शब्द सोन्याचा पिंपळ/सार्वजनिक ग्रंथालये:काल,आज आणि उद्या

सार्वजनिक ग्रंथालये : काल, आज आणि उद्या



 मनुष्य विकासाचे प्रतीक : ग्रंथालय-

 माणूस मूलतः पशू असला तरी त्याच्यात अनेक वृत्ती, खुणा, लकबी, शक्ती, कौशल्ये अशी आहेत की त्यास त्या गोष्टी त्याच्या प्राणीपणापासून वेगळ्या करतात. ते त्याच्यातलं दुस-या परीनं प्राणीश्रेष्ठत्वही ठरतं. माणसाचा शारीरिक विकास जसा हजारो वर्षांचं उत्क्रांत भौतिक रूप तसंच त्याचं बौद्धिक, मानस नि भावनिक स्थित्यंतरही! त्याचं टोळीत राहणं, गुहेत विसावणं, शेकोटी पेटवणं, शिकारीनंतर शेती करणं या गोष्टींनीही तो विकसित होत गेला. मौन अभिव्यक्ती जाऊन, ओरडणं सोडून त्याचं बोलू लागणं हा त्याच्या नागर होण्याचाच एक आविष्कार होता. घर बांधणं, सजवणं यातून तो स्थिर झाला. प्रारंभीच्या काळी शिकार, युद्ध इत्यादी नंतरचं त्याचं रोमांचक ओरडणं, आरोळी ठोकणं, प्रतिपक्षाला आवाहन देणं या त्यांच्यातील शक्तिप्राबल्याच्या आविष्काराच्या गोष्टी होत्या. विजयानंतरचा त्याचा उन्माद ही त्याचीअभिव्यक्तीच होती. यातून मग गीत, नृत्य उदयास आलं. युद्धगीतं म्हणजे सामूहिक आविष्करणच! जी गोष्ट तो मुठी आवळून, दात घट्ट आवळून, स्नायू ताणून व्यक्त करायचा त्याला लय, संगीतानं थंड नसलं तरी ढिलं जरूर केलं. ते त्याचं एका परीनं मानवीकरणच होतं.

 जंगलात असताना अणकुचीदार दगडांनी झाडांच्या बुंध्यांवर कोरणं, गुहेत राहताना दगडावर रेघोट्या मारणं असं आरेखन, रेखांकन नि पुढे चित्र काढणं एकीकडे त्याचं व्यस्त होणं होतं. तर दुसरीकडे ती त्यांच्या स्मृती, घात-आघातांची नोंदही होती. ते त्याचं असणं (being) अस्तित्व नोंदणं, खोदणं होतं. यातून तो 'स्व' शोधू पाहत होता. त्याच्यातील स्वामित्वाच्या

खुणा पशू, वस्तूवरील त्याच्या खुणा, चिन्हांतून होऊ लागल्या. हे त्याचं लिहिणं प्रारंभी त्याची व्यकितगत नोंद होती. त्या नोंदींचं संप्रेषण निकटस्थ, टोळी, गट, कुटुंबात विस्तारित होऊन नोंदीच्या वाचनास प्रारंभ झाला. गूढ चित्रे, कूट संकेत यातून अभिव्यक्ती विकास झाला. त्याचे ठसे घेणं, त्याच्या एकापेक्षा अनेक आवृत्त्या करणं ही माणसाच्या मुद्रणकलेचा प्रारंभ होता. भूर्जपत्र, चामडे, चिखलांचे ठोकळे यावर उठवण्याच्या कलेनं लेखन, मुद्रण, वाचन विकास घडवून आणला. अशा साधन संग्रहातून ग्रंथ उदयास आले. त्यांची संग्रहालये झाली. ती म्हणजे आमची ग्रंथालये होत.

 ग्रंथालय विकास -

 लेखन विकासामधुन लिपी निर्माण झाली. लिपी म्हणजे लेखन व वाचनाचं सार्वत्रिक रूप. जगातील प्राचीन लिपी इजिप्तमधील मेसेपोटेमियातील क्युनिफॉर्म ही मानली जाते. ती चित्रलिपीच होती. तिचा काळ इ. स. पूर्व ३००० मानला जातो. पण लेखनास ग्रंथरूप येऊन त्यांचे संग्रहण होण्यास सुमारे दोन हजार वर्षांचा काळ जावा लागला. सर्वांत प्राचीन ग्रंथालय म्हणून अशिरियन राजा अशुरव निपालचा राजप्रासाद मानला जातो. त्यांच्या ग्रंथालयात क्यूनिफॉर्म लिपीतील विटांवर कोरलेले विविध ग्रंथ होते. ते प्रेमकाव्य, महाकाव्य, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादी विषयांना वाहिलेले होते. त्याच्य संग्रहात २०,००० अशा विटा होत्या. त्या आज ब्रिटिश म्युझियममध्ये संग्रहित आहेत.

