निर्माणपर्व/भारतीय मृगेन्द्र


भारतीय मृगेन्द्र




 निबिडतरकांतारजठरात निद्रिस्त असणारा हरी शेवटी जागा झाला, खवळला आणि त्याने चालून आलेल्या मदांध गजालीश्रेष्ठाचे गंडस्थळ फोडून आपल क्रोध शमवला.
 सिंह हा स्वातंत्र्याचे, स्वाभिमानाचे, माणसांच्या ठिकाणी असणा-या आत्मसन्मान प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून समजला जातो.
 ‘मानमहताम् अग्रेसर : केसरीˈ असे कवींनी त्याचे वर्णन केलेले आहे.
 कठिण काळ आला तर हा राजा, हा मानमहतांचा अग्रेसर उपाशी राहणे पसंत करतो; पण गवत खात नाही.
 याला बळजबरीने गवत खाऊ घालण्याचा प्रयत्न झाला. त्याची विटंबना केली गेली. त्याचे अंतस्थ राजेपण हिरावून घेतले गेले. त्याचा अहंकार डिवचला गेला. संधी मिळताच त्याने मग आपली नखाग्ने बाहेर काढली, गुरुतरशिलांचे भेद केले आणि भ्रमाने उन्मत्त बनलेल्या अनेक गजश्रेष्ठांना त्याने अक्षरशः धुळीत लोळवले.
 प्रत्येकाचा अभिमान पायदळी तुडवला गेलेला होता.
 राजकर्त्यानी गेल्या दीड-दोन वर्षात सामान्य माणसाची प्रतिष्ठाच नष्ट करून टाकली होती.
 मग तो सामान्य माणूस शहरातला कारकून, कलावंत असो, नाहीतर खेड्यातला लहान, मोठा शेतकरी असो.
 समाजातले सगळेच थर दुखावले गेले होते.
 कुणी सक्तीने नसबंदी झाली म्हणून चिडलेले होते.
 कुणी विनाचौकशी, विनापराध तुरुंगात डांबले गेल्यामुळे संतप्त होते.
 नागरिक स्वातंत्र्याची गळचेपी झाली म्हणून बुद्धिजीवी अस्वस्थ होते.
 आर्थिक कोंडी झाली म्हणून श्रमजीवी चितेत होते.

 कधी नव्हे तो शेतकरी या वेळी जागा झाला होता. त्याच्या घरादाराचे लिलाव झाले होते, त्याच्या मालाला भाव मिळत नव्हता. त्याची तरुण मुले शिकलेली होती. स्वस्थ बसायला तयार नव्हती.
 निरनिराळे थर निरनिराळ्या कारणांमुळे असे दुखावले गेलेले होते आणि हा असंतोष विधायक मार्गांनी वेळच्या वेळी प्रकट व्हायला काही साधन उरलेले नव्हते.
 राजकीय पक्षांना वाव नव्हता.
 वृत्तपत्रे बंधनात अडकलेली होती.
 सभांना बंदी होती. मोर्चे निघू शकत नव्हते.
 त्यामुळे असंतोष साचत गेला, दबून राहिला आणि वेळ येताच उफाळून वर आला.
 असंतोषाच्या लहान लहान लाटांचे एका महाप्रचंड लाटेत रूपांतर झाले आणि नगरांमागून नगरे गिळंकृत करीत शेवटी दिल्लीचे सिंहासनही या लाटेने वाहून नेले.
 मानवी संतापाचा एक वडवानल उफाळला होता.
 हा एक ज्वालामुखीचा उद्रेक होता.
 मतभेदांच्या, पक्षोपपक्षांच्या, जाती-धर्माच्या, वर्गीय हितसंबंधांच्या तटबंद्या चा उद्रकामुळे केव्हाच कोसळून पडलेल्या होत्या. लहानमोठा हा भेदभाव विर१ळला होता. स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यांच्या घराघरातून तेवणाच्या ज्योतींचे नालात रूपांतर झाले होते. प्रत्येकाच्या हृदयस्थ नारायणाला प्रेरणा मिळाली होती.
 हे सर्व राज्यकर्त्यांना कळलेच नाही. भ्रमात राहिले. नरसिंह प्रकट होतो आहे याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आणीबाणी नसती तर वेळेवर लक्ष तरी देण्याची बुद्धी त्यांना झाली असती. पण आणीबाणीमुळे तळागाळात काय काय घडते आहे चे ज्ञानच राज्यकत्यांपर्यंत पोचू शकत नव्हते. वाफ नको तितकी कोंडली गेली होती. तिचे उफाळून वर येणे क्रमप्राप्तच होते. निवडणुका जाहीर झाल्या म्हणून ती मतपेटीद्वारा उफाळली. नाहीतर आणखी वेगळ्या मार्गांनी बाहेर पडली असती झाले ते उत्तम झाले. मतपेटीद्वारा जगातील एक अभूतपूर्व राज्यक्रांती घडवून खवण्याची एक महासंधी येथील जनतेला त्यामुळे प्राप्त झाली.
 या लोकशाही राज्यक्रांतीचे सादपडसाद आता शेजारीपाजारीही उम

