शब्द सोन्याचा पिंपळ/महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ:कार्य आणि योगदान


महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ : कार्य आणि योगदान




 मराठी भाषा आणि संस्कृती विकासासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करून महाराष्ट्राच्या जनतेने त्यासाठी दीर्घकाळ लढा दिला. त्यानंतर १ मे, १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र राज्याची मुहर्तमेढ रोवली गेली. नामदार यशवंतराव चव्हाण मराठी भाषिक स्वतंत्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या विकासाचे स्वप्न स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणून दिलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, ‘‘महाराष्ट्र ही भूमी अनेक संत, पराक्रमी वीर, त्यागी समाज सुधारक व विद्वान, देशभक्त यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व लोकमान्य टिळक ही आमची प्रातिनिधिक प्रतीके आहेत. त्यांनीच महाराष्ट्राच्या संस्कृतीची जोपासना केली व तिचा वारसा आपल्या हाती दिला. हा अमोल ठेवा आपल्या हृदयात जपून ठेवणे व त्याचा विकास करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे आद्य कर्तव्य ठरते. आज आपले मराठी भाषी राज्य स्थान होत असताना आपल्या देशाची भरभराट करण्यास व त्याची कीर्ती दिगंत पसरविण्यास आपले शक्तिसर्वस्व देऊ अशी आपल्यापैकी प्रत्येकाने प्रतिज्ञा केली पाहिजे." या प्रतिज्ञेनुसार महाराष्ट्र शासनाने १९ नोव्हेंबर, १९६० रोजी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ' स्थापन केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. त्यात सर्वश्री महामहोपाध्याय वि. वि. मिराशी, डॉ. ए. एम. घाटगे, प्राचार्य

दिनकर कर्वे, प्रा. गोवर्धन परीख, डॉ. पी. एम्. जोशी, प्रा. न. र. पाठक, प्रा. वा. ल. कुलकर्णी प्रभृती मान्यवरांचा समावेश होता.

 हे मंडळ अस्तित्वात आणण्यासाठी प्रसृत अध्यादेशात मंडळाची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली होती. त्यानुसार मराठी भाषा, संस्कृती व इतिहासाच्या संशोधनार्थ प्रकल्प हाती घेणे, या संदर्भातील ग्रंथ प्रकाशित करणे, मराठी ग्रंथ, चरित्रे, नियतकालिके प्रकाशित करण्यास प्रोत्साहन देणे, मराठी ग्रंथसूची, विश्वकोश, शब्दकोश इ. संदर्भ ग्रंथ प्रकाशित करणे, विश्वभाषांमधील श्रेष्ठ ग्रंथांची मराठी भाषांतरे प्रकाशित करणे, मराठी साहित्य विकासाच्या नवनवीन ज्ञान-विज्ञान शाखांचा शोध घेणे, महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि साहित्यिक जडणघडणीचा इतिहास लिहिणे इ. चा त्यात अंतर्भाव करण्यात आला होता. या मंडळाने गेल्या ५० वर्षात या अनुषंगाने मोठे कार्य केले आहे.

१. ग्रंथ प्रकाशन

 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या गेल्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत मंडळाने अनेक मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करून महाराष्ट्राच्या साहित्य विकासात मोठे योगदान दिले आहे. प्रा. अशोक रानडे लिखित ‘स्टॅविन्स्कीचे सांगितिक सौंदर्यशास्त्र', डॉ. वा. वि. मिराशी लिखित ‘कालिदास', 'शेक्सपिअर परिचय ग्रंथ', 'महात्मा फुले समग्र वाङ्मय', ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ', डॉ. सं. ग. मालशे लिखित ‘साहित्य सिद्धांत', 'कौटिलीय अर्थशास्त्र', स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘भाषाशुद्धी', 'संपूर्ण गडकरी (भाग १, २), आगरकर वाङ्मय खंड', ‘महात्मा गांधी-रवींद्रनाथ ठाकूर’, ‘भारतीय लिपीचे मौलिक एकरूप', ‘सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय', 'ग्रीक शोकनाट्ये, ‘कलेची मूलतत्त्वे', ‘बुद्धलीला सारसंग्रह', ‘फार्सी-मराठी अनुबंध', 'केशवसुतांची कविता (यथामूल आवृत्ती) सारखे ग्रंथ मराठी सारस्वतातील दीपस्तंभ म्हणून ओळखले जातात.

