निर्माणपर्व/साम्यवादी पर्याय नको असेल तर ?





साम्यवादी पर्याय नको असेल तर !



 जयप्रकाशांची चळवळ ही हळूहळू उलगडत चाललेली लोकांची चळवळ आहे. एखादी तत्त्वप्रणाली निश्चित करून, तिच्या आधारे लहानसा गट वा पक्ष संघटित करून, लोकांना या गटामागे खेचून आणणारी व शेवटी सत्तासंपादनाचे उद्दिष्ट गाठणारी ही रूढ व आकारबद्ध चळवळ नाही. फॅसिस्ट किंवा कम्युनिस्ट चळवळी या स्वरूपाच्या असतात. याउलट जयप्रकाशांच्या चळवळीचे नाते टिळक-गांधींच्या जनता चळवळीशी अधिक जवळचे आहे. जनतेचे प्रश्न घ्यायचे, तात्पुरत्या संघटना, समित्या तयार करायच्या, प्रश्न बदलले तर हे तात्पुरते संघटनही बदलायचे आणि प्रश्न संपलाच, तर सगळा पसारा विसर्जित करून मोकळे व्हायचे, पसारा असतानाही शक्यतो मोकळे राहायचे, या खास भारतीय पद्धतीने जयप्रकाशांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना हे आंदोलन गोंधळाचे, अस्पष्टसे वाटते. तसे ते आहेही. पण तशी आपली मागची स्वराज्याची आंदोलनेही होती, हे मात्र आपण सहज विसरतो. जे व जेवढे लोक येतील, तेवढयांना बरोबर घेऊन, व्यवहार्य व सर्वांना झेपेल असा कार्यक्रम ठरवून, टिळक-गांधी पुढे जात असत. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क मानणाऱ्या टिळकांनी गणपती उत्सवापासून सुरुवात करून स्वदेशी बहिष्कारापर्यंत वाटचाल केली. गांधीजी सत्याग्रहापर्यंत गेले. यातील एकेक पाऊल पुढे पडायला दहा दहा, वीस वीस वर्षे उलटावी लागलेली आहेत. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे म्हणजे असा वेळ लागतोच. वाटही अगोदर निश्चित करता येत नाही. उद्दिष्ट तेवढे पक्के ठरवून, मिळेल त्या वाटेने, झेपेल त्या वेगाने चालू लागणे, इतर वाटांनी जाणाऱ्यांचेही जमेल तितके सहकार्य घेत राहणे, वाटचालीत अधून मधून थांबणे, मतभेद शक्य तेवढे मिटवणे, सहकाऱ्यामध्ये एकवाक्यता घडवून आणणे, त्यांना पुढच्या टप्प्यापर्यंत तरी एकत्र ठेवणे, अशी ही आपल्याकडील स्वराज्ययात्रेची पालखी चालली होती. त्यामुळेच आपली स्वराज्ययात्रा ही जनयात्रा ठरली आणि शेवट जवळ आला तेव्हा, सैन्यातल्या शिपायापासून अगदी सर्वसामान्य खेडुतांपर्यंत या यात्रेत सगळेच वर्ग, जाती-जमाती, पक्षोपपक्ष सामील झाले. या जनयात्रेची आठवण व्हावी अशा पद्धतीने स्वातंत्र्यानंतर 

