शब्द सोन्याचा पिंपळ/इंग्रजी प्रचुरतेच्या गर्तेतील मराठी


इंग्रजी प्रचुरतेच्या गर्तेतील मराठी



 मी मराठी वृत्तपत्रे वाचतो आहे. त्यातील बातम्यांचे काही मथळे मी पुढे देत आहे. ते एकाच मराठी वृत्तपत्रातले नाहीत. अलीकडच्या माझ्या निरीक्षणात असे लक्षात येते आहे की आपला भाषिक व्यवहार इंग्रजीप्रचुर होतो आहे. त्याचे हे निदर्शक होय

 'कॅशलेस व्यवहारावरच सरकारचा भर’, ‘एटीएम सेवा ठप्पच', ‘मोहातील टीम इंडियाची दादागिरी', 'पाकने सर्जिकल स्ट्राईक केल्यास भारत चोख उत्तर देईल', 'रोटी, ब्रेड आणि पाव महागले’, ‘इन्कम टॅक्सचे ‘लक्ष्य' इत्यादी.

 मराठी जाहिराती सर्वत्र प्रकाशित होत असतात. त्या वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिकात प्रकाशित होतात. तशाच त्या रस्त्या, चौकातील जाहिराती फलकांवर पण होत असतात अशा काही जाहिरात मजकुरांतील या काही ओळी वानगीदाखल - ‘कराडेपती बिझनस मॅनची आता नाही सुटका’, ‘या विकेंडला अनुभवा पुण्याची थंड हवा', 'एलआयसी प्रिमियम देय असेल तेव्हा नेट बँकिंग, डेबिट कार्डस, ई वॅलेटस द्वारा भरणा करा', 'कार इन्शुरन्सचे स्मार्ट पर्याय' इत्यादी.

 रस्त्यावरून येता-जाता दुतर्फा दुकाने असतात. त्यांच्या पाट्या माझे लक्ष वेधत असतात - ‘रिलायन्स मॉल', ‘बारटक्के अँड सन्स', ‘श्री मेडिकल्स', 'चैतन्य हॉस्पिटल', 'डिलक्स हॉटेल', ‘सदासुख लॉजिंग अँड. बोर्डिंग', 'प्रभाकर सायकल कंपनी', 'सोनगे क्लॉथ मर्चट’, ‘भगिरथी ग्राइंडिंग मिल', 'सातेरी न्यूजपेपर्स स्टॉल', ‘महालक्ष्मी अॅपरल्स'

 नवी पिढी त्यांच्या भ्रमणध्वनी वा चलभाषेद्वारे एकमेकांशी संदेश देवाण घेवाण, संवाद, आदानप्रदान करीत असते. त्यांच्या त्या संवादी

यंत्रात सर्व भाषांची सोय असते. मराठी भाषी आपले सारे संपर्क क्रमांक, सूत्र, पत्ते इत्यादी इंग्रजीतच नोंदवतात व संग्रहित करून वापरतात. त्यांचे मराठी संदेशन रोमन लिपीत सुरू असते - mi aaj kamawar gelo nahi tuzi wat pahat hoto, udya tu yenar aahes ka? "mi kiti wait karat thambalo hoto" aaj dudywar lete ka re?

 या वर्षीचे दिवाळी अंक वाचत होतो. अनुक्रमणिकेतील लेख शीर्षक माझे लक्ष वेधत होती - ‘कबड्डीनेच बनविले सेलिब्रिटी', ‘ब्रूसचा अंत व्हाया डेव्हिड’ ‘देअर आर नो फुल स्टॉप' या अंकातील कवितांच्या काही ओळींकडे माझं लक्ष जातं - ‘लिफ्ट, एक्सलेटरने ती चढली वरवर’, ‘नित्य लॅपटॉप, नको आहे बाप'

 अलिकडे मराठीत प्रकाशित झालेली पुस्तक शीर्षक अशीच लक्षवेधी - ‘एक डॉक्टर असलेला इंजिनिअर', 'गॅसवॉर', ‘एका स्टूडिओचे आत्मकथन', 'कॉमनमॅन', ‘भारतीय जीनियस', 'फुटपाथ ते नोटरी', ‘इन्वेस्टमेंट' इत्यादी.

 वृत्तपत्रांच्या पुरवण्यांकडे माझे लक्ष जाते. ‘ऑक्सिजन, ‘हॅलो', 'फॅमिली डॉक्टर’, ‘विवा' इत्यादी उपहार गृहे, निवास गृहे, शीतपेय गृहे, चित्रपट गृहे कुठेही जा तिथले पदार्थ, पेय, दालने यांची नावे सर्रास इंग्रजी आढळतात.

