निर्माणपर्व/चित्त हवे भयशून्य

चित्त हवे भयशून्य


श्री. ग. माजगावकर यांसी

स. न. वि. वि.

 काल वर्षप्रतिपदा शके १८९९ च्या शुभदिनी महामहिम राष्ट्रपती महोदयांनी ‘आणीबाणी' संपूर्णतः उठविल्याचे ऐकून माझ्या मनात प्रामुख्याने जो विचार आला तो आपले मन:पूर्वक अभिनंदन करण्याचा. गल्या वर्षप्रतिपदा शके १८९८ पासून आपण तत्कालीन ‘आणीबाणीला' आव्हान देऊन माझी लेखमाला प्रसिद्ध करावयाला सुरुवात केलीत. त्यानंतर कहाणीचे पुस्तक छापलेत-त्यातील प्रास्ताविकासकट छापलेत, हे आपले धाडस सार्थकी लागले. आणीबाणीला आव्हान देण्याचा ध्वज आपण गेल्या वर्षी उभा केलात आणि या वर्षी गुढ्या तोरणे बांधून कालचा पाडवा साजरा केलात असेच मला वाटत आहे. आपल्या प्रकाशनाचे वैशिष्ट्य असे की, आपले हितकर विचार लिहावयासाठी विदूषकी साज न चढवता आपले विचार लिहिता येतात, लेखन ऋजु आणि मऊ असून त्यात विलक्षण दाहकता आणता येते हे 'माणूस' च्या पानोपानी जाणवते. आपले हे वैशिष्ट्य आणि धाडस नेहमी वर्धिष्णु राहो हीच देवाजवळ प्रार्थना!
 कळावे लोभ असावा ही वि.

२१-३-७७
आपला 
 

पु. ल. इनामदार, मुंबई

 खरी गोष्ट अशी आहे की, 'माणूस' ने इनामदारांसारख्या लेखकांचे आणीबाणीतील कामगिरीबद्दल प्रथम आभार मानायला हवेत. अशा लेखकांची साथ नसती तर १८।१९ महिने चाललेल्या आणीबाणीत स्वतंत्र विचारांचा पाठपुरावा करणारे लिखाण सातत्याने 'माणूस' मधून देत राहणे, निर्भयता प्रकट करणे एरव्ही कठीण गेले असते.

 आणीबाणीच्या काळात 'माणूस' मधून आलेले स्वतंत्र बाण्याचे लिखाण एकत्रित

करायचे ठरवले तर सहज ७।८ पुस्तके निघू शकतील. दोन तर निघालीही आहेत. (इनामदारांचे ‘लाल किल्ल्यातील अभियोगाची कहाणी' व सौ. सुमती देवस्थळे यांचे 'गॉर्की'). तिसरे अशोक जैनअनुवादित आर. डॉक्युमेंट निघण्याच्या वाटेवर आहे.
 देवस्थळे यांच्या 'गॉर्की' प्रस्तावनेतील हे हेतुकथन पाहण्यासारखे आहे. सुमतीबाई लिहितात-'गॉकीच्या जीवनकथेला फार झगझगीत असा राजकीय आशय आहे. एका प्रचंड राज्ययंत्रणेने त्यांची अक्षरश: शिकार केली.विचारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य या मलभूत मानवी हक्कांवर श्रद्धा असणा-यांना गॉर्कीची जीवनकथा विचार करायला लावील. राज्ययंत्रणा लेखनस्वातंत्र्याच्या आड येते म्हणजे नेमके काय घडते, याचे प्रत्यंतर गॉर्कीच्या जीवनकथेत स्पष्ट होते.'
 आणीबाणी घोषित झाल्यानंतर निघालेल्या पहिल्याच दिवाळी अंकात सुमतीबाईंचे हे लिखाण प्रसिद्ध झाले आहे हे ध्यानात घेतले, म्हणजे त्या काळातील या लिखाणाचे मोल विशेषत्वाने जाणवल्याशिवाय राहत नाही. कहाड साहित्य संमेलन लेखनस्वातंत्र्याच्या जयजयकाराने ज्यांनी गाजवून सोडले त्या इंदुमती केळकर परवा सहज बोलता बोलता म्हणून गेल्या- ‘‘गॉर्कीने चांगली कामगिरी केली. यावेळी गॉर्की पुढे येण्याला विशेष महत्त्व होते. 'माणूस' ची आणीबाणीच्या काळातील Contribution मोठी आहे."
 या दिवाळी अंकात 'चार्ली चॅप्लीन' कशासाठी दिला होता? दिवाळी अंकाच्या अगोदरच्या अंकातील प्रकटनच त्यावर लख्ख प्रकाश टाकू शकेल. प्रकटनात चॅप्लीनचे आवाहन दिले होते. चॅप्लीनने म्हटले होते-
 'Soldiers,
 in the name of democracy
 let us unite. . .
 Brutes have risen to power
 एका विदूषकाचे हे भाषण.
 ‘डिक्टेटर' या चित्रपटामधील हिटलरच्या भूमिकेतील चॅप्लीनचे'
 ही चॅप्लीनची योजना त्यावेळी किती अचूक होती हे आणीबाणी उठून निवडणका जाहीर झाल्यावर पु. ल. देशपांडे यांनी जी कामगिरी केली त्यावरून आता तरी ध्यानात यायला हरकत नाही. यशवंतराव चव्हाण यांना प्रतिटोला मारताना प. लं. ना चॅप्लीनचे उदाहरणच आठवावे हा काही केवळ योगायोग नाही. जगभर यादीत असलेले, लोकांना चटकन भिडणारे हे साम्य आहे. 'माणूस' ने हे साम्य ओळखून त्यावेळी विस्ताराने चॅप्लीनची कथा सादर केली. या कथेचे लेखक होते अनिल किणीकर.