प्रथमच जयप्रकाशांचे आंदोलन सुरू आहे. उद्दिष्टे अजून अस्पष्ट आहेत; सहकारी पर्ण विश्वासातले नाहीत; हाताशी एखादा संघटित पक्ष वा निष्ठावंत अनुयायांचा गट नाही. सर्वांना मुक्तद्वार आहे. तरीही वर्षापूर्वी सुरू झालेली ही यात्रा हळूहळू पुढे सरकत आहे. दिल्लीलाही एक धडक मारून झालेली आहे. सुरुवातीला केवळ भ्रष्टाचार निर्मूलन हे मर्यादित उद्दिष्ट होते. यात्रा पुढे सरकली तसे उद्दिष्ट अधिक व्यापक वनले. नवी क्षितिजे दिसू लागली. मोठा व दूरचा पल्ला दृष्टीसमोर आला. भ्रष्टाचार निर्मूलनाला, बेकारी कमी करणा-या शिक्षणसुधारणेची मागणी जोडली गेली. यात्रेत नवीन लोक आले. काही जुने गळाले. जुन्या-नव्यांचा मेळ घालण्यात काही वेळ गेला. विरोधकांचे हल्ले झाले. ते परतविण्यात शक्ती खर्च झाली. वाटचालीतच, वरोबर असतील त्यांच्याशी सहविचार, काही ध्येयधोरणात्मक चर्चा वगैरे. सगळेच उघड्यावर. मुक्त. मनात त्यावेळी असेल ते जयप्रकाश बोलून टाकतात, घरच्यासारखे. मग ती लाखोंची सभा असो, दहा-पाच कार्यकर्त्यांची बैठक असो. बोललेले सगळे ब्रह्मवाक्य म्हणून स्वीकारले गेलेच पाहिजे असा त्यांचा अट्टाहासही दिसत नाही. तरी वेळप्रसंगी कणखर भूमिका घेतली नाही, असेही नाही. घाई नाही, पण यात्रेत खंडही पडू दिलेला नाही. लय एकूण संथच, जशी ती गांधीजींची होती. म्हणून यात्रेत लाखो लोक समील होऊ शकत होते. वेग बेताचा होता आणि मुख्य म्हणजे गांधीजींचे आकर्षण होते. गांधीजींचे विचार, त्यांची मते, सर्वांना पटत होती असे नाही; पण हा देवमाणूस सांगत होता चला म्हणून आणि लोक फारसा मागचा पुढचा विचार न करता चालू लागले होते. गांधीजींच्या जवळ कुठे क्रांतीच्या, समाज परिवर्तनाच्या अगोदर ठरवून घेतलेल्या योजना होत्या ? वेळ येईल तसतशी एकेक कल्पना त्यांना सुचत गेली, ती ते सांगत गेले. कित्येकदा मागची आणि पुढची कल्पना वेगवेगळी असे . तरी गांधीजींची चळवळ वाढत गेली, स्वराज्य यात्रा लांबत-फैलावत गेली. विचारांपेक्षाही लोकांची गांधी या व्यक्तीवर श्रद्धा होती. हा माणूस आपल्या भल्यासाठी काहीतरी सांगून राहिला आहे, याला व्यक्तिगत असा कुठलाही स्वार्थ चिकटलेला नाही, सत्ता आणि संपत्तीचा याला मोह नाही, लोकेषणेच्याही हा पलीकडे पोहोचलेला आहे, हा साधू आहे, हा महात्मा आहे, असे लोकांना मनोमन जाणवले आणि लोक त्याच्यामागे गेले. जयप्रकाश चळवळीचेही आजचे मुख्य बळ व आकर्षण जयप्रकाश ही व्यक्ती आहे. त्यांचे विचार नाही, कार्यक्रम नाही. हा माणूस निरिच्छ आहे, सत्ताप्राप्ती हा त्याचा उद्देश नाही असे लोकांना वाटत आहे. राजकारणालाही साधुत्वाची डूब देणा-या गांधी परंपरेचा हा वारसा आहे, नवे आविष्करण आहे आणि भारतीय जनतेला या आणि अशाच आविष्करणाची आतून ओढ असते, हे आजवर अनेकदा दिसूनही आलेले आहे. गांधीजींवर डाव्या, शास्त्रशुद्ध वगैरे विचारसरणीतून कमी का टीका झाल्या ? त्यांनाही प्रतिगामी

निर्माण पर्व । १०४
