शब्द सोन्याचा पिंपळ/अजून मोहविते मधुशाला



अजून मोहविते मधुशाला



 ‘साहित्यकार के लिए पत्नी के अलावा एक प्रेयसी का होना जरूरी है।' या हिंदीतील प्रख्यात कथाकार नि तत्त्वचिंतक जैनेंद्रकुमार यांच्या विधानाने एके काळी हिंदी साहित्य जगतात वादाचे मोहोळ उठवून दिले होते. त्यामुळे आज जीवनाच्या उतारावर असतानाही मुलाखतकार जेव्हा जेव्हा जैनेंद्रकुमारांची मुलाखत घेतात तेव्हा हटकून प्रेयसीबद्दल छेडत असतात. जैनेंद्रकुमारांच्या प्रेयसीची यादी जाहीर झाली नसली तरी कवी हरिवंशराय बच्चन यांनी मात्र आपल्या क्या भूलें क्या याद करु' या आत्मकथनात आपल्या पत्नी नि प्रेयसीबद्दल प्रांजळपणे लिहिले आहे. जैनेंद्र प्रतिभेला प्रेयसी मानतात. प्रत्येक कवीमनात अशी प्रेरक प्रतिभा, प्रेयसी दडलेली असते. ती कवीला सतत बेचैन करत राहते नि मग या बेचैनीतून जन्माला येते एक मधुर काव्य, ‘मधुशाला' हे बच्चन यांच्या अशा बेचैनीतून निर्माण झालेले एक लोकविलक्षण काव्य आहे. ज्याला तारुण्यात बच्चन यांच्या ‘मधुशाला', ‘मधुबाला', 'मधुकलश' या काव्यसंग्रहांनी वेड लावले नाही असा तरुण (नि तरुणीही) सापडणे मुश्कील. याला मी अपवाद कसा असणार? ‘मधुशाले'बद्दल माझ्या मनात आपलेपणा असण्याचे आणखी एक कारण आहे. ज्या प्रेरक ‘प्रकाशो'कडे पाहत बच्चन यांनी ‘मधुशाला' लिहिली त्या सुश्री प्रभावती पाल (हिंदी कथाकार यश पालच्या पत्नी) यांच्योबरोबर अनेक दिवस, राहायचे, बोलायचे नि बच्चन यांच्या हस्ताक्षरातील दुर्मीळ ‘मधुशाला' पाहायचे भाग्य मला मिळाले. मधुशाला प्रकाशित झाल्याला आज पन्नास वर्षे पूर्ण होताहेत. गेल्या पन्नास वर्षात ‘मधुशाले'च्या अक्षरशः लक्षावधी प्रती खपल्या. सतत पन्नास वर्षे काव्यरसिकांच्या हृदयसिंहासनी अढळपद मिळविणाच्या या काव्याबद्दल

वाटणारी गोडी प्रत्येक पाठागणिक वाढत जाते. 'मधुशाले'त एके ठिकाणी निराशेच्या भरात बच्चन लिहन गेले की -

 जब न रहूँगा मैं, तब मेरी

 याद करेगी मधुशाला ।।

 पण बच्चन एक भाग्यवान कवी आहेत. आपल्या काव्यवृत्तीला पन्नास वर्षे होताना ते हयात आहेत व याचि देही, याचि डोळा आपल्या 'मधुशालेला लोक सतत वाढत्या संख्येने याद करत असल्याचे ते पाहताहेत. अशा या सुवर्णमहोत्सवी मधुपर्वाप्रीत्यर्थ प्रत्येक काव्य, रसिक मनाला म्हणत असेल, ‘बच्चनजी, तुम जियो हजारो साल, हर साल के दिन हो पचार हजार!'

