अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/कर्मचारी :कामसू व 'प्रवासी'

मच्या कंपनीच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या भांडवलाचा उल्लेख आमच्या बॅलन्सशीटमध्ये आलेलाच नाही. ते म्हणजे आमचे कर्मचारी’ हे हमखास टाळीचे वाक्य वार्षिक सर्वसाधारण सभेत भाषण करताना बहुतेक सर्व कंपन्यांंच्या अध्यक्षाकडून वापरले जाते.

 ही बाब खरी असते,पण वस्तुस्थिती अशीही आहे की,कर्मचारी जसे संस्थेची संपत्ती असतात, तसेच ते संस्थेची सर्वात मोठी अडचणही ठरू शकतात.
 सर्वसाधारणपणे असं दिसून आले आहे की, कोणत्याही संस्थेतील १० टक्के कर्मचारी कामसू असतात,तर २५ टक्के कर्मचारी निव्वळ ‘प्रवासी’ असतात.
 कामसू कर्मचारी कंपनीचे खरी संपत्ती असते. त्यांच्या कामावर देखरेख ठेवावी लागत नाही. सोपविलेली जबाबदारी ते अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या पध्दतीने पार पाडतात. त्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त परिश्रम घेण्याची त्यांची तयारी असतेे. कामासाठी कराव्या लागणाच्या कष्टाची तुलना पगाराशी करण्याकडे त्यांचा कल नसतो.
 याउलट ‘प्रवासी’ कर्मचारी कधीही स्वतःचे ओझे उचलत नाहीत. त्यांना नेहमी कुणी तरी ओढत न्यावंं लागतं. कामसू कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आपला भार टाकून ते निर्धास्त असतात. असे कर्मचारी संस्थेची मोठी अडचण असते.
 ही दोन टोके सोडून उरलेले कर्मचारी सर्वसामान्य प्रकारचे असतात. त्यांची ठराविक कामं ते व्यवस्थित करतात. कारणपरत्वे विशेष जबाबदारी सोपविल्यास ते त्या कामात अपयशी ठरण्याची शक्यता असते. किंवा असं काम करण्यात ते पडतात. कर्मचाऱ्यांचे हे प्रकार व प्रमाण जवळपास सर्व संस्थांमध्ये सर्व स्तरांवर असंंच असते.
कामसू कर्मचारी :
 कठीण परिस्थितीत संस्था टिकवून धरणं व अनुकूल परिस्थितीत तिची वाढ आणि विकास करण्याचा वसा जणू या कर्मचाऱ्यांंनी उचललेला असतो. ‘काम'हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय असतं. आपल्या हातून सतत भरीव कामगिरी झाली पाहिजे, अशी इच्छा त्यांच्या ठायी वास करीत असते. मात्र अशा कर्मचाऱ्यांंमध्येही दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांंना कामातच आनंद वाटतो. कार्यप्रवण राहण्यासाठी त्यांना बाहेरच्या प्रेरणेची आवश्यकता वाटत नाही. दुसऱ्या प्रकारचे कर्मचारी आपली इतर दुःखं किंवा समस्या विसरण्यासाठी कामाला जुंंपून घेतात. त्यांना 'वर्कोहोलिक्स' म्हणतात. दुःख विसरण्यासाठी जसे कित्येक जण दारूचा आधार घेतात तसं हे कामाचं व्यसन लावून घेतात.
 कामसू कर्मचाऱ्यांंना संस्थेत मोठा आदर व मान मिळतो. संस्था त्यांच्यावर अवलंबून असते. आपल्याप्रमाणे इतरांनीही कार्यमग्न असावं, आपलं अनुकरण करावं, यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांची संस्थेतील संख्या १० टक्क्यांहून अधिक झाल्यास संस्थेच्या कामगिरीत लक्षणीय प्रगती होते. त्यांचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत पोहचतं, तेव्हा संस्थेची कामगिरी अतुलनीय होते.
'प्रवासी' कर्मचारी :
 केवळ कामगार संघटनांचे सदस्य असल्याने कामावर टिकून राहिलेले कर्मचारी म्हणजे प्रवासी कर्मचारी. त्यांना संघटनेचंं संरक्षण असतं. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करणं अवघड असतं. कामचुकारपणा, आज्ञापालन न करणं, न कळवता गैरहजर राहणं, स्वतःचे काम सोडून दुसऱ्याच्या उचापती करणं, अन्य कर्मचारी कामात असताना त्यांना आपल्या अडचणी विचारून त्रास देणं, अन्य कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करणंं इत्यादी 'गुणां'नी ते संपन्न असतात. ज्या संस्थेत संघटीत कामगारवर्ग आहे, तेथे अशा कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याचं आढळून आलंं आहे. कामगार संघटनांमुळे मिळणाच्या संरक्षणाचा ते पुरेपूर फायदा उठवितात.
 अशा कर्मचाऱ्यांंकडून टोकाचा शिस्तभंग घडतो, तेव्हा व्यवस्थापन त्यांच्यावर कारवाई करते. मात्र कामगार कायदे, न्यायालयांनी दिलेले आश्चर्यकारक निकाल,राजकीय दबाव यामुळे अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे लागल्याची कैक उदाहरणंं आहेत. यामुळे 'प्रवासी'पणास अधिकच उत्तेजन मिळतंं. त्यांच्याबाबतची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांचा श्रमसंस्कृतीवर विश्वास नसणंं ही होय. काम करणंं महत्वाचंं व अत्यावश्यक आहे असं त्यांना वाटतच नाही. काम सोडून ते इतर काहीही करावयास तयार असतात. कामसू कर्मचाऱ्यांच्या उलट त्यांना कामचुकारपणाचं व्यसन असतंं. काम कसं करावं यासंबंधी विचार करण्यापेक्षा सुटी कशी एन्जॉय करावी याचा विचारच त्यांच्या मनात अधिक घोळत असतो.
