सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या ३०१ ते ४००

<poem> तेवींच स्वप्नीं दृश्यासी । पाहतसे कल्पून मानसीं । त्यांत आपण एकअसे तयासी । कल्पूनी पाहे ध्यासें ॥१॥दृश्य आणि आपणाही कल्पिलें । परि हाचि मी त्या दृढ धरिलें । हे हे अन्य ते परते वाटले । मज सुख दुःख देती ॥२॥एवं स्वप्नांत जो अभिमान धर्तां । तोचि तैजसाभिमानी तत्त्वता । पुढें झोंपही जरी लागतां । मीपणा न त्यागी ॥३॥मी काय बहु वेळ निजेलों । होतों अन्य किमपि न स्मरलों । सुखदुःखासी न होतों स्पर्शलों । आणि कांहीच नेणें ॥४॥कांही विषय इच्छा नाहीं केली । न किंचित्स्वप्न-अवस्था देखिली । ते जागें जालिया आठवली । परि अनुभविली नेणीव तेथें मीपणा जरी नसतां । तरी जागृतींत अनुभवा न येता । एवं नेणिवेचा अभिमान धर्ता । तो प्राज्ञ अभिमानी ॥६॥एवं जागृति स्वप्न सुषुप्ति । ऐसिया तिन्ही अवस्थांप्रती । मीच म्हणोनि दृढ प्रतीति । तया बोधाभासाची ॥७॥या तीन अवस्था स्वाभाविक । परी अन्य असती आगांतुक । तेथेंही मीपणा आवश्यक । उणा नोव्हे ॥८॥मुद्रल प्रहारें मूर्च्छा आली । तेंव्हा मज मूढत्वें पडली भुली । हेही सावधानीं अठवली । परी तेथें मीपण होतें ॥९॥तैसेंच मरण जेंव्हा पातलें । तेंही मी मेलों ऐसें भाविलें । परी अभिमानाचें उणें जालें । नाहीं रोम ॥३१०॥हें असो समाधींत बैसतां । मीपणासि नये उणिवता । मी सुखी बैसलों सांडून परता । विषय चिंतनादि ॥११॥ऐसा मीपणा धरिला जेणें । तोच जीव आभास वोळखणें । असो देहक्रिया जे जे होणें । ते ते म्हणे म्यां केली ॥१२॥स्नान संध्या स्वधर्म कर्म । नित्य नैमित्तिक यज्ञ होम । दान अथवा नित्य नेम । कर्ता मीच पुण्यासी ॥१३॥शास्त्रीय जें कां न करावें । तें जरी केलें स्वभावें । तेंचि अभिमानानें माथां घ्यावें । पाप केलें म्हणोनी ॥१४॥अथवा लोकरीती विषय । जैसा जैसा वर्ते काय । तें तें माथां घेत जाय । पुण्य पाप म्हणोनी ॥१५॥विचार पाहतां जीवासी । करणें नाहीं आभासासी । परी मी कर्ता बुद्धि जरी ऐसी । तरी तें भोगावें लागे ॥१६॥देह इंद्रिय आणि प्राण । कर्म आणि अंतःकरण । हें इतुकें मिळतां संपूर्ण । करणें घडे ॥१७॥देह नसतां प्राण इंद्रिय । चित्तें कर्में करणें ही काय । इंद्रियांविण करणें न होय । देहादिही असतां ॥१८॥प्राणेंविण इंद्रिय देहे । मन कर्म जरी आहे । तरी कर्म निफजूं न लाहे । शुभ कीं अशुभ ॥१९॥एकलें अंतःकरण नसतां । देह प्राणादि असतां । कर्में नुद्भवती तत्त्वतां । तस्मात् कर्ता कोण ॥३२०॥होणें कर्म नाहीं उदेलें । जरी मन इंद्रियादि असलें । तरी कर्में न घडतील जाणिलें । पाहिजे विचारें ॥२१॥जीव तरी बुद्धि आंत । मिथ्यात्वें प्रतिभास दिसत । तेथें करणियाचा संकेत । उपाधिविण केवीं ॥२२॥एवं सर्व हे भिन्न भिन्न । परी कोठेंचि नाढळें कर्तेपण । उगेंचि भाविलें न कळून । अभिमानें मी कर्ता ॥२३॥नेणें देह इंद्रिय प्राण । नेणें कर्म अंतःकरण । नेणें जीवाचें काय लक्षण । उगाचि सर्वां मी म्हणे ॥२४॥