर्माचरण यथाशक्ती ॥५९॥ वानप्रस्थाश्रमी झाल्याही । निःशेष वैराग्य अल्पही । सर्वथा नुपजे ज्याच्या ठायीं । त्याचा अधिकार पाहीं हरि बोले ॥६०॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

यदासौ नियमेऽकल्पो जरया जातवेपथुः । आत्मन्यग्नीन् समारोप्य मच्चित्तोऽग्निं समाविशेत् ॥११॥

सर्वथा वैराग्य नुठी देहीं । जरा आदळली ठायींचे ठायीं । स्वधर्माचरणीं शक्ति नाहीं । कंप पाहीं सर्वांगीं ॥६१॥ ऐसा वानप्रस्थवनवासी । आत्मसमारोप करूनि अग्नीसी । मातें दृढ ध्याऊनि मानसीं । अग्निप्रवेशीं रिघावें ॥६२॥ वानप्रस्थाश्रमीं वनस्थ । अतिशयें झाला जो विरक्त । त्याची उत्तरविधि समस्त । स्वयें भगवंत सांगतसे ॥६३॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

यदा कर्मविपाकेषु लोकेषु निरयात्मसु । विरागो जायते सम्यङ् न्यस्ताग्निः प्रव्रजेत्ततः ॥१२॥

वानप्रस्थीं अनुष्ठान । तेणें वैराग्य अतिगहन । इंद्रचंद्रादिब्रह्मसदन । निरयासमान जो मानी ॥६४॥ ऐसा दृढ वैराग्यउहठावा । तेणें विहिताग्नि बोळवावा । त्याग करूनि आघवा । अंगीकारावा संन्यास ॥६५॥ ते संन्यासग्रहणस्थिती । यथाशास्त्र यथापद्धती । स्वयें सांगताहे श्रीपती । यथानिगुती विहितार्थे ॥६६॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

इष्ट्वा यथोपदेशं मां दत्वा सर्वस्वमॄत्विजे । अग्नीन्स्वप्राण आवेश्य निरपेक्षः परिव्रजेत् ॥१३॥

अष्टश्राद्धादि विधान । प्राजापत्यनामिष्टिसाधन । मज भगवंतातें यजून । सर्वस्वदान ऋत्विजां ॥६७॥ मुख्यत्वें मूर्त जो अग्नी । तो निजहृदयीं संस्थापूनी । आशा निःशेष छेदूनी । संन्यास करूनी निरपेक्ष ॥६८॥ संन्यास करितेठायीं । विघ्नें अपार उठतीं पाहीं । तीं रगडूनियां पायीं । संन्यास तिंहीं करावा ॥६९॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

विप्रस्य वै संन्यसतो देवा दारादिरूपिणः । विघ्नान्कुर्वन्त्ययं ह्यस्मानाक्रम्य समियात्परम् ॥१४॥

संन्यास करिता जो ब्राह्मण । त्यासी समस्त देव मिळोन । नाना स्त्रियादि रूपें जाण । अनंत विघ्नें करूं येती ॥७०॥ विघ्न करावया कारण । मनुष्य देवांचा पशु जाण । सदा अर्पी बळिदान । देवाअधीन हा सर्वदा ॥७१॥ तो बळी नेदी येथूनि आतां । पाय देऊनि आमुचे माथां । घेऊं पाहे ब्राह्मसायुज्यता । यालागीं सर्वथा विघ्नें करिती ॥७२॥ तेथ वैराग्यबळें तत्त्वतां । विघ्नें हाणूनियां लातां । अवगणूनि देवां समस्तां । संन्यास सर्वथा करावा ॥७३॥ ऐसा वैराग्यें उद्भतट । विवेकज्ञानें अतिश्रेष्ठ । संन्यासग्रहण वरिष्ठ । विधिनिष्ट विभागें ॥७४॥ एवं झाल्या संन्यासग्रहण । त्याचें विधीचें विधिविधान । स्वयें सांगताहे नारायण । स्वधर्मलक्षण संन्यासिया ॥७५॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

बिभृयाच्चेन्मुनिर्वासः कौपीनाच्छादनं परम् । त्यक्तं न दण्डपात्राभ्यामन्यत्किञ्चिदनापदि ॥१५॥

भूतां अभयदानपुरस्कर । संकल्पपूर्वक प्रेषोच्चार । तैं उरलें दिसे देहमात्र । सर्वस्य येर त्यागिलें ॥७६॥ जो गुरुवाक्यश्रवणासरिसा । वस्तूचि हो‍ऊनि ठेला आपैसा । उडाला देहबुद्धिचा वळसा । तुटला फांसा कर्माचा ॥७७॥ त्यासी विधिविधान कर्तव्यता । बोलोंचि नये गा सर्वथा । नवनीत आलिया हाता । रितें ताक आतां कोण घुसळी ॥७८॥ कापूर मिळालिया वन्हीं । तो परतेना कापूरपणीं । तेवीं वस्तु झाला जो गुरुश्रवणीं । तो विधिकिंकरपणीं वर्तेना ॥७९॥ परी गुरुवाक्यें तत्त्वतां । ज्यासी ऐसी हे अवस्था । सत्य न बाणेचि सर्वथा । त्याची विधानता अवधारीं ॥८०॥ गुरुवाक्याचें करितां मनन । नागवेपणीं लाजे मन । तरी लिंगमात्र आच्छादन । कौपीन जाण धरावी ॥८१॥ इतुकेन निर्वाह न सरे । ऐसें जाणवलें जैं पुरें । तैं वस्त्रखंड दुसरें । स्वाधिकारें धरावें ॥८२॥ दंड कमंडलु जंव आहे । तंव कौपीन बहिर्वास राहे । दंडत्यागासवें पाहें । त्याग होये वस्त्रांचा ॥८३॥ आपत्तिकाळीं संन्याशासी । रोग लागला होय ज्यासी । का जरेनें व्यापिलें देहासी । तैं जें लागेल त्यासी तें द्यावें ॥८४॥ गुरुवाक्यें श्रवण मनन । ऐसें साधी जो साधन । त्या साधकाचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥८५॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम् । सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत ॥१६॥

दृष्टि ठायीं ठेवूनि जाण । पृथ्वी पाहूनि पावन । हंसगतीं करी गमन । अनुसंधान निजवृत्तीं ॥८६॥ जेथ जीवसंपदा दृष्टीं पडे । तैं प्राण गेल्या न चले पुढें । जीवांतें काढूनि कडे । पाऊल पडे अतिशुद्ध ॥८७॥ आधींच पवित्र गंगाजळ । त्याचा निर्मळ वस्त्रें निरसोनि मळ । यापरी करोनियां निर्मळ । गंगाजळ सेविती ॥८८॥ ज्याचे वाचेचे आळां । असत्याच्या तृणशाळा । जाळूनि वैराग्यज्वाळा । सत्याचा उगवला कल्पद्रुम ॥८९॥ ज्या कल्पद्रुमाचीं वचनफळें । परिपक्वे आणि सोज्वळें । मधररसेंसीं रसाळें । अतिनिर्मळें घमघमितें ॥९०॥ जें श्रवणीं अतिगोड । पुरवी श्रोतयांचें कोड । निववी जीवाची चाड । सत्य सुरवाड हा वाचेचा ॥९१॥ सहजें संन्याशाचें ध्यान । `अहमेव नारायण' । तें दृढ धरोनि अनुसंधान । पवित्र मन करावें ॥९२॥ मन करोनि पावन । पृथ्वी विचरावी जाण । त्या मनाचें पवित्रपण । सर्वत्र आपण लक्षावें ॥९३॥ संन्याशाचे धर्मीं जाण । मुख्यत्वें हेंचि लक्षण । पवित्र करोनि अंत:करण । सर्वत्र नारायण लक्षावा ॥९४॥ मनाचें पवित्रपण । उद्धवा या नांव जाण । आतां त्रिदंडाचें लक्षण । संन्यासनिरूपण तें ऐक ॥९५॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

मौनानीहानिलायामा दण्डा वाग्देहचेतसाम् । न ह्येते यस्य सन्त्यङ्ग वेणुभिर्न भवेद्यतिः ॥१७॥

मौन अथवा सत्य भाषण । कां श्रीरामनामाचें स्मरण । हो कां ओंकाराचें उच्चारण । `वाग्दंड' जाण या नांव ॥९६॥ शरीरींचे जितुकें चळण । तें प्राणाचेनि बळें जाण । त्या प्राणाचें प्राणरोधन । करावें आपण प्राणायामें ॥९७॥ प्राणायामें निजप्राण । जिणोनि करावा स्वाधीन । या नांव `देहदंड' जाण । ऐक लक्षण `मनोदंडाचें' ॥९८॥ मनाचें चपळपण । संकल्प विकल्प जाण । त्याचें करावया छेदन । ब्रह्मानुसंधान करावें ॥९९॥ माझें स्वरूप सर्वगत । तेथ निश्चयें ठेवितां चित्त । मन संकल्पविकल्पें जाय जेथ । तेथ तेथ स्वरूप ॥१००॥ ऐसें सावध राखतां मन । दृढ लागल्या अनुसंधान । तंव संकल्पविकल्प क्षीण । सहजचि जाण स्वयें होती ॥१॥ देह वाचा आणि मन । या त्रिदंडांचें लक्षण । तुज म्यां सांगितले संपूर्ण । संन्यासत्व जाण येणें सत्य ॥२॥ हे तिन्ही दंड नसतां जाण । केवळ वेणुदंडग्रहण । तेणें संन्यासत्व न घडे जाण । देहविटंबन दंभार्थ ॥३॥ सन्याशाचा आहार विहार । आचार संचार विचार । स्वधर्मयुक्त साचार । स्वयें सारंगधर सांगतु ॥४॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