 मला इंग्रजीच्या संकर व संसर्गाचे भय वा वर्जता नाही. प्रश्न आहे तो भाषेच्या अस्तित्व आणि अस्मितेचा. मराठी भाषा आणि संस्कृतीचाच हा प्रश्न नाही. प्रश्न आहे समग्र भाषिक व्यवहाराचा. कोणतीही भाषा टिकते, वाढते, समृद्ध होते तिचा एक सामान्य निकष वा कसोटी असते - तिचा वापर. भाषा वापर वा व्यवहार जितका अधिक तितका तिचा विकास, प्रचार, प्रसार अधिक, आज सर्वत्र असे ऐकू येते की इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, जागतिक भाषा आहे, संपर्क भाषा आहे. जागतिक क्रमवारीत इंग्रजी तिस-या क्रमांकाची भाषा आहे. मँडरिन (चिनी) भाषा बोलणारे १ अब्ज ३0 कोटी लोक जगात आहेत. ही संख्या सध्याच्या भारतीय लोकसंख्येइतकी आहे. त्यानंतरचा क्रम येतो स्पॅनीश भाषेचा. ४२ कोटी ७0 लाख लोक ती बोलतात. तर इंग्रजी भाषिक ३३ कोटी ९० लक्ष आहेत. भारतातील प्रथम क्रमांकाची भाषा हिंदी आहे. २६ कोटी लोकांची ती मातृभाषा आहे तर हिंदी जाणणारे, समजणारे ४१ टक्के लोक भारतात आहेत. मराठी भाषिकांची संख्या ७ कोटी २० लक्ष आहे. म्हणजे भारतात ६ टक्के मराठी भाषिक आहेत.

 मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संबंधीचा वर्तमानातील आपला व्यवहार तिच्या विकास, प्रचार आणि प्रसारास मारक आहे. तो अशा अर्थाने की आपली मराठी बोलण्या,लिहिण्याची टक्केवारी कमी होत आहे. माणसाचा भाषिक वापर ही एक सहज प्रक्रिया असते. तुम्ही घरी, दारी, बाजारी, दरबारी ती बोलता का हे महत्त्वाचे असते. अनेक भाषांना बोलींचे वरदान असते मराठीस पण ते आहे. कोकणी, व-हाडी, खानदेशी, अशी तिची रूपे आढळतात. कोकणी माणूस घरी कोकणी बोलतो पण बाजारात मराठी चालते. शाळेत तो मराठी शिकतो तो कोकणी बोलतो पण लिहितो मराठी. माणसाच्या समग्र भाषिक व्यवहारात तिचे प्रतिबिंब असणे म्हणजे त्या भाषेबद्दलची तुमची बांधिलकी असणे. अशा बांधिलकीच्या कसोटीवर आपण एक एक पायरी खाली येत आहोत. वर्तमान महाराष्ट्रातील सध्याची सत्तरीतील व त्यावरील वयोगटाची पिढी आपण पाहू लागू तर तिचे बोलणे, लिहिणे, वाचणे, ऐकणे या चारही क्रियांची मराठी भाषिक वापराची टक्केवारी समग्रतेकडे जाते. नंतर आपण पन्नाशीची पिढी पाहू लागलो तर ती निममराठी दिसते. तिशीतील पिढी इंग्रजी प्रचुर आहे. तर एकविसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीचा भाषिक व्यवहार हा एकभाषी न राहता, तो बहुभाषी होताना दिसतो. ते घरी बोलतात मराठी, ऐकतात, पाहतात (दूरदर्शन, वाहिन्या, चित्रपट, भ्रमणध्वनी इ.) हिंदी तर शाळा शिकतात इंग्रजीत. त्यांना धड एक भाषा येत नाही. सा-या भाषांतील लिंग, वचन, पुरुष एकमेकांत इतके मिसळलेत की विचारू नका. खेळ, गेम, शब्द मराठी, इंग्रजीत पुल्लिंगी खरा. पण नवी पिढी गेम शब्द स्त्रीलिंगी वापरताना दिसते. भाषिक व्यवहार अंतिमतः प्रयोग वा वापर अधिक्यावर ठरतो, हे जरी खरे असले तरी भाषा म्हणून तिची एक सर्वसामान्य रचना असते. तिला आपण स्थूलमानाने व्याकरण म्हणतो. व्याकरण भाषेचे सार्वत्रिक रूप नियंत्रित करणारी व्यवस्था होय. तिचा अतिरेक नको हे खरे. पण ती व्यवस्था अधिक कडक वा शिथिील होता नये. कडक झाली की तिची स्थिती संस्कृतसारखी होते. नियमाच्या काळात भाषा बांधली की तिचा प्रथमपक्षी विकास खुटतो. नंतर ती जनमानसात कमी वापरली जाते. मूठभर लोकांच्या वापराची भाषा ग्रांथिक बनून राहते. अंतिमतः ती कालबाह्य होत नामशेष होते. या उलट भाषिक शिथिलताही तिच्या नाशास कारणीभूत असते. सध्या मराठी भाषेचा वर्तमान संघर्ष हा अस्मिता आणि अस्तित्वाच्या रस्सीखेचतेचा आहे. भारतातील भाषांना राजकीय झालर आहे. भारत स्वतंत्र