 सन १९३० च्या दरम्यान भारताच्या राजनैतिक व आर्थिक क्षितिजावर घोर निराशेचे सावट पसरले होते. सर्वत्र उदासी भरलेली. अशा काळात ‘मधुशाले'ला आपल्या मादक, मोहक, मदिरा मस्तीने काव्यरसिकांना भारावून टाकले. 'मधुशाला' हा अवघ्या १३५ रुबायांचा संग्रह. हा रुबाया लिहिण्याची प्रेरणा त्यांना फिट्ज़ेरल्डच्या ‘रुबाइयात-ए-उमर खयाम' पासून मिळाली. ‘रुबाई' म्हणजे चौपदी. चार ओळींचे कडवे. फारसी भाषेतील तो एक बहुप्रचलित छंद आहे. इराणच्या कवीने रुबाया लिहिल्या नाहीत असे क्वचितच घडले असेल. उमर खैयाम हा रुबायांचा सम्राट. त्याच्या रुबाया ऑक्सफर्डमधील ग्रंथालयातून प्राध्यापक कोबेल यांनी शोधून काढल्या. त्या पुढे फिट्ज़ेरल्डच्या हाती लागल्या आणि त्या रुबायांचे रुबल, रुपये झाले. फिट्जेरल्डनी त्यांचा इंग्रजी अनुवाद केला आणि पाहता पाहता या रुबायांनी विश्वसंचार केला. बच्चनजी आणि उमर खैयाम यांची गाठ पडली ती फिट्जेराल्डच्या रुबाइयात-ए-उमर खैयाम'मुळे. बच्चन यांनी या रुबायांचा हिंदी अनुवाद केला. “खैयाम की मधुशाला' नावाने तो प्रसिद्ध आहे. या रुबाया अनुवादित करताना बच्चन यांचे सारे भावविश्व रुबायांनी व्यापून टाकले. त्यांच्या जगल्या, भोगल्या जाणिवा रुबायांचे रुपेरी रूप घेऊन आल्या. पुढे याच रुबायांनी हिंदी मधुशालेला सजवलं, मढवलं.

 उमर खैयामची ‘मधुशाला' व बच्चनची ‘मधुशाला' वरपांगी एक असली तरी दोहोंमध्ये एक मौलिक भेद आहे. उमरची ‘मधुशाला' हे हालावादी काव्य आहे. ‘हाला' म्हणजे मदिरा. मदिरेत मस्ती, मदहोशी असते. पिणारा मदिरेच्या नशेत जीवनातील सर्व दुःख, क्षणभर का असेना, विसरतो. साहित्यात या क्षणवादी जीवन चिंतनाला हाला, मदिरालय (मधुशाला), प्याला, सुराही, साकी इत्यादी प्रतीकांद्वारे व्यक्त करण्याची

पद्धत सूफी कवींनी प्रचलित केली. ते कवी या प्रतीकांच्याद्वारे ईश्वरीय भक्तीने रसरसलेले असायचे. उमरची रुबाई या पठडीतील. बच्चन यांनी या काव्यातील वरपांगी मधुरता घेतली आणि रुबाया रचल्या नि म्हणूनच बच्चन यांच्या मधुशालेला लौकिक काव्याची संज्ञा प्रदान करण्यात आली आणि ती खरीच आहे. आपल्या काव्यातील लौकिक प्रतीकांचे स्पष्टीकरण करत असताना बच्चन यांनी एका रुबाईत म्हटले आहे...

 ‘भावुकता अंगुर लता से ।

 खींच कल्पना की हाला,

 कवि साकी बनकर आया है।

 भरकर कविता का प्याला,

 कभी न कणभर खाली होगा,

 लाख पिएँ, दो लाख पिएँ।।

 पाठकगण है पीनेवाले

 पुस्तक मेरी मधुशाल!'

 उमर खैयाम व आपल्या मधुशालेतील फरक स्वतः बच्चन यांनी मान्य केला आहे. ते आपल्या मधुशालेला उमर खैयामचे अनुकरण मानायला तयार नाहीत. त्यांनी ‘नये पुराने झरोखे'मध्ये अशी कबुली दिली आहे की, “मेरी भावनाएँ उमर खैयाम से एकाकार हो जाती तो शायद मैं ‘मधुशाला' न लिखता!"

 बच्चन यांच्या मधुशालेची आपली अशी अवीट गोडी, आपला असा वेगळा तोंडावळा व आपला असा वेगळा नाद-स्वाद आहे - ‘जो खाये सो पछताए, न खाये सो भी!' 'मधुशाला' हे एक विशुद्ध प्रेमकाव्य आहे. ऐन पंचविशीत लिहिलेल्या या काव्यात प्रेम-प्रणय, विरह, आशा, निराशा इत्यादींची सुंदर गुंफण झालेली आहे. प्रेम करताना किंवा होत असताना आपल्याला सारे जग प्रेम-प्रणयाने धुंद झाल्याचा आभास होत असतो. निसर्गातील झाडे, पराग, सुगंध, कोकीळ, वसंत सारेच कसे प्रेमधुंद वाटायला लागतात याचे सुंदर वर्णन करताना बच्चन म्हणतात -

 ‘प्रति रसाल तरु साकी - सा है,

 प्रति मंजरिका हैं प्याला,

 छलक रही है जिसके बाहर

 मादक सौरभ की हाला,

 छक जिसको मतवाली कोयल

 कुक रही जाली-जाली

 हर मधुऋतु में, अमराई में,

 जग उठती है मधुशाला!