२. कोश प्रकाशन

 एकविसावे शतक हे ज्ञान-विज्ञानाच्या विस्फोटाचे शतक म्हणून ओळखले जाते. ज्या भाषेतील संदर्भ वाङ्मय श्रेष्ठ ती समृद्ध ज्ञानभाषा. या दृष्टीने मंडळाने स्थापनेपासूनच विविध प्रकारच्या कोश निर्मितीवर भर दिला आहे. स्वतंत्र मराठी विश्वकोश मंडळ स्थापन करून महाराष्ट्र शासनाने मराठी विश्व कोशाचे १९ खंड प्रसिद्ध करून हिंदीनंतर विश्वकोश असलेली

राज्यभाषा म्हणून गौरव प्राप्त केला आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळाने आयुर्वेद, मराठी वाङ्मय, शब्द इ. कोशांची निर्मिती करून कोशवाङ्मय क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. अनुवाद साहित्य कोशासारखे अनेक कोश सध्या अप्राप्त आहेत. त्यांचे पुनर्मुद्रण त्वरित होणे गरजेचे आहे.

३. भाषांतरांचे प्रकाशन

 देवाणघेवाणीतून संस्कृती विकसित होत असते तशी भाषाही. स्वभाषेत परभाषी वाङ्मय अनुवादित होऊन आले की अनुभव, शैली वैचित्र्य, भाषा प्रयोग इत्यादीच्या कक्षा रुंदावतात. जगभर इंग्रजी भाषेतून स्वभाषेत भाषांतरांची मोठी परंपरा आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळाने इतिहास, साहित्य, नाटक, कादंबरी, काव्य इ. विविध प्रकारचे अभिजात साहित्य मराठीत भाषांतरित करून घेऊन प्रकाशित केले आहे. न्यायमूर्ती रानडे यांच्या Rise of Maratha for power, आनंद मिश्रा यांच्या Nanasaheb Peshwa and Right for freedom, FAT371 Storia Do Mogar ची मराठी भाषांतरे प्रकाशित केली आहे. संस्कृतमधून ‘भरतमुनीचे नाट्यशास्त्र', 'मुद्राराक्षस', रशियनमधून तुर्गनेवच्या कादंबरीचा अनुवाद, उर्दूमधून जाफर शरीफच्या ‘कानून-इ-इस्लाम'चे भाषांतर अशी मोठी परंपरा आहे. मराठी साहित्यात आज इंग्रजी ललित साहित्यकृतींच्या अनुवादाची मोठी लाट आली असून मराठी प्रकाशक तीवर अहमहिकेने स्वार होत असताना आपणास हे विसरून चालणार नाही की या भाषांतरयुगाचा पाया साहित्य आणि संस्कृती मंडळाने पन्नास वर्षांपूर्वी घातला होता. आज केवळ इंग्रजी भाषांतरे होतात. या पाश्र्वभूमीवर मंडळाचे भाषावैभव व वैविध्य लक्षात घेण्यासारखे आहे.

४. ऐतिहासिक ग्रंथांचे प्रकाशन

 महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर हे मंडळ स्थापन करण्याच्या अनेक उद्देश्यांपैकी एक उद्देश संस्कृती व इतिहासाचे संशोधन व प्रकाशन होता. त्यानुसार मंडळाने दुर्मीळ इंग्रजी, उर्द इतिहास ग्रंथांची भाषांतरे जशी प्रकाशित केली तसेच मौलिक ग्रंथही प्रकाशित केलेत. ‘धर्मशास्त्राचा इतिहास, ‘औरंगजेबाचा इतिहास', ‘दुसरे महायुद्ध', ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव लेख', ‘सम्राट अकबर' सारखे ग्रंथ या संदर्भात उल्लेखनीय म्हणून सांगता येतील.

