कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा/महाराष्ट्रीय मुसलमान

महाराष्ट्रीय
 मुसलमान


 महाराष्ट्रातील मुसलमानांची मातृभाषा मराठी असून संस्कृती महाराष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन करणारा कॉ. अमर शेख यांचा लेख फेब्रुवारीच्या 'किर्लोस्कर'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. आजच्या भाषिक आणि सांस्कृतिक जागृतीच्या काळात प्रसिद्ध झालेला हा लेख महत्त्वपूर्ण आहे, तथापि परिपूर्ण नाही. 'आम्ही येथेच जन्मलो, येथेच वाढलो, इथली भाषा ही आमची भाषा आणि हा देश हा आमचा देश'- हा युक्तिवाद (तो कितीही बरोबर असला तरी) स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेकदा करण्यात आला आणि विफल ठरला, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रीय मुसलमानांत मराठी भाषा आणि संस्कृती यांविषयी जो एक परकेपणा आलेला आहे, तो केवळ प्राचीन परंपरेने आलेला नाही. भाषिक आणि सांस्कृतिक अलगपणा जो आलेला आहे तो राजकीय अलगपणाच्या, फुटीरपणाच्या प्रवृत्तीतून निर्माण झालेला आहे. राजकारणाचा भाग सोडला, तर आज भाषिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मुसलमान एक प्रकारच्या अलगपणाच्या भूमिकेत वावरत आहेत. हा अलिप्तपणा नष्ट व्हावा असे वाटत असेल, तर आम्हा मुसलमानांच्या शैक्षणिक भूमिकेचा आधी विचार केला पाहिजे.
 स्वातंत्र्याच्या काळापर्यंत आमच्या मुसलमान विद्यार्थ्यांना वेगळ्या उर्दू शिक्षणाची तरतूद करण्यात आली. इथल्या बहुजन समाजाशी असले-नसलेले सांस्कृतिक संबंध तोडण्याचा शिकस्तीचा प्रयत्न करण्यात आला. उर्दू भाषेची वेगळी परंपरा निर्माण करण्यात आली. परंतु इथले संबंध आम्ही पूर्णपणे तोडू शकलो नाही, की मराठीशी फारकत करून घेऊन उर्दू पचवू शकलो नाही. आज तर मुस्लिम समाज या प्रश्नाकडे गोंधळलेल्या दृष्टीने पाहत आहे. आपली भाषा आणि आपली संस्कृतीच अखेर महाराष्ट्राच्या समाजजीवनातले आपले स्थान निश्चित करणार आहे, याची त्याला पुरती जाणीव झालेली नाही. इथल्या जीवनात रुळलेली मराठी समजल्याशिवाय गत्यंतर तर नाही आणि उर्दूविषयी अकारण निर्माण झालेल्या जिव्हाळ्याने तिला बिलगण्याचा मोह तर आवरत नाही, अशी बहुसंख्य मुसलमानांची त्रिशंकू अवस्था झालेली आहे.
 आमच्यातला व महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातला हा अलगपणा स्वातंत्र्यानंतर नष्ट व्हावा आणि निदान भाषिकदृष्ट्या तरी मुसलमान इथल्या जीवनात मिसळून जावा, असे प्रयत्न पुन्हा करण्यात आले. परंतु मुस्लिम बहुजन समाजांत अनेक वर्षांच्या शिकवणुकीमुळे मराठी भाषा आणि संस्कृती यांविषयी एक प्रकारचा परकेपणा निर्माण झालेला असल्यामुळे या बदलास साहजिकच विरोध झाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या परिस्थितीची इथे सविस्तर माहिती देणे अप्रस्तुत ठरणार नाही.
 रत्नागिरी जिल्हा स्कूल बोर्डाने स्वातंत्र्यानंतर बदललेल्या काळास अनुसरून मुसलमान विद्यार्थ्यांना मराठी माध्यमांतून शिक्षण देण्याचा एक ठराव मंजूर केला. परंतु स्कूल बोर्डातल्या मुसलमान सभासदांनी याला कडाडून विरोध केला. रत्नागिरी शहरात याच सुमारास एक उर्दू विकास मंडळ स्थापन करण्यात आले आणि त्यामार्फत स्कूल बोर्डाच्या प्रस्तावाचा निषेध तेव्हाचे शिक्षणमंत्री श्री. बाळासाहेब खेर यांच्याकडे करण्यात आला. स्कूल बोर्डाचे शैक्षणिक अधिकार कमी करण्याच्या सरकारच्या धोरणानुसार, सरकारने प्राथमिक शिक्षणाची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्कूल बोर्डाचा ठराव तसाच खुंटीला टांगला गेला.