वगैरे विशेषणे कमी का लावली गेली ? पण भारतीय जनतेने या टीका, ही विशेषणे मुळीच मनावर घेतली नाहीत. उलट या तथाकथित शास्त्रीय विचारसरणीच बदनाम झाल्या, एकाकी पडल्या. जयप्रकाशांच्या बाबतीत आज हे घडून येत आहे. डावे गट जयप्रकाशांना आज फॅसिस्ट किंवा फॅसिस्टांचे म्होरके ठरवीत आहेत. पण लोकांचा या टीकेवर मुळीच विश्वास नाही. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत पार रसातळाला गेलेल्या सार्वजनिक नीतीमत्तेची आणि चारित्याची शुभ्र ध्वजा पुन्हा उभारली गेलेली लोकांना दिसत आहे आणि लोक यावर विसंबून जयप्रकाशांच्या मागे जात आहेत. जयप्रकाशांचे आवाहन मुख्यत: नैतिक आहे,ते या अर्थाने. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला लोकांनाही पाहवत नाही. तो असणारच, चालू समाजरचनेत तो अपरिहार्य आहे, वगैरे पुस्तकी पंडितांची विश्लेषणे खरी असोत वा नसोत-लोकांना या विश्लेषणांच्या पलीकडे जाणारा काही स्वच्छ आदर्शाचा नि:संदिग्ध आग्रह धरला जायला हवा आहे. जयप्रकाश आज असा आग्रह धरीत आहेत. आणि हेच त्यांच्या यशस्वितेचे आज तरी मुख्य कारण आहे, इतरांजवळ नसलेले त्यांचे हे एक प्रमुख बलस्थान आहे.

 हे उघड आहे, की जयप्रकाशांची चळवळ केवळ नैतिक स्तरावरची असती तर आज ती इतक्या चर्चेचा, टीकेचा, विरोधाचा आणि आकर्षणाचा विषय झालीच नसती. नैतिकता हा तिचा मूळ पाया आहे; पण या पायावर आता राजकीय लढ्याचा एक किल्लाही उभा राहिलेला आहे. गेल्या २५-३० वर्षांत, दिल्लीच्या एकछत्री, एकपक्षीय सत्तेला शह देऊ शकेल असे नैतिक-राजकीय आंदोलन भारतात उभे राहू शकले नव्हते. केरळ-बंगालात साम्यवादी राजवटी आल्या आणि गेल्या. तामीळनाडूमध्ये द्रमुकसत्ता आहे. पंजाबमध्ये अकाली राजवट होती. ६७ च्या निवडणुकीनंतर, उत्तरेत ब-याच राज्यात संविद सरकारे आली. पण जयप्रकाशांच्या चळवळीइतकी या विरोधी राजवटींनी दिल्लीच्या सिंहासनाला धडक दिलेली नव्हती. या सिंहासनातला थोडाफार वाटा या राजवटी मागत होत्या, इतकेच. थोडीफार देवाण-घेवाण करून, कधी याचा वाटा काढून त्याला संतुष्ट ठेवून, एकाविरुद्ध दुस-याला खेळवत राहून दिल्लीचे सिंहासन स्थिर राहू शकत होते. मजबूतपणे कारभार करू शकत होते. जयप्रकाश चळवळीने मात्र वाटा वगैरे न मागता सिंहासनाच्या मुळावरचे सरळ सरळ आघात केला. दिल्लीची राजवट भ्रष्टाचारावर उभी आहे, देशातील भ्रष्टाचाराचे मूळ केंद्र दिल्लीत आहे, दिल्ली हलवल्याशिवाय देश बदलता येणार नाही, पाटण्याची लढाई थेट दिल्लीपर्यंत नेऊन भिडवावी लागेल, असे जयप्रकाश सांगू लागले आणि लोक त्यांचे मानू लागले. दिल्लीची सत्ता यामुळे आज अस्वस्थ आहे, अस्थिर आहे. तिची विश्वासार्हताच (Credibility) हळूहळू कमी होत आहे, धोक्यात सापडली आहे. पूर्वीच्या विरोधी पक्षीय चळवळीतून असा
