शब्द सोन्याचा पिंपळ/वाचनाने जग बदलते

वाचनाने जग बदलते




 माणूस नेहमी अस्वस्थ असतो. त्याला प्रत्येक क्षणी काहीतरी सांगायचं, बोलायचं, समजवायचं असतं. या अस्वस्थतेतूनच तो बोलू, लिह, विचारू लागला. पहिल्यांदा तो हे सारं हावभावाने करायचा. त्याच्याकडे भाषा नव्हती. मग ती काळाच्या ओघात आली. आधी त्यानं अक्षरं निर्माण केली. ती होती चित्रं, चिन्हं! पुढे त्याला विस्ताराने काही सांगावं वाटू लागलं. मग तो अनेक अक्षरांनी सांगू लागला. ‘ख’ म्हणजे आकाश. 'ग' म्हणजे गमन. म्हणून झाला खग. खग म्हणजे पक्षी. शब्द असे बनले तरी त्याचे समाधान होईना. मग तो वाक्यात बोलू लागला... शब्द जमवले. त्याची वाक्यं झाली. ती सुरुवातीस काव्यमय होती... म्हणून आपलं सारं प्राचीन साहित्य काव्यमय... रामायण, महाराभारत, भगवद्गीता हे सर्व असंच काव्यमय दिसतं.

 वाचन, लेखन, गणन या माणूस विकासाच्या प्रारंभिक खुणा. त्यातही वाचनाने माणसास अन्य प्राण्यांपासून अलग केले. सर्कशीतले प्राणी... नाचतात, खेळतात, चित्रं काढतात पण वाचू नाही शकत. ‘वाचतो तो माणूस' ही माणसाची खरी व्याख्या, खरी ओळख! लिहिलेले अंक, अक्षरे ओळखणं... त्यांची संगती लावणं... विचार करणं, समजून घेणं म्हणजे वाचणं. घोकणं आणि वाचणं यात फरक आहे. एकदा का तुम्ही पुस्तकं वाचू लागला की, मग तुमचं जग बदलू लागतं. तुम्हाला चांगलं-वाईट समजतं. पुस्तकं वाचतो तो निसर्ग वाचू शकतो... तो चित्रं वाचू शकतो. चित्रं पाहायची नसतात, वाचायची असतात हे किती जणांना माहीत आहे?

जी माणसं चित्रं वाचू शकतात ती मग वाचू लागतात. ज्यांना माणसाची पारख करता येते तो शहाणा. शहाणपण येतं ते वाचनाने.

 वाचन आपला श्वास व्हायला हवा. श्वास घेतल्याशिवाय आपणास जगता येत नाही. वाचनाशिवाय आपलं जग, जीवन, जगणं बदलणं अशक्य. ‘प्रसंगी अखंडित वाचित जावे'चा संस्कारच तुम्हाला ज्ञानसंपन्न करतो. एकदा का वाचनाचा छंद जडला तर मग तुम्हाला सारं व्यर्थ, तुच्छ वाटू लागेल. रेडिओ, टी.व्ही., सिनेमापेक्षा पुस्तकं कितीतरी पटीनं आपणास समृद्ध करत असतात.

 वाचनाने वेळ जातो. आपलं मनोरंजन होतं. नवे ज्ञान होते. नवा दृष्टिकोन येतो. आपण जन्मतः एकाकी, एकांगी असतो. वाचन आपणास बहुश्रुत, सामाजिक बनवतं. वाचनाने चिंता दूर होऊन माणूस चिंतन करू लागतो. तो विचारी होतो. वाचनामुळे विविध ज्ञान-विज्ञानाचा परिचय होतो. विविध भाषा, संस्कृती, देश, माणसं समजतात. वाचन माणसास सहनशील बनवतं. माणसाची कल्पनाशक्ती विस्तारते ती वाचनामुळेच. स्वतःचा शोध ज्यांना घ्यायचा आहे, ज्यांना स्वतःला जाणून घ्यायचं आहे त्यांना वाचनाशिवाय पर्याय नाही.

 वाचनाचं वेड म्हणजे जगण्याचं वेड. माझे एक साहित्यिक मित्र होते. त्यांची मुलगी मोठी झाली. लग्न ठरवायला, दाखवायला म्हणून ते मुलीला नवच्या मुलाच्या घरी घेऊन गेले. लग्न ठरवणं म्हणजे युद्धाची चर्चा. तह, शह, कट, काटशह सारं असतं. त्याला भरपूर वेळ लागतो. दोन्हीकडची मंडळी चर्चेचे गु-हाळ चालवत राहिली. परक्या घरात गेलेल्या मुलीचा वेळ जाता जाईना. तिनं त्या घरी वाचायला काही आहे का विचारलं? त्या घरी वाचायला काही नव्हतं. त्या मुलीनं तिच्या बाबांना बोलावलं आणि निघून सांगितलं, “ज्या घरात मी एक तासही घालवू शकत नाही, तिथं मला आयुष्य काढायला लावू नका.' हे सारं शहाणपण येतं वाचनातून.

 ‘डोळ्यात वाच माझ्या, गीत भावनांचे' म्हणणारा कवी खरा भावसाक्षर होता. माणसास केवळ साक्षर होऊन चालणार नाही. तो भावसाक्षर हवा. भावसाक्षरता येते वाचनातून. ‘वाचता येणं म्हणजे तुमचं वाचन समृद्ध असणं. सत्यनारायणाची पूजा सांगणाच्या भटजीप्रमाणं वाचणं म्हणजे वाचन नव्हे. ते फक्त उच्चारणं असतं. उच्चार व वाचनातला फरक नित्य वाचनातून

येतो. वाचन म्हणजे शब्दार्थाचा संबंध जीवनास जोडणं. वाचन ही क्रिया नाही, ती कला आहे. जीवन ही एक संधी असते. लक्ष लक्ष फे-यांतून येणारी! माणसाचं जीवन पाशवी बनायचं नसेल तर पुस्तकं, चित्रं, माणसं, निसर्ग सारं वाचायला हवं. वाचनाने जग बदलते... अधिक सुंदर होते... सार्थक होते. त्यासाठी ग्रंथोत्सव! ग्रंथ येती घरा... तोचि दिवाळी-दसरा!

▄ ▄