 प्रेम हा हृदयी ओथंबलेला मृदु भाव आहे. प्रियकर-प्रेयसी प्रेम-प्रणयात एक-दुस-याची ‘मधुशाला' बनत असतात. त्या वेळी प्रत्येक प्रेमी रोमांचित होत असतो. या वेळी मन विलक्षण द्विधा नि द्वंद्वाच्या स्थितीत असते. किंकर्तव्यमूढ प्रेमिकाला मग कोणता तरी एक मार्ग, एक प्रेमी निवडावा लागतो. ही निवड करताना मोठा सैरसपाटा करावा लागतो. निष्ठा असेल तर मग गवसणीचे गूढ नाहीसे होते नि मग अमूर्त अभिलाषा पाहता पाहता मूर्त होतात-

 मदिरा पीने की अभिलाषाही

 बन जाए जब हाला,

 अक्षरों की आतुरता में ही

 जब आभासित हो प्यासा बने,

 ध्यान ही करते-करते

 जब साकी साकार, सखे,

 रहे न हाला, प्यासा, साकी,

 तुझे मिलेगी मधुशाला!

 स्वतःच्या जीवनातील घोर निराशेच्या काळात लिहिल्या गेलेल्या मधुशालेतील हा आशावाद कवीच्या जीवननिष्ठेबद्दल बरेच काही सांगून जातो.

 प्रेम-प्रणयातील भावलीलांचे सुंदर रेखाटन हे मधुशालेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून सांगता येईल. प्रेम हा होकार-नकारांचा लाडिक लपंडाव असतो. त्यात नकार, नखरा, नेत्रपल्लवी, नाजूक नजाकत भरलेली असते. नकारात दडलेला होकार ज्याला ओळखता येणार नाही तो प्रेम परीक्षेत पास कसा होणार? अशा अदांचे वर्णन करत ते नवशिक्या प्रेमिकाला समजावतात-

 हाथों में आने से पहले

 नाज दिखाएगा प्याला,

 अधरों पर जाने से पहले

 अदा दिखाएगी हाला,

 बहुतेरे इन्कार करेगा

 साकी आने से पहले,

 पथिक, न घबरा जाना

 मान करेगी मधुशाला।

 स्त्रीस्वभावाचे, तिच्या मानभावी मनोधारणेचे चित्रांकन बच्चनसारखा प्रेमपारखी कवीच करू जाणे!  बच्चन यांच्या मधुशालेत विविध भावभावनांच्या इंद्रधनुष्याच्या छटा आहेत, हे खरे असले, तरी या काव्याची निर्मिती मात्र जिव्हारीच्या वेदनेतून नि जिव्हाळ्यातून झाली आहे. 'चम्पा' ही मित्रपत्नी, बच्चन यांच्या आयुष्यात आलेली ती पहिली स्त्री. पतीवियोगाच्या वेदनेत तडपत बच्चन यांचेशी अजाणतेपणी एकाकार झालेल्या या प्रेरक प्रतिभेने अकाली एकटे जाणे पसंत केले. आपल्या पतीसारखेच विरहाकुल बच्चन पुढे ‘प्रकाशो'च्या प्रेरक संपर्कात आले आणि त्यांच्या पूर्वस्मृतींना जाग आली. ‘प्रकाशो'च्या प्रेरक संपर्कात चम्पाच्या स्मृतींनी रुबायांचे रूप घेतले. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर...

 दर्द नशा है इस मदिरा का

 विगत - स्मृतियाँ साकी है;

 अशा या कवितेला दग्ध हृदयाची कविता म्हणणेच उचित ठरेल. विदग्ध मनःस्थितीत आकारलेली ही कविता प्रेम-प्रणयाने बहरली असली तरी तिच्यात जीवनाचे महान तत्त्वज्ञान भरलेले आहे. मधुशालेच्या माध्यमातून बच्चन समानता, धर्मनिरपेक्षता, जीवन-मरण, उदारता, स्वातंत्र्यता, प्रगतिशीलता, साम्यवाद, कर्तव्यपरायणता, न्याय यांसारख्या कितीतरी जीवननिष्ठांबद्दल सांगून जातात. प्रेमात सर्व जीवनमूल्ये संवर्धित व वर्धिष्णू करण्याची शक्ती असते. प्रेमात धर्म, जाती, वर्ण आदींचा दुरावा राहात नाही. प्रेमातील एकात्म शक्तीचा प्रत्यय देताना ते म्हणतात

