शब्द सोन्याचा पिंपळ/लेखक माझ्या मनी,अंगणी


लेखक माझ्या मनी, अंगणी



 लिहितो तो लेखक. केवळ साहित्य लिहिणारा लेखक असत नाही. गायक, संगीतकार, छायाचित्रकार, शिल्पकार, वास्तुशिल्पी, शेतकरी, मजूर, रस्ता झाडणाराही लेखक असतो. लेखकाची ही व्यापकता तुमची मनी, अंगणी रुजवतो तो लेखक. रूढ अर्थाने साहित्यिकच लेखक खरा. तो कथा, कादंबरी, नाटक, काव्य, व्यक्तिचित्र, चारित्र्य, निबंध सारं रेखाटतो. म्हणजे जीवन अनेक शैलींनी, पद्धतींनी समजावतो. तसाच तो गायक, गाणं तो कानात, मनात गुणगुणत ठेवतो. संगीतकारही तसाच, स्वरांची तार अन् हृदयाचे ठोके यात तो ताल निर्माण करतो. म्हणून मग तोल जाता जाता आपण वाचतो. चित्रकार नवं जग दाखवतो. वास्तवाच्या पलीकडचं जग दाखवणारा... चितारणारा चित्रकार खरा! जीवनाचा अविस्मरणीय क्षण टिपणारा छायाचित्रकारही लेखकच ना?

 साहित्यात भाव, रस, गती, संगीत, शास्त्र, सौंदर्य, भाषा, आकार, रंग, लय, ताल सारं असतं म्हणून साहित्य श्रेष्ठ, लेखक निरीक्षक, कल्पक, सजग असतो! तो केवळ असलेलं शब्दबद्ध करत नाही तर तो येणाारंही कल्पितो अन लिहितो. म्हणून तो सूर्यापेक्षाही श्रेष्ठ ठरतो. जो न देखे रवी, सो देखे कवी' म्हटलं जातं ते यामुळेच. लेखक चित्रण करतो. विचार, दृष्टी, संस्कार देतो. तो हसवतो, रडवतो, मनोरंजन करतो तसा तो अंतर्मुखही करतो. तो सतत काळाच्या पुढे विचार करत असल्याने वर्तमानाबरोबरच भविष्याचंही त्याला पक्कं भान असतं. पुष्पक विमानाची कल्पना करणाच्या कवीच्या प्रतिभेनंच रॉबर्ट बंधूना विमानाच्या शोधाची दिशा नि दृष्टी दिली, हे आपणास विसरून चालणार नाही. भारत हा अठरापगड जाती, धर्म, भाषांचा देश आहे. तो एकात्म व्हायचा तर ‘आंतरभारती'चं स्वप्नं हवं

म्हणणारे साने गुरुजी आणि ‘विश्वभारती'ची कल्पना करणारे रवींद्रनाथ टागोर श्रेष्ठ ठरतात ते त्याच्या भविष्यलक्ष्यी प्रतिभेमुळेच. जात चोरावी लागण्याचं वास्तव चितारणारे बाबूराव बागूल मनस्वी वाटतात ते अनुभव चित्रित करणाच्या विलक्षण सामथ्र्यामुळे. बहिणाबाई आपली माय वाटते ती जीवनाची ओवी सहज सुंदर गाते म्हणून!

 'गीतारहस्य', ‘स्मृतिचित्र', 'श्यामची आई', 'रणांगण', 'विशाखा', ‘ययाती', 'मढेकरांची कविता', 'व्यक्ती आणि वल्ली', 'कोसला', ‘काजळमाया' ही मराठीतील शतक श्रेष्ठ पुस्तके, अनुक्रमे त्यांचे लेखक - लोकमान्य टिळक, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, विश्राम बेडेकर, कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, बा. सी. मर्ढेकर, पु. ल. देशपांडे, भालचंद्र नेमाडे, जी. ए. कुलकर्णी हे होत. त्यांचे लेख व पुस्तके आपणास माहीत हवीत. ती आपल्या घरी हवीत, तशीच ‘बलुतं', 'उपरा' ही हवीत. 'स्त्री पर्व' घरी हवे तसे माझे विद्यापीठही. 'एकच प्याला' हवे तसे 'नटसम्राट' ही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ‘भारतीय घटना' घरी नसेल तर तुम्ही भारतीय कसे? हा सारा संस्कार लेखक व साहित्य रुजवतो.

 लेखकाचं महत्त्व ज्या समाजात, तो समाज प्रगल्भ, मी असं ऐकून आहे की, पोर्तुगाल हा स्पेनजवळ असणारा एक छोटा देश आहे. या देशाला एका कवीनं नोबेल मिळवून दिले. तिथल्या जनतेला त्याचा कोण अभिमान? त्याच्या घरासमोरून जाताना लोक आपली वाहने म्हणे सावकाश चालवतात... त्याला त्रास नको... समाधिभंग नको. तिथले सर्व जण त्याची काळजी घेत होते. नोबेल मिळाल्यावर... का तर तो दुसरं नोबेल मिळवू शकेल म्हणून! लेखक एका देशाच्या मनी, अंगणी असण्याचं आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिकचं उदाहरण. तिथले कुसुमाग्रज सर्व नाशिककरांचे ‘तात्या' होते. ज्या दिवशी त्यांना ज्ञानपीठ मिळालं, त्या दिवशी त्यांच्याकडे जाणा-या कुणाचेही पैसे रिक्षावाल्यानी घेतले नाहीत. सर्वच रिक्षावाले शिक्षित नसले तरी शहाणे होते, कारण तात्यांनी त्यांना माणुसकी शिकवली होती.

 लेखक मनी, अंगणी असला की दोन जर्मनी एक होऊ शकतात, युरोप एक होऊ शकतो. हा इतिहास पाहता जग एक होऊ शकेल ते लेखकांमुळेच. त्यासाठी पुस्तकं घरी हवीत. नित्य वाचन हवं. व्याख्यानं वारंवार ऐकायला हवीत. लेखकांशी बोलावं, भेटावं, चर्चा करावी. सभा-समारंभात लेखकाची सही घेण्याच्या छोट्या छंदामुळे माझ्यात लेखनाचा अंकुर फुटला. आपण



कोणीतरी आहोत अशी अस्मिता, अभिमान साहित्य जागवतं. ते तुम्हाला ओळख करून देतं नि जग ओळखायला शिकवतं. साहित्यिक सन्मान, पुरस्कार, संमेलनांची महाराष्ट्र संस्कृतीत असलेली समृद्ध परंपरा आपल्या प्रगल्भतेचीच खूण होय. ती ग्रंथमहोत्सवांद्वारे जाऊन जपू... जोपासू.

▄ ▄