 पुढे लेखनकलेचा विकास होऊन पॅपिरस वनस्पतीपासून तयार केलेल्या रिळांवर लिहिले जाऊ लागले. याच काळात शाई, रंग, लेखणी इत्यादी लेखन साधनांचा विकास झाला. काही काळानंतर पॅपिरस रिळांची जागा चमड्याच्या पानांनी घेतली. प्रारंभी चमड्यांची रिळेच असत. नंतर चमड्यांच्या सुट्या पानांवर लिहन त्यांची बांधणी करण्याची पद्धत रूढ़ झाली. अशा ग्रंथांना कोडेक्स म्हणत. त्या वेळी लेखन जिकिरीचे व जोखमीचे काम मानले जाई. लेखक म्हणत, 'लेखन जरी दोन बोटाने होत असले तरी सारे अंग ते मोडते.' हा काळ इ. स. पूर्व ६०० ते ७०० चा मानला जातो. यापूर्वी चीनमध्ये इ. स. पूर्व १३०० च्या दरम्यान लाकूड, बांबूवर लिहिले जाई. इ. स. ४०० पासून पॅपिरसचा प्रयोग बंद झाला.

 रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर पाचव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत ग्रंथांची जोपासना व विकासाचे कार्य प्रमुखतः ख्रिश्चन चर्चेसनी केले. तत्पूर्वी बाराव्या शतकात जगातील विविध विद्यापीठांनी ग्रंथ विकासास

चालना दिली. पंधराव्या शतकात सन १४३९ मध्ये गटेन्बर्गने लावलेल्या मुद्रणकलेच्या शोधामुळे ग्रंथ व्यवहारात खरी क्रांतीच आली. त्या शतकात चाळीस हजार ग्रंथांची निर्मिती झाली. गेल्या पाच हजार वर्षांत लक्षावधी ग्रंथ निर्माण झाले. आज प्रतिवर्षी कोटीच्या घरात ग्रंथ निर्मिती होते. जगात असा देश नाही, जिथे ग्रंथ नाही वा निर्मिती नाही. यावरून ग्रंथालय विकासाची व्याप्ती व महत्त्व अधोरेखित होते. सारं जग साक्षर करण्याचा ध्यास म्हणजे सारं जग ग्रंथमय करण्याचंच अभियान होय.

 जगातील श्रेष्ठ ग्रंथालये-

 सार्वजनिक ग्रंथालयांचा उदय हा राज्ये स्थापन होण्यापूर्वीपासूनचा मानला जातो. राजेशाही, धर्म साम्राज्ये यांच्या काळातही ग्रंथालये होती. पण तिचे स्वामीत्व राजा व संस्थेचे असायचे. तिचा वापर राजा, दरबारी, अमीर-उमराव करत. सार्वजनिक व्यवस्थेचा उदय हा प्रजाकें द्री राज्यनिर्मितीबरोबर झाला. सर्वाधिक जुने सार्वजनिक ग्रंथालय म्हणून इजिप्तच्या अलेक्झांड्रिया ग्रंथालयाचा उल्लेख केला जातो.

 कल्याणकारी राज्य कल्पनेचा उदय झाल्यानंतर सार्वजनिक पैशातून कर गोळा केला जाऊ लागला. करातून कल्याणकारी योजनांची सुरुवात झाली. त्यापैकी सार्वजनिक ग्रंथालय एक होते. जगातली जी जुनी व मोठी ग्रंथालये आहेत, ती शासन निधीतून उभारली. आजही ती शासकीय अनुदानातून चालवली जातात. जगात ग्रंथव्यवहारास चालना देण्यासाठी युनेस्कोसारखी संघटना कार्य करते. शिवाय वर्ल्ड लायब्ररी काँग्रेससारख्या संस्थाही याबाबत वरचेवर पुढाकार घेऊन ग्रंथ वर्ष, ग्रंथ सनद, ग्रंथ करार, ग्रंथ देवघेव इत्यादी संबंधाने जागतिक धोरण, नीतिनियम ठरवत असते. आज ग्रंथालयशास्त्र विकसित झाले असून त्याद्वारे ग्रंथ नियमन, वर्गीकरण, संग्रहण, प्रशिक्षण इत्यादी बाबतीत जागतिक, सार्वत्रिक अशी प्रतिमाने निश्चित केली जातात. जगातील खालील श्रेष्ठ ग्रंथालये या संदर्भात आदर्श मानली जातात.