 याच दिवाळी अंकातील डॉ. श्रीराम लागू यांचा 'अँटिगनी' हा नाट्यानुवाद कशासाठी होता? नाझीव्याप्त फ्रान्सला हुकुमशाहीविरुद्ध लढण्याची प्रेरणा 'अँटिगनी ने दिलेली होती. त्यावेळच्या अंध:कारमय कालखंडात ही प्रेरणा आपल्याकडेही जागती ठेवणे आवश्यक होते. पुढे 'अँटिगनी' संबंधी. उलटसुलट चर्चा वृत्तपत्रातून आली, तरी या प्रेरणेचे महत्त्व कोणालाच अमान्य झाले नाही. आता सांगायला हरकत नाही, हा डॉ. लागूकृत अँटिगनी-अनुवाद भूमिगत असताना मृणाल गोरे भाच्या वाचनात आला. माझी व त्यांची अशा स्थितीत एके ठिकाणी भेट झाली तेव्हा, हा अनुवाद लगेच प्रसिद्ध व्हावा ही इच्छा त्यांनी बोलून दाखवली. दिवाळी १५/२० दिवसांवर येऊन ठेपलेली होती. पुष्पाबाई भावे यांनी मग धावपळ सुरू करून वेळेवर हे सर्व साहित्य 'माणूस' ला उपलब्ध करून दिले आणि अगोदर उरलेले बरेचसे कथासाहित्य रद्द करून हा संपूर्ण अनुवाद एकाच अंकात 'माणूस नेही प्रसिद्ध करून टाकला.
 पुढे हा सर्व अंकच आक्षेपार्ह' ठरला. मुखपृष्ठासकट. कारण मुखपृष्ठावर मानवाच्या स्वातंत्र्यप्रेरणेचे प्रतीक असणा-या, जिव्हारी जखम झाली तरी, आकाशात उच उच झेपावणाच्या गर्दीच्या ‘फाल्कन' ससाण्याचे चित्र होते आणि शिवाय या कवितेतील ओळीही
 A proud call to freedom ... to light ...
 the madness of the brave we sing
 अंकातील ‘संपादकीय' तर फारच ‘स्फोटक' ठरले. कारण त्यात रा. स्व. संघ जणि दसरा-विजयदिन यांचा संबंध जोडला होता. (तुकडे पृष्ठ )
 आणीबाणी २६ जून (७५) ला जारी झाली. २८ जून अंकावरील इंदिरा गधी न्यायदेवतेला वाकवत आहेत अशा अर्थाचे चित्रकारं फडणीस यांचे चित्र व ताल 'इंदिरा गांधींनी अलाहाबाद कोर्टाच्या निर्णयानंतर राजीनामा द्यायला हरकत नाही' हे संपादकीय, प्रीसेन्सॉरशिपचा हुकूम हाती पडण्यापूर्वी छापून झाले हात या कारणास्तव सुटले. पण नंतरचा ५ जुलैचा अंक मात्र सापडला. मजकुरावर सिद्धीपूर्व नियंत्रण आले होते. पण रंगाबाबत लेखी सूचना नव्हत्या. म्हणून मुखपृष्ठावर सगळा काळा रंग घेतला आणि आत पहिल्या पानावर तीन सूचक अवतरणं देऊन या काळ्या रंगाचा अर्थ स्पष्ट केला. ही अवतरणे बाजारात उपलब्ध लल्या पुस्तकांतून निवडलेली होती. या पुस्तकांवर बंदी नव्हती. प्रीसेन्सॉरशिपची हुकूम नवीन मजकुराबाबत आहे, हे तर जुनेच साहित्य आहे-असा युक्तिवाद "ता येण्यासारखा होता. पण या युक्तिवादाचा काही उपयोग झाला नाही 3च्या अंकाचे काम चालू असतानाच 'माणूस' कचेरीत पोलीस अधिकारी थडकले

