सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या ४०१ ते ५००

<poem> नाभि नाभि हे रविदत्ता । तुझा भव हा सारूं परता । तूं कोण अससी तया आतां । भेटवूं ज्ञानें ॥१॥नदीमाजीं कीटक पडिला । ऐसा जो कां दृष्टांत दिधला । तैसाचि जीव हा प्रवाहीं सांपडला । तो सत्य भाविला तुवां ॥२॥हा खराच जरी वाहवता । तरी ज्ञानाच्या बापें न निघता । तस्मात् जाणें हा विचारें पुरता । भ्रमें वाहवला दिसे ॥३॥भ्रमें वाहवला असे कैसा । तो बोलूं सावध हो मानसा । यासी साम्य दृष्टांत असे जैसा । तो अवधारीं ॥४॥एक महानदी सखोल वहात । थोर वृक्ष एक असे तींत । त्यावरी पुरुष एक निवांत । बैसला असे ॥५॥तो सुखरूप असतां बैसला । सहज अधोमुखें पाहता जाला । यया वृक्षासहित आपणाला । देखे पडिलों प्रवाहीं ॥६॥आपण जो वृक्षासहित अचळ । तया स्वकीयत्वा विसरला सकळ । प्रवाहीं प्रतिबिंब कांपे चळचळ । तोचि मी भाविलें मी पडिलों बोंबलत । कोणी काढा रे काढा त्वरित । वाहूनि चालिलों काय न देखत । कृपेसहित कोणी ॥८॥तैसा कूटस्थ निर्विकार । जों कां आपण ब्रह्मपर । या विकाराहून अति दूर । यांतचि असोनी ॥९॥वृत्तीपासोनि तत्त्वें सत्रा । हें पाणी देखे द्रष्टा । नेत्रा त्यांत बिंबला तया अन्यत्रा । जीवा मी कल्पिलें ॥४१०॥हाचि मी जीव प्रवाहीं पडिलों । जन्ममरण रूप वाहवलों । येथून केवीं जाय सुटलों । कवण्या साधनें ॥११॥कैवारी देव कोणी असे । तोचि तारील कृपेसरिसें । म्हणून अट्टहास्यें पाहतसें । कर्म हेंचि बोंबलणें ॥१२॥तो जरी खरा प्रवाहीं पडता । तरी देवासीही काढितां येता । जन ऐकोनि होती हेळसिता । तेवीं उपेक्षी देव ॥१३॥कोणी हांसोनि नदीत गळ । टाकोनि धुंडित पात्र सकळ । तेवीं वेदवाणीं साधनें पुष्कळ । बोले जीव उद्धारा ॥१४॥ऐसीं साधनें कल्पकोटी । केलीं जरी कल्पूनि मोठीं । तरी कां जीव हा उठाउठी । ज्ञानेंवीण मुक्त होय ॥१५॥खरा जरी पडिला असता । कांहीं तरी उपाय चालता । येथें भ्रमें मानिलें तया सोडविता । ज्ञानेंविण कवण ॥१६॥ऐसें ज्ञान गुरुविण कवण । बोधील बापुडा जरी देव येऊन । तस्मात् नाथिलिया दुःखांतून । काढिता सद्गुरु ॥१७॥परी जयासी तया विवेक असिला । तरीच बोधें जाय सुटला । नाहीं तरी गुरुही अनधिकारियाला । उपेक्षून जाती तो विवेक कोणता म्हणसी । तरी अवधारीं निश्चयेसी । म्यां केले जितुकें मागां सायासीं । त्याचें फळ काय प्राप्त नदींत धुंडिती ते आपण पाहे । परी एकही पडिला न लाहे । तैशीं साधनें करितां लवलाहें । मी सुटलों न वाटे ॥२०॥आणि मी बोंबलें हाका मारीं । परी कोणी धावेना कैवारी । तैसा मी दिननिशीं भजन करीं । परी देव कां न भेटे ॥२१॥जरी मी खरा वाहवतों । तरी केवीं रडतों बोंबलतों । केवीं तारी तारी उच्चारितों । मी अज्ञान जरी ॥२२॥आणि पडला पडिलिया न दिसे । हें तों मज साग्रत्वें दिसे । दिसे तरी मी पडिलों नसें । या नांव विवेक ॥२३॥तैसा मी अंतःकरणापासून । देहापर्यंत जितुकें संपूर्ण । जाणतसें सर्वांलागून । तरी मी वाहवें केवीं ॥२४॥जरी प्रवृत्तींत वाहवतों । तरी मी आपआपणा न पाहतों । मनादि विषयांत अवलोकितों । तरी मी हा नव्हें ॥