 भारतातील सार्वजनिक ग्रंथालयांचा विकास-

 भारतातील सार्वजनिक ग्रंथालय विकासास गती मिळाली ती मे १८0८ मध्ये. त्या वर्षी रजिस्ट्रेशन ऑफ पब्लिकेशन अॅक्ट बाँबे अंमलात आला. त्यामुळे एतद्देशीय ग्रंथ व्यवहार ब्रिटिश नियंत्रणाखाली आला. त्यामुळे इंग्लंडच्या धर्तीवर इथे ग्रंथ प्रकाशन व विक्रीस प्रोत्साहन मिळाले. त्यातून सन १८८१ मध्ये कलकत्ता लायब्ररीची स्थापना झाली. लॉर्ड कर्झनच्या

कार्यकालात ३१ जानेवारी १९०२ मध्ये इंपिरियल लायब्ररी अँक्ट मंजूर करण्यात येऊन राष्ट्रीय पातळीवरचे ग्रंथालय उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला. त्यानुसार कलकत्ता लायब्ररीस 'इंपिरियल लायब्ररी'चा दर्जा देण्यात येऊन तिच्या विकासाची योजना आखण्यात आली. ही घटना १९०६ ची. यामुळे देशातत सर्वत्र सार्वजनिक ग्रंथालये अशाच धर्तीवर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी जी वेगवेगळी संस्थाने होती, त्या संस्थानांनी आपापल्या राज्यक्षेत्रात ग्रंथालये सुरू केली होती. तत्कालीन संयुक्त महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर मराठी ग्रंथालये बडोदे, कोल्हापूर, सावंतवाडी, सांगली, जमखंडी इत्यादी ठिकाणी सुरू होती. अशा ग्रंथालयांना आधुनिक करण्याच्या योजनेअंतर्गत राजे सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्याची आपली लायब्ररी विकसित करून मुक्तद्वार बनवली. (Open Access System) शिवाय ग्रंथ वर्गीकरण व परिगणन पद्धतींचा अवलंब करण्यात आला. त्याची चर्चा भारतभर होऊन ग्रंथालय क्षेत्रात आधुनिकीकरणाची लाट आली. त्यामुळे नव्या वातावरणात आंध्र प्रदेशातील बेसवाडा इथे ग्रंथालय कर्मचारी संघाचे अधिवेशन पार पडले. सन १९१८ मध्ये लाहोरमध्ये अखिल भारतीय ग्रंथालय परिषद संपन्न झाली. सन १९३४ मध्ये अखिल भारतीय सार्वजनिक ग्रंथालय अधिवेशन मद्रासमध्ये भरले. त्यात सार्वजनिक ग्रंथालय विकासावर भर देण्यात आला. भारत स्वतंत्र झाल्यावर सन १९४८ मध्ये 'इंपिरियल लायब्ररीचे रूपांतर 'नॅशनल लायब्ररी'मध्ये करण्यात येऊन ग्रंथ प्रकाशन, नोंद, संग्रहण, संशोधन, सुधारणा इत्यादी जबाबदारी त्या ग्रंथालयांवर सोपविण्यात आली. सदरचे ग्रंथालय राजाराम मोहन रॉय ग्रंथालयाच्या रूपाने आज राष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक ग्रंथालय विकासाचे कार्य करत आहे.

