शब्द सोन्याचा पिंपळ/सामाजिक धर्मबुद्धी आणि गांधी विचार

सामाजिक धर्मबुद्धी आणि गांधी विचार



 गांधी विचार, गांधी दर्शन, गांधी तत्त्वज्ञान अशा अनेक पद्धतीने महात्मा गांधींच्या आचार व विचारांचा धांडोळा घेत असताना एक गोष्ट व्यवच्छेदकपणे लक्षात येते की महात्मा गांधींनी आपले जीवन भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञानावर उभारले असले तरी त्याचा पाया समाजरचना हाच आहे. या विचारात आचार व तत्त्वज्ञानाचं अद्वैत आहे. ज्याला आपण स्थूलमानाने ‘गांधी विचार' म्हणून संबोधतो. खरा तर तो एक ‘आचारधर्म' आहे. गांधी विचारात आचाराचे, अनुसरणाचे असाधारण महत्त्व आहे. गांधी विचार भारतीय तत्त्वज्ञानाच्या अंगाने पाहू लागल्यास, तो वरकरणी अध्यात्माकडे जाणारा वाटला तरी त्याचं कर्मकांड धार्मिक न राहता ते सामाजिकतेकडे अधिक झुकताना दिसतो. म्हणून गांधी विचार ही एक ‘समाज जीवन धारणा पद्धती' आहे आणि ती सामाजिक धर्मबुद्धीवर उभी आहे.

 महात्मा गांधींचा जगातील सर्व धर्मांचा अभ्यास होता. असे असल्यामुळे त्यांचे जीवन तत्त्वज्ञान म्हणून जे घटक पुढे येतात ते दुसरे तिसरे काही नसून सर्व धर्मातील ती अनुकरणीय तत्त्वे होत. बुद्धाची करुणा, ख्रिस्ताची दया, इस्लामचा निर्गुण ईश्वर, महावीराचा अपरिग्रह व निग्रंथ आचार, शिखांची कारसेवा अशांतून त्यांची एकादशव्रते सिद्ध झाली आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, आस्वाद, अभय, सर्वधर्मसमभाव, स्वदेश भावना, अस्पृश्यता, नम्रतासारखी तत्त्वे माणसात सामाजिक धर्मबुद्धीच जागवतात.

 म. गांधी हिंदू धर्म पायाभूत मानून अन्य धर्मांचा विचार करतात. त्यांच्या सामाजिक धर्मात पूजा-अर्चा नसली तरी प्रार्थना आहे. व्रत नसले



तरी उपवास आहे. शिक्षा नाही पण प्रायश्चित्त आहे. विषमतेच्या जागी ते समानता स्वीकारतात. गुलामीऐवजी स्वातंत्र्य ते पसंत करतात. भारत गरिबांचा देश असल्याने ते खादी, स्वदेश, साधेपणाचे मूल्य मानतात. श्रमप्रतिष्ठा हे प्रतीक नसून तो दैनिक व्यवहाराचा भाग आहे. शेती, सूत कताई, स्वावलंबन, सेवा इत्यादीतून तो स्पष्ट होतो.

 महात्मा गांधींच्या सामाजिक धर्मबुद्धीचे ध्येय माणुसकी व मानवतावाद आहे. म्हणून ते अस्पृश्यता निवारण, दारूबंदी, कुष्ठसेवा, ग्रामसफाई यांचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यांचा मानवतावाद नीती, राजकारण, अर्थकारण यांचा साकल्याने विचार करून साकारतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही या पंचशीलाचा त्यांचा आग्रह मानवाचे जिणे अधिक उंचावावे, या ध्यासातून आलेला आहे. सत्य हा त्यांचा ईश्वर आहे. गरीबदास त्यांचा राम आहे. गुलामीचं निर्दालन मग ते सामाजिक असो वा राजकीय याचा ते निकराने आग्रह धरतात. सविनय अवज्ञा आंदोलन, उपोषण, सत्याग्रह इत्यादी उपायांनी ते सामाजिक जागृती करतात. त्यामागे लोक सहभागाचा होरा असतो. सत्याच्या वेगवेगळ्या प्रयोग, उपक्रमातून त्यांची समाजशास्त्रीय बैठक स्पष्ट होते.