धोका निर्माण झाला नव्हता. काँग्रेसची ती पिछेहाट होती. तिच्या अधिसत्तेला मुळापासून धक्का बसलेला नव्हता. जयप्रकाश चळवळीमुळे हा मूळ धक्का आता बसत आहे, कारण हे शस्त्र दुधारी आहे. एक बाजू नैतिकतेची, दुसरी राजकीय काँग्रेसजवळ राजकीय बाजू उलटविण्यासाठी लागणारे बळ व कौशल्य भरपूर प्रमाणात अजूनही आहे. निवडणुका जिंकणे, हा दिल्लीश्वरांच्या हातचा मळ आहे. पण केवळ निवडणुका जिंकून राज्य करता येत नाही. लोकांचा राज्यकर्त्यांवर विश्वास असावा लागतो. राज्यकत्यांच्या विश्वासार्हतेचे हे अधिष्ठानच जयप्रकाश आज काढून घेत आहेत. म्हणून दिल्लीचा एवढा जळफळाट आहे. विनोबांच्या भेटीला तरी इंदिरा गांधींनी पुन्हा पुन्हा जायचे कारण काय ? झपाट्याने घसरत असलेली आपल्या पक्षाची नैतिक बाजू थोडीफार सावरून धरता आली तर पाहावी, यासाठी केला गेलेला हा सर्व अट्टाहास. सर्व सेवा संघ फुटला असला, विनोबा बाईंना आतून अनुकूल असले, तरी ही घसरगुंडी थांबणे आता शक्य नाही. मग जयप्रकाश बिहारमध्ये निवडणुका जिंकोत किंवा हरोत. बाईचे ७१ चे स्थान आता पुन्हा त्यांना दिसणार नाही हे निश्चित.

 जयप्रकाशांची संपूर्ण क्रांतीची कल्पना आज तरी धूसरच आहे. तिचा ढोबळ आशय इतकाच जाणवतो, की बदल केवळ एका क्षेत्रात करून चालणार नाही. बदल सर्वंकष हवेत. राजकीय आणि सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या सर्व क्षेत्रांत क्रांतीचे वारे वाहायला हवेत. राजकीय क्षेत्रातील बदल जयप्रकाशांनी थोडेफार स्पष्ट केले आहेत. निवडणुका पैशाच्या जोरावर होऊ नयेत. निवडून आलेल्या उमेदवारांवर मतदारांचा सतत अंकुश हवा; वेळ पडली तर त्याला परत बोलावण्याची सोय हवी; त्याची मिळकत दरवर्षी जाहीर व्हावी; तो कुठल्याही एका पक्षाचा प्रतिनिधी असू नये; आपल्याला निवडून देणा-या मतदारांचा प्रतिनिधी म्हणून त्याने काम करावे, असे बदल जयप्रकाशांना राजकीय क्षेत्रात तूर्त अभिप्रेत दिसतात. सामाजिक क्षेत्रात जातिनिर्मूलनावर व हुंडाबंदीवर त्यांचा भर विशेष दिसतो. शैक्षणिक क्रांतीचे महत्त्व जयप्रकाशांनी अनेकवार सांगितलेले आहे. पण पर्यायी शिक्षणक्रमाचा आकृतिबंध त्यांनी अद्याप तरी मांडलेला नाही. शाळा कॉलेजांवर बहिष्कार पुकारा, इतकेच ते म्हणतात. एक खरे की, अशी पर्यायी शिक्षणव्यवस्था तपशीलात जाऊन मांडणे ही काही जयप्रकाशांची एकट्याचीच जबाबदारी नाही. इतरांनीही जबाबदारीचा वाटा उचलला पाहिजे. तरी पण या विषयात जयप्रकाशाकडन अधिक स्पष्टतेची अपेक्षा बाळगणे चूक नाही. शाळा-कॉलेजे सोडली तरी पुढे काय हा प्रश्न लक्षावधी पालकांना आणि विद्याथ्र्यांना भेडसावल्याशिवाय राहणार नाही. हा सगळा मोकळा झालेला विद्यार्थीवर्ग जयप्रकाशांच्या कार्यात समील झाला,