  स्कूल बोर्डाच्या या ठरावाच्या अनुषंगाने श्री. अप्पासाहेब पटवर्धन यांनाही मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची एक योजना सुचविली होती. मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे माध्यम मराठी असावे आणि एक जादा भाषा म्हणून त्यांना उर्दू देण्यात यावी, असे त्या योजनेचे (स्कूल बोर्डाचा ठरावदेखील असाच होता.) स्वरूप होते. सरकारचे धोरणदेखील अप्पासाहेबांच्या योजनेप्रमाणे असेल असे, (मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षणाचे माध्यम मराठी असावे असे प्रयत्न करणाऱ्या) आमच्यासारख्यांना वाटत होते.

 परंतु, मुंबई सरकारने आपले पूर्वीचे वेगळेपणाचे धोरण चालू ठेवले; इतकेच नव्हे, तर त्यात अधिक भर घालण्यात आली! पूर्वी मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुसलमान मुलाला एक जादा भाषा म्हणून उर्दूची सोय केलेली होती. आता ती बंद करण्यात येऊन उर्द माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या मुलाला मात्र एक भाषा म्हणून मराठी शिकण्याची व्यवस्था करण्यात आली. याचा परिणाम असा झाला की, उर्दूशी असलेला आपला संपर्क तुटेल, या भीतीने मराठी माध्यमांतून आपल्या

उर्दू माध्यमाची शाळा : १९५० चे दशक, महाराष्ट्र 

मुलांना शिक्षण देण्याचे मुसलमान पालकांनी बंद केले. चाळीस मुलांच्या पालकांनी मागणी केल्यास उर्दू शाळा देण्यात येईल, या धोरणानुसार उर्दू शाळांच्या मागण्या भराभर करण्यात आल्या. शाळांच्या भराभर फाळण्या झाल्या आणि सर्वच मुले उर्दू माध्यमातून शिक्षण घेऊ लागली.
  चाळीस मुलांच्या पालकांनी उर्दू शाळेची मागणी केल्यास त्यांना उर्दू शाळा द्यावी, हे धोरण कोणत्या तत्त्वास धरून आखण्यात आले? या चाळीस मुलांच्या पालकांच्या मागणीचा निकाल कोणत्या न्यायाने लावण्यात आला? महाराष्ट्रातल्या- विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या- मुसलमानांची मातृभाषा उर्दू आहे, असे सरकारला म्हणावयाचे आहे काय?
  आम्ही मुसलमान महाराष्ट्रात धार्मिक दृष्ट्या अल्पसंख्य असलो तरी भाषिक दृष्ट्या अल्पसंख्य नाही,हे आमच्या निधर्मी सरकारला सांगण्याची वेळ यावी, हे दुर्दैव आहे ! भिन्नधर्मीय लोक एकभाषिक असू शकतात आणि एकाच धर्माच्या लोकांची मातृभाषा वेगवेगळी असू शकते. मुसलमान लोक धर्माने भिन्न असले तरी भाषिकदृष्ट्या वेगळे नाहीत, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि समजा, एखादे मुसलमान कुटुंब पूर्वी कधी काळी अगदी थेट अरबस्तानातून आले असले, तरी त्याला इथल्या प्रादेशिक भाषेतूनच शिक्षण दिले गेले पाहिजे; कारण पिढ्यान् पिढ्या तो महाराष्ट्राच्या भूमीत रुजून गेला आहे.