 बैर बढाते मस्जिद- मंदिर

 मेल कराती, मधुशाला।।

 त्यांच्याच भाषेत सांगायचे तर प्रेमात शंभर सुधारकांचे सामर्थ्य सामावलेले असते. जाती, वर्णांनी मानवामानवांत फरक करणाच्या समाजव्यवस्थेला हळुवार चपराक देत ते म्हणतात

 व्यर्थ बने जाते हो ‘हरिजन',

 तुम तो ‘मधुजन' ही अच्छे;

 मानवाला ‘मधुजन' मानण्यातील महानता नि मांगल्या मननीय नव्हे का? मानव जीवनातील भाग्य, क्षणभंगुरता, मानापमान इत्यादींची ही सुंदर

चित्रे मधुशालेत जागोजागी सापडतात-

 लिखी भाग्य में जो तेरे बस

 वही मिलेगी मधुशाला।।

 म्हणत बच्चन भाग्यवादाचे समर्थन करतात, तर मानवाच्या नश्वर जीवनाची मीमांसा करताना लिहितात

 क्षीण, क्षुद्र, क्षणभंगुर दुर्बल

 मानव मिट्टी का प्याला!

 किती नि काय सांगावे मधुशालेबद्दल! शेवटी एवढेच म्हणता येईल

 जितनी दिल की गहराई हो

 उतना गहरा है प्याला,

 जितनी दिल की मादकता हो

 उतनीही मादक है हाला,

 जितनी उर की भावुकता हो

 उतनी सुंदर साकी है;  जितना ही जो रसिक है

 उतनी रसमय मधुशाला।

 कविता करायचे वय असताना सर्वप्रथम ही ‘मधुशाला' मला भेटली. तेव्हापासून आजपावेतो तिच्या प्रेमातून सुटका नाही. प्रत्येक वेळी तिचा आस्वाद घेताना तिच्यातील नवनवी सौंदर्यस्थळे दिसतात. तिच्यातील भावभावनांचे नवनवे धुमारे अनुभवणे माझ्यातील कवी मनाला जडलेला अतूट असा छंद आहे. मधुशालेबरोबरच ‘मधुबाला' व 'मधुकलश' या काव्यकृतींनी हिंदी साहित्यात एक नवी काव्यधारा रूढ केली. या अवघ्या तीन काव्यकृतींनी हिंदीसारख्या गुण नि परिमाणांच्या दृष्टीने समृद्ध असणाच्या साहित्यात ‘हालावादी' काव्यपरंपरा रूढ केली. पं. नरेंद्र शर्मा, रामेश्वर शुक्ल, ‘अंचल'सारख्या भावुक कवींनी या वादाला खतपाणी घातले. मधुशालेद्वारे हिंदी साहित्यात निर्माण झालेला ‘हालावाद' भरतीसारखा उफाळला नि ओहोटीगत ओसरला, हे जरी खरे असले तरी ‘मधुशाला', ‘मधुबाला' नि ‘मधुकलश' या काव्यकृतींचे महत्त्व अक्षय नि अढळ राहील यात शंका नाही. बच्चन यांच्या या मधुकाव्याची समीक्षकांनी ‘भोगवादी काव्य' म्हणून केलेली हेटाळणी, आदर्शवादाच्या आग्रही भूमिकेतून झालेली आहे. पण हे करत असताना ‘भोग' हा योगाइतकाच महत्त्वाचा जीवनांश आहे, या त्रिकालाबाधित सत्याकडे केलेली सोईस्कर डोळेझाक, मात्र न पटणारी

आहे. बच्चन यांनी आपल्या या काव्यकृतीत जीवनाच्या एका मधुर भावविश्वाचे चित्रण केले आहे. त्याची ‘वासनाकांड' म्हणून भलावण करणे कितपत न्याय्य आहे? बच्चन जर भोगवादी, विकारग्रस्त कवी असले असते तर...

 ‘वासना जब तीव्रतम थी

 बन गया था संयमी मैं

 हो रही मेरी क्षुधा ही

 सर्वदा आहार मेरा!'

 सारख्या विवेकशील काव्यपंक्ती त्यांनी लिहिल्या असत्या का, याचा विचार तटस्थपणे व्हायला हवा. 'मधुशाले’ला पन्नास वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने का असेना, बच्चन यांच्या या मधुकाव्याचे पुनर्मूल्यांकन व्हायला हवे.

▄ ▄