टल्याशिवाय राहणार नाहीत. लंका, ब्रह्मदेश, तसेच पाकिस्तानातील जनताही दडपली गेलेली आहे. तेथील राजवटी अन्यायावर उभ्या आहेत. या सर्व आसपासच्या देशांत असंतोष खदखदतो आहे. परकीय मदत घेऊन आर्थिक अरिष्टे पुढे ढकलण्याची कसरत याही देशांत चालूच आहे. आर्थिक स्वयंपूर्णता, लोकशाही स्वातंत्र्याची जपणूक करून कशी साधावयाची, हा पेच या सर्व आशियायी देशांसमोर उभा आहे. भारतीय मृगेन्द्राची ही जाग, ही गर्जना, हा त्याने साधलेला भीम पराक्रम या आसपासच्या देशांतील जनतेलाही स्फूर्ती दिल्याखेरीज राहणार नाही. शेवटी या उपखंडाचे प्रश्न समान आहेत. श्रीमंत बड्या राष्ट्रांची आर्थिक मांडलिकी सर्वांवरच जुलूम जबरदस्तीने, किंवा मदतीच्या नावाखाली लादली जात आहे. हे सारे अर्धविकसित देश अर्ध मांडलिक अवस्थेत आहेत व भाकरी व स्वातंत्र्य या दोन्हींचीही त्यांना तितकीच निकड आहे. भारतीय मृगेंद्राचे हे इतिहासदत्त कार्य आहे की, त्याने आपल्याबरोबरच आसपासच्या या सर्व लहानमोठ्या देशांनाही हे अथक पारतंत्र्य झुगारून देण्याची, एक स्वयंपूर्ण अर्थरचना खडी करण्याची स्फूर्ती द्यावी. प्राचीनकाळी तर सांस्कृतिकदृष्ट्या हा सर्व भूप्रदेश एकात्मच होता. या सर्व भूभागाला त्यावेळी जंबूद्वीप हे समान नामाभिधान लाभलेले होते. 'जंबुद्वीपे भरतखंडे' हा प्राचीनांचा स्वदेश होता. इंग्रजांनी तो लहान केला. फाळणीमुळे तो आणखी लहान झाला. ही. फाळणीची साम्राज्यसत्तांनी लादलेली प्रक्रिया आता उलटवण्याची, परस्परबंधुभावातून एकत्र येण्याची वेळ जवळ येत चालली आहे. भारतीय मृगेन्द्राची स्वातंत्र्याची, स्वत्वाची घनगर्जना आता चहूदिशांतून घुमली पाहिजे, तिच्यामुळे त्या त्या देशांतील भ्रष्ट, हुकूमशाही राजवटीही कोलमडून पडल्या पाहिजेत. हे महत्कार्य आहे आणि हे साधायचे तर, महत्कार्याचे कंकणही होती बांधायला हवे आहे. हे कंकण न बांधताच इंदिराजी हे साधू पाहत होत्या. म्हणून त्यांना अपयश येत होते. त्यांच्या राजवटीचा आता निरोप घेत असताना भारतीय जनतेने हे कधीही विसरता कामा नये की, मांडलिकत्वाची आत्यंतिक चीड असणारी ही एक प्रखर राष्ट्रवादी व्यक्ती होती. स्वयंपू, समर्थ आणि बलंसंपन्न भारताची उभारणी त्यांनाही अभिप्रेत होती-नव्हे ते त्याच एक स्वप्नही होते. पण केवळ राजकीय कसब दाखवून हे स्वप्न सत्यसृष्टीत उतर वण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी जनमानसात काही खोल नैतिक जाणीवाचा उदय व्हावा लागतो, त्या आधारे काही जनसंघटन सिद्ध व्हावे लागते. याचे त्यांना भानच नव्हते. त्यामुळे बांगला देशच्या युद्धात त्या विजयी होऊ शकल्या. भारताकडे त्यांनी दक्षिण आशियाचे नेतृत्व खेचून आणले. भारतीय उपखंड' हा शब्द प्रयोग नव्याने रूढ झाला. हे सर्व त्यांचे कर्तृत्व होते. पण मुख्य आघाडी आर्थिक होती. तिच्यासाठी काही वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्यबळाचे कंकण हाती बांधणे आवश्यक होते. ही व्रतनिष्ठा त्यांच्या स्वभावात नव्हती. असत्य, आणि