 आम्हा मुसलमानांची धर्मभाषा काही उर्दू नव्हे, ती अरबी आहे. आमची काही धार्मिक पुस्तके उर्दूतून आहेत, हे खरे आहे; पण त्यामुळेच शिक्षणाचे माध्यम म्हणून उर्दूची मागणी मान्य करून कसे चालेल? बहुसंख्य हिंदू लोकांचे सगळे धर्मग्रंथ संस्कृतात आहेत, महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या ज्यू धर्मीय लोकांचेदेखील हिब्रू भाषेत आहेत; म्हणून सरकार त्या-त्या जमातीच्या धार्मिक शिक्षणाची कोणती सोय करते? मग मुसलमानांच्या धार्मिक शिक्षणाची तरतूद करण्याची काळजी आमच्या निधर्मी सरकारला का वाटावी? आणि आज उर्दूतून शिक्षण घेत असलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांची मातृभाषा कोणती ठरवायची? त्यांचे आई-बाप आणि आई-बापांचे आई-बाप यांच्या भाषेवरून जर मातृभाषा ठरवायची, तर ती मराठी ठरवावी लागेल. या अगोदरच्या पिढीला उर्दूचे अगदीच मामुली ज्ञान आहे. त्यांचा घरचा व्यवहार, व्यापारी जमाखर्च आणि पत्रव्यवहार सगळा मोडीतून होतो; परंतु गेल्या सार्वत्रिक नोंदणीत तो विद्यार्थी अथवा पालक सांगतील ती मातृभाषा (म्हणजे उर्दू) लावण्यात आली आहे (कारण मुलगा उर्दू शाळेत जातो.)! खुद्द माझ्या घरातली स्थिती सर्वांत अधिक केविलवाणी आहे! माझी मातृभाषा मराठी नोंदवली गेली आहे आणि माझ्या धाकट्या भावाची (तो उर्दूतून शिक्षण घेत असल्याने) उर्दू नोंदवली गेली आहे!
 उर्दूतून शिक्षण घेत असलेली ही मुले पुढे मराठी माध्यमांतून दुय्यम शिक्षण घेऊ शकत नाहीत. जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी असलेल्या उर्दू हायस्कूलमध्येही ती जाऊ शकत नाहीत. अखेर शिक्षणाला रामराम ठोकण्यातच याची परिणती होते. अशाने मुस्लिम समाज अज्ञानाच्या अंध:कारात कायमचाच खितपत राहणार आहे!
 मुंबई सरकारच्या शैक्षणिक धुरीणांना या गोष्टी कळत नाहीत, असे कसे म्हणायचे? परंतु सरकारचे हे धोरण केवळ संधिसाधू आहे, राजकीय धूर्तपणे आखलेले आहे. मुसलमानांचे हितकर्ते आपणच आहोत- सरकारचे धोरणच मुसलमानांच्या कल्याणाचे आहे, असा भ्रम मुसलमानांत निर्माण करण्याचे आहे आणि तात्पुरते व अंतिम असे दोन परिणाम यातून उद्भवणारे आहेत. सध्या मुसलमानांचा भरघोस पाठिंबा व मते मिळतात, हा तात्पुरता परिणाम आणि अंतिम परिणाम म्हणजे, मुस्लिम समाज इथल्या स्थानिक जीवनापासून कायमचाच अलग पाडण्यात होईल, होतो आहे- त्याला इथल्या जीवनापासून, भाषेपासून वंचित करण्यात येणार आहे.
 मुस्लिम समाजातल्या एका जमातवादी गटाला हेच हवे आहे. स्वातंत्र्यातही या जमातवादी प्रवृत्तीला गोंजारण्याचे चाललेले हे प्रयत्न पाहून माझ्यासारख्यांचे अंत:करण व्यथित होते. 'मुसलमान मुलांच्या शिक्षणाचा हा खेळखंडोबा थांबवा आणि त्यांना मराठी माध्यमातून शिक्षण द्या', अशा अर्थाचा एक लेख मागे मी 'नवशक्ती'मध्ये लिहिला. तेव्हा 'इन्किलाब'सारख्या उर्दू, जातीयवादी पत्राने मला 'अस्तनीतला साप' म्हणून संबोधावे आणि रत्नागिरीतल्या 'बलवंत' या काँग्रेसवादी पत्राने मला जातीयवादी ठरवावे- याची संगती कशी लावायची? 'इन्किलाब' आणि 'बलवंत'ची ही युती कोणत्या धोरणाची निदर्शक आहे, याचा सर्वसामान्य मुसलमान समाजानेच शांतपणे विचार केला पाहिजे. या धोरणाने स्वत:चा फायदा होते आहे की नुकसान होत आहे, याचा विचार झाला पाहिजे.
 सत्ताधारी पक्षाच्या धोरणाचा अर्थ उघड आहे. मुसलमान समाजाच्या समुदायवृत्तीचा फायदा घेण्याची वृत्ती याच्या मुळाशी आहे. सरकारच्या देशव्यापी धोरणाचाच तो एक भाग आहे. बेल्लारीचे भवितव्य ठरवताना तिथल्या मुसलमानांचे वेगळे मत का अजमावण्यात आले? सरकारच्या या धोरणामुळे आता आंध्रातला आमचा तेलुगू भाषक मुसलमानही उर्दूची मागणी करू लागला आहे.
