सप्तशती गुरूचरित्र/अध्याय सोळावा

तो महात्मा लोटुनी शिष्यां । स्वयें कोठें राहोनियां । काय करी असे तया । विप्रें पुसतां सिद्ध सांगे ॥

सवें जितात्मा मी एक । वैजनाथीं गुरुनायक । असतां विप्र आला एक । सांगे दुःख गुरुनें दिल्हें ॥२॥

गुरु तया धिक्कारुन । म्हणती तूं रे जा यथोन । येरु धरुनियां चरण । गुरुसेवन सांगा म्हणे ॥३॥

गुरु संतोषें बोलती । ब्रह्माविष्णूशिवमूर्ति । गुरु ब्रह्म साक्षात्‌ म्हणती । भक्तां देती ते सर्वार्थ ज्ञ ॥४॥

सेवा गहन वाटे तरी । गुरु आपुल्या शिष्या तारी । कथा झाली हे द्वापारीं । अवधारी मी सांगतो ।

धौम्य दोषज्ञ गुरु भला । तिघे शिष्य होते त्याला । कठिण सेवा सांगे त्याला । न वेदांसी सांगे पूर्वी ॥

विशेषार्थ न सांगती । हृच्छुघ्यर्थ सेवा घेती । वळखूनी प्रसन्न होती । रहाटी ऐसी गुरुची हे ॥७॥

धौम्य अशा रीती शिष्या । अरुणा म्हणे शेतीं तोया । न्हेयी म्हणतां तो न्हे तोया । तें न जाय शेताकडे ॥

मनीं ध्यायी गुरुपद । जलामध्यें पडे सानंद । जळ क्षेत्रीं ये स्वच्छंद । गुरु प्रसाद करी तेव्हां ॥९॥

अध्यात्म ज्ञानी तो झाला । तया गेहा पाठविला । धौम्य सांगे बैदाला । ह्या शेताला यत्‍नें राखीं ॥१०॥

राखोनि तो मळी धान । गुरुला ते दे सांगून । गाडा रेडा एक देऊन । म्हणे आण धान्य घरीं॥११॥

गाडा त्या धान्ये भरुन । आणिता पंकी तो गढून । गेला तव गुरु येवून । त्या काढून प्रसन्न हो ॥१२॥

सर्व विद्या आल्या त्याला । तया गेहीं पाठविला । गुरु म्हणे उपमन्यूला । तूं धेनूला वनी चारीं ॥१३॥

नेवोनि तो गुरें रानीं । चरवी तेथें भिक्षा करुनी । गुरु मागे तें जाणुनी । भिक्षा आणुनि दे ती मला ॥१४॥

द्विरावृत्ती भिक्षा करी । शिश्य एक देई घरीं । तें जाणुनी गुरु दुसरी । भिक्षा घरीं देई म्हणे ॥१५॥

दुश्चित्त तो नच होई । दोनी भिक्षा घरीं देई । वस्तोच्छिष्टपय घेई । गुरुमायी वारी तया ॥१६॥

तो अर्‌काचें क्षीर पीतां । होई अंध कूपी पडतां । कृपा आली गुरुनाथा । दृष्टी देता झाला मंत्रें ॥१७॥

सत्कामाः फलंतु ते । असें म्हणुनि धाडी त्यातें । तो हो कृतार्थ कीर्तीते । तच्छिष्यें मिरविली ॥१८॥

जगद्वंद्य शिष्य झाला । सतक्षकेंद्र पाडिला । गुरुतोषाची ही कला । जा तूं गुरुला पुनः सेवीं ॥१९॥

तो तद्वैरें अनुतापाला । मग तारिती गुरु त्याला । आले भिल्लवाडीला । वास केला चार मास ॥२०॥

इति श्री०प०प०वा०गु० सारे शिष्यत्रयाख्यानं नाम षोडशो०


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]