यांनी मशिनवर चालू असलेली पुढच्या अंकाची छपाई थांबवली आणि दुस-या दिवशी कॅपातल्या मुख्य आयुक्तांच्या कचेरीत हजर राहण्याचा हुकूम बजावून ते निघून गेले.
 दुसरे दिवशी ११ वाजता कॅपातल्या आयुक्तांच्या कचेरीत आम्ही तिघे हजर झालो. मी स्वतः, मुद्रक व सहसंपादक म्हणून दिलीप माजगावकर आणि स्नेही म्हणून बिंदूमाधव जोशी. डेप्युटी कमिशनरांच्या खोलीत आमचे पाऊल पडते न पडते तोच फोन वाजला. एका हाताने आम्हाला ‘बसा' असे खुणवीत डेप्युटी कमिशनरांनी फोन कानाला लावला. “Yes. Yes. He is just here' असे डे. कमिशनर फोनरून कोणाशी तरी बोलत होते. थोड्या वेळाने फोन संपला आणि त्यांनी म्हटलेः वेळेवर आलात. तुमच्यासंबंधीचाच दिल्लीचा फोन होता. तुमच्या मागील अंकावर अॅक्शन घेतली की नाही म्हणून चीफ सेन्सॉरने फोनवरून विचारणा केली.
 दिल्लीचे दडपण तेव्हा एकदम जाणवले.
 मी सगळा वर दिलेला युक्तिवाद केला. पण काही एक उपयोग झाला नाही. कडक ताकीद देणारे एक पत्र माझ्यासमोर ठेवण्यात आले. अंक तर जप्त झालाच होता. पण प्रेस वाचला.
 'Noted' असे पत्रावर लिहून मी सही केली. 'तुम्ही ताकीद दिलीत. तुमच्या हातात अधिकार आहे. ताकीद मला मिळाली. मी नोंद घेतली-' एवढेच मला कबूल करावयाचे होते. पत्रातील विधाने, बाकीचा मजकर मी मान्य केला नाही -करणे शक्यही नव्हते.
 प्रसिद्ध कायदेपंडित चंद्रकांत दरू यांचा प्रिसेन्सॉरशिप व मिसा कायद्याचे स्पष्टीकरण करणारा लेख ‘भूमिपुत्र' या गुजराथी नियतकालिकातून भाषांतर करून माणूस' साठी घेतला होता. पोलीस 'माणूस' कचेरीत आले तेव्हा या लेखाची छपाई सुरू होती. दुस-या दिवशी डे. कमिशनरांच्या कचेरीत या लेखावरूनसुद्धा वाद झाला. त्यांनी लेख प्रसिद्ध करायला मनाई केली. ऐनवेळी दुसरा मजकूर कुठून आणायचा? त्यामुळे १२ जुलैचा अंक निघूच शकला नाही.
 नंतरचा १९ जुलैचा अंक. आणीबाणी जाहीर होऊन पंधरा-वीस दिवसच जेमतेम उलटलेले आहेत. वातावरणात भीती दाटून राहिली आहे. पोलिसांकडे तेव्हा सेन्सॉरचे काम असल्याने त्यांची 'माणूस' कचेरीवर पाळत आहे. आणि तरीही या अंकातील ‘सोलकढी' सदरात अनंतराव भाव्यांनी एक काडी शिलगावून दिला. त्यांचा ‘नन्नाचा जाहीरनामा' पोलिसांच्या हातावर सफाईने तुरी देऊन पसार झाला• जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी अनंतरावांनी आणीबाणीला चक्क ‘पुटकुळावर नवे गळु' म्हटले आणि लिहिले-
 ‘शाळा नव्याने उघडल्या... नवा अभ्यासक्रम. तो मुलांना यथासांग शिकवायचा तर, मुलांनी जबाबदारीने वागायला हवे. बाकी सगळे कळले तरी तेवढे नेमके त्यांना कळत नाही. हवी तशी वागतात. आपापसात त्यांनी काहीही केले तरी हरकत नाही हो. पण ती शिची शिकवणाच्या बाईंना सतावतात. बाई तरी काय करणार? त्यांनी वर्गांतर्गत सुरक्षेसाठी आणि शांततेसाठी नन्नाचा जाहीरनामा काढून त्याची मातेच्या कठोरपणे अंमलबजावणी केली. हसतखेळत शिकवायच्या नव्या पद्धतीनुसार मुलांना जे सांगायचे ते त्यांनी गाण्यात सांगितले. ते गाणे असे:
  मुलांनो मुलांनो
  बोलू नका बोलू नका
  मुलांनो मुलांनो
  हालू नका हालू नका 
  मुलांनो मुलांनो
  तापू नका तापू नका
  मुलांनो मुलांनो
  लपू नका लपू नका 
  खोकू नका.. शिकू नका
  रडू नका...ओरडू नका
  पाहू नका ..खाऊ नका
  नका..नका...नको
  नं ना निन्नी नुनू नेनै नौ नौ नंनः ।
 यावेळी अनंतराव सहीसलामत सुटले. पण नंतर मात्र ‘सोलकढी' वर सेन्सॉरचा फार बारीक डोळा राहिला. २ ऑगस्ट अंकातील 'लंकेच्या नकाशात भारत' या मजकुरावर ‘जाहीरनाम्या'चा सूड उगवला गेला आणि वरचेवर काटछाट ९ऊ लागली. एकदा तर काटछाट झालेला मजकूरही अंकात छापला गेला. पण तंबीवर भागले.
 २६ जुलै अंकामुळे सेन्सॉरच अडकले. ‘राजमुकुटाची चोरी' ही एक सत्य. या अंकात छापली आहे. सेन्सॉरने पास केलेल्या या कथेचा शेवट असा आहे-
 'इंग्लंडच्या राजमुकुटाच्या चोरीची ही काहीशी जगावेगळी हकीकत वाचून अपक वाचकांच्या डोक्यात काहीतरी यासारख्याच ओळखीच्या घटनेची याद येऊ गली असेल. २४ मे १९७१ रोजीची दिल्लीत स्टेट बँकेची ६० लक्ष रु. ची 'हाणी वाचक अजून विसरले नसतील; पण वाचकहो, भलत्या शंकाकुशंका न
काढणेच बरे नव्हे का ? कारण त्यातील मुख्य आरोपी श्री. नगरवाला हॉस्पिटलमध्य ‘हृदयविकाराने’ मृत्यू पावला. या प्रकरणाची चौकशी करणारे कश्यप, ग्रेंड ट्रंक रोडवरील अपघातात ठार झाले. पोलीस तपासात पुरेसा पुरावा पुढे न आल्यामुळे स्टेट बँकेचे चीफ कॅशियर श्री. मल्होत्रा यांच्यावरील खटला काढून टाकला गेला आणि या प्रकरणावर पडदा पडला. त्यामुळे आता अजूनही राजमुकुटाच्या चोरीसारखीच ही राजपेढीतील (स्टेट बँक) ६० लाखांची चोरी ‘करण्यात’ आली असे तर्कवितर्क करण्यात काय स्वारस्य? श्री. मल्होत्रांना बँकेतून काढून टाकण्यात आले. ही शिक्षा त्यांना पुरेशी आहे. नव्हे का ?'
 २६ जूनला आणीबाणी जाहीर झाली. बरोबर एक महिन्यानंतरच्या २६ जुलैच्या माणूस अंकात कथेचा हा शेवट सेन्सॉरच्या परवानगीने छापून येऊ कसा शकतो? आयुक्तांच्या कचेरीत संपादकांना पुन्हा बोलावले गेले. का बोलावले ते फोनवरून अगोदर सांगितलेले असल्याने संपादकही सेन्सॉरची सही शिक्क्याची प्रत घेऊन हजर झाले. ताकीद देण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी फक्त तोंडी. संपादकांनी हळूच सेन्सॉरची मान्यता प्रत दाखवली. अधिका-यांचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला !
 ‘सेन्सॉरवाल्यांनाच आता टप्पू घातला पाहिजे' असे म्हणत अधिकारी संपादकांबरोबरच खोलीबाहेर पडले.
 पुढचे १।२ अंक पड खाल्ली. वाईचे डॉ. शरद अभ्यंकर यांनी लिहिलेल्या सूचक नीतीकथाही सेन्सॉर संमत करीना. १५ ऑगस्ट अंक बंदच ठेवला आणि नंतरच्या अंकात खूप काटछाट होऊन आलेला आबा करमरकरांचा विधायक कार्यावरील लेख, काटलेला भाग पांढराच ठेवून छापून टाकला. अंगावर कोड दिसावा तसा लेख दिसत होता. पांढ-या मोकळ्या जागेतील मजकूर सेन्सॉर झालेला आहे हे न सांगताच समजत होते. सेन्सॉरला हा अप्रत्यक्ष निषेध कसा मानवणार? त्यांनी हरकत घेतली. हरकत फार जोरदार वाटली नाही म्हणून ही कोड फुटलेला पाने 'माणूस' मधून जरूर वाटली तेव्हा पुढे येतच राहिली.
 चौकटी वेगवेगळया वेळी, सुट्या सुट्या, सेन्सॉरकडून मंजूर करून घ्यायच्या. त्यांची मांडणी एकत्रित करून हवा तो अर्थ वाचकांपर्यंत पोचवायचा-हीही एक चोरवाट या कठीण काळात 'माणूस' ला उपयुक्त ठरली.
 ग्राहक चळवळीचा वर्धापन दिन आला. सप्टेंबर महिना. गणपती उत्सवही सुरू होता. चित्र टाकून टिळकांचा काळ आणि सद्य:स्थिती यातील साम्य सूचित करता येत होते. टिळकांच्या काळात गणेशोत्सवाने जी कामगिरी बजावली ती नाटक संघांनी आता बजवावी, इतपत उघडपणे लिहिलेले चालू शकले. भयंकर  दडपशाही आणि भीतीच्या वातावरणातून टिळकांना वाट काढायची होती. निदान आरत्या म्हणायला तरी लोक एकत्र जमू देत. त्यातून हवा तो विचार, हवी ती धिटाई हळूहळू प्रगट होईल, असा गणेशोत्सवामागील टिळकांचा हेतू होता. तेलातुपाचे वाटप करताकरता देखील असा काही अंतरीचा हेतू ठेवून कार्य करणे ग्राहक चळवळीला अशक्य नव्हते.
 अनिल बर्वे यांची ‘बँक्यू मि. ग्लाड' ही कादंबरी 'माणूस' मधून याच सुमारास आली. वाचक अक्षरशः थरारून गेले. कादंबरीचा नायक नक्षलवादी आहे की, नंतर झालेल्या कादंबरीच्या नाट्यानुवादाप्रमाणे क्रांतिसिंह आहे, हा सवाल नव्हता. एका जुलमी सत्तेशी झुंज घेणारा हा एक बेडर आणि ध्येयवादी तरुण आहे, याने वाचक विलक्षण प्रभावित झाले होते. वीरभूषण पटनाईकाच्या हौतात्म्याची ही एक ज्वलंत दाहक कहाणी होती. काळ्याकुट्ट अंधारात वीज चमकावी, क्षणकाल आसमंत उजळून निघावे तशी आणीबाणीत ही कथा चमकली-गाजली. खाडिलकरांच्या 'कीचकवधा' सारखा परिणाम तिने साधला.
 पाठोपाठ क-हाडचे साहित्य संमेलन आले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे छापील भाषण छापायचे नाही, अशा सेन्सॉरच्या आज्ञा भाषण झाल्यावर ताडतोब सुटल्या. त्या फोनवरून दैनिकांना दिल्या गेल्या. त्यामुळे दुस-या दिवशीच्या एकाही वृत्तपत्रात तर्कतीर्थाचे भाषण आले नाही. तुरळक ठिकाणी आले ते महत्त्वाचा शेवटचा लेखनस्वातंत्र्याचा उल्लेख गाळून. माणूस साप्ताहिक असल्याने अशी फोनवरून सेन्सॉरची आज्ञा काही त्यावर बजावली गेली नाही. या फटीतून सुटका होऊ शकली होती. सगळे भाषणच 'माणूस' ने छापून टाकले. साहित्य संमेलनावर व विशेषतः दुर्गाबाईंनी केलेल्या पराक्रमावर तर एक सोडून दोन लेख 'माणूस' ने दिले. अगदी संमेलनाच्या सुरुवातीला दिल्या गेलेल्या घोषणांच्या उल्लेखासहित.