 हे सर्व विस्ताराने लिहिण्याचे कारण इतकेच की- मुसलमान इथल्या भाषेशी, संस्कृतीशी एकरूप व्हावा; स्थानिक समाजजीवनाशी तो समरस व्हावा, असे इच्छिणाऱ्या आणि त्याप्रमाणे प्रयत्न करणाऱ्या मुसलमान तरुणांच्या मार्गात सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध हीच एक मोठी आडकाठी होऊन बसली आहे!
 सरकारचे हे धोरण आता बदलले पाहिजे. महाराष्ट्रातल्या मुसलमानाला मराठी भाषेविषयी, मराठी संस्कृतीविषयी जिव्हाळा वाटावा असे वाटत असेल; तर त्याच्या शिक्षणाचे माध्यम मराठी ठेवले पाहिजे. महाराष्ट्राचा इतिहास विकृतपणे उर्दूतून शिकवला जाण्याने मराठी इतिहासाविषयी इथल्या मुसलमानाला प्रेम वाटेल काय? यासाठी सर्वत्र सक्तीचे मराठी माध्यम करून एक जादा भाषा म्हणून सरकारने उर्दू शिकवण्याची व्यवस्था करावी. शैक्षणिक स्वरूपाविषयी आज सर्वत्र एक प्रकारची जागृती आलेली आहे. शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्नही विद्वानांत चर्चिला जात आहे. अशा वेळी या जिव्हाळ्याच्या प्रश्नात महाराष्ट्रांतील बहुजन समाजानेही लक्ष घातले पाहिजे. सरकारने आपले हे शैक्षणिक धोरण बदलावे म्हणून दडपण आणले पाहिजे.
 सरकारचे धोरण जरी जाणूनबुजून चुकीचे असले, तरी आम्ही मुसलमानांनीच - आता खरे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. सरकार चुकते, असे म्हणून आमची जबाबदारी टळत नाही; आमच्या चुका लपल्या जात नाहीत. गेल्या अनेक वर्षांच्या सततच्या शिकवणुकीने का होईना; मराठी भाषेशी, संस्कृतीशी आणि प्राचीन परंपरेशी आम्ही कायमची फारकत मिळवू शकतो का? उर्दू आमच्यात पूर्णपणे रुळली का? उर्दूमय झालेल्या आमच्या या तरुणांचे उद्याच्या महाराष्ट्रातले स्थान कोणते राहील, याचा तरी आपण शांतपणे विचार करू या. उर्दूच्या अर्धवट ज्ञानाने आणि भोवतालच्या दैनंदिन जीवनातल्या मराठीच्या सरावाने जी भाषा उर्दू म्हणून बोलली जाते, ती पूर्णपणे धेडगुजरी असते. पुढील काही नमुने पाहण्यासारखे आहेत“मुजे जानाच चाहिये", "वो आदमखान मऱ्या ", "तुम इदर काय कू आया?" इत्यादी. कोकणातल्या मुसलमानांच्या जीवनात मोडी लिपीसकट मराठी मुरली आहे. घरात बोलली जाणारी बोली कोकणी असते, उर्दूशी तिचा काही संबंध नसतो.