भिक्षां चतुर्षु वर्णेषु विगर्ह्यान्वर्जयंश्चरेत् । सप्तागारानसंक्लृप्तांस्तुष्येल्लब्धेन तावता ॥१८॥

पूर्वी जाण संन्याशासी । चतुर्वर्णीं भिक्षा होती त्यासी । कलियुगीं गोष्टी झाली कैसी । ब्राह्मणापाशीं चतुर्वर्ण ॥५॥ ज्याची जीविका जेणें जाण । त्या ब्राह्मणाचा तोचि वर्ण । ऐका तेंही प्रकरण । जीविकालक्षण सांगेन ॥६॥ `मुख्य ब्राह्मणाची वृत्ती' जाण । `शिल' `उंछ' का `कोरान्न' । अयाचित का अध्यापन । अथवा याजन जीविकेसी ॥७॥ जो जीविकेलागीं निर्धारीं । शस्त्र घेऊनियां करीं । शूरवृत्तीं जीविका करी । तो जाणावा `क्षत्री' ब्राह्मणांमाजीं ॥८॥ जो वाणिज्यवृतीवरी । नित्य जीविका आपुली करी । तो ब्राह्मण ब्राह्मणामाझारीं । `वैश्य' निर्धारीं निश्चित ॥९॥ जो शूद्राचे शूद्रक्रियेवरी । सदा सर्वदा जीविका करी । तो ब्राह्मण शूद्रकर्मेंकरीं । `शूद्रत्व' धरी क्रियायोगें ॥११०॥ जैं उत्तम ब्राह्मणाची भिक्षा न लभे । तैं क्षत्रियब्राह्मणीं भिक्षा लाभे । क्षात्रब्राह्मणांचेनि अलाभें । वैश्यादि ब्राह्मणीं लाभे भिक्षाग्रहण ॥११॥ ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्यब्राह्मणीं । भिक्षेस अप्राप्त हे तिनी । तैं शूद्रजीविका-ब्राह्मणीं । भिक्षाग्रहणीं अधिकारु ॥१२॥ यांत निंद्य जे ब्राह्मणाआंतु । केवळ दोषी अथवा अभिशप्तु । ते भिक्षेसी न लावावा हातु । हा स्वधर्मार्थु भिक्षेचा ॥१३॥ तेही भिक्षा अतिनेमस्त । भिक्षेसी येतों हें कळों नेदित । मागावीं नेमिलीं घरें सात । जें झालें प्राप्त तेणें सुखी ॥१४॥ जे सातां घरीं भिक्षा प्राप्त । ते भिक्षेचा धर्म विहित । स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । स्मृतिशास्त्रार्थप्रयोगें ॥१५॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

बहिर्जलाशयं गत्वा तत्रोपस्पृश्य वाग्यतः । विभज्य पावितं शेषं भुञ्जीताऽशेषमाहृतम् ॥१९॥

ग्रामाबाहेर गंगातीरीं । अथवा तडागाचे परिसरीं । भिक्षा धरोनियां करीं । आचमन तीरीं करावें ॥१६॥ याचित जें भिक्षेचें अन्न । तें द्वादशप्रणवें अभिमंत्रून । तेणें मंत्रोदकें प्रोक्षीतां जाण । होय पावन पवित्र ॥१७॥ चतुर्धा करावें त्या अन्नातें । चार अधिकारी त्या भागतें । ब्रह्मा विष्णु अर्क आणि भूतें । अर्पण तेथें अवधारीं ॥१८॥ विष्णुकल्पित जो भाग । तो जळीं घालावा साङ्ग । भूतकल्पित जो विभाग । तो पृथ्वीवरी चांग ठेवावा ॥१९॥ उरले जे विभाग दोनी । यतीसी अधिकार सेवनीं । दीन मागों आलिया ते क्षणीं । भूतदयागुणीं अन्न द्यावें ॥१२०॥ परी मी एक अन्नदाता । हें आठवोंही नये चित्ता । आल्या दातेपणाची अहंता । अधर्मता संन्यासीं ॥२१॥ मधुकरीचें अवघेंचि अन्न । समयीं मागों येती दीन । येणें उद्देशें अधिक अन्न । सर्वथा जाण मागों नये ॥२२॥ करितां मधुकरीभोजन । ठायीं अधिक उरलिया अन्न । तें सांडितां अतिपतन । अवघेंच जाण भक्षावें ॥२३॥ संन्यासधर्मीं लघु आहार । नित्य करावा निरंतर । अधिक आहारीं विकार । निद्रा आळस फार बाधिती ॥२४॥ ज्यालागीं कीजे चतुर्थाश्रम । तो संन्याशाचा मुख्य धर्म । स्वयें सांगे पुरुषोत्तम । जेणें आत्माराम पाविजे ॥२५॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

एकश्चरेन्महीमेतां निःसङ्गः संयतेन्द्रियः । आत्मक्रीड आत्मरत आत्मवान् समदर्शनः ॥२०॥

सदा वैराग्य अंगीं पुरतें । जो अपेक्षीना सांगात्यातें । निःसंग होत्साता चित्तें । सुखें पृथ्वीतें विचरतु ॥२६॥ इंद्रियें बांधोनि चित्ताच्या पायीं । चित्त लावी चैतन्याच्या ठायीं । तेणें चिन्मात्र ठसावें पाहीं । देहत्व देहीं स्मरेना ॥२७॥ ऐसा आत्मस्थितीचा उद्यम । तेणें आत्मक्रीडेचा आराम । आत्मसुखाचा संभ्रम । अनुभव परम तो ऐक ॥२८॥ आत्मस्थिति निजात्मयुक्त । तेणें आत्मसुखें उल्हासत । सदा समदर्शनें डुल्लत । वोसंडत समसाम्यें ॥२९॥ ऐशिया समसुखाची संपत्ती । भोगावया सुनिश्चितीं । सदा एकाकी वसे एकांतीं । तेंचि श्रीपती सांगत ॥१३०॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

विविक्तक्षेमशरणो मद्भा-वविमलाशयः । आत्मानं चिन्तयेदेकमभेदेन मया मुनिः ॥२१॥

पवित्र आणि विजन । प्रशस्त आणि एकांतस्थान । तेणें माझें अनुसंधान । सद्भािवें जाण सर्वदा ॥३१॥ तेथें सांडून जनपद दुश्चित । सदा एकांतीं व्हावें निरत । मद्भा वें सुनिश्चित । आत्मसुख प्राप्त साधकां ॥३२॥ ज्यासी निजात्मसुख झालें प्राप्त । तो होय अनन्यशरणागत । मीवांचूनि जगाआंत । आणीक अर्थ देखे न ॥३३॥ ऐसे अनन्य करितां माझें ध्यान । साधक विसरे मीतूंपण । तेव्हां अभेदें चैतन्यघन । मद्‌रूप जाण तो होय ॥३४॥ त्या मद्‌रूपाचे स्वरूपस्थिती । पाहों जातां निजात्मवृत्ती । मी ना तो ऐशी होय गती । `अभेदप्राप्ती' या नांव ॥३५॥ जंव असे द्वैतवार्ता । तंव भयाची बाधकता । अभेदत्व आल्या हाता । निर्भयता साधकां ॥३६॥ अभेदप्राप्तीच्या ठायीं । बंधमोक्षांची वार्ता नाही । गडगर्जे बंधमोक्ष पाहीं । नांदती नवायी हरि बोले ॥३७॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

अन्वीक्षेतात्मनो बन्धं मोक्षं च ज्ञाननिष्ठया । बन्ध इन्द्रियविक्षेपो मोक्ष एषां च संयमः ॥२२॥

ऐक्यें पावोनि एकात्मता । तेथूनि बंधमोक्ष पाहतां । दोंहीची मिथ्या वार्ता । मायिकता निश्चित ॥३८॥ प्रवृत्तीमाजीं बंधमोक्षता । त्या दोंहीची विभागता । इंद्रियांची जे विषयासक्तता । `दृढबद्धता' ती नांव ॥३९॥ काया-वाचा-चित्तवृत्तीं । निःशेष विषयांची विरक्ती । या नांव साचार `मुक्ति' । जाण निश्चितीं उद्धवा ॥१४०॥ ज्यासी साचार पाहिजे मुक्ती । तेणें करावी विषयनिवृत्ती । हेचि मुख्यत्वें उपायस्थिती । कृष्ण कृपामूर्ती सांगत ॥४१॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

तस्मान्नियम्य षड्वर्गं मद्भाकवेन चरेन्मुनिः । विरक्तः क्षुल्लकामेभ्यो लब्ध्वाऽऽत्मनि सुखं महत् ॥२३॥