 'तर जपानमधल्या प्रस्थापिताच्या विरुद्ध लढ्याची ही आणखी एक चित्रपट कथा. तिचं नाव तितकंच यथार्थ-'रिबेलियन.' एका पिसाट धर्मसत्तेविरुद्ध किंवा राजसत्तेविरुद्ध काही नगण्य पण सच्चा माणसांनी दिलेली एक लढत'...ही सुरूवात आहे एका चित्रपट समीक्षणाची. समीक्षक आहेत अशोक प्रभाकर डांगे असे कितीतरी परदेशी चित्रपट हुडकून हुडकून त्यांच्या कथा डांगे यांनी या काळात आवर्जून सादर केल्या.
 रिबेलियन' चा प्रकाशनकाळ आहे. २७ डिसेंबर १९७५. आणीबाणीला फक्त सहा महिने झाले होते.
 याच सुमारास सायक्लोस्टाइल्ड पत्रके, लेख वगैरे ‘भूमिगत' मजकूर बराच येत होता. एका पत्रकात ना. ग. गोरे यांचे आणीबाणी विरोधाचे लोकसभेतील भाषण सविस्तर दिलेले होते. त्यातील एक वाक्य छापण्याचा मोह अगदी अनावर झाला. ना. ग. गोरे यांनी या भाषणात सताधारी पक्षाला टोमणा मारला होता-
 'लोकशाही ही बुरखाधारी स्त्रीसारखी असावी काय, की तिला इतर कोणी पाहू नये, स्पर्श करू नये, केवळ सत्ताधारी पक्षालाच तिच्याबरोबर बोलता यावे ? '
 लोकसभेतील भाषणे, भाषणातील काही भागसुद्धा छापण्यास तेव्हा बंदी होती. पण 'ना. ग. गोरे यांच्या नवी दिल्ली येथील एका अप्रकाशित भाषणातून...' असा मोघम संदर्भ देऊन वरील वाक्य 'माणूस' ने मुखपृष्ठावरच छापून टाकले. हा अंक होता २७ डिसेंबर १९७५ चा. आणीबाणीची पहिली सहामाही जेमतेम पूर्ण झाली होती. वातावरण किती तंग होते. हवेत किती घबराट होता, हे सांगायला नकोच. तरीही वाटले होते, ही वाक्यप्रसिद्धी दुर्लक्षिली जाईल पण अंदाज चुकला, सेन्सॉरने कान पकडला. कळविले-
 'आपल्या दिनांक २७ डिसेंबरच्या अंकातील मुखपृष्ठावर आपण खासदार श्री.ना ग.गोरे यांच्या भाषणातील एक उतारा संदर्भविरहित व भडकपणे उद्धृत केला आहे.
 ‘सदर बाब ही गाईडलाईन्समधील सूचनांशी विसंगत असून आक्षेपार्ह आहे. याची आपण नोंद घ्यावी व इतःपर याबाबतीत खबरदारी घ्यावी.'