झाला तेव्हा हिंदी बहुसंख्येच्या जोरावर राष्ट्रभाषा व्हायला हवी होती. ती झाली नाही. त्यावेळी उत्तरभारती भाषा विरुद्ध दाक्षिणात्य भाषा असा संघर्ष झाला. परिणामी हिंदी देशाची संपर्क भाषा झाली. पण तिला इंग्रजीची जोड देण्यात आली. सन १९६५ मध्ये (घटना मंजूरीनंतर १५ वर्षे) इंग्रजी जाऊन हिंदी एकटीच संपर्क भाषा वा राजभाषा व्हायची ते न होता, इंग्रजी तशीच राहिली. जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजीचा वापर, वापर, व्यवहार सर्वत्र अव्वल झाला. महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओरिसा, केरळ हे भाषिक आग्रही प्रांत म्हणून ओळखले जातात. या प्रांतात भाषिक अस्मितेवर उभारलेले पक्ष आढळतात. शिवसेना, द्रविड मुन्नेत्र कळघम, तेलगू देसम अशी काही उदाहरणे सांगता येतील. या पक्षांनी भाषिक राजकारणाइतके लक्ष भाषा विकास, वापर, प्रचार, प्रसाराकडे दिले नाही. परिणामी भाषेची लढाई अस्तित्वापेक्ष अस्मितेच्या परिघात होत राहिली. मराठी भाषिक व्यवहार आपण पाहू लागलो तर स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. मराठी भाषा विकासासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा भाषिक अस्मितेवरच उभा होता. स्वतंत्र महाराष्ट्रानंतर भाषा विकास संस्था, साहित्य संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ (बालभारती) यांनी मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीसंदर्भात गंभीर व भरीव कार्य केले. मराठी विश्वकोशाचे नियोजित २० खंड आपल्या हाती आहेत. असे काम अन्य भारतीय भाषांत अपवादाने झाले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने अनेक भाषांतील अभिजात ग्रंथांची मराठी भाषांतरे करवून घेऊन प्रकाशित केली. अनेक कोश तयार केले. महाराष्ट्र राज्य वस्त्रकोश, स्वाद्यकोश सांगता येतील. भाषा विकास संस्थेने असेच कार्य केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी स्थापन झालेल्या या संस्था. त्याचे श्रेय संस्थापक मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचे. नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात विविध भाषिक अकादमी स्थापन झाल्या पण त्यात परस्पर समन्वय झाला नाही व त्या मराठी भाषा साहित्य, संस्कृतीशी जोडल्या गेल्या नाहीत. हिंदी, उर्द, सिंधी, गुजराती भाषिक अकादमींनी मिळून मराठी केंद्रीकार्य केले असते तरी मराठी भाषा, साहित्य, संस्कृती विकसित होती. भाषिक विकासाचे महत्त्वाचे दुसरे साधन असते शिक्षण माध्यम. सन १९९० पर्यंत महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळांचे वर्चस्व होते. महाराष्ट्र शासनाने मधल्या काळात मराठी माध्यमांच्या शाळांना परवानगी न देणे, अनुदान कपात,विना अनुदान शिक्षण संस्थांची स्थापना

