शब्द सोन्याचा पिंपळ/चला मुलांसाठी नवा डाव मांडू या




चला मुलांसाठी नवा डाव मांडू या



 रूढ अर्थाने मी बालसाहित्यिक नाही. मात्र मी बालसेवक खचितच आहे. मुले मला आवडतात. मुलांसाठी सर्व काही करायला मला आवडते. विशेषतः ज्या मुलांना काही नाही, त्यांना सर्व काही देण्यात मला अधिक रस आहे. खेड्यात शाळा पोहोचली, पण साहित्य पोहोचले असे म्हणणे अतिशयोक्त ठरेल. अशा संमेलनांमुळे बालकुमार वयातील मुलामुलींत साहित्याची आवड व गोडी निर्माण होते. साहित्यिक भेटतात, बोलतात. त्यांना ऐकणे, पाहणे हा देखील एक मोठा अविस्मरणीय ठेवा आहे. ती बालपणातील आनंद पर्वणी असते. मी तुमच्या वयाचा होतो तेव्हा शाळेत येणा-या साहित्यिक, कलाकार, वक्ते यांची सही घ्यायचो. एकदा आमच्या शाळेत बालसाहित्यिक यदुनाथ थत्ते आले होते. त्यांनी माझ्या वहीवर सही करण्यापूर्वी संदेश लिहिला होता, 'वेडे व्हा'. आज मी बालकवेडा म्हणून तुमच्या पुढे उभा आहे. अशा संमेलन समारंभाचे हे योगदान असते.

 तुमचं हे दुसरं बालकुमार संमेलन आहे. वर्ष आहे सन २०१४. म्हणजे एकविसाव्या शतकातलं हे संमेलन या शतकातली मुलं पाहतात अधिक, वाचतात कमी. शिक्षक, पालक हल्ली तक्रार करतात. मुलं वाचत नाहीत हे मला मान्य नाही. मी मलांचा वकील आहे. माझं म्हणणं आहे. आजच्या युगात वाचन, लेखनाची पद्धत बदलली आहे. मुलांचं पाहणं वाचनच आहे. हे नवं वाचन आहे, माझ्या बालपणी रेडिओ होता. आम्ही ऐकायचो. ऐकणं आमच्या काळात वाचनच होतं. त्याला ‘बहुश्रुत' होणं म्हणायचे. आज मुलंमुली टीव्ही., सिनेमा पाहतात, मोबाईल्सवर गेम खेळतात. व्हिडिओ पाहतात. त्यांचं पाहणं हे नव्या युगाचं नवं वाचन आहे. मुलांना मनसोक्त पाहू द्या जे आणि जेवढं, जितका वेळ पाहायचं ते पाहू द्या. seeing is



believing हे नवं शिक्षण सूत्र आहे. माझ्या लहानपणी घोकमपट्टी म्हणजे शिक्षण होतं. पोपटपंची म्हणजे शिक्षण, मला शिक्षक, पालकांना विचारायचं आहे; तुम्हाला पोपट हवेत की गरुड? पोपट हवे असतील तर पिंज-यातलं शिक्षण द्या. आज जागतिकीकरणाचा काळ आहे. या मुलांना जग जिंकायचं आहे. त्यांना मुक्त शिकू द्या. ज्ञानरचनावाद आला आहे. म्हणजे काय? स्वतः शिकणं त्यांना चुकू द्या, त्यांचं ते शिकतील.