 ‘माणसातील अपूर्वाई बुद्ध्याच वा बेपर्वाईने चिरडून टाकणारा समाज पुरता मुर्दाड आणि पूर्वपरंपरावादी, गतानुगतिक बनतो. त्या समाजाची प्रगती खुटते, किंबहुना अशा समाजाच्या स्वतंत्र अस्तित्वाचे प्रयोजनच नाहीसे होते'... नवीन वर्षाची (७६) ची सुरुवात. थोर व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारवंत बट्रांंड रसेल यांचे लिखाण माणूसमधून प्रसिद्ध होऊ लागले. वरील अवतरण मुखपृष्ठावर दिले होते! "
 याच ३ जानेवारी अंकात देवीदास बागुल यांचे 'झेड' या चित्रपट, परीक्षण आहे. 'एकला चलो रे' चे निखळ धैर्य दाखवणारा एक न्यायाधीशचं पोलीस-राजकीय गुंड यांच्या दडपणाला बळी न पडता निर्भयपणे खरी साक्ष देणारा एक सामान्य कामगार. सर्व समाज मुर्दाड बनला तरी माणसातील चैतन्य जागे आहे, ही श्रद्धा जागवणारी ही चित्रपटकथा...
 "'मनु' शासन पर्वाकडे” हे संपादकीय-
 हा सगळा अंकच स्फोटक होता.

 रसेलनंतर कुरुंदकरादिकांचे स्वातंत्र्यविषयक लेख-
 स्वामी रामानंदतीर्थाच्या विस्मृत कार्याची ओळख-
 श्री. मा. भावे यांनी महाभारतातील कथांतून सांगितलेले आधुनिक भारत-
 प्रा. बिवलकर यांनी केलेले वीस कलमी कार्यक्रमाचे परखड विवेचन-
 ‘कोणीतरी रानडुकराच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत करायला हवी, ' राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली माझ्या राष्ट्राच्या रंगभूमीचा गळा दाबण्यात आला आहे' असे भेदक मथळे-
 धारियांची तुरुंगात घेतलेली मुलाखत-
 ‘आचार्य विनोबांचे निवेदन स्वीकारून आणीबाणी उठवा,' अशी संपादकीयातून केलेली स्पष्ट मागणी-
 रत्नाकर महाजनांनी दिल्लीमधील विचारवंत-कार्यकर्ते यांच्या घेतलेल्या लोकशाही संघटकांच्या मुलाखती-
 'बकऱ्याची गोष्ट' सारखी एखादी उपरोध कथा-
 संजय गांधींचा भस्मासूर याच सुमारास उदयास येत होता. वृत्तपत्रातील त्यांची मोठमोठी छायाचित्रे आणि भाषणाचे अहवाल वाचून आतल्या आत माणसे चडफडत होती. सार्वत्रिक लाचारीची किळस वाटू लागली होती. या परिस्थितीत 'माणूस' मधील ‘संजयोवाच' या उपरोधिक स्फुटाचे वाचकांकडून प्रचंड स्वागत व्हावे, यात नवल नाही. तोवर मराठीत तरी संजयस्तोमाची अशी टर उडवणारे, त्यांची खरी लायकी त्यांना दाखवणारे एक अक्षरही कुठे प्रसिद्ध झालेले नव्हते. नंतरही नाही. त्यावेळी जो भेटेल तो कळवत होता-'माणूस' सर्वांच्या मनात जे डाचत होते, ते व्यक्त केले. लेखक कोण म्हणून चौकशी सुरू झाली. 'बकऱ्याची गोष्ट' आणि ' संजयोवाच' या दोन स्फुटांवर शासनाची विशेष नजर होती. त्यावर लेखकाचे नाव दिलेले नव्हते. आता ते जाहीर करायला हरकत नाही. वि. ग. कानिटकरांनी ही दोन्ही स्फुटे लिहिलेली होती. खूप दडपणे आली. 'माणूस' कचेरीत काम करणा-यांकडून लेखकाचे नाव काढून घेण्याचेही विश्रामबाग पोलिसांकडून (L.I.B.) प्रयत्न झाले. पण पोलिसांची डाळ मुळीच शिजली नाही.

 पापाचा (!) घडा मात्र भरून आला होता.
 मध्यंतरी नसलेली 'प्री-सेन्सॉरशिप' माणूसवर लादली गेली. काही अंक शासनाने ‘आक्षेपार्ह' ठरवले. एकूण दहा.
 'माणूस' कडून एक हजाराचा जामीन मागितला गेला.
 वृत्तपत्रनियंत्रण कायद्याच्या चौकटीत राहून हे सर्व लिखाण ‘माणूस' ने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे ते आक्षेपार्ह ठरू शकत नाही, अशी 'माणूस' ची भूमिका होती. पण अधिका-यांना सांगून-पटवून काही फायदा नव्हता. अधिकारी वर बोट दाखवीत. गृहखात्याला विचारा असे सांगत. सचिवालयात तर तेव्हा पाऊल ठेवावेसे वाटत नव्हते. स्वाभिमानाचे इंद्रिय बाहेर ठेवूनच अशा ठिकाणी त्या काळात जावे लागत होते. हाराकिरी करून 'माणूस' बंद पडू द्यावा, या विचाराने सर्वात जास्ती उचल घेतली असेल ती या काळात. प्रत्येक अंक म्हणजे एक नवे संकट होते. नवे आव्हान होते. एक तरी स्वतंत्रतेची, अस्मितेची जीवंतपणाची खूण प्रत्येक अंकात उमटली पाहिजे, असा हट्ट होता, आणि शासन तर नाकेबंदी करायला, अस्तित्व कागदोपत्री शिल्लक ठेवून प्रत्यक्षात अशक्यप्राय करून टाकायला टपलेलेच दिसत होते.
 एखादे पत्र येई आणि काही काळ दिलासा देऊन जाई. मराठवाड्यातील घटनांवर माणूसमधून पूर्वी अधूनमधून लिहिणारे श्री. देवदत्त तुंगार यांनी लिहिले होतेः
 'माणूस' मधील काही लेखन स्वातंत्र्यपूर्व काळातील शिवरामपंतांच्या अन्योक्तीपूर्ण लिखाणाची आठवण करून देते. 'साधनाचे' काम सरळसोट व ‘मूले कुठार' स्वरूपाचे वाटते...' वगैरे..वगैरे...
 मित्रमंडळी अंक बंद करण्याच्या विचारापासून परावृत्त करीत.
 आर्थिक ओढाताण तर असह्य होऊ लागली होती. थोड्याफार जाहिराती पूर्वी मिळत, त्याही सरकारने ‘काळी यादी ठिकठिकाणी पाठवून बंद करून टाकल्या.
 जामिनाविरुद्ध एकीकडे हायकोर्टात जायचे ठरवले. कारण १० अंक कारण न दाखवता ‘आक्षेपार्ह' ठरवणे हा धडधडीत अन्याय आणि अवमान होता आणि जामिनामुळे पुढे कळत न कळत बंधने आणि दडपणे वाढत जाणार होती, हे उघड दिसत होते.
 एक निरोपाचा अग्रलेखही या मन:स्थितीत लिहून ठेवला. कारण ‘पकडले जाणार' अशी अफवा होती आणि बाहेर राहूनही अशा स्थितीत फार काळ 'माणूस' चालू राहील, अशी शक्यता नव्हती.