 जागतिकीकरणाची आव्हाने व संगणक क्रांती-

 आज भारतातील सार्वजनिक ग्रंथालये संगणक क्रांतीमुळे आणि जागतिकीकरणाने ज्ञानासक्त समाजापुढे ठेवलेल्या नव्या आव्हानांमुळे कात टाकत आहे, हे खरे असले तरी माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील जागतिक प्रगती पाहता आपल्या बदलाची गती कासवाचीच ठरते. हे पाहून भारत सरकारने नेमलेल्या राष्ट्रीय ज्ञान आयोगाने (National Knowledge Commission) ग्रंथालयांवर स्वतंत्र अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेऊन उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार ग्रंथालये बदलत्या काळात ग्रंथ संग्रह व देवघेवीचे केंद्र न

राहता समाजातील नागरिकांचे आजन्म शिक्षण केंद्र (Life long Learning) वा जीवनलक्ष्यी निरंतर शिक्षण संस्था म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. सार्वजनिक ग्रंथालयांचे आजवरचे कार्य स्थानिक वाचकांच्या गरजा पुरविण्यापुरते मर्यादित होते. नव्या संकल्पनेनुसार भारतातील सर्व सार्वजनिक ग्रंथालये इंटरनेटद्वारे जगातील सर्व विद्यापीठे व ग्रंथालये यांना जोडण्याचे लक्ष्य निर्धारित केले असल्याने आपल्या ग्रंथालयांनी ग्रंथसंग्रहण, संरक्षण, देवघेव, विकास इत्यादी बाबत जागतिक प्रगती लक्षात घेऊन आपल्या सेवांचा दर्जा उंचावून कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे संगणकीकरण, महाजालीय जोडणी (Net connectivity), ई-बुक्स, ई-जर्नल, दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन या गोष्टी अनिवार्य मानण्यात आल्या आहेत. ग्रंथालये वाचकांसाठी मर्यादित न राहता प्रत्येक जिज्ञासूच्या ज्ञान, संदर्भ, अध्ययन, अध्यापन, अनुवाद, संशोधन इत्यादी दृष्टीने साहाय्य व मार्गदर्शन करणारे केंद्र होणे आवश्यक मानण्यात आले आहे. केवळ माहिती देणे आता पुरेसे न मानता अद्ययावत माहिती पुरवण्यावर भर राहणार आहे. सार्वजनिक ग्रंथालयाची ही नवी उद्दिष्टे म्हणजे विकास व प्रगतीची नवी क्षितिजे असून जी ग्रंथालये संगणक क्रांतीमुळे आलेल्या जागतिक आव्हानांना स्वीकारणार नाहीत. त्यांच्याकडे युवा वाचक फिरकणारसुद्धा नाहीत. ग्रंथालयात सायबर कॅफे, कॉफी हाउस, ई कंटेंट अँड कलेक्शन, वैचारिक देवघेवीचे केंद्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा, किंडलस् इत्यादी सुविधा आता काळाची गरज होय.

 सार्वजनिक ग्रंथालये : सुविधा विकासासंबंधी शिफारशी -

 राष्ट्रीय ज्ञान आयोगाने भारतातील शालेय, विद्यापीठीय तसेच सार्वजनिक ग्रंथालयांचा विकास व्हावा म्हणून काही शिफारशी आपल्या ग्रंथालयासंबंधी अहवालात केल्या असून भारत सरकारने त्या स्वीकारल्या आहेत. त्यानुसार आर्थिक तरतूदही केली जात आहे. सदर शिफारशींत ग्रंथालय हा विषय समवर्ती सूचीत अंतर्भूत करण्याची क्रांतिकारी शिफारस केली आहे. पूर्वी ग्रंथालय विकास ही केवळ राज्याची जबाबदारी होती. नव्या धोरणानुसार ती केंद्र व राज्याची संयुक्त जबाबदारी असल्याने ग्रंथालय विकासाचा राष्ट्रीय आराखडा ठरून सर्व ग्रंथालये एकमेकांस बँकेसारखी जोडली जातील व सामान्य वाचकास सर्व ग्रंथालयांचा लाभ घेता येईल. यासाठी स्थायी ग्रंथालय आयोगाची स्थापना करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस करण्यात आली