 आपण काम करीत नाही.त्यामुळे आपली चेष्टा होते याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे इतरांनाही कामचुकारपणाचे व्यसन लागावं यासाठी ते प्रयत्न करतात.असं केल्यास आपण ‘एकटे' पडणार नाही अशी त्यांची भावना असते. ‘प्रवासी'पणा हा देखील संसर्गजन्य रोग आहे. अशा कर्मचाऱ्यांंची संख्या ५० टक्क्यांंपर्यंत पोहोचल्यास संस्था कोसळते.
कामसू व प्रवासी कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन :
 कामसू कर्मचाऱ्यांचंं व्यवस्थापन करणंं सोपं असतं. त्यांना फारसं काही लागत नाही. ते स्वतःच पुढाकार घेऊन आपले काम करीत असतात.
 प्रवासी कर्मचाऱ्यांंना हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना एकटंं पाडणं व इतरांच्या संपर्कात फारसं येऊ न देणे. त्यांना काढणंं शक्य नसल्यास किमान त्यांचा इतरांना त्रास होणार नाही किंवा इतरांच्या कामात त्यांचा विनाकारण हस्तक्षेप होणार नाही अशा प्रकारची कामंं त्यांना देणंं शक्य असतं. ज्या ठिकाणी कामगार संघटना बळकट आहेत (उदाहरणार्थ, सरकारी कार्यालये, बँका, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग) तेथे अशा कर्मचाऱ्यांंना सरळ घरी बसवणंं अशक्य असतं. प्रवासी कर्मचाऱ्याने त्याच्याकडून केली जाणारी किमान अपेक्षा तरी पूर्ण करावी व दुसऱ्याच्या कामात कारण नसताना ढवळाढवळ करू नये. मग त्याला हात लावला जाणार नाही अशी अॅॅडजेस्टमेंट कित्येक ठिकाणी बॉस व असा कर्मचारी यांच्यात होते. ज्या ठिकाणी बॉस स्वत: कामसू असतो तेथे अशी जुळणी यशस्वी होते.
 कामसू व प्रवासी हे दोन्ही कर्मचारी वर्गाचे व्यवस्थापन सुयोग्य पध्दतीने करणंं यात व्यवस्थापकाच्या कौशल्याची कसोटी लागते. या दोन्ही वर्गांचा प्रभाव मधल्या सर्वसामान्य कर्मचारी वर्गावर पडत असतो. व्यवस्थापन सुदृढ असेल तर कामसू वर्गाचा प्रभाव अधिक पडेल. ते ढिले असेल तर प्रवासी वर्गाची सरशी होईल आणि संस्थेची हानी होईल.
चालकांचे सहकार्य आवश्यक
 कामसू कर्मचाऱ्यांची संख्या वाढ देण्यात व्यवस्थापनाचं खरं कौशल्य आहे. मधल्या वर्गातील अधिकांश कर्मचाऱ्यांंना कामसू बनविणं हे कामगार व्यवस्थापनासमोरचं आव्हान असतं. या कामी संस्था चालकांचंं मनापासून सहकार्य असणंं गरजेचं आहे. कर्मचाऱ्याची त्यांच्या कामगिरीवरून पारख करण्याचे स्वातंत्र्य संस्था चालकांनी व्यवस्थापनास देणंं आवश्यक आहे. यासाठी व्यवस्थापन व चालक यांच्यात परस्पर विश्वास व सततचा संंपर्क असणंं महत्वाचंं आहे.
 या सहकार्यात सर्वात महत्त्वाचा अडसर नातेवाईकबाजीचा असतो. अमुक कर्मचारी केवळ चालकाचा नातेवाईक आहे किंवा त्याचा संबंधित आहे म्हणून त्याला सांभाळून घ्यायचं बंधन व्यवस्थापकावर पडल्यास त्याचा परिणाम इतर कर्मचाच्यांवर होतो. चालकांचा सगासोयरा असणं ही पात्रता न मानता कामगिरी हाच मापदंड ज्या संस्थेत लावला जातो, तेथे कर्मचाऱ्यांंचंं व्यवस्थापन योग्य तऱ्हेनंं होतं. यासाठी चालकांनी हट्टाग्रही भूमिका सोडणं जरूरीचे ठरतं.
 याखेरीज जात, भाषा, प्रदेश, प्रांत, लिंग अशा ‘कामगिरीबाह्य’ घटकांचा प्रभाव कर्मचाऱ्यांची पारख करताना पडू न देणं हे व्यवस्थापकाचं व चालकाचं कर्तव्य आहे. त्यात कसूर न केल्यास सर्वसाधारण वर्गातील अनेक कर्मचाऱ्यांना कामसू बनविणं शक्य होईल. प्रवासी कर्मचाऱ्यांचा संसर्ग मर्यादित राहील व संस्थेची गाडी फायद्यात चालेल. यासाठी चालक व व्यवस्थापक यांनी मिळून कार्य करणं श्रेयस्कर आहे.