श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ सप्टेंबर

२२ सप्टेंबर

भक्ति म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम.



एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये एक चक्र सुरू झाले की बाकीची सर्व चक्रे आपापल्यापरी हळू किंवा जलद फिरू लागतात. त्याचप्रमाणे आपल्या मनाचे आहे. मनाची एक शक्ती काम करू लागली की तिच्याबरोबर इतर सर्व शक्तीदेखील हालचाल करू लागतात. मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे. ते थोर माणसालाच जमण्यासारखे आहे. पारा समोर टाकला तर दिसतो, पण काठीने मारला तर तो मारला जात नाही. त्याचप्रमाणे, मन आहे हे समजते, पण ते आवरता येत नाही. म्हणूनच भगवंताला शरण जावे, आरशावर घाण पडली म्हणून साफ करण्याचा प्रसंग आला. अंतःकरणाची घाण पुसण्याचे काम साधनाने होते. मिरच्या, मिरे, मीठ, इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतात, त्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला पाहिजे. शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचे नामस्मरण, या त्या तीन गोष्टी आहेत. शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा, धार्मिक आचार आणि नीतीचे वर्तन. शुद्ध अंतःकरण म्हणजे अभिमान नसणे, द्वेषमत्सर नसणे, आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणे. भगवंताचे नामस्मरण म्हणजे भगवंताचा केव्हाही विसर न पडणे. नवर्‍याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही. तिने नाम घेतले तर पत्‍नीधर्म सोडला असे होत नाही.

मनात येणारे भलतेसलते विचार हे नामाच्या प्रेमाला आडकाठी करतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचा उपाय म्हणजे, या विचारांना थाराच देऊ नये म्हणजे झाले. एक मोठा पोलीस अंमलदार चोर पकडण्यात हुशार होता. तो असे करी की, चोर ज्या बाईच्या नादी असेल तिला फितुर करून घ्यायचा, म्हणजे चोर आपोआप नेमका सापडे. त्याचप्रमाणे आपले मन जिथे गुंतते तिथे भगवंताला ठेवला, की मन आपल्या ताब्यात आलेच म्हणून समजा. मनाचे संयमन करायला दोन उपाय आहेत: एक म्हणजे पातंजल योग, आणि दुसरा म्हणजे भगवंताची भक्ती. पातंजल योग म्हणजे युक्ताहारविहार, नियमित राहणे, आणि इंद्रियांचा निरोध करणे, भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम. या प्रेमाची साधने कोणती तर भगवंताचे नामस्मरण, त्याचे कथाकीर्तन, साधुसमागम, आणि त्यातल्या त्यात सद्‌गुरूची कृपा, ही होत. भगवंताच्या स्मरणाशिवाय जी कर्मे होतात ती वाईट कर्मे होत. कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचे नाम घेतल्याशिवाय खायचा नाही, असा नेम ठेवला तर नाम आपोआप येते. कोणत्याही परिस्थितीत आपण नामस्मरणापासून ढळूच नये. जो नामात प्रपंच करील, त्याचा अभिमान नष्ट होऊन त्याला सुखसमाधानाचा लाभ झाल्यावाचून राहणार नाही.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.