एवं तया मीपण योगें । अन्याचें कर्म तें म्यां केलें अंगें । तया ध्यासेंचि लागेवेगें । मज भोगणें लागे मानी ॥२५॥पुण्य केलें तेणें मज । पुढें सुख होईल सहज । पापें घडलीं जीं जीं सहज । तेणें दुःख होय पुढें ॥२६॥ऐसें जें जें कर्म जालें । तें तें कर्तेपणें दृढ भाविलें । तितुकें ध्यास अंतरीं बैसलें । हा देह पडिला जरी ॥२७॥मरणकाळीं ऐशी वासना । दृढ धरून पावे अवसाना । तयाचि ध्यासें पावें जनना । भलतेहि योनी ॥२८॥सएवसंसरेत्कर्मवशाल्लोकद्वयेसदा ।ऐसा जो चिदाभास जीव । जेणें मीपणाचा घेतला भाव । तोचि जन्ममरणा पावे स्वयमेव । अध कीं उर्ध्व लोकीं मीपणध्यासें एक देह सोडी । एक देहा पावे परवडी । सदां फिरताचि असे आवडी । कर्मफलाची धरोनी ॥३३०॥जेव्हां पुण्यकर्माचा उदय । तेव्हां स्वर्गस्थ होय स्वयें । पाप उद्भवतां अधोगती जाय । नाना नीच योनी ॥३१॥अंतकाळीं जे आठवण । तैसा देह पुढें होणें । ऐसा कर्मवशें कडून । पुनः पुनः जन्मे मरे ॥३२॥जन्ममरणा नाम संसृती । हें भ्रमण न चुके कल्पांतीं । मा असो अधम कीं उत्तम गती । परी भोगी अचुक ॥३३॥उत्तमामागें अधम । कीं अधमामागें उत्तम । हा कांहीं न संभवे नेम । कर्मा ऐसें होय ॥३४॥उत्तमाचा उत्तमची । कीं अधमाचा अधमची । हा नेम न संभवे कांहीची । परी जन्मे कर्मवंशें ॥३५॥मनुष्यापासून कीटकांत । वृक्षादि हे अधम समस्त । तैसाचि मानवापासोन देवांत । उत्तम योनी ॥३६॥यास्तव मानव देह हा मध्यम । येथें पुण्यपाप असे सम । या तळीं हे सर्व अधम । उत्तम ते ऊर्ध्व ॥३७॥देव गंधर्व यक्ष स्वर्गावासी । तेथून जरी सत्यलोकवासी । हे उत्तम गति असे जीवासी । परी संसृति न चुके ॥३८॥सलोकता समीपता । तिसरी ते मुक्ति स्वरूपता । चौथी सगुण ही सायुज्यता । परी भ्रमणें न चुके ॥३९॥सायुज्यांत जे उर्ध्व गती । तयाही म्हणावी संसृती । मा अधमत्वें जे मरती जन्मती । तेथें बोलणें नको ॥३४०॥जोंवरी अज्ञान न फिटे । जंव स्वरूपज्ञान नव्हे गोमटें । तोंवरी संसृति न पालटे । जन्ममरणरूप ॥४१॥जन्मता साकार प्रगटावा । मरता वासनेंत गुप्त असावा । ऐसा लोकद्वयी हा फिरावा । सदां जीव ॥४२॥देह प्रगटता सत्रा प्रकार । प्रगटती करिती व्यवहार ।तेथेंही स्वप्न किंवा जागर । फिरे या लोकद्वयीं । ॥४३॥मग असो देव कीं मानव । अथवा कीटक गो अश्र्व । परी स्वप्न जागरीं दोन्ही ठाव । असे भ्रमणें ॥४४॥जन्ममरण हे संसृती । कीं फिरणें स्वप्नीं जागृती । एवं भ्रमणें जें जीवाप्रती । चुके ना कीं ॥४५॥अथवा संसृति हा संसार । म्हणजे देहद्वयाचा व्यापार । केव्हां स्वप्नं केव्हां जागर । या लोकद्वयीं संचरे ॥४६॥तया व्यापाराचे पांच प्रकार । होत असती सविस्तर । त्यांत एकेक व्यापारीं साचार । पांच पांच तत्त्वें ॥४७॥तेचि व्यापार कैसे कैसे । बोलिजेत असती अल्पसे । मुमुक्षें अवधारितां मानसें । विवेचन घडे ॥४८॥पूर्वी अपंचिकृत उद्भावलीं । तेचि तत्त्वें पंचीकृत जालीं । एकेकांत पांच पांच राहिलीं । पुढें प्रवेशलीं देहीं ॥४९॥व्यापार जेधवां होत । तेव्हां येकेकांतून एकेक निघत । पांचाचे पांच जेंव्हां मिळत । तेव्हां व्यापार एक होय ॥३५०॥ गगन तत्त्वाचा व्यापार होणें । मुख्य आकाशाचें अंतःकरण । वायूंतून निघे ध्यान । तेजांतून श्रोत्र ॥५१॥वाचा आपाचें कर्मेंद्रिय । पृथ्वीचा शब्द विषय । या पांचातत्त्वें व्यापारद्वय । होय ऐकणें बोलणें ॥५२॥ऐकणे श्रोत्र ज्ञानेंद्रियाचें । बोलणें वाचा कर्मेंद्रियाचें । दोहींसी काज शब्दाचें । असे व्यापारा ॥५३॥दोहींशी आधार चळणासी । ध्यान वायु निश्चयेंसी । जाण तें तत्त्व निवडावयासी । अंतःकरण ॥५४॥आतां वायुतत्त्वाचा व्यापार होता । गगनांतून मन निघे तत्त्वतां । समान वायु हा आपण स्वतां । त्वचा तेजाची ॥आपाचें पाणी कर्मेंन्द्रिय । पृथ्वीचा स्पर्श हा विषय । एवं पांच मिळतां व्यापारद्वय । स्पर्श देणें घेणें ॥५६॥त्वचा ज्ञानेंद्रियाचें स्पर्शणें । पाणी कर्मेंन्द्रियाचें देणें घेणें । समान वायूचें चळण होणें । मन जाणतें तत्त्व ॥५७॥ज्ञानेंद्रियद्वारा जाणावें । कर्मेन्द्रियद्वारा करावें । दोहींचा स्पर्श विषय व्हावे । व्यापार दोन ॥५८॥होतां तेजतत्त्वाचा व्यापार । बुद्धि आकाशाची साचार । उदान वायूंतून अपार । स्वये तेजाचा चक्षु ॥५९॥आपांतून घेतला पाद । पृथ्वींतून रूप विशद । हे पांच मिळून व्यापारभेद । पहाणें चालणें दोन ॥३६०॥चक्षुज्ञानेंद्रियें पाहणें । पादकर्मेन्द्रियें चालणें । दोहींचा विषय रूप होणें । भोग्यरूप ॥६१॥उदान वायु चळणा आधार । जाणतें तत्त्व बुद्धि सुंदर । एवं हा जाला विस्तार । तेज तत्त्वाचा ॥६२॥आपतत्त्वाचा व्यापार होत । आकाशांतून घेतसे चित्त । प्राणवायूंतून निघत । जिव्हा तेजाची ॥।६३॥आपाचें उपस्थ सुरस । पृथ्वींतून विषय रस । हे पांच मिळून होती बहुवस । अशनरती ॥६४॥जिव्हा ज्ञानेंद्रियें रस घेणें । उपस्थकर्मेन्द्रियें भोगणें । दोहींचा विषय रस होणें । ग्रहणरूप ॥६५॥दोहींस आधार चळणा प्राण । जाणावया चित्त संपन्न । एवं व्यापार पांचांचे होती दोन । आपतत्त्वाचे ॥६६॥पृथ्वीतत्त्वाचा व्यापार । आकाशाचा अहंकार । अपानवायूचा निर्धार । तेजाचें घ्राण ॥६७॥गुद तें आपांतून निघालें । गंधासी पृथ्वींतून काढिलें । या पांचांयोगें व्यापार जाले । गंधग्रहण विसर्ग ॥६८॥घ्राणज्ञानेंद्रियें गंधग्रहण । गुदकर्मेन्द्रियें विसर्ग करणें । मुख्य विषय दोहींचा होणें । गंध हा भोग्य ॥६९॥दोहींसी आधार चळणा अपान । जाणतें तत्त्व अहंकरण । एवं व्यापार जे होती दोन । पृथ्वीतत्त्वाचे ॥३७०॥ऐसे हे पांच तत्त्वांचे । व्यापार होती पांचांचे । या पांचांत अधिष्ठान त्रिगुणांचें । तिहीं शक्तिरूपें ॥७१॥अंतःकरण पंचक सत्त्वगुण । हे ज्ञानशक्ति संपूर्ण । बरें कीं वाईट निवडणें । यास्तव भोक्ता ॥७२॥ज्ञानेंद्रियें सत्त्वगुण असतां । परी हे निर्गम द्वार तत्त्वता । म्हणोनि यासी क्रियारूपता । साधन भोक्त्स्याचे ॥७३॥तस्मात् ज्ञानेंद्रियपंचक । दुजें कर्मेन्द्रिय क्रियारूपक । प्राणपंचक मिळोनि एक । क्रियाशक्ति बोलिजे ॥७४॥एवं त्रिपंचकें रजोगुण । हें क्रियाशक्तीचें लक्षण । भोग्या घ्यावयाचीं साधनें । उपकरणें भौक्तियाचीं ॥७५॥