येणें विचारें विचारिता । विषयासक्ती दृढबद्धता । त्या विषयांचा त्याग करितां । निजमुक्तता सहजेंचि ॥४२॥ तेचि विषयांची विरक्ती केवीं । आतुडे आपुल्या हातीं । यालागीं वैराग्याची उत्पत्ती । साधकें निश्चितीं साधावी ॥४३॥ अंतरीं वासना दृढमूळ । विषयशाखा तेणें सबळ । ते वासना छेदावया समूळ । वैराग्य सबळ साधावें ॥४४॥ वैराग्यप्राप्तीचें कारण । स्वधर्मकर्म मदर्पण । सांडावें कर्माचें कर्तेपण । `मदर्पण' या नांव ॥४५॥ मदर्पणें कर्मस्थिती । तेणें माझ्या ठायीं उपजें प्रीती । माझें नाम माझी कीर्ती । चिंतन चित्तीं पैं माझें ॥४६॥ ऐशिया माझ्या परम प्रीतीं । होय वैराग्याची उत्पत्ती । तेणें विषयांची विरक्ती । माझी सुखप्राप्ती शनैःशनैः ॥४७॥ माझेनि सुखें माझें भजन । अत्यंत थोरावे पैं जाण । तेव्हा सर्वत्र मद्भाजवन । ब्रह्मत्वें पूर्ण ठसावे ॥४८॥ सर्वत्र ब्रह्मभावन । ब्रह्मसुखाचें अनुसंधान । धरूनि करावें पर्यटण । जंव निर्वासन मन होय ॥४९॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

पुत्रग्रामव्रजान् सार्थान् भिक्षार्थं प्रविशंश्चरेत् । पुण्यदेशसरिच्छैलवनाश्रमवतीं महीम् ॥२४॥

पृथ्वी विचरणें विचित्र । पुण्यदेश कुरुक्षेत्र । सप्त पुर्याण परम पवित्र । पुष्करादि थोर महातीर्थें ॥१५०॥ कृतमाला पयस्विनी । पुण्यरूप ताम्रपर्णी । गौतमी रेवा त्रिवेणी । परमपावनी गोमती ॥५१॥ कृष्णा वेण्या तुंगभद्रा । तपती पयोष्णी भिंवरा । यमुना भागीरथी नीरा । गंगा सागरासंगमीं ॥५२॥ ऋष्यमूक श्रीशैल व्यंकटाद्री । मूळपीठींचा सह्याद्री । गौतमीतीरींचा ब्रह्मगिरी । जो पापें संहारी यात्रामात्रें ॥५३॥ हो कां चढता हिमगिरी । पदीं दुरितांतें दूर करी । निःशेष पापांतें निवारी । ते यात्रा मुनीश्वरीं अवश्य कीजे ॥५४॥ दंडकारण्य बृहद्वन । नैमिषारण्य आनंदवन । इत्यादि वनांचें गमन । संन्याशीं जाण करावें ॥५५॥ च्यवनकपिलव्यासाश्रम । गौतमवामनआ श्रमोत्तम । यात्रा श्रेष्ठ बदरिकाश्रम । जो सकळ कर्मदाहकु ॥५६॥ ऐशीं स्थळें जीं पावन । तेथें संन्याशियें करावें गमन । मार्गीं भिक्षार्थ जें अटन । तेंही निरूपण अवधारीं ॥५७॥ हाट हाटवटिया अति उत्तम । त्यातें `पुर' म्हणती नरोत्तम । हाटहाटवटियाहीन तो `ग्राम' । भिक्षेचा नेम सारवा तेथें ॥५८॥ गायीगौळियांचें निवासस्थान । `व्रत' त्यातें म्हणती जाण । `सार्थ' म्हणिजे पव्हा संपूर्ण । भिक्षार्थ अटन करावें तेथें ॥५९॥ पवित्र भिक्षेचे प्राप्तीकारणें । संन्यासीं अवश्य जाणें । तेचि अर्थींचें निरूपणें । स्वयें श्रीकृष्ण सांगिजे ॥१६०॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

वानप्रस्थाश्रमपदेष्वभीक्षणं भैक्ष्यमाचरेत् । संसिद्धयत्याश्वसंमोहः शुद्धसत्त्वः शिलान्धसा ॥२५॥

शुद्ध व्हावया अंतर । वानप्रस्थाश्रमी जो नर । जाऊनि ठाकावें त्याचें द्वार । अतिसादर भिक्षार्थ ॥६१॥ सेवितां सात्त्विकाचे अन्नासी । शुद्धसत्त्वता साधकासी । तत्काळ होय ग्रासोग्रासीं । शुद्ध अन्नासी हा महिमा ॥६२॥ यालागीं वानप्रस्थाचें द्वार । ठाकोनिजावें वारंवार । तेणें सत्त्वशुद्धि अनिवार । होय साचार साधकां ॥६३॥॥६३॥i शुद्ध भिक्षेचिये प्राप्ती । सत्त्वशुद्ध होय वृत्ती । तेणें वासना निःशेष नासती । निजशांती उल्हासे ॥६४॥ वासना नासल्या निलाग । तो सत्यत्वें न देखे जग । विषयासक्ति कैंची मग । सहज विराग उद्भ ट ॥६५॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

नैतद्वस्तुतया पश्येद् दृश्यमानं विनश्यति । असक्तचित्तो विरमेदीहामुत्र चिकीर्षितात् ॥२६॥

येथ जें जें दिसे नासे । हें सर्वांसी प्रत्यक्ष आभासे । परी अज्ञानें भुलले कैसे । विषयविलासें गुंतोनी ॥६६॥ यालागीं शुद्ध भिक्षेचिये प्राप्ती । ज्याची शुद्धसत्व झाली वृत्ती । त्यासी विषय सत्यत्वें न दिसती । मा विषयासक्ती तेथें कैंची ॥६७॥ ऐसें मिथ्या विषयांचें भान । त्याचें विषयासक्त नव्हे मन । यालागीं भवस्वर्गसाधन । दोन्ही तो जाण स्पर्शेना ॥६८॥ ऐसा जो विषयविरक्त । त्याचें परमार्थीं लागे चित्त । तो जगीं विचरे अनासक्त । परमार्थयुक्त निजबोधें ॥६९॥ त्याच्या निजबोधाचें लक्षण । स्वयें सांगताहे नारायण । प्रपंचाचें मिथ्यापण । समाधान निजात्मता ॥१७०॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

यदेतदात्मनि जगन्मनोवाक्क्ष्प्रा-णसंहतम् । सर्वं मायेति तर्केण स्वस्थस्त्यक्त्वा न तत्स्मरेत ॥२७॥

मनसा-वाचा-प्राणप्रवाहीं । अहंकारकृत उभयदेहीं । जग आत्म्याच्या ठायीं । मिथ्या मायिक पाहीं आभासे ॥७१॥ दोराअंगीं सर्पाभास । शुक्तिकेमाजीं रजतप्रकाश । उखरीं मृगजळाचा विलास । तैसा जगदाभास चिन्मात्रीं ॥७२॥ जैसा स्वप्नींचा व्यवहार । तैसें भासे चराचर । ऐसें मिथ्या जाणोनि साचार । पुढती स्मरणादर स्फुरेना ॥७३॥ जो जागा झाला इत्थंभूत । तैं स्वप्नभोग न वांछी चित्त । तेवीं स्वरूपीं जो सुनिश्चित । तो प्रपंचजात स्मरेना ॥७४॥ त्रिदंडी बहूदकाचें कर्म । तुज म्यां सांगितलें सुगम । आता हंस परमहंसांचे धर्म । यथानुक्रम अवधारीं ॥७५॥ संन्यास चतुर्विध देख । `हंस' `परमहंस' एक । एक तो `बहूदक' । `कुटीचक' तयासी बोलिजे ॥७७॥ वार्धकीं कुटीचकाची परी । अग्निहोत्र-स्त्रियेचा त्याग करी । परी शिखासूत्र न अव्हेरी । गायत्रीमंत्रीं अधिकारु ॥७८॥ नित्य भिक्षा पुत्राचे घरीं । पर्णकुटी बांधे त्याचे द्वारीं । मठिका सांडोनि न वचे दूरी । `कुटीचक' निर्धारीं या नांव ॥७९॥ शिखासूत्र त्यागोनि जाण । करूनि त्रिदंडांचें ग्रहण । केवळ करी कर्माचरण । ज्ञानाचें लक्षण जाणेना ॥१८०॥ नाहीं वैराग्य वरिष्ठ । न दिसे ज्ञाननिष्ठा श्रेष्ठ । अतिशयेंसीं जो कर्मिष्ठ । `बहूदक' ज्येष्ठ त्यासी म्हणती ॥८१॥ जो कां वैराग्याच्या निर्धारीं । ज्ञानसाधनार्थ विचारी । शिखासूत्रकर्मत्याग करी । आत्मचिंतनावरी निजनिष्ठा ॥८२॥ ऐसा जो त्यागविलास । या नांव `विविदिषा' संन्यास । ऐशिया निष्ठें वर्ते तो `हंस' । एक `परमहंस' हा म्हणती ॥८३॥ ऐक परमहंसाचें लक्षण । ज्ञानपरिपाकें परिपूर्ण । अतएव शांति वोळंगे आंगण । देखे तिन्ही गुण मिथ्यात्वें ॥८४॥ मिथ्या जाणे कर्माची वार्ता । आपुली देखे नित्य निष्कर्मता । कर्मक्रिया जो कर्तव्यता । ते प्रकृतीचे माथां प्रारब्धें ॥८५॥ ऐशिया स्थितीं सावकाश । त्या नांव जाण `परमहंस' । नाहीं मठ मठिका विलास । नित्य उदास निराश्रयी ॥८६॥ आतां हंस-परमहंसांचे धर्म । स्वयें सांगताहे पुरुषोत्तम । त्या धर्माचें विशद वर्म । ऐक सुगम उद्धवा ॥८७॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