  या निरोपाच्या अग्रलेखात मी नेहमीचा 'माणूस' बंद झाला तरी दोन विशेषांक वाचकांच्या हाती देण्याची योजना मांडली होती. एक मानवेन्द्रनाथ रॉय अंक व दुसरा पं. दीनदयाल उपाध्याय अंक. दोन थोर मानवतावादी विचारवंत. एक साम्यवादाकडून मानवतावादाकडे आलेला. दुसरा राष्ट्रवादातून मानवतावादात उत्क्रांत झालेला. 'माणूस' वर या दोघा विचारवंतांचे काही ऋण होते. या ऋणातून मुक्त होण्याची कल्पना या अंकामागे होती.
 पण कोणाचा तरी मदतीचा, सहानुभतीचा स्पर्श लाभे आणि 'शेवटचा अंक’ पुढे पुढे ढकलला जाई. 'निरोपाचा अग्रलेख' २-४ आठवडे तसाच टेबलावर लोळत पडला होता. एकदा तर 'छापून टाका' असे सांगून मी सहसंपादक दिलीप माजगावकरांच्या तो हवाली करून मुंबईला रॉय अंकाच्या तयारीसाठी निघूनही गेलो होतो.
 परत येऊन पाहतो तो सहसंपादकांनी तो टेबलाच्या खणात ठेवून दिलेला दिसला!
 