अनीती यांचे भय त्यांना नव्हते. आसुरी सत्ताकांक्षा हाच त्यांच्या राजनीतीचा पाया होता. अशी राजनीती काही नेत्रदीपक चमत्कार घडवून आणू शकते, पण नवसमाज निर्मितीची पायाभरणी करू शकत नाही. ज्या धक्कातंत्राने इंदिराजींचा राजकीय प्रवास सुरू होता, त्या तंत्राचा, हा धक्कादायक शेवट अटळ होता. त्यांच्या मुलाने, तो शेवट, आपल्या अविवेकाने लवकर खेचून आणला, इतकेच. अनुशासनाशिवाय राष्ट्रीय प्रगती अशक्य असते हे खरे. पण अनुशासन केवळ लादलेले असून चालत नाही. जनतेचा स्वयंस्फूर्त पाठिंबा त्यामागे उभा असावा लागतो. ही जनतेची स्वयंस्फूर्ती इंदिराजींनी मारून टाकली. हळूहळू भ्रष्टता वाढत गेली, त्यांच्या राजवटीचा, टोळक्याच्या कंपूशाहीत अधःपात झाला. विदूषक आणि खुषमस्करे यांच्या गोतावळ्यात त्या पूर्ण अडकल्या. कारण महत्कार्याची ओढ होती, पण व्रतनिष्ठेचे ककण हाती नव्हते. ते असते तर, हा दुर्दैवी राजकीय . अंत, ही पराभवाची शोकांतिका त्यांना सहज टाळता आली असती. २५ जूनपर्यंत आणीबाणी लादली जाईपर्यंत तरी जनता त्यांच्यावर प्रेमच करीत होती. या प्रेमाचा इंदिराजींनी इन्कार केला आणि सत्तामदाने त्या अधिकाअधिक धुंद आणि उन्मत होऊ लागल्या. न्यायअन्यायाची चाड संपली, ख-याखोट्याचा विधिनिषेध उरला नाही. सत्तला सेवेची जोड असती तर हे असे झाले नसते. कुठे तरी कुणाचे तरी एकले गेले असते. ज्या प्राचीन परंपरेचा अभिमान त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेला होता, त्यातील मौलिक भागाचे त्यांना विस्मरण व्हायला नको होते. विनोबांना जव्हा त्यांनी दूर सारले, जयप्रकाशजींना, संघाला जेव्हा त्यांनी शतुस्थानी मानायला सुरुवात केली. साधुत्वाची, शुचित्वाची परंपरा जेव्हा त्यांनी लाथाडली, तेव्हा त्यांच्या राजवटीचे उरलेसुरले नैतिक अधिष्ठान संपुष्टात आले आणि मग कवळ दडपणे थोडी सैल होण्याचा अवकाश पुरला. लोकक्षोभाचा प्रचंड वणवा भडकला आणि त्या, त्यांचा मुलगा, त्यांचे सर्व टोळके, संपूर्ण नेहरू राजवटच या वणव्यात सापडून इतिहासजमा झाली.
 ‘विनाशकाले विपरीत बुद्धी-' दुसरे काय म्हणायचे या अंतपवला?


 मात्र राजवट अशी इतिहासजमा झाली तरी तिचा वारसा डोळसपणे भाळावा लागतो. त्यात नवीन भरही घालावी लागते.
 समर्थ आणि स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न इंदिराजींना का पूर्ण करता आले नाही? त्यांच्या वडिलांनाही, ते लोकशाहीवादी असूनसुद्धा, या कामी अपयश का जाल, याचा नीट शोध घेतला गेला तरच अशी नवीन भर या ऐतिहासिक वारशात घालता येईल.
 येथील जनतेचे सामर्थ्य आपण नीट ओळखले नाही हे एक महत्त्वाचे कारण सांगता येईल,
 येथील जनविराट जागृत करण्याची कोणालाच आवश्यकता वाटली नाही.
 नेहरूंनी आणि इंदिराजींनी शासनसंस्थेवर केवळ भर दिला. वरवरचा जनस्तुतीवादाचा सोपा मार्ग स्वीकारला.
 या जनस्तुतीवादाचे युग संपले तरच नेहरूयुग संपले असे म्हणता येईल
 पण यासाठी जनहितवादाची कास धरायला हवी, अप्रिय पण पथ्यकर धोरणांचा धैर्याने, सातत्याने पाठपुरावा करायला हवा.
 जनतेला यासाठी शिक्षित आणि संघटित करण्याचे लांब पल्ल्याचे कार्य केल्याशिवाय असे धैर्य, केवळ लोकसभेत बहुमत आहे म्हणून, एखाद्या राजकीय पक्षाला दाखवता येत नाही, हा आजवरचा अनुभवही ध्यानात धरायला हवा
 यासाठी सत्तेची आणि सेवेची एक क्रांतिकारक एकजूट घडवून आणावी लागेल.
 आणि हे घडून आले तरच भारतीय मृगेन्द्र त्याचे इतिहासदत्त कार्य तडीस नेऊ शकेल.
 आज तो फक्त जागा झाला आहे.
 ही त्याची जागा अल्पकालीन न ठरो.

२६ मार्च १९७७