 भाषा, रीती-रिवाज, परंपरा, चालीरीती, पेहराव या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आमच्या परंपरा कोणत्याच बाबतीत भिन्न नाहीत, हे दिसून येईल. लग्नप्रसंगी आमच्यात जी गीते गायली जातात, त्यात पीरांच्या उल्लेखाबरोबर नजीकच्या परशुरामाचादेखील उल्लेख आहे! लग्नाच्या चाली-रीतीत तर इथल्या बहुजन समाजाच्या चालीरीतीचा फार मोठा प्रभाव आहे आणि यात वेगळे, वाईट असे काहीही नाही. महाराष्ट्रातल्या मुस लमानाचा पेहरावही काही वेगळा नाही. क्वचित आढळणाऱ्या फेझ टोप्या सोडल्या; तर खाली धोतर, अंगरखा आणि वर फेटा असला अस्सल मराठी पोशाख आमच्याकडचा मुसलमान घालतो. बायकांच्या गळ्यात मंगळसूत्र असते आणि काही ठिकाणी कुंकू लावणाऱ्या मुसलमान स्त्रियाही मी पाहिल्या आहेत. लग्नाच्या आणि गरोदरपणाच्या वेळी ओटीत नारळ देण्याची प्रथा काही मुसलमानी नाही! कुठल्याही गावात गावच्या देवीला पीराइतकाच मान देण्यात येतो आणि अनेक प्रयत्न करूनही तो अजून नष्ट करता आला नाही! मागे मुस्लिम लीगच्या ऐन चळवळीच्या वेळी गावच्या देवीला नारळ देऊ नये, असा प्रयत्न काही तरुणांनी आमच्या गावात केला. परंतु पुरुषांच्या नकळत बायकांनी देवीला नारळ पोचते केल्याचे मला माहीत आहे! गेल्या पन्नास वर्षांत आमच्या गावात गोहत्या घडलेली नाही. पुष्कळसे तरुण गोमांस खातात, परंतु आमच्या बायका ते घरात शिजवायलाही तयार होत नाहीत! मुसलमान व्यापाऱ्याच्या जमाखर्चाच्या वह्या दिवाळीत बदलतात- मोहरमपासून व्यापारी वर्ष मोजण्याची प्रथा महाराष्ट्रीय मुसलमानांत क्वचितच दिसून येते. या सगळ्या परंपरा, हे संस्कार शुद्ध मराठी आहेत. कदाचित यांत श्रद्धेचाही भाग असेल (तो आहेच.) ही श्रद्धा उडवणे फक्त बुद्धिवादानेच शक्य होईल. अनेक वर्षांचे संस्कार नष्ट करणे फक्त बुद्धिवादाला शक्य आहे. परंतु जेव्हा ते शक्य होईल, तेव्हा देवीलाच नारळ देणे बंद होणार नाही- कशालाच न मानण्याची वृत्ती निर्माण होईल!
 अनेक वर्षांच्या शिकवणुकीनेही जर आपण या परंपरा नष्ट करू शकलो नाही; तर मग वेगळेपणाचा, अलिप्तपणाचा प्रयोग आपण किती दिवस करत राहणार? आता आपण उलट दिशेने आपल्या प्रयोगाला सुरुवात केली पाहिजे. वेगळेपणाच्या परंपरा वाढवण्याऐवजी एकमेकांशी संबंधित असलेल्या परंपरेच्या जोपासनेचे प्रयत्न केले पाहिजेत.
 हे करायचे, तर आपल्याला आपले शैक्षणिक धोरण आधी बदलले पाहिजे. फुटीरपणाच्या शिकवणुकीमुळे इथल्या बहुजन समाजाच्या आणि मराठी भाषेच्या द्वेषावर पोसला गेलेला-वाढलेला एक पुढारीवर्ग आमच्या समाजात निर्माण झाला आहे. सर्वसामान्य मुसलमान समाज अज्ञ, अजागृत राहिल्यामुळेच या वर्गाचे पुढारीपण टिकून राहत असल्याने तो नेहमी सबंध समाजाला चुकीचा मार्ग दाखवतो. इतकेच नव्हे, तर स्थानिक जीवनाशी समरस व्हावे असे इच्छिणाच्या नि त्याप्रमाणे प्रयत्न करणाऱ्या मुस्लिम तरुणांविरुद्ध लोकमत भडकावण्याचाही सतत प्रयत्न करण्यात येतो. परंतु यामुळे आलेली कटुता विसरून जाऊन, इथल्या बहुजन समाजावर अथवा सरकारवर विसंबून न राहता मुस्लिम बहुजन समाजाला या धोरणाचा अंतिम परिणाम समजावून देण्याचा प्रयत्न आम्ही मुस्लिम तरुणांनीच केला पाहिजे. असे प्रयत्न आपण केल्यास महाराष्ट्रातला बहुजन समाज आपल्याला खचित सहकार्य देईल. मुस्लिमांनी आपल्यात सामावून जावे, असेच त्यालाही वाटते. आपले स्वागत करायला तो तयार आहे- नव्हे, उत्सुक आहे!
 आजचा सर्वसामान्य मुस्लिम तरुण गोंधळलेला आहे. उद्याच्या महाराष्ट्रातील आपले स्थान कोणते, याची त्याला निश्चिती वाटत नाही. उदासीनतेच्या पोटी आलेला हा अलिप्तपणा नष्ट व्हावा असे वाटत असेल; तर आधी आपण आपल्या मराठी भाषेशी, संस्कृतीशी, इतिहासाशी आणि परंपरेशी समरस होऊ या. आपली मातृभाषा आपण आत्मसात करू या. उर्दू शिकायचीच असेल, तर कोणी आपल्याला प्रतिबंध केलेला नाही. उर्दूच काय, पण भारतातल्या आपल्या इतर भाषाभगिनींचाही मुसलमानांनी अभ्यास करावा, त्यात पारंगतता मिळवावी, असे मी म्हणेन!