पंच विषय तमोगुण । हे द्रव्यशक्ति भोग्य संपूर्ण । एवं त्रिपुटीनें होय ग्रहण । सुखदुःख जीवा ॥७६॥जयाविषयीं नुसता शब्द । तो श्रोत्रद्वारा होय वेद्य । जेथें शब्द स्पर्श द्विविध । तें वेद्य श्रोत्रत्त्वाचे ॥७७॥जेथें शब्द स्पर्श रूप तीन । तें श्रोत्रत्वचा चक्षुसि ग्रहण । शब्द स्पर्श रूप रस चतुर्गण । तें श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हेसी शब्द स्पर्श रूप रस । जेथें गंधादि पांच सुरस । तें श्रोत्र त्वक्चक्षू जिव्हा घ्राणास । विषय वेद्य होय ॥७९॥एवं भोग्य तमोगुणद्रव्यशक्ति । त्रिपंचकें रजक्रियाशक्ति । अंतःकरण सत्त्वज्ञानशक्ति । हे भाग्य भोगणें भोक्ता ॥प्रत्यक्ष विषय स्थूलासी । भोग जो घडे निश्चयेंसी । हे जागृति अवस्था जीवासी । घडे साभिमानें ॥८१॥विषय इंद्रियांवांचून । कल्पनेनें विषय कल्पून । सुख दुःख भोगी अभिमान । ते स्वप्नअवस्था ॥८२॥एवं जागृति स्वप्न स्थानीं दोही । जीव संचरे दों लोकीं पाही । सुषुप्तींत मात्र संचार नाहीं । परी नेणिवेंत गुप्त ॥ऐसा एक देह पावत असतां । तों काल देहद्वयीं संचरतां । प्राणवियोगें मृत्यु पावतां । उत्तमाधमयोनीं ॥८४॥ह्या लोकद्वयीं संचरे जीव । अनंत कर्मफल भोगास्तव । हें भ्रमण चुके ऐसा उपाव । त्रिभुवनीं नाहीं ॥८५॥जैसा प्रावाहीं कीटक पडे । तया आवर्तीहून आवर्ती जाणें पडे । विसावा क्षणभरी आतुडे । ऐसा काळ नाहीं ॥८६॥तैसा एक देह जरी त्यागावा । तों दुजा तेव्हांच अवलंबावा । तोही क्षय पावतां धरावा । तिजा उत्तम कीं अधम जेधवां अज्ञानें भिन्न पडिला जीव हा मी मानून बैसला । तेव्हांपासून प्रवाहीं सांपडला । जन्ममृत्यूच्या ॥८८॥निमिष्य एक विसावा घेतां । सुखा मागें दुःख होय भोक्ता । कीं दुःखा मागें सुख मागुता । भ्रमें कीटकापरी ॥दैवें जरी किडा नदीतीरा । येतां कोणी देखिला नेत्रा । तेणें काढिला वोढून त्वरां । दयाळूपणें जरी ॥३९०॥तरी तो वृक्षछाये तळवटीं । कीटक विश्रामे उठाउठी । ऐसीच सद्गुरूची होय भेटी । तया जीवासी जरी ॥९१॥परी तो हृदयशुद्धीचे कडे । आला पाहिजे कोडें । त्याचेंचि बोधद्वारा सांकडें । फेडिती गुरु ॥९२॥जन्ममृत्यूच्या प्रवाहांतून । काढिती तया बोधून ज्ञान । सुखें विश्रामें स्वरूपाभिन्न । कीं पुन्हां सुखदुःखा नातळे येर्ह२वी गुरुराज न भेटतां । अभिन्न ज्ञान न होतां । अन्य कोटि साधनें करितां । हा प्रवाह न निमे ॥९४॥रविदत्ता हें सत्य वचन । कदां नोव्हे अप्रमाण । ऐसी गुरुवाणी ऐकोन । येरू साष्टांग घाली ॥९५॥वारंवार प्रदक्षिणा । वारंवार वंदी चरणा । कंठ दाटला अश्रुनयना । फुटेना शब्द ॥९६॥तैसाच गद्रद वाणी करून । त्राहि त्राहि बोले वचन । सोडवीं सोडवीं भवापासून । अन्य मी प्रार्थूं नेणें ॥९७॥जय गुरू जय जय गुरू । कृपाघन करुणासागरु । भज दीनाचा करी अंगीकारु । न करीं उपेक्षा ॥९८॥मी काया वाचा मनेंसी । शरण शरण श्रीचरणसी । दयाळा संरक्षून ब्रीदासी । उचित तें करा ॥९९॥मागुतीं करून साष्टांग । चरणीं पडला दृढ अभंग । मग शंकरें उठवून लगबग । गाढ आलिंगिला ॥४००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.