२५॥जरी मीच आपआपणा । अमुक अमुकसा दिसेना । तरी मज कृपाळू गुरुराणा । दावील अपरोक्ष ॥२६॥ऐसा रविदत्ता विवेक जयासी । असेल अंतरीं निश्चयेंसी । तयासीच सद्गुरु उपदेशी । येरां उपेक्षी ॥२७॥वृक्षीं बैसोनि पडिलों मानी । तयासी खरेपणें सांगे कोणी । कीं तूं न पडतां स्वस्थानीं । अससी वृक्षीं ॥२८॥परी तयासी सत्य वाटतें । पडिलों निर्दय न काढी मातें । तैसाचि मी देह वाटे जयातें । जन्मतों मरतों खरा ॥२९॥तयासी शास्त्र आणि गुरु सांगती । कीं देह नव्हेसी तूं आत्मा चिन्मूर्ति । तया उपाय काय तयाची उपेक्षाचि गुरु करी । कारण कीं योग्य नव्हे अधिकारी । रविदत्ता ऐसें मानिसी अंतरीं । कीं गुरु निर्दय बुडतिया पाहून काढीना । भवव्याघ्रें धरिलें सोडवीना । तरी निर्दयामाजीं काय उणा । येविषयी ऐकें ॥३२॥प्रवाहीं जरी खरा पडता । निर्दय म्हणावा त्या उपेक्षिता । बैसला पाहून वृक्षावरुता । त्यागितां दोष नाहीं ॥३३॥तैसा आत्मा सर्वगत असोनी । परिपूर्ण असंग भिन्नपणीं । कदा न स्पर्शे जन्ममरणीं । सुखदुःखें नातळे ॥३४॥येणें मात्र भ्रमें मानिलें । कीं जन्ममरण मज लागलें । परी सद्गुरु जाणती आपुले । ठाई आपण ॥३५॥खरे बुडती तरी तारावें । खरे बांधिलें तरी सोडवावे । ऐसिये निश्रयें पाहोनि जावें । तया उपेक्षुनी ॥३६॥कोणासींच नाहीं बंधन । कवणा नाहीं जन्ममरण । उगेंचि मानिती पामरजन । त्या उपेक्षितां बाध काय ॥३७॥ऐसियाची बळे उपेक्षितां । गुरूसी न संभवे निर्दयता । तस्मात् ऐक बापा रविदत्ता । सत्य वचन आमुचें ॥३८॥विवेकीयासी उपदेश करूं । अविवेकिया हातीं न धरू । मागुनिही हाचि निर्धारु । चालत आला ॥३९॥ आणि वर्तमानीं पुढें होणार । परि ज्ञात्याचा हाचि निर्धार । अंगीकारावें जया अधिकार । येरां उपेक्षावें ॥४४०॥आणिकही मानिसी तूं ऐसें । कीं अन्य साधन सांगावें त्या ऐसें । तरी अवधारावें मानसें । दृष्टांतासहित ॥४१॥पडलियासी टाकून गळ । प्रवाहीं धुडिती जन बरळ । परि जे सम नसती बाष्कळ । ते अनुमोदन देती ॥४२॥तैशीं व्रतें तपें अनुष्ठानें । दानें तीर्थटनें पारणें । यज्ञ याग पुरश्चरणें । इत्यादि क्रिया ॥४३॥अर्चन प्रतिमादिकांचें । अथवा भजन अवडत्या देवाचें । ऐसें साधन नाना परीचें । मोक्षा अनुपयोगी ॥४४॥हेंचि नाना शास्त्रें प्रतिष्ठिती । पुराणेंही गलबला करिती । बहू कासया वेदही गाती । परी तो अर्थवाद ॥४५॥येणें जीव हा बंधांतून । न सुटे हें सत्य सत्य प्रमाण । ऐसें ज्ञाते जाणती पूर्ण । कीं हें निरर्थक ॥४६॥तस्मात् ज्ञाते अन्य साधना । कदां न सांगती मुमुक्ष नसतां येरां ही प्रेरणा । सहसा न करिती ते तों करितची असती सर्वें । तेंचि कासया प्रयोजावें । इतुकियापासून जें परतावें । हृदयशुद्धि होऊनि ॥४८॥जे सर्व कार्मांपसून परतले । तेचि अंतर शुद्धीतें पावले । पुढें सद्गुरूसी शरण गेले । करूं लागले श्रवण ॥४९॥श्रवणापरतें साधन कांहीं । अज्ञान निरासा दुजें नाहीं । तेंही श्रवण वेदांताचें पाहीं । जेथें ब्रह्मात्मा ऐक्य ॥४५०॥ वृक्षागारचिया पुरुषासी अन्य वाक्यें न येती उपयोगासी । एकचि वाक्य कीं प्रवाहीं न पडसी । अससी वृक्षीं स्वस्थ तैसें परोक्षही सच्चिदानंद ब्रह्म एक आहे विशुद्ध । तेणें वाक्यें नव्हे बोध । अधिकारी जरी ॥५२॥तूंचि प्रत्यक्ष ब्रह्म अससी । वेदाचीं वाक्यें जीं ऐशीं । तोच गुरु बाणविती शिष्यासी । विवेचनद्वारां ॥५३॥ऐसें हें जें वाक्य अपरोक्ष । तेणेंचि ज्ञान होय प्रत्यक्ष । तेव्हांचि अधिकारिया होय मोक्ष । अज्ञान नासे नी ॥५४॥ऐसेंही वाक्य जरी बोधिलें । आणि शिष्याप्रतिही विश्र्वासलें । परी विवेचन न होतां व्यर्थ गेलें । जाले पाषांढी गुरूनेंचि ब्रह्म म्हणतां । देहादिकांसी मानिली आत्मता । तस्मात् पाखांडी ययापरता । दुजा कोण असे ॥५६॥हें ज्ञान नव्हें अधिक अज्ञान । वाढलें दृढ जालें बंधन । ऐसा पाखांडी कोटि कल्पेंकरून । न सुटे कदां ॥५७॥तस्मात् खरें जयासी तरणें । तेणें विवेचन सांग करणें । सर्व आभासाहून ओळखणें । यथार्थ आत्मत्व ॥५८॥आतां तेंचि विवेचन कैसें । बोलिजे तें सावधान मानसें । अगा हे रविदत्ता ग्रहण करी तैसें । विवेचून यत्नें ॥५९॥बोधाभ्ज्ञासाच्छुद्धबोधो विविच्येदतियत्नतः ॥बोधासाभाहून शुद्ध बोध । विवेचून घेइजे प्रसिद्ध । तोचि आत्मा ब्रह्म आत्मा ब्रह्म विशुद्ध । बोधाभास अनात्मा ॥४६०॥एकदां विवेचनें नाहीं कळलें । परी वारंवार पाहिजे विवेचिलें । यास्तव अति प्रयत्नें म्हणितलें । सत्य सत्य त्रिवाचा वृक्षीं बैसला तो मुख्य बिंब । प्रवाहीं दिसे तो प्रतिबिंब । हे दोन परी असती स्वयंभू । एक सत्य एक मिथ्या ॥६२॥जें दिसे तें सत्य नाहीं । उगेंच पडिलें वाटे प्रवाहीं । न दिसे पाहें सर्वांही । तें प्रवाहा वेगळें ॥६३॥तेंवीच स्फूर्तीपासून देहांत । जितुकीं तत्त्वें हीं समस्त । तितुकींही जाणतिया दिसत । परी तीं असत्य सर्व ॥६४॥जो सर्वत्रांसी स्वप्रकाशें । साधनेंविण जाणतसे । परी तो कळेना अल्पसें । आणि आपणा न देखे ॥६५॥तोचि आत्मा ब्रह्म निश्चयेंसी । विलक्षण असे या सर्वांसी । जन्ममरणा पापपुण्यासी । देहकृता नातळे ॥६६॥जो प्रतिबिंबरूप आभास । जो मागें बोलिला बहुवस । आणि पुढेंही बोलिजे तयास । तोचि कर्ता भोक्ता ॥६७॥ऐसा आभास जो मिथ्या दिसे । तो तिहीं काळींही सत्य नसे । जो देखणा तो तिहीं काळीं असे । तोचि आत्मा आपण आत्मा म्हणिजे आपणा म्हणावें । येर सर्व तें आपण नव्हे । ऐसे जाणोन अंगें व्हावें । देह असतां ब्रह्मरूप ॥६९॥आत्माचि कैसा ब्रह्मरूप । ऐसा असे जरी आक्षेप । तरी सावधान असावें साक्षेप । उभयांचीं लक्षणें बालूं ॥४७०॥जग उत्पत्ति-स्थिति-लय । मायेस्तव होत जाय । परि तिहीं काळीं जे अद्वय । अबाधित तें सद्रूप ॥७१॥सृष्टीपूर्वीं सद्रूप होतें । यास्तव अधिष्ठान या भ्रमातें । सत्यावीण अन्यथा भासातें । दिसणें न घडे ॥७२॥एवं सृष्टिपूर्वी आहेच आहे । सृष्टि होतां माजीं राहे । म्हणोनि सर्वां आहेपणा लाहे । घटीं मृत्तिका जेवीं ॥७३॥पुढें नासूनी जाता सर्व । उरे तें सद्रूप स्वयमेव । जेवीं घट भंगतां रूप नांव । मृत्तिका उरे ॥७४॥एवं सृष्टीच्या आदि अंतीं उरें । मध्येंही असे निर्विकारें । तेंचि सद्रूप ब्रह्म साचारें । अविनाश सदां ॥७५॥