संघर्षवाहिनीत भरती झाला, खेडोपाडी जाऊन नवनिर्माण कार्यात त्याने स्वतःला झोकून दिले तर उत्तमच. संघर्षाचे आणि निर्माणाचे प्रत्यक्ष कार्य, हे फार मौलिक शिक्षण ठरेल. त्या विद्यार्थ्यांचे जीवनच बदलून टाकणारा हा प्रयोग मानावा लागेल. असे प्रत्यक्ष क्रांतिकार्य हे जीवन शिक्षणाची एक महान प्रयोगशाळाच असते आणि अशा शाळांतून विद्यार्थी बहुसंख्येने बाहेर पडले तर समाजजीवनाची एकूण स्तरच उंचावतो, नया बिहार बनाना है, नया देश बनाना है, हा या जीवनशिक्षणाचा प्रेरक मंत्रच यासाठी ठरायला हवा. पदवी शिक्षणाचा मोह टाळून, वर्ष-दोन वर्षासाठी, असा नवा देश बनवण्यासाठी बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी, मग छोटे छोटे अभ्यासक्रम ठरवावे लागतील. तात्पुरती खुली विद्यापीठे यासाठी चालवण्याची गरज निर्माण होईल. नव्या शिक्षणपद्धतीचा आकृतिबंध वगैरे अशा जिवंत प्रयोगांतूनच हळूहळू स्पष्ट होत राहील. पदवीप्रधान चालू शिक्षणपद्धतीवरही या खुल्या प्रयोगांचा इष्ट तो परिणाम होईल.
 जयप्रकाशांची आर्थिक क्रांतीची बाजू दुबळी वाटते. आर्थिक कार्यक्रम जाहीर केला तर आज बरोबर आहेत ते पक्ष, सहकारी सोडून जातील असे भय त्यांना वाटते का ? जानवे तोडा असे त्यांनी सांगितले, तेव्हाही काहीजण निघून जाण्याचा धोका होताच. तो त्यांनी जसा पत्करला, तसा आर्थिक कार्यक्रमाबाबतही पत्करायला हवा. जयप्रकाश एकेकाळचे समाजवादी. नंतरचे सर्वोदयी. तेव्हा आर्थिक कार्यक्रमाबाबत तर त्यांनी सर्वप्रथम आग्रह धरायला हवा. बिहारमधील जमीनदा-या, हे त्यांच्यासमोर उभे असलेले केवढे तरी मोठे आव्हान आहे. आपल्या अनुयायांना हे आव्हान पेलायला ते प्रवृत्त करणार आहेत की नाही ? माओची लाल सेना खेड्यात पोचली की, त्या खेड्यातील जमीनवाटपाचा कार्यक्रम लाल सैनिक प्रथम हाती घेत असत. जयप्रकाश असा काही कार्यक्रम आपल्या संघर्षवाहिनीसमोर ठेवणार आहेत की नाही ? साठेबाज व्यापारी, भ्रष्ट नोकरशाही, काळाबाजारवाले, समाजकंटक, यांच्यावर संघर्षवाहिनी तुटून पडणार आहे की नाही ? राजकीय पक्षांप्रमाणे एखादा जाहीरनामा काढून आर्थिक कार्यक्रमांची खैरात जयप्रकाशांनी मांडावी अशी अपेक्षा नाही. परंतु जेवढी राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रात त्यांनी स्पष्टता दाखवली, काही आग्रह धरले, तसे आग्रह आर्थिक क्षेत्रातही त्यांच्या कडूनधरले जायला हवे आहेत. त्याशिवाय त्यांचा संपूर्ण क्रांतीचा रथ पुढे सरकणार नाही; या रथाचे एक चाक जमिनीत कायमचे रुतलेलेच राहील.