 उर्दूचे प्रस्थ आपण किती ठेवायचे, याचाही आता विचार झाला पाहिजे. भारतात कुठल्याही प्रदेशाची भाषा म्हणून उर्दूला स्थान राहिलेले नाही. लखनऊ हे उर्दूचे केंद्र समजले गेले, परंतु तिथेही तिला एक प्रादेशिक भाषा म्हणून मान्यता नाही. यामुळे उर्दूच्या अस्तित्वालाच एक प्रकारचे आव्हान दिले गेल्यासारखे आहे. उर्दूची लिपी बदलली आणि देवनागरी लिपीचा तिने स्वीकार केला, तरच एक भाषा म्हणून भारतात ती तग धरू शकेल. तसे झाल्यास राष्ट्रभाषा म्हणून हिंदी शिकल्याने उर्दूचा आपोआपच सराव होऊ शकेल. परंतु सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास उर्दू शिक्षण मुसलमान तरुणांच्या चरितार्थाचा प्रश्न सोडवू शकत नाही. अशा स्थितीत नोकऱ्या मिळण्यास आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत पारंगतता मिळण्यास स्थानिक भाषेच्या अभावी आपण नालायक ठरलो, तर सरकारला अथवा बहुजन समाजाला दोष देणे योग्य ठरेल काय?
 आपल्या धार्मिक शिक्षणाचा सवाल आपण उपस्थित करणार असू, तर तोही एक प्रकारे चुकीचा ठरेल. बंगाली मुसलमानाला बंगालीमधून धार्मिक शिक्षण मिळू शकते, बोहरी व गुजराती मुसलमान कुराण व तरतीब यांसारखी धार्मिक पुस्तके गुजरातीतून वाचू शकतात; मग महाराष्ट्रीय मुसलमानाला मराठीतून ती वाचण्याची अडचण का वाटावी? श्री. सय्यद अमीनसारख्यांनी 'इस्लाम आणि संस्कृती'सारखी पुस्तके मराठीत लिहिल्यामुळे उलट अरबी न समजणाऱ्या मुसलमानांचा फायदाच झाला आहे. या गोष्टी आम्ही सामान्य मुसलमानाला समजावण्याच्या प्रयत्न केला पाहिजे.
 इथल्या सामाजिक जीवनात पूर्णपणे समरस व्हायचे असेल, तर आजची त्रिशंकू अवस्था आपल्याला आता सोडली पाहिजे. स्थानिक जनतेशी असलेले आपले सांस्कृतिक संबंध आपण अधिकच दृढ केले पाहिजेत. इथल्या परंपरांचे जतन करून आपण खऱ्याखुऱ्या अर्थाने महाराष्ट्रीय म्हणून ओळखले जाऊ या. मराठी सारस्वताचा आपला व्यासंग आपण वाढवू या. तुकारामाचे अभंग आपल्या ओठांवर खेळवू या. ज्ञानेश्वरीच्या अध्यायांची आपण पारायणे करू या. समर्थांच्या दासबोधाचे मर्म आपण समजावून घेऊ या. मराठी शाहिरांच्या वीररसाने आपण रोमांचित होऊ या. हे साहित्य-भांडार केवळ हिंदूंचे नाही, आपलेही आहे. मराठी सरस्वतीच्या अंगावरची ती बहुमोल लेणी आहेत.
 बदलता कालप्रवाह ओळखून आजचा मुस्लिम समाज आता महाराष्ट्राशी समरस होण्याची वाट शोधीत आहे. पूर्वीचे संस्कार त्याला बिचकावीत आहेत. अशा वेळी आपण तरुणांनी त्याला साह्य केले पाहिज. महाराष्ट्रातला मुस्लिम तरुण हा नवा दृष्टिकोन स्वीकारील, याबद्दल मला शंका वाटत नाही!

'मौज' साप्ताहिक :
 
११ एप्रिल १९५४
 

(हा लेख प्रसिद्ध झाला तेव्हा हमीदभाईंचे वय होते २२ वर्षे.)