 पूर्वीचे लेखक पेन, पेन्सिलनी लिहायचे. चित्रकार कुंचला वापरायचे. आज संगणक युग अवतरलं आहे. पेनची जागा पेन ड्राइव्हने घेतली आहे. तुमच्या खिशात शिक्षक, पालक, लेखकांच्या खिशात पेन असेल तर ते मुलांशी नातं जोडू शकणार नाहीत. पेनड्राइव्ह असेल तर तुम्ही क्लिप, व्हिडिओ, कार्टून, सिनेमाचं गाणं, बडबडगीत दाखवू शकाल. दाखवाल तर मुलं शिकतील. बोलत राहाल तर झोपी जातील. मुलांना तुम्हाला झोपवायचं आहे की जागं ठेवायचं आहे. ते तुम्ही ठरवा. 'श्यामची आई', ‘चांदोबा'तून बाहेर या. नोबिता, डोरेमॉन, शिजुका, मिकी माऊसची कथा त्यांचं नवं कल्पनाविश्व आहे. अल्लाउद्दीनची दिवा, उडती चटई गेली. गॅझेटसूची भाषा त्यांना कळते. पाढे येत नाहीत म्हणून चिडू नका कॅल्सी वापरता येते ना? मोबाईलशी खेळतो ना? रिमोट वापरता येतो ना? तेच त्यांचं नवं जीवन कौशल्य आहे.

 मुलांना अंक आणि अक्षरं गिरवायला शिकवू नका. टंकलेखन शिकवा. त्यांना लिहायचं नाही आहे पुढे. टायपिंग करायचं आहे, याचं भान ठेवा. स्क्रीनच नवी वही, पुस्तकं आहेत. नव्या जगाचं बदलतं चित्र मनी कोरा. जुनी पाटी पुसा. नवा विचार बाळगा.

 मुलांशी मैत्री करा. मुलांचे मालक, पालक, लेखक, शिक्षक नका बनू. बाल सवंगडी बना. त्यांचं नवं जग समजून घ्या. जग संगणक, इंटरनेटनी छोटं खेडं होऊ पाहात आहे. ‘ग्लोबल व्हिलेज' येतं आहे. करंबळीतही फोन, केबल, टीव्ही, मोबाईलसुद्धा आहेत. खेडं म्हणून ते मागं नाही. पुढेच गेलं आहे. आणखी पुढे जाणार आहे. गावचा विकास रोजच होत राहाणार आहे. मात्र लक्षात असू द्या. रस्ते, मोटार, मोबाईल म्हणजे खरा विकास नाही.

 माणूस मोठा झाला का? मुलं घरोघरी अनाथ नाही ना होत? ते पहा. माझं निरीक्षण आहे. घरोघरी मुलं मुली एकटी पडत आहेत. तुटत आहेत. मायेला ती पारखी होत आहेत. त्यांना सर्व मिळतं. टिफिन, दप्तर, पेन,

टाय, बूट सर्व मिळतं. मिळत नाहीत आई बाबा. शिक्षक शिकवतात. त्यांना भेटत नाहीत. त्यांच्याशी बोलत नाहीत. या मुलांना मित्र मैत्रिणी राहिल्या नाहीत. खेळता येत नाही. असंवाद, अलिप्तता एकटेपण त्यांचं जीवन होत आहे. भौतिक समृद्धी वाढते आहे. भावनेचा दुष्काळ पसरतो आहे.

 बालसाहित्यिकांपुढील खरा प्रश्न मुलांचं वर्तमान वंचित जीवन आहे. मुलांचं जग समजून लिहा. लिहिण्यापेक्षा त्यांच्याशी जीवाभावाचं बोला. ती प्रेमाला पारखी पाखरं बनत आहेत. तुम्ही बालपारखी व्हा. त्यांना हसवा. फिरवा, नाचवा. ती त्यांची खरी गरज आहे. साने गुरुजींचा पाझर परत एकदा फुटला पाहिजे. मुलांचं दुःख पाहून दुःखी होणारे शिक्षक, पालक, लेखक हवेत. मुलांचं मन गुंतेल असं साहित्य हवं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सारंच नवं आहे. पृथ्वी तापली आहे, आग वणवा होतो आहे. तेज लोपले आहे. वायू गळती सुरू आहे. आकाश फाटलं आहे. माणूस जूळेल तर सारं भरून येईल. मुलांसाठी आपण आपल्या मनात जागा करू या. जागे राहू या. मुलांना जागे ठेवू या.

 जय जगत्! बाल जगत्!!

▄ ▄