 जयप्रकाशांचे वय आणि प्रकृती हा संपूर्ण क्रांतीच्या रथयात्रेतील एक मोठा अडथळा आहे. त्यांच्या अगदी निकटच्या सर्वोदयी आणि समाजवादी वर्तुळात कुणी त्यांचे
स्थान घेऊ शकेल अशीही शक्यता दिसत नाही. अशा व्यक्तीजवळ दोन-तीन वैशिष्ट्ये किमान हवीत. अखिल भारतीय मान्यता, पक्षाभिनिवेशाचा अभाव आणि चारित्र्यसंपन्नता. या दृष्टीने अटलबिहारी वाजपेयी-मधु लिमये ही नावे चटकन डोळयासमोर येतात. लोकसभेचा राजीनामा देऊन बाहेर पडण्याची अटलजींची घोषणा प्रत्यक्षात उतरली असती, तर यांचे स्थान जनमानसात एकदम उंचावले गेले असते व जयप्रकाशांच्या आंदोलनानेही अधिक गती घेतली असती. आता तरी या दोघांनी लोकसभेला काही काळ रामराम ठोकून, मधु लिमयांनी बिहारमध्ये व अटलजींनी मध्यप्रदेश-उत्तरप्रदेशमध्ये जयप्रकाशधर्तीचे पक्षातीत जनआंदोलन संघटित करण्याचे काम तात्काळ हाती घ्यायला हवे आहे. मनूचा मासा जसा विहिरीतून तळयात, तळयातून नदीत व नदीतून समुद्रात जातो, तसे हे दोन मासे आता आपापल्या पक्षांच्या नद्यांतून बाहेर पडून विशाल जनसागरात एकरूप व्हायला हवे आहेत. जयप्रकाश उभे आहेत तोवरच हे नवे नेतृत्वही जनमानसात स्थिरावले जायला हवे. म्हणजे संपूर्ण क्रांतीच्या रथयात्रेत खंड पडणार नाही व तिचा आकार व आशयही वाढत राहील रा. स्व. संघाचाही या दृष्टीने पुनर्विचार व्हायला हवा. दुसरी कुठलीही अखिल भारतीय संघटना हे शिवधनुष्य उचलण्याइतकी समर्थ नाही. गांधीजींची लोकसेवक संघाची कल्पना रा. स्व. संघच आज प्रत्यक्षात आणू शकतो. गांधीजींनी ४८ साली मांडलेली लोकसेवक संघाची कल्पना गुरुजींनीही त्यावेळी उचलली होती; समाजपरिवर्तनाची ही खास भारतीय पद्धती आहे, असा अभिप्राय गुरुजींनी तेव्हा व्यक्त केलेला होता. वरवरचे मतभेद आणि आकृतिभेद, या पलीकडे जाऊन भिन्न भिन्न परंपरांमधील समान आशय शोधण्याची दृष्टी बाळगली तर, एके काळी परस्परविरोधी असणारे किती तरी प्रवाह आज एकत्र आणता येतील. या सर्व प्रवाहांचा 'नया देश बनाना है' यासाठी उपयोग करून घेता येईल. या दृष्टीने संघाची परंपरा गांधीजींच्या विचारधारेला फार जवळची आहे. संघानेही यासाठी आपल्या परंपरेचा पुन्हा एकदा शोध घ्यायला हरकत नाही. या परंपरेतील कालबाह्य भाग कोणता, चिरकालीन महत्त्वाचा कोणता, हे ठरवून, त्या दृष्टीने आपल्या विचारांची, आचारांची पुनर्मांंडणी संघाकडूनही अपेक्षित आहे. मुसलमानांबद्दलचा आपला जुना दृष्टिकोन तर संघाने तात्काळ सोडायला हवा. हा या दशकाचा मुख्य प्रश्नच राहिलेला नाही. स्वातंत्र्यपूर्वकाळात हा प्रश्न होता व त्या काळात सावरकर-हेडगेवार यांनी या प्रश्नाला महत्त्व देणे अगदी अवश्य व योग्यच होते. त्या काळात सर्वसामान्य हिदू भेकड होता व मुसलमान शिरजोर व आक्रमक होता. आता हिंदू भेकडे नाही व मुसलमानांनाही, त्यांची शिरजोरी महागात पडते असा अनुभव अनेकवार, अनेक