जेवीं तिहीं काळी सत् न नासे । तेवीं सदोदित ज्ञानही असे । तेंचि चिद्रूप निर्विशेषें । शून्य देखणें ॥७६॥माया असतां प्रकाशावीं । माया निमतां अवलोकावी । तया नाहींपणाची प्रतीति घ्यावी । तेचि ज्ञप्ति चिद्रूप ॥७७॥एवं सत्चित्लक्षणें दोन । तेवींच तिसरें आंनदघन । सर्वथा सुखःदुःखविहीन । आनंदरूप ॥७८॥स्फुरणापासून अलीकडे । दिसती सुखदुःखाचें सांकडें । यास्तव आनंदरूपता न जोडे । सुखदुःखाभावीं सिद्ध ॥७९॥ऐसें सच्चिदानंद ब्रह्म । तिहीं लक्षणीं सर्वदां सम । तोचि हा कूटस्थ आत्माराम । निर्विकाररूप ॥४८०॥तेंचि लक्षणें आत्मत्वीं असतीं । यास्तव ब्रह्मिच आत्मा चिन्मूर्ति । श्रुति युक्ति आणि अनुभूति । तिहीं प्रतीतीं सिद्ध हेंचि लक्षण आत्मत्वीं कैसें । प्रस्तुत बोलिजे असे तैसें । तें लक्षण ऐकतां विश्र्वासें । मन हें साधकाचें ॥८२॥सच्चिदानंद ब्रह्म बोलिलें । तेंचि आत्मत्वीं असे पहिलें । जें का अस्ति भाति प्रिय म्हणितलें । अपर पर्यायें ॥८३॥अस्ति म्हणजे आहेपणा । तेंचि सद्रूप पूर्णपणा । भाति म्हणजे चिद्रूप देखणा । प्रिय रूप आनंद ॥८४॥एवं आस्ति भाति प्रियरूप आत्मा । तोचि सच्चिदानंद परमात्मा । येथें भेद नाहीं एक नामा । वाचून कांहीं ॥८५॥सूर्य भानु नामें दोन । परि द्विधा नव्हे सहस्त्रकिरण । तैसाचि आत्मा ब्रह्म पूर्ण । नामभेदें एकरूप ॥८६॥असो अस्ति भाति आणि प्रिय । याचा पिंडीं कैसा प्रत्यय । तेंचि बोलिजे यथान्वय । दृष्टांतासहित ॥८७॥मी आहे जों सर्व जनांसी । आहेच आहे दिवा कीं निशीं । मी नाहीं हा संशय कोणासी । कधींही नव्हे ॥८८॥सर्वत्रांसी पुसोनि पहावें । कीं सखया अससी कीं नव्हे । तरी तो म्हणे हें काय बोलावें । नलगे असतां ॥८९॥जरी मी नाहीं उगेंच बोलतां । लाज वाटे तयाचे चित्ता । आणि अहाचि वाटे समस्तां । हंसून भाविती भ्रम ॥४९०॥ऐसा आहेपणा जो आपुला । सर्वत्रीं असे संचला । येथें संशय नाहीं कोणाला । हा अस्तित्त्वें आत्मा ॥९१॥आहेपणा जागृतींत असे । स्वप्नींही भास देहीं वसे । बहु बोलणें कासया अपैसें । आहे झोंपेमाजी ॥९२॥झोपी गेला परी मी नाहीं । ऐसा प्रत्यय नसे कवणाही । मी निजलों होतों निःसंदेहीं । या रीती आहे हा प्रत्यय ॥९३॥एवं आहेपणा सांगितला ऐसा । आतां चिद्रूप भातित्वें असे कैसा । तोही बोलिजे सावध असा । निरूपणासी ॥९४॥कर्णीं शब्द हा जाणतसे । त्वचीं स्पर्शातें ओळखीतसे । शब्द स्पर्श हे दोन्ही भिन्नसे । परी ज्ञान दोहींचें एक ॥९५॥शब्द स्पर्श जाणिले जया ज्ञानें । तेणेंचि रूपातें अनुभवणें । रस गंधातेंही ओळखणें । ज्ञानें ययाची ॥९६॥श्रोत्र ऐके परि देखेना । डोळा देख परि ऐकेना । एवं इंद्रियांचे धर्म घेववतीना । एकाचे एकासी ॥९७॥परि पांचांतें जाण एकलें । तें कधींही न जाय लोपलें । जरी ते विषय वेगळाले । परि ज्ञान एक ॥९८॥हे असो कर्मेंद्रियांची क्रिया । जाणणेंचि होय ज्ञाना यया । अथवा जडत्वें पंचविषयां । जाणें तेंचि ज्ञान ॥९९॥एवं जागृतीचे जितुके व्यापार । बहुधा परी पांचची प्रकार । तितुकेही जाणे सविस्तर । स्वप्रभें ज्ञान ॥५००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.