५. वैज्ञानिक ग्रंथ प्रकाशन

  मूलभूत वैज्ञानिक ग्रंथ प्रकाशनाची मराठीतील क्षीण परंपरा लक्षात

घेता ५० वर्षांपूर्वी साहित्य आणि संस्कृती मंडळाने या संदर्भात घेतलेला पुढाकार व केलेले प्रयत्न अनुकरणीयच म्हटले पाहिजेत. 'वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय' सारख्या ग्रंथापासून ते 'वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा', ‘स्थापत्यशास्त्र, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान' सारखे ग्रंथ पाहाता या विषयाचा मंडळाचा पैस डोळ्यात भरतो.

 ६. नवलेखन प्रोत्साहन

 ग्रंथ प्रकाशनाबरोबर हे मंडळ सतत नवलेखक शिबिरे, नवलेखक प्रकाशन, नवलेखन पुरस्कार अशा त्रिविध पद्धतीने मराठी साहित्याची मशागत करीत आले आहे. मंडळाच्या या शिबिरातून मार्गदर्शन घेतलेली, अनुदान व पुरस्कार मिळवणारे कितीतरी साहित्यिक आज प्रथितयश झाले आहेत. भारतातल्या फार कमी राज्यात अशा प्रकारचे प्रयत्न सातत्याने व जाणीवपूर्वक होताना दिसतात. मान. यशवंतराव चव्हाण व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची यातून दूरदृष्टी दिसून येते. आजवर मंडळाने नवलकांची २००० पुस्तके प्रकाशित केली आहेत. या मंडळ नवलेखक तयार करून, त्यांच्या ग्रंथांना अनुदान देऊन थांबत नाही तर नवलेखकांच्या ग्रंथांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देत असते.

 ७. साहित्य संस्थांना अर्थसहाय्य

 महाराष्ट्रात आठ महसूल विभाग असले तरी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण व पश्चिम, दक्षिण महाराष्ट्र हे त्यांचे पारंपरिक सांस्कृतिक विभाग होत. या विभागांचे प्रतिनिधित्व करणाच्या साहित्यिक संस्था आहेत. या संस्थांमार्फत साहित्य संमेलने, व्याख्यानमाला, पुस्तक प्रकाशन, साहित्यिक गौरव, मुखपत्र प्रकाशन, ग्रंथालय संचालन, वाचक मेळावे, चर्चासत्रे इ. उपक्रम केले जात असतात. अशा उपक्रमांना प्रोत्साहन व आर्थिक बळ मिळावे म्हणून महाराष्ट्र शासन या मंडळामार्फत प्रतिवर्षी प्रत्येक संस्थांना रु. ५ लक्ष इतके भरघोस अनुदान देत असते. अखिल भारतीय साहित्य महामंडळ, विदर्भ मराठी साहित्य संघ, नागपूर, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई, मराठी साहित्य संघ, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी या संस्थाचा यात अंतर्भाव आहे.

 ८. साहित्यिक पुरस्कार व गौरववृत्ती

 मराठीतील उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती, श्रेष्ठ प्रकाशक, श्रेष्ठ लेखक व कलावंत गौरववृत्ती अशातून साहित्य व साहित्यिक सन्मानाची परंपरा मंडळाने



स्थापनेपासून जपली आहे. प्रतिवर्षी रु. १०,000/- रोख व सन्मानचिन्ह स्वरूपात दिल्या जाणाच्या या पुरस्कारात महाराष्ट्र शासनाचे घसघशीत वाढ जाहीर करून अवघ्या महाराष्ट्राचे साहित्य प्रेम सिद्ध केले आहे. साहित्यिक जीवन गौरवाच्या रूपात दिला जाणारा रु. ५0,000/- रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह अशा स्वरूपात दिला जाणारा साहित्यिक व लोक कलावंतांचा गौरव म्हणजे महाराष्ट्र सन्मानच होय! आजवर गौरविल्या गेलेल्या या सन्मान सूचीत भाई माधवराव बागल, कवी नारायण सुर्वे, आनंदीबाई शिर्के, कुसुमाग्रज, शाहीर वामनदादा कर्डक, भाऊ पाध्ये, इंदिरा संत, शंकरराव खरात, शांता शेळके, राम नगरकर, कवी ग्रेस, प्रा. म. द. हातकणंगलेकर, यमुनाबाई वाईकर, डॉ. भालचंद्र नेमाडे प्रभृती मान्यवरांचा समावेश आहे.