 स्वतंत्र विचारांची चारी दिशांनी कोंडी झालेल्या वातावरणात रॉय अंक निघाला म्हणून त्याचे खूप स्वागत झाले. प्रसिद्ध विधायक कार्येकर्ते आबा करमरकर एक दिवस सकाळी घरी आले आणि 'Manoos has done a yeoman service' असा या अंकावरचा अभिप्राय त्यांनी दिला. त्यांना या अंकावर, त्यातील विचारांवर एक स्वतंत्र लेख लिहायचा होता. मुंबईहून ‘टॉलस्टॉय' लेखिका सौ. सुमती देवस्थळे यांनी फोन करून अंकाचे स्वागत केले. एवढ्या गंभीर प्रकृतीचा अंक पण प्रती कमी पडल्या. सर्वसामान्य वाचकांनाही यातील स्वतंत्र विचारांची एवढी ओढ त्या बंदिस्त काळात जाणवत होती, हा याचा अर्थ. तुरुंगात अंकावर चर्चासत्रे झाली. महाराष्ट्रातील अग्रेसर विचारवंतांनी रॉय यांच्या माध्यमातून स्वातंत्र्य, लोकशाही या कल्पनांचा केलेला पुरस्कार अंकाच्या पानापानांतून उमटलेला होता. अगदी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा या अंकातील लेखही याला अपवाद नव्हता.
 रॉय अंकाव्यतिरिक्त 'सोल्झेनित्सिन' च्या ‘फर्स्ट सर्कल' कादंबरीतून निवडून अनुवादित केलेले ५ लेख आणि श्री. पु. ल. इनामदारांची लेखमाला ही या प्रीसेन्सॉरशिप कालखंडातील विशेष उल्लेखनीय प्रसिद्धी होती. सोल्झेनित्सिनने वर्णन केलेला स्टॅलिन काळातील भयग्रस्त रशिया, लाचारीने भरलेले रशियन समाजजीवन यांची अचूक आणि भेदक वर्णने येथील परिस्थितीशी तंतोतंत जुळणारी होती. 'त्याने (स्टॅलिनने) कोणावरही कधीही विश्वास ठेवला नाही' असा एखादा मथळाही परिस्थितीतले साम्य चटकन जुळवून टाकी. मजकूर तपासून आणून असे मथळे नंतर टाकण्याचे स्वातंत्र्य अधूनमधून घेऊ दिले जात होते.
आणीबाणीतील वृत्तपत्रबंधनांमुळे वाचकही हळूहळू सूचितार्थ शोधायला तत्पर आणि तयार होऊ लागल्याचा एक वेगळाच सुखद अनुभव या काळात खूपदा येऊन गेला. वाचकांची जाण वाढली होती किंवा असलेल्या जाणिवेला अधिक धार व सूक्ष्मता आली होती, असेही म्हणता येईल. भयाण शांततेत एखादी टाचणी पडल्याचा आवाजही ऐकू यावा तसा एखादा शब्द, एखादी कवितेची ओळही वाचकांच्या अंतःकरणाला थेटपर्यंत जाऊन भिडत होती.
 एकदा 'साधना' साप्ताहिकाची विनामूल्य प्रसिद्धीसाठी आलेली जाहिरात छापून पाहिली. ‘तीन दिवसात खुलासा करा,' असा प्रीसेन्सॉरचा खलिता धडकलाच. ‘मजकूर दाखवायला हवा, असा हुकुमाचा अर्थ केला. जाहिरातीही छापण्यापूर्वी सेन्सॉरला दाखवायला हव्यात, असे हुकुमात स्पष्टपणे म्हटलेले नव्हते,' असा खुलासा पाठवून वेळ निभावून नेली. ही जाहिरात साधनेने सर्व वृत्तपत्रांकडे पाठवली होती. कुणीही छापल्याचे दिसले नाही.
 पु. ल. इनामदारांची ‘लाल किल्ल्यातील अभियोगाची कहाणी' ही लेखमाला प्रीसेन्सॉरच्या पहा-यातून त्यामानाने सहीसलामत बाहेर पडली. शेवटी शेवटी मात्र सेन्सॉर जागे झालेले दिसू लागले. बहुधा वरून काही तरी लिहून आलेले असावे. विरोधी मतांचे वाचकही रागाच्या आणि उत्साहाच्या भरात सेन्सॉरला, पोलिसांना टेलिफोन करून सावध करीत असत, त्याचाही परिणाम नसेलच असे नाही. पण १-२ वेळा कात्री लागली हे पाहिल्यावर ताबडतोब पुस्तकप्रसिद्धीचा निर्णय घेतला. कारण पुस्तक सेन्सॉरसाठी पाठवायचा हुकूम काही तोवर बजावला गेलेला नव्हता. पुस्तकरूप दिल्यामुळे प्रास्ताविक विनाखटक छापता आले. जे छापले जाणे त्या वेळी तरी फार महत्त्वाचे होते, आवश्यक आणि अर्थपूर्ण होत. ही सर्व लेखमालाच फार संयमित, काटेकोर आणि अतीव जबाबदारीच्या जाणिवेने लिहिली गेलेली आहे. तरीही विचार स्पष्ट व ठाम आहेत. प्रास्ताविकात इनाम दारांनी लिहिले होते.
 ‘धूर आहे तेथे वन्ही, लपवालपवी आहे. तेथे पाप, तसेच जेथे भीताच वातावरण असते, तेथे दादागिरी करणारे हुकुमशहा असतातच. नागरिक अनुशासनाने राष्ट्राची आर्थिक परिस्थिती सुधारणे अत्यावश्यक आहेच. पण त्याबरोबरच काही प्रश्न स्वत:लाच विचारीत राहणे आवश्यक आहे, असे मला वाटते. हितकर विचार-उच्चार–स्वातंत्र्य सर्वांना आहे का ? निष्पक्ष व निभिक न्यायपीठे आहेत का? न्याय मागण्याचे सर्व दरवाजे खुले आहेत का? शासकीय यंत्रणा पक्षविरहित आहे का? एकच एक सत्ताधिष्ठित राजकीय पक्ष-प्रचारावर पोसणारी पद्धती संसदीय पद्धती होईल का? अनुशासनाच्या उन्मादात सुक्याबरोबर ओलेही जळत आहे का? इत्यादी व असे अनेक प्रश्न भारतातल्या प्रत्येक नागरिकाने स्वत:लाच विचारून त्याची उत्तरे शोधायची आहेत. एरवी भारतीय नागरिकांचे वयस्क मतस्वातंत्र्य (adult franchise) 'हाकलेली मेंढरे' अथवा 'विकत घेतलेले पाठबळ' या स्वरूपाचे राहील.'
 इनामदारांचे पुस्तक तडकाफडकी काढून अभिप्रायार्थ सर्वत्र पाठविले खरे, पण एकाही वृत्तपत्रात अभिप्राय छापून आला नाही. पहिला अभिप्राय झळकला तो नागपूर ‘तरुण भारत' मध्ये. अर्थात आणीबाणी उठल्यानंतर, अगदी अलीकडे. आता आणखी ठिकाणी येऊ लागले आहेत. इनामदारांना पुण्याच्या साहित्य परिषदेने व्याख्यानाचे निमंत्रणही पाठविले आहे असे कळते. आनंद आहे. त्यावेळी अस प्रोत्साहन मिळत गेले असते तर थोडी होरपळ कमी झाली असती इतकेच !
 जॉर्ज फर्नाडिस यांच्या बडोदा डायनामाईट केसमध्ये सरकार आणि सरकारचे पोलीस खाते यांच्याकडून गुन्हा हुडकण्यासाठी, यामागे मोठा कट होता हे सिद्ध करण्यासाठी, जो आटापीटा सुरू होता, त्यावर या लेखमालेमुळे अप्रत्यक्ष असा खूपच प्रकाश पडत होता. त्यावेळचे (१९४८-४९) आणि आजचे, राजकीय विरोधकांना खतम करण्याचे तंत्र काही बदलले नव्हते, याची जाणीवही तिचे मोल वाढण्याचे आणखीही एक कारण ठरत होती.
 या कठीण काळात अॅडव्होकेट दळवींचा आम्हा सर्वानाच फार आधार होता. 'माणूस,' 'साधना', रत्नागिरीचे 'समानता', आणखी खानदेशकडील एक नियतकालिक (नाव आता आठवत नाही), या सर्वांची हायकोर्टची बाजू दळवींनी सांभाळली आणि तीही जवळ जवळ विनामूल्यरीत्या. सुरुवातीला 'माणूस'चे व त्याचे संबंध औपचारिक स्वरूपाचे होते. पण माणूस ‘रॉय' वर अंक काढतो आहे. हे पाहिल्यावर संबंधातला औपचारिकपणा संपला आणि हा अंक यशस्वी करण्यासाठी दळवीच सर्व ठिकाणी पुढाकार घेऊ लागले. रॉय आणि सावरकर ही तरुणपणीची त्यांची दैवत होती. या दैवतांनी त्यांना आणीबाणीच्या कठीण काळात नागरिक स्वातंत्र्यासाठी झगडण्याची स्फर्ती दिली म्हणायची! पण ते आणि हायकोर्टातीत त्यांचे काही सहकारी, दिल्लीचे बॅ. तारकुंडे वगैरे लोक यांचा या काळात आधार मिळाला नसता तर, निदान 'माणूस' ची तरी धडगत नव्हती. कारण ‘माणूस' मागे एखादी संस्था उभी नव्हती. पक्षाचे किंवा नामवंत व्यक्तींचे पाठबळही नव्हते. सगळ्या आघाड्यांवर एकट्यालाच तोंड द्यावे लागत होते. दळवींसारख्या निरपेक्षतेने काम करण्याच्या व्यक्ती त्यामुळे खूपच आधार देऊन गेल्या.