ज्ञाननिष्ठो विरक्तो व मद्भलक्तो वाऽनपेक्षकः । सलिङ्गानाश्रमांस्त्यक्त्वा चरेदविधिगोचरः ॥२८॥

विषयांची नावडे मातु । ज्ञानप्राप्तीलागीं उद्यतु । यापरी जो अतिविरक्तु । तो संन्यास बोलिजेतु मुख्यत्वें ॥८८॥ जो ज्ञाननिष्ठा अतिसंपन्न । सदा स्वरूपीं रंगलें मन । कदा न मोडे अनुसंधान । परमहंसासमान हा हंस ॥८९॥ ज्यासी करितां भगवद्भ।क्ती । अपेक्षामात्राची झाली शांती । मोक्षापेक्षा नुपजे चित्तीं । हे संन्यासपद्धती अतिश्रेष्ठ ॥१९०॥ ज्ञाननिष्ठ कां मद्भचक्त । इहीं आश्रमधर्म दंडादियुक्त । त्याग करावा हृदयीं समस्त । बाह्य लोकरक्षणार्थं राखावे ॥९१॥ येचि अर्थींचें निरूपण । पुढें सांगेल श्रीकृष्ण । प्रस्तुत त्यागाचें लक्षण । ऐक संपूर्ण हरि बोले ॥९२॥ आश्रमधर्म समस्त करी । परी विधिकिंकरत्व तो न धरी । प्रतिबिंब कांपतां जळांतरी । आपण बाहेरी कांपेना ॥९३॥ तेवीं स्वधर्मकर्म कर्तव्यता । करी परी नाहीं कर्मठता । आपुली कर्मातीतता । जाणे तत्त्वतां निजकर्मी ॥९४॥ यापरी स्वधर्मकर्म करी । परी विधीचें भय तो न धरी । विधिनिषेध घालून तोडरीं । कर्मे करी अहेतुक ॥९५॥ जो नातळे स्वाश्रमकर्मगती । दंडादि लिंग न धरी हातीं । ऐसिया सर्वत्यागाची स्थिती । पुढें श्रीपती सांगेल ॥९६॥ प्रस्तुत हेंचि निरूपण । लोकरक्षणार्थ लिंगधारण । अंतरीं जो निष्कर्म जाण । त्याचे लक्षण हरी बोले ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

बुधो बालकवत् क्रीडेत् कुशलो जडवच्यरेत् । वदेदुन्मत्तवद्विद्वान् गोचर्यां नैगमश्चरेत् ॥२९॥

विवेकज्ञान शुद्ध आहे । परी बाळकाच्या परी पाहे । मानापमान सुखें साहे । सांडोनि सोये देहाभिमानाची ॥९८॥ निजनैष्कर्में अतिकुशल । परी कर्मजडाऐसा केवळ । कर्में आचरे तो सकळ । कोठेंही विकळ दिसों नेदी ॥९९॥ जाणे धर्माधर्मलक्षण । सर्वार्थीं अतिसज्ञान । परी न करी प्रश्नसमाधान । अप्रमाणिक जाण स्वयें बोले ॥२००॥ करितां प्रश्नसमाधान । लौकिकीं वाढेल सन्मान । यालागीं साक्षेपें जाण । उन्मत्त वचन स्वयें बोले ॥१॥ वेदतत्त्वार्थ विहित जाणे । तें लौकिकीं नाहीं मिरवणें । सकळिकीं मूर्खाचि म्हणणें । तैशीं `पशु' लक्षणें स्वयें दावी ॥२॥ यालागीं वेदवादसंवाद । न करी वाद अतिवाद । येचि अर्थीं अतिविशद । स्वयें गोविंद सांगत ॥३॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

वेदवादरतो न स्यान्न पाषण्डी न हैतुकः । शुष्कवादविवादे न कञ्चित्पक्षं समाश्रयेत् ॥३०॥

धरोनियां मीमांसकमत । कर्मकांडींचे शास्त्रार्थ । नानावाद कर्मार्थ । न करी निश्चित निजबोधें ॥४॥ तार्किकाचे अतितर्क । तर्क वितर्क कुतर्क । हेही वाद करीना देख । निजात्मसूख जो जाणे ॥५॥ बाहेरी ब्रह्मज्ञानें गर्जे तोंड । भीतरीं विषयवासना उदंड । ऐसे महावादी प्रचंड । अतर्क `पाखंड' त्या नाव ॥६॥ नसोनि ब्रह्मानुभव साचार । जो उच्छेदी निजाचार । तो केवळ पाखंडी नर । उदरंभर दुःशील ॥७॥ ऐशिया वादाचा विटाळ । ज्याचे वाचेसी नाहीं अळुमाळ । न लगे असत्याचा समूळ मळ । नित्य निर्मळ निजबोधें ॥८॥ `शुष्कवाद' ज्या वृथा गोष्टी । त्यांतही वाग्वाद उठी । होय नव्हे कपाळपिटी । मिथ्या चावटी करीना ॥९॥ ऐशिया विवादाची कथा । दृष्टीं न पाहे निजज्ञाता । मा स्वयें करील ऐशा वार्ता । हें सर्वथा घडेना ॥२१०॥ होतां शास्त्रार्थमहावाद । देतां युक्तीचे प्रतिबाध । तेथ न करी पक्षपात शुद्ध । जाणे परी शब्द बोलेना ॥११॥ श्रुतिस्मृतींसीं विरूद्ध । होतां देखे अतिवाद । स्वयें जाणे शास्त्रार्थ शुद्ध । परी पक्षपात करीना ॥१२॥ वाग्वादीं बोलतां जाण । दुखवेल पुढिलांचें मन । कां क्षोभेल स्वांतःकरण । यालागीं वचन बोलेना ॥१३॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

नोद्विजेत जनाद्धीरो जनं चोद्वेजयेन्न तु । अतिवादांस्तितिक्षेत नाममन्येत कञ्चन ॥३१॥

जनापासोनि उद्वेगगती । ज्ञाता न पवे सर्वथा चित्तीं । निंदा अवगणना अपमानिती । ते आत्मस्थितीं स्वयें साहे ॥१४॥ जन जे जे उपद्रव देती । ज्ञाता साहे ऐशिया रीतीं । मीचि आत्मा एक सर्व भूतीं । यालागीं खंती मानीना ॥१५॥ आपुलिया अवयवविकारता । उद्वेग नुपजें जेवीं चित्ता । तेवीं सर्वांभूतीं एकात्मता । जाणून तत्त्वतां उबगु न मनी ॥१६॥ तैसेंचि ज्याचिया स्थितीं । भूतें उद्वेग न मानिती । ज्याचिया निजाचारगतीं । सुखी होती जीवमात्र ॥१७॥ सर्व भूतीं भगवंत आहे । झणें त्यासी उपद्रव होये । यालागीं वागवितां हातपाये । सावध राहे निजदृष्टीं ॥१८॥ थोर देतां आरोळी । झणें दचकेल वनमाळी । कां नेटें भवंडितां जपमाळी । देवाचे कपाळीं झणें लागे ॥१९॥ यालागीं करचरणांच्या चेष्टा । आवरोनियां निजात्मनिष्ठा । भूतीं लागों नेदी झटा । झणें वैकुंठा उपद्रव लागे ॥२२०॥ ऐसिऐशिया निजात्मगती । उद्वेग उपजों नेदी भूतीं । तेथ वाग्वादाची गती । कैशा रीतीं संभवे ॥२१॥ सर्वभूतीं भूतात्म ईश्वर । यालागीं उंच न बोले उत्तर । तेथ अतिवाद्यासी समोर । सर्वथा अधर उचलीना ॥२२॥ पडल्या जीवसंकट प्राणांतीं । अपमान न करावे कोणे व्यक्ती । अपमानीना भूताकृती । सर्वांभूतीं हरी देखे ॥२३॥ जनास्तव उद्वेगता । कदाकाळीं न पवे ज्ञाता । ज्ञात्यापासोनि उद्वेगता । नव्हे सर्वथा जनासी ॥२४॥ ऐशी निजात्मस्थिती साचार । तो कोणासीं न करी वैर । येचि अर्थीं शारंगधर । विशद उत्तर सांगत ॥२५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

देहमुद्दिश्य पशुवद् वैरं कुर्यात्र केनाचित् । एक एवपरो ह्यात्मा भूतेष्वात्मन्यवस्थितः ॥३२॥