 महात्मा गांधींच्या विचारात व्यक्ती व्यवहारात व्यक्तिगत आचरणास अधिक महत्त्व आहे. ते स्वातंत्र्याचे भोक्ते असल्याने विचारात कोणतीही गोष्ट अनिवार्य मानत नाहीत. स्वत्त्व, सत्त्व, स्वराज्य, स्वातंत्र्य, स्वावलंबन, स्वदेश भाव या साच्यामागे 'स्व' प्रज्ञतेचा आग्रह आहे. लादलेली कोणतीही गोष्ट अनिच्छेने होते. उलटपक्षी ‘स्व' स्वीकृत बाब परिणामकारकपणे कार्य करते. महात्मा गांधींचा विचार व व्यवहार अशा दोन्ही पातळ्यांवर बुद्धीपेक्षा भावनेस महत्त्व देतो. त्यामुळे त्या विचारात आत्मशुद्धी, निग्रह, स्वीकार, आत्मक्लेश, आत्मनिर्भरता यांचे अतूट नाते आहे. हृदय परिवर्तनावर त्यांची निष्ठा असण्यातून त्यांच्या विचारातील आतल्या आवाजाचं महत्त्व स्पष्ट होतं. विवेकास ते विकाराचा उतारा मानतात. विखार त्यांना अमान्य आहे. काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभदी षड्रिपूंना ते थारा देत नाहीत. कारण ते ईश्वराप्रमाणे माणसास ‘पूर्ण' पाहू इच्छितात. गांधी विचार हा स्वप्नरंजन नाही, समाजधारणेचा तो एक ध्यास आहे. गांधी विचारात अहिंसा तत्त्वास असाधारण महत्त्व आहे. त्यांच्या दृष्टीने अहिंसा हा मानववंशाचा जीवन धर्म आहे. हिंसा मग ती शारीरिक असो वा मानसिक, महात्मा गांधी ती वर्त्य मानतात. हिंसेमुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक जीवनात

ताणतणाव निर्माण होतात. सामाजिक धर्मबुद्धीत हिंसेस थारा नसण्याचं ते महत्त्वाचं कारण आहे.

 महात्मा गांधींनी अहिंसा ही आपल्या विचारधारेत अनेक अंगांनी अंगिकारली आहे. सत्याग्रह, आत्मशुद्धी, आत्मसंयम ही अहिंसापूरक उपकरणे होत. त्यातला आत्मक्लेशासारखा भाग स्वहिंसा असली तरी ती व्यापक समाजहिताची असल्याने गांधीजी ती स्वीकार्य ठरवतात. त्यांच्या जीवन व्यवहारातील निःशस्त्र प्रतिकाराचा पवित्रा हा अहिंसेच्या विचारातून आलेला आहे, हे सहज लक्षात आल्यावाचून राहात नाही.

 मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानण्याचे ख्रिस्ती धर्म तत्त्व गांधीजी शिरोधार्य मानतात. माणसास ते ईश्वराचे अर्थात सर्व गुणग्राही रूप मानतात. यातही समाज अधिक प्रगत करण्याचीच धडपड दिसून येते. युद्धाचा विरोध अहिंसा व मानव विकासाच्या संकल्पनेतून अवतरला आहे. ते सबलांची हिंसा अधिक अमानवी समजतात.

 गांधी विचारातील ‘एकादशव्रते' ही सामाजिक धर्मबुद्धीचा आचारधर्म स्पष्ट करतात. सत्य, अहिंसा याबद्दल आपण वर विचार केला आहे. उर्वरितात ब्रह्मचर्यासारख्या तत्त्वाकडे पाहू लागलो तर लक्षात येते की, तो आत्मसंयमी जीवन व्यवहार होय. ही अत्यंत कठीण गोष्ट मानवाने एकदा स्वीकारली की मग तो ईश्वरपदास पोहोचला असेच समजायला हवे. अस्तेय, अपरिग्रह, अभयादी तत्त्वामागे सामाजिक सदाचार सार्वजनिक करण्याचा महात्मा गांधींचा ध्यास आहे. अस्पृश्यता निवारणामागेही एकसंध समाजनिर्मितीचं स्वप्न आहे. श्रमास्वाद माणसास स्वावलंबी बनवतो. सर्वधर्मसमभावही एकसंध समाज रचनेचा गांधी उपाय मानतात. नम्रता सुसंस्कृत माणसाचे लक्षण होय. नम्रतेने हिंसेस बगल मिळते, हे गांधीजींनी आपल्या जीवन व्यवहारातून आधी केले नि मग सांगितले. स्वदेशी स्पर्श भावना हा गांधीजींनी स्वतःच्या पायावर उभारण्याचा दाखवलेला मार्ग आज जागतिकीकरणाच्या पाश्र्वभूमीवर लाखमोलाचा वाटतो.