यातून मराठी भाषा माध्यम म्हणून मागे पडली. भाषा विकासाचे प्रचार, प्रसाराचे दुसरे साधन ग्रंथालये. महाराष्ट्राच्या अनेक गावांत मराठी सार्वजनिक ग्रंथालये आहेत. त्यांना ग्रंथ खरेदी, कर्मचारी वेतन, इमारत बांधकाम, देखभाल, आधुनिकीकरण यावर अनुदान दिले तर ग्रंथालये वाढणार व वाचक निर्माण होणार. सन १९९० नंतर सार्वजनिक मराठी ग्रंथालयांना लागलेली उतरती कळा हे मराठी मारक शासन धोरणाचे अपत्य होय. इंग्रजी माध्यम शाळांना झुकते माप व परवानगीचे उदार धोरण यातूनही मराठी मारक वातावरण फोफावले हे नाकारता येणार नाही. शिवाय समाज मनाचा इंग्रजी कल हेही त्याचे एक कारण आहेच. सध्याचे युग हे माध्यमांच्या अधिराज्याचे मानले जाते. मराठी भाषिक माणूस वृत्तपत्रे मराठी वाचतो. आज घरोघरी मराठी वृत्तपत्रे येतात. माझ्या लहानपणी सार्वजनिक ठिकाणीच वर्तमानपत्र असायचे. आज वृत्तपत्र स्पर्धेमुळे घरोघरी एकच नाही तर अनेक वृत्तपत्रे नियमित येतात व वाचली जातात. वृत्तपत्र वाचनावर मराठी भाषिक अधिक वेळ खर्च करतात. लेख, संपादकीय, सदरे, स्फूट वगळता त्याच त्या बातम्या ते अनेक शैली व शब्दात वाचतात. त्यातून ज्ञानवृद्धी होत नाही, होतो केवळ माहिती विस्तार, माहिती विस्तार म्हणजे एकाच गोष्टीची बहुपेडी माहिती. मराठी वाचक गंभीर, प्रगल्भ वाचन कमी करतो. मराठी नियतकालिकांचा वाचक निर्देशांक व वर्गणीदार संख्या कमी होत जाणे हा त्याचा पुरावा. माध्यमांचे दुसरे रूप चित्रपट, दूरदर्शन वाहिन्या, महाराष्ट्रात अलिकडचा मराठी चित्रपट निर्मिती निर्देशांक व दर्जा सुखावह, आश्वासक खरा. पण तरीही हिंदी भाषी चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग ओसरलेला नाही. दूरदर्शन, वाहिन्यावर बातम्या, मालिका, चित्रपट, विषय समर्पित वाहिन्या (इतिहास, मनोरंजन, पर्यटन इ.) पाहाता मराठीच्या तुलनेत हिंदी वरचढ दिसते. लहान मुलांची पिढी वक्रचित्रे, व्यंगचित्रे, मालिका पाहण्यात दंग असते. त्या वाहिन्या मराठीपेक्षा हिंदी, इंग्रजी अधिक पाहिल्या व पसंत केल्या जातात. संगणकाची व महाजालाची भाषा इंग्रजी आहे. तित मराठी भाषांतराची सोय आहे. पण भाषांतराच्या भाषेचा दर्जा सुमार असल्याने मराठी वाचक संगणकावर रुळत नाही. तो इंग्रजीकडे वळतो. मराठी संकेत स्थळे सुमार आहेत. मराठीतून संगणकावर माहिती मिळण्याचे प्रमाण नगण्य आहे. अनुप्रयुक्त मराठी साधने अद्याप विकसित न झाल्याने मराठी भाषिक इंग्रजी, हिंदी संगणकीय स्त्रोतांचा वापर करतात. त्यांना दुसरा पर्याय राहात नाही. मराठी वर्तमान साहित्यही जीवनोपयोगी माहिती देणारे. भाषांतरित

झालेआहे. मूलभूत ललित मराठी साहित्याला ओहोटी लागलेली आहे. मराठी भाषा, साहित्य, लिपी, संस्कृती इंग्रजी प्रचुरतेच्या गर्तेत सापडली आहे असे महाराष्ट्राचे का व्हावे हा विचार करण्याचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर शोधू लागलो की आपल्या लक्षात येते की दैनंदिन व्यवहार आपण इंग्रजीस प्रतिष्ठा देत राहिलो. कुसुमाग्रजांनी मराठी फटक्यामध्ये जे वर्णन केले तो फटका महाराष्ट्र शासनाने तसबीरी करून भिंतीवर टांगला, शोभायमान केला खरा पण तो आपला आचार धर्म बनवला नाही. आपण सुरेश भटांचे अभिमान गीत गातो हे खरे पण त्या गीतातले कोणते क्रियापद मराठी राहिले याचा धांडोळा घेता लक्षात येते की, बोलणे, ऐकणे, जाणणे, मानणे, दंगणे, रंगणे, नाचणे, खेळणे, हिंडणे, डोलणे, राहणे यात मराठी कुठे आहे? भाषिक समग्र व्यवहार म्हणजे या सर्व क्रियात नित्यव्यवहारात मराठी भाषा, साहित्य, लिपी, संस्कृतीचा वापर.