केवळ पशूचियापरी । हो‍ऊनियां देहअ हंकारी । कोणासी वैर न करी । तेही परी परीयेंसी ॥२६॥ प्रकृति-पर चिदात्मा आहे । तोचि सर्वांभूतीं भूतात्मा पाहे । मजमाजींही तोचि राहे । ऐशी सर्व भूतीं एकात्मता जो ॥२७॥ त्यासी कोण आप्त कोण इतर । कोणासी करावें वैर । सर्व भूतीं मीचि साचार । निरंतर निजात्मा ॥२८॥ एक आत्मा सर्व भूतांत । येचि अर्थींचा दृष्टांत । स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । श्रोता सावचित्त उद्धव ॥२९॥ यथेन्दुरुदपात्रेषु भूतान्येकात्मकानि च ।


y----------------------------------

एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

अलब्ध्वा न विषीदेत काले कालेऽऽशनं क्वचित् । लब्ध्वा न हृष्येद्धृतिमानुभयं दैवतंत्रितम् ॥३३॥

सहस्त्र घटीं भरल्या जळ । बिंबे एकचि चंद्रमंडळ । तेवीं निजात्मा एक केवळ । भूतीं सकळ भूतात्मा ॥२३०॥ देखे भूताकृति ज्या भिन्न । त्याही परमकारणीं अभिन्न । जेवीं अळंकारीं सुवर्ण । आकारींहीं जाण भिन्नत्वं नाहीं ॥३१॥ जेवीं मृत्तिकेचीं गोकुळें केलीं । नानाकारीं पूज्य झालीं । परी ते मृतिकाचि संचली । तेवीं भूतें भासलीं भगवंतीं ॥३२॥ का विणोनियां सुतें सुत । शेला परकळा पातळ म्हणत । तैशी वस्तूचि वस्तुत्वें येथ । साकार भासत भवरूपें ॥३३॥ एवं साकार निराकार । उभयतां ब्रह्मचि साचार । ऐसा ज्याचा ज्ञाननिर्धार । त्याचा `आहार' तूं ऐक ॥३४॥ आहार न मिळे जिये काळीं । दुःखी नव्हे तिये वेळीं । अन्नालागीं न तळमळी । धारणाबळीं बलिष्ठ ॥३५॥ आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म । दैवाधीन जाणे वर्म । निजकर्मप्राप्तीसी ॥३६॥ एवं प्राप्ताप्राप्ताची कथा । जाणे दैवाधीन तत्त्वता । यालागीं हर्षविषादता । त्याचे चित्ता स्पर्शेना ॥३७॥ दैवाधीन प्राप्ती प्राणियांसी । ऐसे सत्य कळलें ज्यासी । तैं भिक्षेसी कां हिंडणें म्हणसी । तेंचि हृषीकेशी सांगत ॥३८॥


एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

आहारार्थं समीहेत युक्तं तत्प्राणधारणम् । तत्त्वं विमृश्यते तेन तद्विजाय विमुच्यते ॥३४॥

पाळावया आश्रमधर्मासी । अवश्य हिंडावें भिक्षेसी । मधुकरी संन्याशांसी । स्वधर्मासी अतिविहित ॥३९॥ साधकां तरी आहारार्थ । अवश्य हिंडावें लागे येथ । आहारेंवीण त्यांचें चित्त । विक्षेपभूत हों पाहे ॥२४०॥ तिंहीं रसासक्ति सांडून । भिक्षेसी करावा प्रयत्न । आहारेंवीण त्यांचें मन । अतिक्षीण सर्वार्थीं ॥४१॥ साधकांसी आहारेंवीण । न संभवे श्रवण मनन । न करवे ध्यान चिंतन । अनुसंधान राहेना ॥४२॥ संन्याशांसी ध्यान न घडे । तैं आश्रमधर्माचें तारूं बुडे । यालागीं भिक्षेसी रोकडें । हिंडणें घडे हितार्थ ॥४३॥ मिळावें मिष्टान्न गोड । हे सांडूनि रसनाचाड । करावें भिक्षेचें कोड । परमार्थ दृढ साधावया ॥४४॥ आहार घेतलिया जाण । साधकांसी घडे साधन । साधन करितां प्रकटे ज्ञान । ज्ञानास्तव जाण निजमोक्ष लाभे ॥४५॥ सर्वथा न वांछावें मिष्टान्न । तरी भिक्षा मागावी कोण । ऐसें कांहीं कल्पील मन । तेंचि श्रीकृष्ण सांगत ॥४६॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

यदृच्छयोपपन्नान्नमद्याच्छ्रेष्ठमुताऽपरम् । तथा वासस्तथा शय्यां प्राप्तं प्राप्तं भजेन्मुनिः ॥३५॥

सहज भिक्षेसी आलें जाण । शुष्क अथवा मिष्टान्न । तेणें करावें प्राणधारण । रसनालालन सांडोनि ॥४७॥ निद्रालस्याचें न ये प्रस्थान । तैसें करावें प्राणधारण । दृढ ठसावें आसनध्यान । `युक्ताहार' जाण या नांव ॥४८॥ वल्कल अथवा अजिन । नवें अथवा वस्त्र जीर्ण । सहजें प्राप्त झाल्या जाण । करी प्रावरण यथासुखें ॥४९॥ कंथा हो कां मृदु आस्तरण । तृणशय्या कां भूमिशयन । स्वभावें प्राप्त झाल्या जाण । तेथही शयन करी मुनि ॥२५०॥ मी एक भोक्ता शयनकर्ता । हेही नाहीं त्यासी अहंता । स्नानादि कर्मीं वर्ततां । त्याची निरभिमानता हरि सांगे ॥५१॥


एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

शौचमाचमनं स्नानं न तु चोदनया चरेत् । अन्यांश्च नियमान् ज्ञानी यथाहं लीलयेश्वरः ॥३६॥

आचमन स्नान शौचाचार । करितां नव्हे विधिकिंकर । कर्माभिमानाची मोडली थार । जैसा मी अवतार तैसा तो ॥५२॥ जैसा मी `लीलावतार' धरीं । अलिप्तपणें कर्में करीं । तैसीचि जाण योग्याची परी । सर्व कर्माचारीं अलिप्त ॥५३॥ ज्यासी विधींचें भय नाहीं पोटीं । तो कर्में करावया कदा नुठी । तेचि विखींची विशद गोठी । कृष्ण जगजेठी सांगता ॥५४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा

न हि तस्य विकल्पाख्या या च मद्वीक्षया हता । आदेहान्तात्क्वचित्ख्यातिस्ततः संपद्यते मया ॥३७॥

कर्म करणें न करणें । ऐशिया संदेहाचें ठाणें । पळालें माझेनि दर्शनें । संकल्पाचें जिणें निमालें ॥५५॥ संकल्पु निमतांचि पोटीं । विराली लिंगदेहाची गांठी । भेदाची हारपली त्रिपुटी । मी परमात्मा दिठीं देखतां ॥५६॥ ज्यासी नाहीं भेदाचें भान । त्याचे देहाचें भरण पोषण । स्नान-भोजन-शयन । गमनागमन केवीं घडे ॥५७॥ जो जिणोनियां विकल्पभ्रांती । त्रिशुद्धिं मिसळला अद्वैंतीं । त्याचे देहाची स्थितिगती । प्रारब्धाहातीं निश्चित ॥५८॥ वृक्ष समूळ उपडलिया पाहें । परी सार्द्रता वृक्षीं राहे । तांबूल खाऊनियां जाये । तरी अधरीं राहे सुरंगात ॥५९॥ हो कां कन्यादान केल्या पाहें । वरु कन्याही घेउनि जाये । तरी उगा मान उरला राहे । रुसणें न जाये देहान्त ॥२६०॥ तैसा अभिमानाचेनि सळें । मी कर्मकर्ता म्हणवीं बळें । ते अहंता निमे ज्ञानबळें । तरी शरीर चळे प्रारब्धें ॥६१॥ कुलाल दंड भांडें घेऊनि जाये । पूर्वभवंडीं चक्र भंवत राहे । तेवीं अभिमान गेलिया पाहें । देह वर्तताहे प्रारब्धें ॥६२॥ त्या देहाचें भरणपोषण । प्रारब्धचि करितें जाण । ज्ञात्यासी प्रपंचाचे भान । सत्यत्वें जाण असेना ॥६३॥ जैशी मिथ्या छाया देहापाशीं । तैसें देह दिसे सज्ञानासी । यालागीं देहबुद्धि त्यासी । सत्यत्वेंसीं उपजेना ॥६४॥ छाया सुखासनामाजीं बैसे । कां विष्ठेवरी पडली दिसे । त्या छायेचे अभिमानवशें । सुखदुःख नसे पुरुषासी ॥६५॥ तेवीं देहाची ख्यातिविपत्ती । बाधीना सज्ञानाचे स्थितीं । प्रारब्धक्षयाचे अंतीं । विदेह पावती कैवल्य ॥६६॥ जैशी जळाची लहरी । निश्चळ होय सागरीं । तैसा ज्ञाता मजमाझारीं । विदेह करी समरसें ॥६७॥ उगम संगम प्रवाहगती । सरितांची नामरूपख्याती । जेवीं प्रळयोदकीं हारपती । तेवीं समरसती मजमाजीं ज्ञाते ॥६८॥ अपरोक्ष साक्षात्कार संन्यासी । त्याची स्थितिगति स्वधर्मेंसीं । उद्धवा सांगितली तुजपाशीं । आता मुमुक्षु संन्यासी ते ऐक ॥६९॥