 महात्मा गांधी यांनी आपल्या विचारांतून ज्या वरील सामाजिक धर्मबुद्धीस आवाहन केले आहे ते पाहून वि. स. खांडेकरांनी त्यांना ‘दुसरे प्रॉमिथिअस' म्हटले आहे. ग्रीक दंतकथेत प्रॉमिथिअस एक मिथक आहे. प्रॉमिथिअस एक दिव्य पुरुष होता. त्यानं देवांचा विरोध झुगारून स्वर्गातील अग्नी मानव कल्याणार्थ पृथ्वीतलावर आणला. परिणामी त्याला जेरबंद करण्यात आलं. साखळदंडांनी बांधलेल्या प्रॉमिथिअसचे गरुड दिवसभर लचके तोडत. पण

रात्री त्याचे पुनरुज्जीवन व्हायचं. या कथेतून कल्याण भावनेचं व ते करण्याचं मृत्युंजयत्व खांडेकरांनी स्पष्ट केलं त्याची आठवण झाल्यावाचून राहात नाही.

 'खेड्याकडे चला' म्हणणाच्या त्यांच्या विचारातील सामाजिक दूरदृष्टी आजच्या जीवघेण्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेत प्रकर्षाने लक्षात येते. महात्मा गांधी खरेच मानवी मांगल्याचे भाष्यकार होते. आज जेव्हा आपण त्याग, ध्येयवाद, क्षमाशीलतेसारखी वृत्ती लोप होताना पाहतो, तेव्हा गांधीजींच्या सामाजिक धर्मबुद्धीची अनिवार्यता अधोरेखित होते. हरणाच्या गतीने विकासाची स्वप्ने पाहणारे आपण, आपला मूल्यव्यवहार मात्र गोगलगाईच्या गतीचा. ही विसंगती गांधी विचार समजून घेताना लक्षात येते. आज विवेकाचं लोक शिक्षण इतिहासजमा झालंय, याची खंत कोणाही समाजहितकारी व्यक्तीस अंतर्मुख होण्यास भाग पाडते. मला वाटतं, यातच गांधी विाराची प्रसंगोचितता सामावलेली आहे. 'बुडती हे जन। पाहवेना डोळा।।'ची सद्यःस्थिती आपणास अस्वस्थ करते ती त्यामुळेच.

 हे सारं रोखायचं तर त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःच्या वर्तमान जीवन व्यवहारास छेद देऊन ‘पावलापुरता प्रकाश' अशा छोट्या सामाजिक न्याय भावनेतून व्यक्तिगत जीवनात काही पथ्ये पाळायला हवीत. मी एकादशव्रताचे पालन करीन. मी जातिभेद मानणार नाही, करणार नाही. इतकेच नव्हे, तर जातिअंताचा लढा जात नाकारल्याशिवाय, जाती त्यागाशिवाय सुरू होणार नाही याचं भान मला आल्यानं मी तिच्या निरासास पूरकच जीवन व्यवहार करीन. 'जात नसते ती जात' ही जातीच्या व्याख्या जातीस खतपाणी घालणारी आहे. तिच्यावर अधिक आघात करण्याची गरज आहे. जातिधर्मास छेद देणारे रोटी-बेटी व्यवहार, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाचं मागासलेपण आधारित सामाजिक न्याय व समावेशनाचं धोरण अंगिकारणं हाच सद्यःस्थितीतील जात-धर्म व्यवहारास दिला जाणारा समर्थ पर्याय आहे, अशी धारणा जोवर समाजात दृढमूल होणार नाही तोवर ख-या अर्थाने आपल्यात सामाजिक धर्मबुद्धी जागली असे म्हणता येणार नाही. दलित, पीडित, वंचित मानवसमुदायाचं कल्याण जपानी समुराईंच्या अधिकार, हक्क, सवलती नाकारण्याच्या अनुकरणानेच होऊ शकतं. अन्यथा,

