श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ सप्टेंबर

२३ सप्टेंबर

शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन.


एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की, "तू आपल्या मुखानेच सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल." तेव्हा परमात्मा म्हणाला, "भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते." भक्तीची तीन साधने आहेत - शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन. आपले सध्या सगळे विपरीत झाले आहे. शास्त्रवचन म्हणावे, तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की, हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते, 'मी या गावंढळ बापाचे कसे ऐकू ? यापासून माझा काय फायदा होणार?' तसेच आत्मसंशोधनाचे. आपण शोधन करतो ते कसले, तर पांडव कुठे राहात होते ? रामाचा जन्म कोणत्या गावी झाला ? कौरव-पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले ? मला सांगा, अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार ? एक प्राध्यापक मला म्हणाले, "मी कृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचे जन्मस्थळ कोणते, निर्याणस्थळ कोणते, याची आता खात्री झाली." मी म्हणतो की, ते करतात ते ठिक आहे. पण संतांना कृष्णप्राप्तीसाठी, कृष्णजन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरूरी वाटली नाही; त्यांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपलेसे केले. खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे.

आपण जर आपले वर्तन पाहिले, मनातले विचार बघितले, तर आपल्याला असे आढळून येईल की, लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत; आणि असे असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो, याला काय म्हणावे ? अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार ? आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसर्‍या कुणी सांगण्याची गरजच नाही. आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा; मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार ? साधुसंतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे, आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की, 'रामा, आता मी तुझा झालो; ह्यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन, आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीन; तू मला आपला म्हण.' देव खरोखरच किती दयाळू आहे ! लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही, शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.