 असाच दळवीकडे एकदा डोकावलो होतो. इतर बोलणे झाल्यावर त्यांनी बाजूला पडलेल्या एका पुस्तकाचा उल्लेख केला. पुस्तकाचे नाव होते R Document. ‘ताबडतोब पुस्तक विकत घेऊन जमेल त्या स्वरूपात माणूसमधून छापून टाका. पुस्तकावर बंदी येण्याची शक्यता आहे. अगदी आपल्याकडील सध्याच्या परिस्थितीवरच जणू काही लिहिले आहे. दळवी म्हणाले.
 आदल्याच दिवशी महाराष्ट्र टाईम्सचा वार्ताहर अशोक जैन भेटला होता. त्याने एक भयंकर' पुस्तक हाती आले आहे. आणि 'माणूस' साठी आपण ते अनुवादित करीत आहोत, असे उडत उडत सांगितले होते.
 पुस्तक विकत घेतले. जैन आणि दळवी यांची निवड एकच निघाली. आणखीही ७।८ जणांनी तरी हे पुस्तक आम्ही अनुवादित करतो' असे कळवले, इतकी या पुस्तकाची तेव्हा हवा होती. मुख्य प्रश्न अर्थात ‘पुस्तकावरील संभाव्य बंदी' किंवा 'सेन्सॉरची कात्री' हा नसून जैनकडून हा अनुवाद वेळेवर कसा मिळवायचा हा आहे. हे लवकरच मुंबईकर मित्रांनी ध्यानात आणून दिले आणि माणूसवरील लोभाखातर त्यांनीच ‘जैन पाठलाग मंडळ' स्थापन करून कामाची वाटणी करून घेतली. पुष्पा भावे, अनंतराव भावे, रामदास भटकळ, अरुण साधू दिनकर गांगल वगैरे मंडळ सदस्यांनाही जैन पुरून उरतो आहे हे लक्षात येताच दि. वि. गोखले यांचीही मदत घेणे शेवटी भाग पडले. अखेरीस जैन नामोहरम झाला. आपली पुरती कोंडीच झाली आहे, हे ध्यानात आल्यावर मात्र गडी भलताच तडफदार आणि दमदार निघाला. अक्षरशः चार दिवसात त्याने कामाचा फडशा पाडला. मुळातले काही कमी न होऊ देता, कमीत कमी जागेत, सरस अनुवाद वेळेवर पाठवून, त्याने गेल्या वर्षाची (७६) दिवाळी गाजवून सोडली. दीड-दोनशे दिवाळी अंक निघाले. फक्त दोन दिवाळी अंकात राजकीय परिस्थितीवर प्रत्यक्षअप्रत्यक्ष प्रकाश टाकणारी काही चर्चा, काही लेख, साहित्य आले होते. एक निळू दामले याने संपादित केलेला 'मराठवाडा' दैनिकाचा दिवाळी अंक आणि ‘माणूस' बाकी अंक काव्यशास्त्रविनोदात-ललित साहित्यात आकंठ बुडालेले. देश प्रचंड काळोखात आहे, लाखावर निरपराधी लोक गजाआड बंदिस्त आहेत, घटनेची मोडतोड सुरू आहे याची गंधवर्ता जणू या दिवाळी अंक काढणा-यांना नसावी! आणीबाणी सगळेचजण विसरले होते. गेल्या वर्षीचा लेखकांचा, कुठल्याही दिवाळी अंकात निषेध म्हणून न लिहिण्याचा क्षीण असा संकल्पही बारगळला होता. ही पाश्र्वभूमी होती ‘आर डॉक्युमेंट' च्या प्रसिद्धीची. त्यामुळे अंक निघाल्यालरोबर संपादक-सहसंपादकांना अटक झाल्याची अफवा जोरात फैलावली, यात नवल नव्हते. एक-दोन ठिकाणी पोलिसांनी अंक जप्तही करून नेला होता. कोणीतरी खोडसाळपणा केल्यामुळे अंक पोस्टातही थोडा रखडला. अफवा पसरायला एवढी कारणे पुरेशी होती. सेन्सॉरच्या कात्रीतून अशी 'भयंकर' खळबळ उडवून देणारा मजकूर सुटला कसा, हे मात्र ‘गुपित'च राहिलेले बरे. सगळचा चोरवाटा उघड करणे शहाणपणाचे नाही. मजकूर सुटला नसता तर मात्र कर्जाचा डोंगर उरावर घेऊन माणूस दिवाळीतच गाडला गेला असता, यात काही शंका नाही. इतका मोठा धोका त्यावेळी पत्करलेला होता.
 जैनचीही कमाल होती. एका साखळी वृतपत्रात काम करून त्याने माणूसबरोबर हा धोका पत्करण्याची तयारी ठेवावी, हे त्यावेळी तरी विशेष धाडसच होते.
 या धाडसाचे शेवटी चीज झाले. अनेकांनी जैनची पाठ थोपटली, त्याला मनापासून शाबासकी दिली. तुरुंगातून बापू काळदाते यांचे पत्र यावे, हा तर या सर्व स्वागताचा कळस होता.
 तुरुंगात या अनुवादावर व्याख्यानमाला गुंफल्या गेल्याचेही नंतर कळले.
 आणखी काय हवे होते? ज्यांच्या डोळ्यासमोर दिवाळी असूनही अंधार होता, त्यांना प्रकाशाचे, उत्साहाचे चार क्षण जर या अंकाने दिले असतील, तर आणखी कुठली सफलता हवी होती?
 आणीबाणीविरुद्ध गजाआडून ते लढत होतेच.
 गजाबाहेरूनही त्यांना साथ देणे हे आपले कर्तव्यच नव्हते का?
 इनामदार-जैन अशांसारख्या नव्या किंवा अनंतराव-कानिटकर-भावे या जुन्या लेखकांच्या व इतर अनेक लेखक-मित्रांच्या साहाय्याने हे कर्तव्यपालन 'माणूस'ने केले, इतकेच.
 गाजावाजा न करता, वावदूकपणा टाळून, सातत्याने.
 यात असलेच श्रेय तर सर्वांचे.
 किवा या कठीण काळात 'माणूस' बंद न पडू देणा-या कुठल्या तरी अज्ञात शक्तीचे.
 या विराट अज्ञातासमोर 'माणूस' नम्र आहे.
 म्हणूनच कदाचित तो या विलक्षण भयपर्वातही ताठ मानेने जगू शकला, निर्भय राहू शकला.

१६ एप्रिल १९७७