 स्वतंत्र महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी मराठी अस्मितेच्या पोटी सीमाभागातील बंधू-भगिनींनी तिच्या अस्तित्व रक्षणासाठी जी लढाई लढली, संघर्ष केला, तो महाराष्ट्रात राहणा-या मराठी भाषिकांना मराठीची जी अस्मिता व अस्तित्व जाण असते, ती महाराष्ट्रात कमी. परिणामी मराठी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होणे व सीमाभागात होणे यात फरक आहे नि असतो. मी तर सांबरा, बेळगुंदी, कारदगा, आरग, बेडग आदि साहित्य संमेलनात अध्यक्ष होऊन अनुभवले आहे. चिंचवाड, राधानगरी, मिरज इत्यादी संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. सीमाभागातील मराठी साहित्य संमेलने शासन अनुदानावर न होता ती लोकवर्गणी, देणगीतून उभी राहतात ती साच्या गावाची साहित्य जत्रा असते. माहेरवाशिणी गावी संमेलनासाठी येतात. घरोघरी रांगोळी, गुळ्या, तोरणे केवळ सीमाभागातच पाहायला मिळतात. गावचे जेवण फक्त तिथेच असते. उचगाव, कडोली, सांबरा, कारदगा, बेळगुंदी, साहित्य संमेलने पंढरपूरच्या आषाढ, कार्तिकी वारीप्रमाणे लोकोत्सव असतात. हे मी अनेकदा अनुभवले आहे.

 मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, लिपीचे भवितव्य साहित्य संमेलनाच्या उत्सवी आयोजनांपेक्षा दैनंदिन वापर, व्यवहारावर अवलंबून आहे. हे लक्षात घेऊन आपण शिक्षण, माध्यम, संपर्क साधने, जीवन व्यवहारांच्या सर्व पैलू आणि पातळ्यांवर मराठी वापरावर दक्ष असायला हवे. या लेखात आरंभिक इंग्रजी उदाहरणे वगळता कुठेही इंग्रजी शब्दांचा वापर नाही. ती उदाहरणे आपल्या विकृत मराठी वापराचे पुरावेच होत. त्याचे आधिक्य भाषिक

प्रदूषण व विद्रुपीकरणाचे निदर्शक होय. मूळ मराठी भाषा समृद्ध आहे. नर ज्ञानरचनेत जी उपकरणे, साधने, पदे, वस्तू, पदार्थ, क्रिया तयार होतात, त्यालाच प्रतिशब्द देत आपण आपली भाषा समृद्ध करू शकतो. प्रतिशब्द, भाषांतरे, संज्ञा निर्मिती ही भाषिक व्यवहार समृद्ध करणारी निरंतर प्रक्रिया आहे. ही क्रिया आपला जीवन व्यवहार व्हायला हवी. कोणत्याही भाषेची समृद्धी ही शब्दसंग्रह भाषांतर, संशापनादी त्रिविध वापर निरंतरतेवर अवलंबून असते. त्यासाठी मात्र विविध भाषी संपर्काची नितांत गरज असते. इंग्रजी समृद्ध का तर तिच्यात पडणारी नित्य भर हेच त्याचे कारण होय. बहुभाषी नागरिक स्वभाषा विकासात मोलाची भर घालू शकतात. सध्या मी इंग्रजी अधिक वाचतो. हिंदी अधिक लिहितो. मराठी सर्वांधिक बोलतो, वाचतो, लिहितो, विचार करतो. स्वप्न माझी मराठी असतात. ती तुमच्या भाषिक मातृत्वाची निशाणी असते. माझं त्रैभाषिक असणं व नव्या उगवती पिढीचं त्रैभाषिक असणं यात फरक आहे. मी अगोदर मातृभाषा शिकलो. नंतर राष्ट्रभाषा अंगिकारली. तद्नंतर मी आंतरराष्ट्रीय भाषेचा स्वीकार केला. भाषिक सहजता क्रम पाहू लागलो तर अगोदर मराठी नंतर हिंदी व शेवटी इंग्रजी असा क्रम खरा. पण तिन्ही भाषांच्या समान आकलनामुळे माझी मराठी अधिक समृद्धी झाली व होत आहे, हे मुद्दाम आपणास सांगायला हवे. महाराष्ट्राने आपले भाषिक धोरण ठरवताना कन्नड, तेलुगु, गुजराती, हिंदी या शेजारच्या भाषांच्या विकासाचा अभ्यास केला पाहिजे. संस्कृत, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम, ओडिसा भाषा अभिजात होतात, मराठी का नाही या प्रश्नाचे उत्तर केवळ इतिहास, परंपरेत न शोधता ते वर्तमानात पाळले, जगले, आचरले, तरच मराठी कालजयी आणि मृत्यूंजय होईल.

▄ ▄