 ९. नियतकालिक अनुदान

 महाराष्ट्रातील मराठी नियतकालिकांची परंपरा गेल्या शंभर ते दीडशे वर्षांची आहे. दिवाळी अंक हा महाराष्ट्र संस्कृतीचा व्यवच्छेदक भाग होय. ही नियतकालिके काळाच्या प्रवाहात बंद पडू नये. त्यांचे सत्त्व व स्वत्व सुरक्षित रहावे म्हणून विशेष ज्ञानशाखा, विषय इत्यादीची जपणूक करणाच्या नियतकालिकांना मंडळाकडून प्रतिवर्षी १५0 00 ते ३५000 रुपयांचे अनुदान दिले जाते. आजमितीस सुमारे ५० नियतकालिकांना या योजनेतून अर्थसहाय्य दिले जाते. 'नवभारत', 'अर्थसंवाद', 'नव-अनुष्टुभ’, ‘पंचधारा', 'ब्रेन टॉनिक', ‘मराठी विज्ञान पत्रिका', 'मिळून साच्या जणी', ‘हाकारा', 'ब्रेल जागृती', ‘भाषा आणि जीवन’, ‘संशोधक', 'केल्याने भाषांतर' ही नियतकालिकांची नावे वाचली तरी मंडळ केवढे मोठे सांस्कृतिक संचित जोपासते आहे याची प्रचिती आल्यावाचून राहणार नाही.

 या उपक्रमांशिवाय मंडळाने सुवर्ण महोत्सवी उपक्रम म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक महोत्सव, जिल्हा ग्रंथ महोत्सव, सीमा भागातील साहित्य संमेलनांना अर्थसहाय्य, जागतिक मराठी संमेलनास अर्थसहाय्य, ई बुक्स, संकेत स्थळ निर्मिती अशा बहुविध उपक्रमातून कार्यविस्तार केला आहे. महाराष्ट्र राज्याचे नवे सांस्कृतिक धोरण, मराठी भाषा संचालनालय, मराठी भाषा मंत्रालय इ. माध्यमातून मराठी भाषा, साहित्य व संस्कृती विकासाचा समन्वित प्रयत्न सुरू केला असून विविध योजना व उपक्रमांचे एकीकरण आरंभिले आहे. त्यातून मराठी राजभाशा वापरात वाढ, शासकीय व न्यायालयीन कामकाजात मराठीचा उपयोग, बृहन्महाराष्ट्रातील मराठी

संस्थांना सहाय्य असे धोरण अंगिकारल्याने लवकरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

 मंडळाचे वर्तमान अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या कुशल नेतृत्वाखाली विविध शब्दकोशांच्या सीडी तयार करणे, सांस्कृतिक पत्रिका प्रकाशन, बोलीभाषा प्रकल्प, मराठी प्रमाण भाषा कोश, ग्रामीण जीवन कोश, दुर्मीळ ग्रंथ संकेत स्थळांवर प्रकाशित करणे, रंगभूमी, वेशभूषा, हस्तकला, इतिहास लेखन, युवक अभ्यासवृत्ती अशा कालसंगत नव्या योजना, उपक्रम, प्रकाशनांचा संकल्प सोडला असून लवकरच या योजना अंमलात येऊन मराठी भाषा, साहित्य, संस्कृती विकासास गती येईल अशी आशा आहे. दुर्मीळ ग्रंथांचे पुनर्मुद्रण, महाराष्ट्र शिल्पकार मालिका प्रकाशन इत्यादीतून ही महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र समाज विकास व उत्थानाचे महत्त्वाचे कार्य करीत आहे. या मंडळाचे आजवरचे अध्यक्ष व सदस्य यांनी या कार्यात वेळोवेळी केलेल्या सहाय्य व मार्गदर्शनातून हे मंडळ राज्यातील कार्यक्षम व गतिमान मंडळ म्हणून लोकादरास निरंतर पात्र राहिले आहे.