ठिकाणी येऊन चुकलेला आहे. आता हिंदू संघटनवाद्यांनी राष्ट्रासमोरील तर आव्हाने महत्त्वाची मानली पाहिजेत आणि हिंदू-मुसलमान प्रश्नाला जरा दुसरे-तिसरे स्थान द्यायला हवे. आता मुख्य आव्हान साम्यवादाचे आहे. आपले विषमतेचे, दारिद्रयाचे प्रश्न साम्यवाद सोडवू शकतो, असा विश्वास जनसामान्यांना वाटत आहे. चीन, व्हिएटनाम या जवळच्या देशात साम्यवादी राजवटी येऊन त्यांनी हे प्रश्न सोडवून दाखविल्याचा इतिहास आहे. साम्यवाद आणि राष्ट्रवाद यांचे बेमालूम नवीन मिश्रण या देशात तयार झाले आणि गर्तेतून हे देश पाहता पाहता वर आले. आपण लोकशाही मार्गाने हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. आणि लोकशाही मार्गाने प्रश्न सुटायचे, तर संघासारख्या सांस्कृतिक संघटनांनी, आर्थिक-सामाजिक क्षेत्रातील आव्हानेही स्वीकारायची तयारी ठेवली पाहिजे. साम्यवाद हे विषमतेवरचे औषध आहे. भांडवलशाहीने विकास होतो, पण हा विषम विकास असल्याने, साम्यवादाची निकड भासू लागते. लोकशाही मार्गानेही विषम विकास प्रक्रिया कशी रोखता येईल हा खरा आपल्यासमोरचा जटिल प्रश्न आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षात देशाचा विकास झालाच नाही असे आपण म्हणू शकत नाही. हा वारसा नाकारण्यात अर्थ नाही; पण हा वारसा सर्वांना मिळायला हवा, यातही काही संशय नाही. हे कसे साध्य करणार ? व्यक्तीचे स्वातंत्र्य, समाजातील मोकळे वातावरण कायम ठेवून ही समानतेची गरज आपण कशी भागवणार ? लोकसेवकांची फौज हे या प्रश्नाचे एक उत्तर आहे. हे लोकसेवक किंवा रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, सत्तेच्या दैनंदिन खेळात अडकणार नाहीत. पण दूर कुठेतरी अंतराळात, मठा-आश्रमात वावरूनही त्यांना चालणार नाही. तटस्थता, अलिप्तता हवी. पण तुटकपणा, सोवळेपणा नको. यासाठी पर्यायी संस्कार केंद्रे, लोकाभ्युदय केंद्रे त्यांनी उभारली पाहिजेत. शासकीय प्रयत्नांशी कधी समांतर, कधी विरोधी, कधी समन्वय साधून हे कार्य लोकसेवकांना करावे लागेल. पण यापैकी कुठलेही नाते प्रसंगानुरूप जोडले तरी शेवटी सेवकांचे अधिष्ठान ‘लोक' हे राहिले पाहिजे, सत्ता नव्हे-सरकार नव्हे. आपल्याकडील लोकशाहीचा प्रयोग यशस्वी व्हायचा, अभ्युदयाची आपली वाटचाल पूर्ण व्हायची, तर, हा स्वतंत्र, स्वायत्त लोकसेवक, राष्ट्रसेवक-अशांची संघटित शक्ती उभी राहणे अत्यंत अवश्य आहे. रथाचे हे दुसरे चाक आहे-व्हायला हवे. एक चाक सरकार दुसरे, एखादा आश्रम, खेड्यापाड्यातील एखादे चळवळकेंद्र किंवा संघशाखा हे ठरायला हवे यातले एकही चाक निखळून चालणार नाही. एकात दुसरे अडकूनही उपयोगी नाही. साम्यवादी पर्याय नको असेल, तर ही दोन्ही चाके जागच्या जागी असली पाहिजेत, पुढे पुढे सरकली पाहिजेत. सारथी अर्थातच श्रीकृष्णासारखा, गांधीजींसारखा-मोकळा, निराळा, वेगळा हवा हे उघडच आहे.


