चतुःश्लोकी भागवत/राजा परीक्षित

या परीक्षितीचा अधिकार । पाहतां दिसे अतिसुंदर । धर्माहोनी धैर्य थोर । वीर्यशौर्यधर विवेकी पैं ॥५९॥
कृष्ण असतां धर्म भ्याला । कलीभेणें पाठी पळाला । हा कलीसी ग्रासुनी ठेला । धैर्यै आथिला अधिकारी ॥९६०॥
चक्र घेऊनी निजहस्ती । ज्यासी गर्भी रक्षी श्रीपती । त्याचे अधिकाराची स्थिती । वानावी पां किती वाचाळता ॥६१॥
जेणें गर्भी रक्षिलें निजस्थितीं । त्यातें परीक्षी सर्वांभूती । यालागी नांव परीक्षिती । येथवर प्रीती हरिचरणीं ॥६२॥
अर्जुनवीर्य निर्व्यंग । सुभद्रामहीचें गर्भलिंग । तो अधिकाररत्नउपलिंग । उभयपक्षीं चांग जन्मला शुद्ध ॥६३॥
राजा आणि सविवेक । सत्त्ववृद्धि आणि सात्त्विक । ब्रह्मज्ञानालागीं त्यक्तोदक । असे अतिनेटक परमार्थी ॥६४॥
ऐसें देखोनी परीक्षितीसी । कृपा उपजली श्रीशुकासी । मग बैसवोनी सावकाशीं । श्रीभागवत त्यासी निरोपिलें ॥६५॥
दुजें दवडून दृश्य दृष्टी । अति गुप्ततेपरिपाठीं । हरिब्रह्मयांची गुह्यगोष्टी । बोले कर्णपुटीं अतिएकांतीं ॥६६॥
तेंचि ब्रह्मयानें नारदासी । बैसोनियां एकांतवासी । दुजें नपडतां दृष्टीसी । अतिगुप्ततेसी उपदेशिलें ॥६७॥
तेंचि नारदमहामुनीश्वरीं । अतिगुप्त सानें कुसरी । एकांतीं सरस्वतीचे तीरीं । व्यासासी करी निजबोध ॥६८॥
तेंचि श्रीव्यासें अतिनिगुती । बैसवूनियां एकांतीं । श्रीभागवत श्रीशुकाप्रती । यथार्थस्थिती उपदेशिलें ॥६९॥
एवं परंपरा उपदेशस्थिती । गुप्तरुपें जे आली होती । तेचि प्रगट जगाप्रती । शुक परीक्षिती परमार्थ सांगे ॥९७०॥
हे त्यागाची निजवोज । सप्तरात्रें साधावया काज । ब्रह्मशापें ऋषिसमाज । मेळवूंनियां सहज त्यक्तोदक जाहला ॥७१॥
ब्रह्मशापनियमावधी । अंतीं संकटविषयसंधी । तेथें पावला ब्रह्मनिधी । ज्ञानक्षीराब्धी शुकयोगींद्र ॥७२॥
मरतया अमृतपान । दुष्काळीं जेवीं मिष्टान्न । अवर्षणीं वर्षे घन । तेवीं आगमन श्रीशुकाचें ॥७३॥
भक्तिनवरत्नतारुं बुडतां । धर्मधैर्याचा स्तंभ पडतां । तो परीक्षिती शापें पीडितां । झाला रक्षिता शुकयोगींद्र ॥७४॥
तेणें बैसवुनी ऋषिवर्यपंक्ती । तारावयातें परीक्षिती । प्रगट परिसतां त्रिजगतीं । श्रीभागवतार्थी शुक वक्ता ॥७५॥
धन्य वक्ता तो श्रीशुक । श्रवणे विसरवी तान्हभूक । त्यक्तोदका झालें पूर्णसुख । कथापीयूष परमामृतें ॥७६॥
ब्रह्मशापें सर्प दंशतां । मरणभयाची कथावार्ता । विसरवुनियां नरनाथा । पूर्णपरमार्था त्यासी लावी ॥७७॥
तें हें श्रीभागवत संपूर्ण । दशलक्षणीं सुलक्षण । श्रीशुकें करवुनी श्रवण । परीक्षिती पूर्ण ब्रह्म केला ॥७८॥
जेवीं दोराचें सापपण । दोरीच मिथ्या होय जाण । तेवीं देहाचें देहपण । देहस्था मीपण जाणतां मिथ्या ॥७९॥
देह असो अथवा जावो । आह्मी पूर्णपरब्रह्म आहों । यापरी परीक्षिती पहाहो । केला निः संदेहो श्रवणमात्रें ॥९८०॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.