शब्द सोन्याचा पिंपळ/शब्द माहात्म्य

शब्द माहात्म्य

 माणसाचा विकास ज्या अनेक गोष्टींमुळे झाला त्यात भाषा, साहित्य, संगीत इत्यादींचा समावेश आहे. माणसाच्या विविध उद्गारांनी भाषा बनली. भाषेला शब्दरूप आलं आणि साहित्य बनलं. काव्ये रचली गेली. कारण त्यात संगीत होतं. या सर्व प्रक्रियेत शब्दांचे माहात्म्य आहे. शब्द माहात्म्य ही माणसाला मिळालेली मोठी देणगी आहे. हा आपल्याला लाभलेला अमोल ठेवा आहे. शब्दांची महती गाताना तुकारामांनी म्हटलं आहे.

 आम्हा घरी शब्दांचीच रत्ने।

 शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।

 शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।

 शब्दे वाटू धन जन लोका।।

 तुका म्हणे, पाहा शब्द हाचि देव।

 शब्देचि गौरव पूजा करू।।१।।

 शब्द हा देव आहे, ते धन आहे. त्याची पूजा करायला हवी. म्हणून तर आपण साहित्यास अमोल ठेवा मानत आलो आहे.

 पण बदलत्या काळात शब्द संपत्तीची हेटाळणी होते आहे. साहित्य एके काळी आपल्या जीवनाचे अभिन्न अंग होते. पण आज आकाशवाणी, दूरदर्शनसारखी प्रभावी माध्यमे उभी ठाकली आहेत. त्यांच्या क्षणिक मोहात आपण शब्दशक्तीची पूजा विसरायला लागलो आहोत. या संदर्भात जपानी साहित्याचा आदर्श समोर ठेवायला हवा. जपान हा गणकयंत्रांचा देश. त्यांची गणकयंत्रे कविताही करतात. पण तरीही जपानमधील लोकांचे साहित्यप्रेम, साहित्यलेखन कमी नाही झाले. सर्व गोष्टी यंत्रांनी करण्याची सवय लागलेला जपानी मनुष्य आजही वाचतो, लिहितो आहे. शब्दांची

कास सोडली तर विकास खंटला, हे मर्म त्यांनी ओळखले आहे. आपल्याकडे शब्दसंपदेची पूजा पाहायची तर बंगाल पाहा. बंगालीतील प्रत्येक पुस्तकाची आवृत्ती ही लाखाच्या घरात असते. बंगालमध्ये दरवर्षी पुस्तक जत्रा भरते. या पुस्तक जत्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. बंगाली मनुष्य जेव्हा आपल्या मुलीला स्थळे पाहायला जातो, तेव्हा प्रथम त्या घरात पुस्तकं आहेत का हे पाहतो. घरात पुस्तक नाही म्हणून स्थळ नाकारलं जातं. लोक आपल्या मासिक पगारातील काही रक्कम पुस्तकांसाठी खर्च करतात. रेशनच्या पाळीसारख्या पुस्तक दुकानांपुढे रांगा लागल्याचं वैभवशाली दृश्य आपणास बंगालमध्येच पाहायला मिळतं.

 शब्दांना धन मानून त्यांची जोपासना करणं, हे सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. आपले भौतिक जीवन कितीही समृद्ध झाले तरी भाषा, साहित्य, संगीताशिवाय ते ख-या अर्थाने समृद्ध होणार नाही हे आपण लक्षात ठेवायला हवे. शब्द हे जीवन आहे, जीवनाचा खरा गौरव शब्दांच्या जोपासनेनेच होणार आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून तर तुकारामांनी शब्दास देव मानले आहे. शब्दसक्तीच्या जोरावरच आपण ब्रह्मांड जिंकले आहे. गगनास गवसणी घालण्याचे सारे उपाय आपणास शब्दसक्तीमुळेच प्राप्त झाले आहे अशा या शब्दशक्तीची जोपासना हे आपले जीवित कार्य व्हायला हवे.

▄ ▄