 जागृत जनगटांच्या द्वारा लोकसेवकांनी राजसत्तेवर अंकुश ठेवणे हा जयप्रकाशांच्या आजच्या चळवळीचा मुख्य आशय आहे. राजसत्ता कुठलीही असो, तिचे केंद्रीकरण होत असते. सत्तेचे वर्तुळ हळुहळू लहान होत जाते, आकुंचन पावते. या केंद्रीकरणामुळे भ्रष्टाचार वाढतो व या भ्रष्ट वर्तुळातून सत्तेला पुन्हा बाहेर काढणे, ती लोकाभिमुख करणे अवश्य होऊन बसते. केवळ निवडणुकांवर विसंबून ही लोकाभिमुखता टिकवून धरता येत नाही. इतर अंकुशांचीही गरज भासते. जयप्रकाशांच्या चळवळीतून असा एक प्रभावी अंकुश निर्माण होत आहे, झालेला आहे.या अर्थाने हा लोकशाही शुद्धीकरणाचा प्रयोग आहे असे मानावे लागेल. हा प्रयत्न सतत चालू राहिला पाहिजे. कारण सत्तेचे केंद्रीकरण, भ्रष्टीकरण सतत चालू असते.ते भांडवलशाहीत असते, तसेच समाजवादी देशातही असते. दोन्हीकडच्या भ्रष्टतेचे स्वरूप फक्त वेगवेगळे असते. चीनमध्ये क्रांती होऊन पंधरा-वीस वर्षे उलटली नाहीत तोच माओला हा शुद्धीकरणाचा प्रयोग, सांस्कृतिक क्रांतीद्वारा हाती घ्यावा लागावा, याचा अर्थ दुसरा काय होतो ? कुठलीही एक व्यवस्था स्थिरावली की, ती जड होऊ लागते, आणि या जडतेतून अनेक बाजूंनी भ्रष्टाचाराला पाय फुटत राहतात. भ्रष्टाचार याचा अर्थ मूळ ध्येयवादापासून लांब जाणे. मूल्यांचा विसर पडणे. तत्त्व आणि व्यवहार यांची फारकत होणे. ही फारकत कमी करणे हा शुद्धीकरणाचा अर्थ. ही फारकत नेहमी होत असते म्हणून शुद्धीकरणही नेहमी होत राहिले पाहिजे. ही फारकत कमी करा, असे जयप्रकाशांनी सांगितले व त्यांच्या चारित्र्यबळामुळे हे त्यांचे सांगणे लोकांनी मनावर घेतले, आपापले लहान-सहान मतभेद विसरून लोक त्यांच्यामागे जमा झाले. ही फारकत कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न इंदिरा गांधींनी केला तर जयप्रकाशांच्या चळवळीचा आजचा जोर ओसरेलही. पण इंदिरा गांधींनी अगदी लढाईचाच पवित्रा घेतलेला आहे. सुसंवाद अशक्य करून टाकलेला आहे. म्हणून जयप्रकाशांनाही खोलखोल पाण्यात उतरणे भाग पडत चालले आहे. सुसंवादाची वेळ अजूनही पूर्णपणे गेलेली आहे असे नाही. उद्या पाकिस्तानचे वा चीनचे आक्रमण झालेच, तर सगळे संदर्भ पुन्हा बदलतील, सुसंवाद झकत करावाच लागेल. मग तो आजच का केला जाऊ नये ? आपला लोकशाही प्रयोग ध्रुवीकरणापेक्षा अशा सुसंवादांमुळेच यशस्वी ठरण्याची अधिक शक्यता आहे.

मार्च १९७५