एकनाथी भागवत - श्लोक ३८ वा

दुःखोदर्केषु कामेषु जातनिर्वेद आत्मवान् । अजिज्ञासितमद्धर्मो गुरुं मुनिमुपाव्रजेत् ॥३८॥

शेंडा धरूनि समूळ । ज्याचें उत्तरोत्तर दुःख फळ । अतिबाधक विषयजाळ । त्यासी केवळ जो अनासक्त ॥२७०॥ माझे प्राप्तीलागीं चित्त । सदा ज्याचें आर्तभूत । स्वधर्मकर्मीं वर्तत । जो वेदशास्त्रार्थ विवंची ॥७१॥ इहामुत्रभोगीं निश्चित । त्रासलें असे ज्याचें चित्त । ऐसा जो कां नित्य विरक्त । अतिविख्यात मुमुक्षु ॥७२॥o तेणें साधवया ब्रह्मज्ञान । तेचि साधनीं लावितां मन । स्वकर्म झालिया विलक्षण । आली नागवण प्रत्यवायें ॥७३॥ तेणें कर्म संन्यासोनि जाण । करावें संन्यासग्रहण । सद्गु रूसी रिघावें शरण । तेणें ब्रह्मज्ञानपदप्राप्ती ॥७४॥ एक केवळ भावार्थीं । नेणे स्वधर्मकर्मगती । नेणे शास्त्रश्रवणव्युत्पत्ती । परी माझी प्रीती अनिवार ॥७५॥ तेणेंही संन्यासूनि जाण । गुरूसी रिघावें शरण । त्यासीही गुरुकृपा जाण । ब्रह्मज्ञानअववाप्ति ॥७६॥ गुरु करावा अतिशांत । शास्त्रार्थ परमार्थपारंगत । त्याचे सेवेचा भावार्थ । स्वयें श्रीकृष्णनाथ सांगत ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३९ वा

तावत्परिचरेद्भ-क्तः श्रद्धावाननसूयकः । यावद्ब्र ह्म विजानीयान्मामेव गुरुमादृतः ॥३९॥

अचळ अमळ अविनाश । परात्परतर परेश । गुरु तो परब्रह्म ईश । हा दृढ विश्वास धरावा ॥७८॥ त्या विश्वासाच्या पडिपाडीं । नवल गुरुचरणीं आवडी । नित्य नूतन नवी गोडी । चढोवढी भजनार्थ ॥७९॥ ऐशिया भजनपरवडीं । हृदयीं श्रद्धा उसळे गाढी । गुरुआज्ञेची नुल्लंघी काडी । आळस तोडी समूळ ॥२८०॥ गुरुवाक्याचेनि श्रवणें । विकल्पाचें खत खाणणें । संकल्पासी सूळीं देणें । जीवें घेणें अभिमाना ॥८१॥ तेथ असूया कैंची उठी । धाकेंचि निमाली उठाउठी । ऐशी गुरुचरणीं श्रद्धा मोठी । परब्रह्मदृष्टीं गुरु पाहे ॥८२॥ निर्गुण जो निर्विकारु । तोचि मूर्तिमंत माझा गुरु । करूनि अकर्ता ईश्वरु । तोचि हा साचारु गुरु माझा ॥८३॥ नित्य निर्विकल्प देख । ज्यासी म्हणती समाधिसुख । तें माझ्या गुरूचें चरणोदक । ऐसा भावें नेटक भावार्थी ॥८४॥ गुरूतें पाहतां ब्रह्मदृष्टीं । शिष्य ब्रह्मत्वें आला पुष्टी । ब्रह्मरूप देखे सृष्टी । निजऐ क्यें मिठी गुरुचरणीं ॥८५॥ ऐसें ब्रह्मरूपीं ऐक्य घडे । तंव गुरुसेवा करणें पडे । ऐक्य झाल्याही पुढें । सेवा न मोडे अखंडत्वें ॥८६॥ कापूर घातलिया जळीं । स्वयें विरोनि जळ परमळी । तेवीं अहं जाऊनि सेवा सकळी । सर्वीं सर्वकाळीं गुरुचरणीं ॥८७॥ ऐशी अवस्था न येतां हाता । केवळ मुंडूनियां माथा । संन्यासी म्हणवी पूज्यता । त्याची अनुचितता हरि बोले ॥८८॥ स्वयें संन्यास अंगीकारी । ब्रह्मसाक्षात्कार जो न करी । त्यालागीं स्वयें श्रीहरी । अतिधिक्कारीं निंदीत ॥८९॥


एकनाथी भागवत - श्लोक ४० व ४१ वा

यस्त्वसंयतषड्वर्गः प्रचण्डेन्द्रियसारथिः । ज्ञानवैराग्यरहितस्त्रिदण्डमुपजीवति ॥४०॥

सुरानात्मानमात्मस्थं निन्हते मां च धर्महा । अविपक्वकषायोऽस्मादमुष्माच्च विहीयते ॥४१॥

नाहीं वैराग्याची स्थिती । नसतां विषयविरक्ती । देखोदेखीं संन्यास घेती । केवळ वृत्ती अन्नार्थ ॥२९०॥ संन्यास नेघतां पूर्व दृष्टीं । जें वैराग्य होतें पोटीं । तें संन्यास घेतल्यापाठीं । उठाउठीं पळालें ॥९१॥ ज्ञानेंद्रियें पांच सहावें मन । हेचि अरिषड्वर्ग जाण । यांचें न करितां निर्दळण । संन्यासपण तो विटंबु ॥९२॥ अवैराग्यें सकाम मन । तेणें विषयाकुलित बुद्धि जाण । नाहीं ज्ञान ध्यान साधन । दंडग्रहण उदरार्थ ॥९३॥ नुपजेच अनुताप जाण । न करीच श्रवण मनन । आदरें न साधीचि साधन । त्यासी ब्रह्मज्ञान नव्हेचि ॥९४॥ त्याचा व्यर्थ संन्यास जाण । व्यर्थ त्याचें दंड मुंडण । व्यर्थ काषायवस्त्रग्रहण । जेवीं वेषधारण नटाचें ॥९५॥ संन्यास घेतलिया पाठीं । काम उचंबळे उठाउठीं । क्रोधलोभांची धुमे आगिटी । चौगुणा पोटीं अभिमान ॥९६॥ आसक्ति अधिकाधिक उठी । सदा ग्रामणी चावटी । करणें पैशुन्याच्या गोष्टी । दंड कासोटी दंभार्थ ॥९७॥ अनधिकारीं दंडग्रहण । तेणें संन्यासरूपें जाण । केवळ आली नागवण । आपल्या आपण नाडिलें ॥९८॥ नाडिले यज्ञाधिकारी सुरगण । नाडिले स्वधाकाराचे पितृगण । नाडिले ऋषि भूतगण । बळिअर्पण ठाकेना ॥९९॥ जीवरूपें मी परमात्मा आपण । त्या मज हृदयस्था ठकिलें जाण । जीवोद्धारीं जें संन्यासग्रहण । तेंचि दृढबंधन त्यासी झालें ॥३००॥ संन्यासग्रहणीं दृढबंधन । व्हावया कोण कारण । तेचि विषयींचें निरूपण । स्वयें नारायण बोलिला ॥१॥ पूर्वश्लोकींचे तिनी चरण । येथील हें निरूपण । श्रोतीं द्यावें अवधान । झणें विलक्षण कोणी म्हणे ॥२॥ ``निन्हुते मां च धर्महा । अविपक्वकषायोऽस्मादमुष्माञ्च विहीयते ॥ करोनियां संन्यासग्रहण । न करी ज्ञान ध्यान साधन । न करी प्रणवउ्च्चारण । अविरक्त जाण विषयार्थी ॥३॥ तेणें दारादिअभिलाषण । करिती द्रव्याचें संरक्षण । आणि गोदानादि ग्रहण । पचन पाचन करविती ॥४॥ मठाधिपत्याचिये बुद्धीं । धनधान्यस्नेहसमृद्धी । नाना वाढवितां उपाधी । जीवात्मा त्रिशुद्धी नाडिला ॥५॥ ऐसें करितां अधर्मपण । जीवासी लागलें दृढ बंधन । जेणें इहलोकपरलोकसाधन । त्या नरदेहासी जाण नाडिलें ॥६॥ चौर्याइशीं लक्ष योनींप्रती । जैं असंख्य फेरे होती । तैं नरदेहाची प्राप्ती । अवचटें पावती सभाग्य ॥७॥ त्या नरदेहासी येऊनि जाण । स्वयें नागवला आपण । करितां अधर्माचरण । नरक दारुण संन्याशा ॥८॥ ज्या नांव गा `आश्रम चौथा' । ज्यासी देवो वंदी माथां । तेथेंही अधर्म करितां । नरकपाता पावले ॥९॥ ज्या नरकाचे ठायीं । कोटि वर्षें बुडतां पाहीं । ठावचि न लागें कंहीं । तैसे ठायीं बुडाले ॥३१०॥ मुख्य चतुर्थाश्रमीं हे स्थिती । तैं इतर आश्रमां कैंची गती । यालागीं आश्रमधर्मयुक्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥११॥


एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

भिक्षोर्धर्मः शमोऽहिंसा तप इक्षा वनौकसः । गृहिणो भूतरक्षेज्या द्विजस्याऽऽचार्यसेवनम् ॥४२॥