आहे. असा आयोग स्थापन केल्यानंतर सार्वजनिक ग्रंथालयांचे राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षण होऊन विद्यमान सेवा, सुविधा, कर्मचारी, संग्रहण आणि वर्गीकरण पद्धती नि सुविधांचा अभ्यास होऊन निष्कर्षांनुसार सुधारणा घडवून आणल्या जातील. आजवर ज्या गोष्टींचा सार्वजनिक ग्रंथालयांनी प्राथमिक विचारही केला नाही अशी बाब म्हणजे वाचक अभिरूचीची नोंद घेणे. राष्ट्रीय ज्ञान आयोगाने वाचक अभिरूचीचे राष्ट्रीय सर्वेक्षण करण्याचा आग्रह धरला असून तसे झाल्यास आपण भारत महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने ज्ञानसमाज (Knowledge Society) निर्मितीची प्रक्रिया गतिमान होईल. यामुळे आदिवासी पाड्यावरही लॅपटॉपवर ई-रिडिंग करणारे लोक, नवी पिढी पाहणे शक्य होईल. (आज ते स्वप्न वाटले तरी!) या सर्वांसाठी राष्ट्रीय ज्ञान आयोगाने राष्ट्रीय उत्पन्नातील विशिष्ट टक्के रक्कम ग्रंथालय विकासासाठी राखून ठेवणे अनिवार्य मानले आहे. तसे झाले तर प्रत्येक सार्वजनिक ग्रंथालय निश्चित काळात आपल्या विकासाची योजना आखून ती टप्प्याटप्याने पूर्ण करेल. त्यामुळे प्रत्येक सार्वजनिक ग्रंथालय किमान सुविधांनी (Minimum Standard) युक्त असेल.

 सार्वजनिक ग्रंथालये : भविष्य चित्र -

 वरील शिफारशींचा अंमल झाल्यास सार्वजनिक ग्रंथालयांचे वर्गीरण, दर्जा, निश्चिती, त्यानुसार अनुदान देण्याची योजना आहे. ग्रंथसंख्या, सुविधा, सभासद संख्येच्या आधारे कर्मचारीसंख्या राहील. त्यांना राष्ट्रीय वेतनमान निश्चित केले जाईल. ते जागतिक ग्रंथालयांच्या दर्जाचा विचार करून ठरवले जाईल. प्रत्येक सार्वजनिक ग्रंथालय मुक्तद्वार केले जाऊन ते वाचककेंद्री विकसित केले जाईल. सार्वजनिक ग्रंथालयात फर्निचर, संगणक, संग्रहण, संरक्षणइ. बाबींवर अनुदान दिले जाऊन सर्व क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञान वापरावर भर असेल. सर्व सार्वजनिक ग्रंथालये (खासगी/शासकीय/ नोंदणीकृत) संगणीकृत असतील व ती परस्परांस महाजालाने (इंटरनेट) जोडलेली असतील. नव्या ग्रंथ नीतीनुसार ई ग्रंथ खरेदीवर भर राहील. त्यामुळे ग्रंथालयात सभासदास यावे लागणार नाही. तो असेल तेथून ई ग्रंथांची देवाणघेवाण शक्य होईल. ग्रंथालये ज्ञान, संदर्भ, संशोधन विकासाची केंद्रे होऊन वाचकांना सुविधा मिळण्याचा हक्क राहील. नव्या व्यवस्थेत संचालकांपेक्षा वाचकांच्या मतास किंमत व महत्त्व असेल. सार्वजनिक वाचनालये त्या त्या गावाचे सांस्कृतिक केंद्र बनून विचारविनिमय करणे, एकमेकांस भेटणे, प्रेस कॉन्फरन्स, सेमिनार, मेळावे यांचे स्थळ म्हणून

विकसित केले जाईल. ग्रंथालयात संगणक, इंटरनेट, झेरॉक्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, पुस्तक बांधणी, मुद्रण, वितरण, विक्री सुविधा असतील. ग्रंथालयात अभ्यासिका, उपाहारगृह, प्रसाधनगृह, लिफ्ट, वातानुकूलन इत्यादी आधुनिक सुविधा देण्यावर भर राहील. ग्रंथालये भविष्यकाळात भौतिक साधनसुविधांनी समृद्ध केली जातील. ग्रंथालय व परिसर विकासात सौंदर्यावर भर दिला जाऊन चित्र, शिल्प, बाग, कारंजी, दिवाबत्ती, पेयजल इत्यादी सुविधा विकास अनविार्य होईल. थोडक्यात, भविष्यकाळात सार्वजनिक ग्रंथालये, ग्रंथांची गोदामे न राहता ज्ञान-विज्ञान विकास, वितरण, देवघेवीचे केंद्र होईल. सार्वजनिक ग्रंथालय दर्जावरून शहर वा गावचा दर्जा ठरवता येईल. असे झाले तरच भारत महासत्तेची स्वप्ने पाहू शकेल. अन्यथा, ते केवळ स्वप्नरंजनच ठरेल.

▄ ▄