आरक्षणार्थ आज लागलेली अहमहमिका थांबणार नाही. आरक्षण ही त्रिकालाबाधित गोष्ट नसून सामाजिक, न्यायाचा तो तात्पुरता विचार व व्यवहार आहे. वंचित वर्गास समाजाच्या मध्यप्रवाहात आणण्याचा तो

सामाजिक खुश्कीचा मार्ग होय. स्त्रीविकासाच्या संदर्भात हे लक्षात ठेवायला हवं.

 गांधी विचाराच्या सदाचारांची सदाफुली आपल्या समाज व्यवहाराची प्रमाणभाषा होणे ही आता काळाची गरज आहे. आपलं वर्तमान सामाजिक व राजकीय नेतृत्व हे पूर्वीसारखं आदर्श, अनुकरणीय राहिलं नाही याची खंत करत राहण्यापेक्षा समाज आदर्शाची पूजा बांधणं हाच त्यावरील उपाय आहे. घड्याळाचे काटे उलटे फिरवून आपणास चरखा चालवत राहता येणार नाही, पण काटकसर करणं शक्य आहे. पादत्राणे १०० रुपयांची घ्यायची की १०,००० रुपयांची यातला साधेपणाचा जितक्या जवळचा विवेक तुम्ही स्वीकाराल तितक्या गतीने सदाचाराची सामाजिक सदाफुली फुलेल, हे सांगायला भविष्यवेत्ता कशाला हवा? लग्न समारंभ साधेपणानं करता येणं, प्राप्त साधनांची विनियोग उत्पादक व्यवहारावर करणं योग्य की भपकेबाज विवाह करून लग्न पत्रिकेवर ‘कृपया अहेर आणू नये' छापणं? जिथे स्कूटर पुरेशी तिथं चारचाकीचा वापर टाळणं हाही गांधीविचारच ना?

 आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यातही गांधी विचार आचरता येतो. प्रश्न आहे तो तुम्हाला किती समजला? तो आचरण्याचा तुमचा संयम किती? तुम्ही समाजभय, समाज प्रतिष्ठा प्रमाण मानणार की स्वनिर्धारित मोजपट्ट्या लावून जगणार? सारा व्यभिचार हा अनुकरणाची घाई, प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना, विसंगत व्यवहार, आपपरभेद, विषम अर्थकारणाचे अनुसरण यातून येतो याचं पक्कं भान हवं. इच्छांचं किमानीकरण विरुद्ध त्याग, समर्पणाची कमाल धारणा अशा द्वंद्वात्मक भौतिक वादाची आजची लढाई आहे. तिला मार्क्सवाद उतारा नाही. असेलच तर गांधीवाद, समाजवाद. हिंसा, आक्रमणास छेद देत जाणारे सारे विचार मग ते तत्त्वज्ञान, धर्म राजकीय विचारप्रणाली कोणतेही असोत, त्याची फळे उशिरा येत असली, तरी उशिरापर्यंत टिकतात. जे झटपट येतं ते झटपट जातं. फुलं झटपट येतात, झटपट कोमेजतात. फळे उशिरा येतात, उशिरापर्यंत टिकतात. सामाजिक विचारांच्या फलधारणेचंही तसंच आहे. ओबामांचा उदय व्हायला तीन मार्टिन ल्यूथरची वाट पाहावी लागली हे जरी खरे असले तरी 'Change is needed' हे सूत्र प्रत्येक द्वंद्वात्मक स्थितीत अधिक स्थैर्याकडे जाणाच्या पर्यायातून निवडले पाहिजे. त्यातच सामाजिक शहाणपण असतं नि ही सामाजिक धर्मबुद्धी गांधी विचार शिकवते.

▄ ▄