संन्याशासी मुख्य `शम' । सबाह्य `इंद्रियनेम' । `अहिंसा' त्याचा स्वधर्म । हा परमधर्म संन्याशासी ॥१२॥ वानप्रस्थाचा स्वधर्म । `तपप्राधान्य मंत्र होम' । आतां गृहस्थाचा नेम । तिंही आश्रमां विश्रामदाता ॥१३॥ गृहस्थ मुख्य `अग्निहोत्र' जाण । संन्यासी ब्रह्मचार्यां सी द्यावें अन्न । करावें `भूतसंरक्षण' । तेहीं लक्षण अवधारीं ॥१४॥ असिलेनि सामर्थ्यें जाण । अन्न धन वस्त्र जीवन । तृण पर्ण निवासस्थान । देऊनि दीन रक्षावे ॥१५॥ ब्रह्मचार्यााचे स्वधर्मीं जाण । श्रद्धायुक्त `गुरुसेवन' । एवं आश्रमधर्मलक्षण । मुख्यत्वें हें जाण उद्धवा ॥१६॥ गृहस्थाश्रमीं जो धर्म आहे । तो इतर आश्रमीं करूं नये । इतराश्रमींचा धर्म पाहें । गृहस्थाश्रमीं होये करणीय ॥१७॥


एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

ब्रह्मश्चर्यं तपः शौचं संतोषो भूतसौहृदम् । गृहस्थस्याप्यृतौ गन्तुः सर्वेषां मदुपासनम् ॥४३॥

गृहस्थें व्हावया निष्पाप । ठाके तो करावा जप तप । उभय शौचांचें स्वरूप । अतिसाटोप करावें ॥१८॥ पोटींची सांडूनि कुसमुस । यथालाभें अतिसंतोष । परोपकारीं अतिहव्यास । सुहृद सर्वांस स्वात्मत्वें ॥१९॥ गृहस्थीं ब्रह्मचर्यलक्षण । ऋतुकाळीं स्वदाराभिगमन । मुख्यत्वें करावें माझें भजन । हा स्वधर्म जाण सर्वांचा ॥३२०॥ सर्व आश्रम सर्व वर्ण । त्यांसी हाचि स्वधर्म जाण । सांडोनि विषयाचें भान । माझें भजन करावें ॥२१॥ करितां स्वधर्में माझी भक्ती । भक्तासी होय जे प्राप्ती । तेचि सांगताहे श्रीपती । उद्धवाप्रती स्वानंदें ॥२२॥


एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा

इति मां यः स्वधर्मेण भजेन्नित्यमनन्यभाक् । सर्वभूतेषु मद्भा्वो मद्भनक्तिं विन्दतेऽदृढाम् ॥४४॥ सर्व भावें अनन्यगतीं । करितां स्वधर्में माझी भक्ती । माझा भावो सर्वांभूतीं । शीघ्रगती उल्हासे ॥२३॥ मद्भाभवो जोडल्या सर्व भूतीं । तेणें प्रकटे माझी चौथी भक्ती । जिच्या पायीं चारी मुक्ती । सदा लागती स्वानंदें ॥२४॥ अनिवार अनन्यगती । सर्वस्वें ज्यासी माझी प्रीती । तो लाहे माझी परमभक्ती । जेथोनि कल्पांतीं च्यवेना ॥२५॥


एकनाथी भागवत - श्लोक ४५ वा

भक्त्योद्धवानपायिन्या सर्वलोकमहेश्वरम् । सर्वोत्पत्त्यप्ययं ब्रह्म कारणं मोपयति सः ॥४५॥

सकळ सच्चिदानंदस्थिती । जीमाजीं सांपडे मी सहजगती । ती नांव माझी `परमभक्ती' । जाण निश्चितीं उद्धवा ॥२६॥ विपरीत संसाराचें भान । दिसे दृष्य-विलक्षण । तेथ सदा स्वानंदपूर्ण । ते चौथी जाण भक्ती माझी ॥२७॥ जेथ देव भक्त एक होती । एकपणें भजनस्थिती । ऐशी साधकांसी प्राप्ती । ते `परमभक्ती' उद्धवा ॥२८॥ माझी प्रकटल्या परम भक्ती । पतन नाहीं प्रळयांतीं । साधक मद्‌रूपा येती । स्वरूपस्थितीं समसाम्यें ॥२९॥ त्या स्वरूपाचें लक्षण । सांगताहे श्रीनारायण । उत्पत्ति-स्थिति-निदान । कारणा जो चिदात्मा ॥३३०॥ जो सकळ नियंता ईश्वरु । जो विश्वात्मा विश्वंभरु । जो उपनिषदांचें सारु । जो महेश्वरु जगाचा ॥३१॥ त्या पदाची पदप्राप्ती । भक्त पावले परमभक्तीं । तेंचि पुढती उद्धवाप्रती । स्वानंदें श्रीपति सांगत ॥३२॥


k-------------------------------------------------------

एकनाथी भागवत - श्लोक ४६ वा

इति स्वधर्मनिर्णिक्तसत्त्वो निर्ज्ञातमद्ग-तिः । ज्ञानविज्ञानसंपन्नो नचिरात्समुपैति माम् ॥४६॥

ऐशिया पदाची पदप्राप्ती । साधक पावले स्वधर्मस्थितीं । ते स्वधर्मप्रयोजनगती । यथानिगुती सांगत ॥३३॥ करितां स्वधर्मानुष्ठान । रजतमें नाशती जाण । शुद्धसत्त्व अंतःकरण । तेथ माझें ज्ञान प्रकाशे ॥३४॥ प्रकाशल्या माझें ज्ञान । तेणें उल्हासे माझें भजन । भजनास्तव मन । विकल्पपण पैं त्यागी ॥३५॥ विकल्पत्यागाचिये गतीं । वैराग्यें उचंबळे विरक्ती । भासे परमात्मा सर्व भूतीं । तेणें `परमभक्ती' उल्हासे ॥३६॥ उल्हासल्या परमभक्ती । भक्तासी माझी स्वरूपप्राप्ती । तेचि स्वरूपाची स्वरूपस्थिती । यथानिगुतीं सांगत ॥३७॥ परमात्मा परंज्योती । परब्रह्म परंज्ञप्ती । परात्परतर प्रकृती । वेद बोलती `परावर' जो ॥३८॥ अज अव्यय अक्षर । अरूप अनाम अगोत्र । अलक्ष अतर्क्य अपार । अपरंपारस्वरूप ॥३९॥ ऐशी निजस्वरूपीं निजप्राप्ती । भक्त पावले स्वधर्मस्थिती । जेथूनि परतलिया श्रुती । नेतिनेतीं निजनिष्ठा ॥३४०॥ ऐसें मद्‌रूप पावल्यापाठीं । संसाराची काढिली कांटी । नांवरूपांची बुडाली गोठी । पडली तुटी जन्ममरणां ॥४१॥ एवं स्वधर्माचेनि धर्मवशें । मीतूंपणाचें नांवचि पुसे । मद्‌रूपाचेनि सामरस्यें । अनायासें मीचि जाहले ॥४२॥ `पूर्वीं होतों मी जीव । आतां झालों सदाशिव' । हाही बुडाला आठव । ऐसा माझा अनुभव मद्भ क्तां ॥४३॥ शून्य पडिलें संसारस्थिती । तेथ कैंची पुनरावृत्ती । ऐशी मद्भिक्तां माझी प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४४॥ एवं स्वधर्में मत्प्राप्ति जाण । तया स्वधर्माचें महिमान । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । सावधान परियेसा ॥४५॥


एकनाथी भागवत - श्लोक ४७ वा

वर्णाश्रमवतां धर्म, एष आचारलक्षणः । स एव मद्भवक्तियुतो, निःश्रेयसकरः परः ॥४७॥

अनादि जो स्वधर्माचार । जो कां मोक्षकर साचार । तेणें स्वधर्में सकाम नर । लोकांतर वांछिती ॥४६॥ झालिया लोकांतरप्राप्ती । तेथूनि होय पुनरावृत्ती । न करूनियां माझी भक्ती । स्वधर्म नाशिती सकामें ॥४७॥ ब्राह्मणा आला भद्रजाती । आम्हां न पोसवे हा निश्चितीं । मग तो देऊनियां घेती । वाहावया पोथी वृद्ध ढोर ॥४८॥ यापरी स्वधर्म जाण । उपेक्षिती गा ब्राह्मण । मग लोकांतरीं कोरान्न । मागावया कण धांवती ॥४९॥ घरीं आणोनि दीघली कामधेनु । आम्हां न पोसवे म्हणूनु । ताकासाठीं देती हेळसूनु । आली नागवणु ते नेणे ॥३५०॥ तेवीं म्यां जाण गायत्रीमंत्र । दिधला ब्राह्मणांसी स्वतंत्र । तो उपेक्षूनियां मंत्रतंत्र । शूद्राचार आचरती ॥५१॥kn सौर शाक्त गाणपत्यादि जाण । नाना मंत्रदीक्षा घेती ब्राह्मण । परी गायत्रीचें अनुष्ठान । एकही जाण न करिती ॥५२॥ नाहीं गायत्रीचें अनुष्ठान । परी विपरीत झालें आन । गायत्रीचें श्रेय जाण । देती ब्राह्मण द्रव्यार्थ ॥५३॥ गायत्रीमंत्र असोनि घरीं । तिचा भावार्थ कोणी न धरी । दीक्षेलागीं मूर्खाचे द्वारीं । लोळिजे द्विजवरीं ऐसें झालें ॥५४॥ शस्त्रास्त्रीं रथ सुदृढू । त्यावरी बैसविला भेडू । सांडूनि पळणें मानी सुरवाडू । न शके विभांडूं रणांगण ॥५५॥ तेवीं वेदरूप मी नारायण । ब्राह्मणहृदयीं असें जाण । त्याचें नेणोनि महिमान । वेदपारायण विकिती ॥५६॥ वांछूनियां स्वर्गफळ । नाना याग करिती प्रबळ । कामकल्पना केवळ । स्वधर्म विकळ पाडिती ॥५७॥ वेदीं प्रतिपाद्य कर्मफळ । तो वेदु मिथ्या नव्हे केवळ । तो वेदवाद समूळ । नेणोनि बरळ हा मानिती ॥५८॥ घ्यायवा वोखदाची वाटी । माता साकर दे चिमुटी । तें मुख्य फळ नव्हे दृष्टीं । जावया पोटींचा महारोगु ॥५९॥ तेवीं वेद बोले जें फळ । तें प्रवृत्तिरोचना केवळ । स्वधर्म विचारितां समूळ । चित्तमळक्षाळक ॥३६०॥ स्वधर्म सांडूनि सर्वथा । सकाम कर्में करूं जातां । तेंही शिणल्यावेगळें तत्त्वतां । क्षुद्रकामता फळेना ॥६१॥ जेणें द्रव्यें अमृत ये हाता । तें वेंचूनि मद्य घेतां । अधर्म आणि उन्मत्तता । पिशाचता जग थुंकी ॥६२॥ स्वपतीसीं काम भोगितां । परलोक पावि पतिव्रता । तोचि काम परपुरुषीं करितां । अधःपाता नेतसे ॥६३॥ जिह्वा दुरुक्ती बोलतां । यमप्रहार वाजती माथां । तिणेंचि `राम राम' म्हणतां । हरिभक्तां यम कांपे ॥६४॥ तेवीं पावोनि उत्तम जन्म । कर्म करूनि सकाम । भोगावें दुःख परम । मरण जन्म अनिवार ॥६५॥ तेणेंचि देहें स्वधर्म । करितां निरसे सकळ कर्म । निवारे मरणजन्म । बहुतां हे वर्म कळेना ॥६६॥ स्वधर्में घडे भगद्भुक्ती । ऐशी अतिगुह्य आहे व्युत्पत्ती । ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुतीं उद्धवा ॥६७॥ स्वधर्म करणें आवश्यक । तेथें सांडणें फळाभिलाख । तेंचि `मदर्पण' चोख । न करितां देख संकल्पु ॥६८॥ हो कां घरिच्याचि रांजणीं । निघती मुक्ताफळांच्या श्रेणी । तरी कां ताम्रपाणीं । समुद्रमिळणीं शोधावी ॥६९॥ आपुलेच घरींचीं झाडें । फळती कल्पतरूचेनि पाडें । तरी अमरावतीचे चाडें । वृथा वेडे कां शिणती ॥३७०॥ हो कां सद्गुेरूंचे तीर्थ घेतां । पाविजे परम पवित्रता । तरी धांवावया नाना तीर्था । विशेषता ते कायी ॥७१॥ कां ईश्वरत्वें पिता पूजितां । निजमोक्ष लाभे आइता । तरीं भजावें देवां देवतां । कोण्या अर्था सज्ञानीं ॥७२॥ तेवीं स्वकर्माचि करितां । लाभे आपली निष्कर्मता । ते स्वधर्मीं काम कल्पितां । जीव निजस्वार्था नाडले ॥७३॥ निर्विकल्पें स्वधर्माचरण । त्या नांव माझें `शुद्ध भजन' । तेणें भजनें हो‍ऊनि प्रसन्न । मी विवेक-वैराग्य-ज्ञान भक्तांसी दें ॥७४॥ तेणेंचि ज्ञानें होय शुद्ध मती । चित्तशुद्धीमाजीं परमभक्ती । ते भक्तीनें माझी परम प्राप्ती । भक्त पावती उद्धवा ॥७५॥ यालागीं नैराश्यें जें स्वधर्मकर्म । तेंचि माझें भजन परम । तेणें भजनें भक्तोत्तम । स्वयें पुरुषोत्तम हो‍ऊनि ठाकती ॥७६॥ यापरी स्वधर्मस्थितीं । लाभे आपुली निजमुक्ती । तेचि म्यां तुजप्रती । यथानिगुतीं सांगितली ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक ४८ वा

एतत्तेऽभिहितं साधो भवन्पृच्छति यच्च माम् । यथा स्वधर्मसंयुक्तो भक्तो मां समियात्परम् ॥४८॥

इति श्रीभागवते महापुराणे पारमहंस्यां संगितायामेकादशस्कन्धे अष्टादशोऽध्यायः ॥१८॥

उद्धवा पुसिलें त्वां मजप्रती । स्वधर्में केवीं घडे मुक्ती । भक्तीनें पाविजे निजमुक्ती । तें म्यां तुजप्रती सांगितले ॥७८॥ हाता आलिया स्वधर्म । तत्काळ निरसे स्वकर्म । उडोनि जाय भवभ्रम । प्राप्ती परम स्वधर्में ॥७९॥ माझिया प्राप्तीलागीं स्वकर्म । नैराश्यें आचरावा स्वधर्म । हें ज्यासी कळे वर्म । तया पुरुषोत्तम सदा वश्य ॥३८०॥ स्वधर्माऐसा स्पर्शमणी । सांपडल्या निर्विकल्पपणीं । तो लावितां दृश्यस्थानीं । चिन्मात्रसुवर्णीं तेज उठी ॥८१॥ स्वधर्माऐसा दिनमणी । नैराश्यें उगवलिया स्वभुवनीं । तो अज्ञाननिशा निरसुनी । स्वप्रकाशपणीं सदा वर्ते ॥८२॥ स्वधर्माऐसें निजअसमृत । जे निर्विकल्पें सेवूं जाणत । त्यांसी जन्ममरणांचा आवर्त । मी श्रीअनंत लागों नेदीं ॥८३॥ जे कां स्वधर्मीं विमुख । त्यासीं माझी प्राप्ती नाहीं देख । जन्मकोटी परम दुःख । सकामें मूर्ख भोगिती ॥८४॥ त्या स्वधर्माची अतर्क्य गोष्टी । न कळे नैष्कर्में निजदृष्टीं । याचिलागीं जन्मकोटी । अतिसंकटीं जीव भोगी ॥८५॥ स्वधर्में करितां स्वकर्म । जैं नैष्कर्म्यतेचें कळे वर्म । तैं विभांडूनि मरणजन्म । परब्रह्म पावती ॥८६॥ एवं स्वधर्म यापरी । तारक होय संसारीं । स्वधर्माचे नावेवरी । तरले भवसागरीं निजभक्त ॥८७॥ संसार तरले हा बोलु कुडा । स्वधर्म करितं माझिया चाडा । होय भवसागर कोरडा । मी सांपडें पुढा निजात्मा ॥८८॥ ऐशी स्वधर्माची थोरी । निष्कामतेच्या निजकुसरी । देवो सांगे आवडीभरीं । नानापरी प्रबोधें ॥८९॥ भक्तिप्राधान्य भागवत । मुख्य भक्ति ते स्वधर्मयुक्त । येणें स्वधर्मभजनें समस्त । परम भागवत उद्धरले ॥३९०॥ त्या स्वधर्मकर्माचा एकान्त । निजभजनभक्तीचा भावार्थ । उद्धवासी श्रीकृष्णनाथ । स्वयें सांगत एकादशीं ॥९१॥ त्या एकादशाच्या गोष्टी । स्वधर्मकर्माची कसवटी । एका जानार्दनकृपादृष्टीं । टीका मराठी हे केली ॥९२॥ हे करणी केली जनार्दनें । मज अभंगीं घातलें तेणें । शेखीं मीतूंपणाचे ठाणें । येणें निरूपणें उडविलें ॥९३॥ उडविलें विषयीं विषयपण । उडविले भेदाचें भान । उडविलें जीवशिवपण । जनीं जनार्दन तुष्टोनी ॥९४॥ जनार्दनें जनकें तेणें । आम्हां केलें परब्रह्म खेळणें । यालागीं सकळ क्रिया तेणें होणें । स्वधर्मपणें सहजेंचि ॥९५॥ सहजीं लागल्या स्वधर्म । कर्मचि होय निष्कर्म । संसार होय परब्रह्म । हे कृपा परम जनार्दनीं ॥९६॥ यालागीं सांडूनियां एकपण । एका जनार्दन शरण । स्वधर्मकर्माचें निरूपण । झालें संपूर्ण तया कृपा ॥९७॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां वानप्रस्थसंन्यासधर्मनिरूपणं नाम अष्टादशोऽध्यायः ॥९८॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ओंव्या ३९७॥श्लोक ॥४८॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]