शब्द सोन्याचा पिंपळ/मराठी भाषाकौशल्याची किमया

मराठी भाषाकौशल्याची किमया


 विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक, स्पर्धा परीक्षा याशिवाय बी. ए., बी. कॉम., बी. बी. ए., बी. सी. ए., अशा पदव्या धारण करणारे तरुण म्हणजे बेकारीत भर असा समाजात एक गैरसमज पसरला आहे. कला, वाणिज्य, शिक्षणशास्त्र, विधी, पत्रकारिता, चित्रकला, चित्रपट, भाषा, साहित्य, संगीत, क्रीडा इ. क्षेत्रात पदवी संपादून जगता येतं. चांगलं वेतन कमावता येतं. करिअर या क्षेत्रातही करता येतं हे आपण समजून घेतलं पाहिजे.

 साहित्य, कला, संगीत, जाहिरात क्षेत्रात शब्द मोजून मोल ठरते. त्यामुळे बी. ए., एम. ए., बी. कॉम., एम. कॉम., बी. बी. ए., एम. बी. ए., बी. जे. सी., एम. जे. सी., बी. सी. ए., एम. सी. ए., बी. पी. एड., एम. पीएड., बी. एड, एम. एड, ए. टी. डी., जी. डी. आर्ट या पदव्या संपादन करणा-यांना आता भाषेच्या अधिकार, सामर्थ्य, ज्ञान, कौशल्य, उपाययोजना इ. च्या आधारावर जीवनातील नवनवी क्षितिजे खुणावत आहेत व या क्षेत्रात डॉक्टर, इंजिनिअरपेक्षा अधिक प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पैसे मिळतात हे आपण रोज पाहात आहेत.

 शिक्षक/प्राध्यापक

 आज मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तमिळ, गुजराथी इ. भाषांतून आपणास पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यासोबत शिक्षणशास्त्रातील पदविका अथवा पदवी संपादून शिक्षक, प्राध्यापक झालात की रु. २५,000 ते रु. १ लाख इतकं मासिक वेतन शासनमान्य श्रेणीनुसार मिळवू शकाल. समाजमानसात पेशापेक्षा शिक्षकाची प्रतिष्ठा मोठी आहे. मी प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक, विद्यापीठीय शिक्षक, संशोधक, मार्गदर्शक, प्राचार्य अशी सतत नवनवी पदे संपादत माझं जीवन

यशस्वी व समृद्ध करू शकलो. माझं निवृत्ती वेतनच रु. ४0,000 आहे. यावरून शिक्षण क्षेत्रातील संधी आपलं जीवन यशस्वी करू शकतात यावर तुमचा विश्वास बसावा. समाजमनात या पदाची प्रतिष्ठा इतकी मोठी की विद्यार्थी कुठेही भेटोत लवून नमस्कार करतात. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुमचे विद्यार्थी तुम्हास आदराने साहाय्य करण्यास तत्पर असतात. मला बसमध्ये कधी उभे राहून प्रवास करण्याची पाळी येत नाही. कोणीतरी पालक, विद्यार्थी दत्त असतात. स्वतः उभे राहतात. मला बसवतात. यापेक्षा या क्षितिजाचं कवेत न येणारं टोक कोणतं?

 साहित्यिक/समीक्षक

 ललित लेखन हे भाषाप्रभुत्वाशिवाय करता येत नाही. तुम्ही भाषेतील उच्च शिक्षण संपादन केलं असेल तर अधिक प्रतिभा संपन्न लेखन करू शकता. मराठीत जे लेखक झाले त्यांना नि त्यांच्या वारसांना आज लाखो रुपयांच्या घरात मानधन मिळते. हे भाषेचे वाढते मूल्य स्पष्ट करणारे आहे. तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात कार्य, व्यवसाय, नोकरी करत भाषेच्या बळावर कवी, नाटककार, कादंबरीकार, टीकाकार, वक्ता होऊन अधिक पद, प्रतिष्ठा, धन कमावून समाजापुढे ‘सेलेब्रिटी', 'रोल मॉडेल' होऊ शकता. वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, नारायण सुर्वे, सुरेश भट, आचार्य अत्रे ही नावं जुनी झाली म्हटली तर आज द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या साहित्याचं मोल सदाबहार ठरतं आहे. साहित्यकृतींवर मालिका, चित्रपट बनून ते घरोघरी पोहोचत आहे. 'श्यामची आई' हे त्याचं सार्वत्रिक चित्र म्हणून सांगता येईल. 'ययाती' माहीत नाही, असा मराठी माणूस मिळणं दुर्मीळ! तुमच्या साहित्याचे अनुवाद अन्य देशी, परदेशी भाषात होऊन तुम्ही जगप्रसिद्ध होणं आजच्या संगणक, इंटरनेट व जागतिकीकरणाच्या युगात नित्याची गोष्ट होऊन गेली आहे. समीक्षेशिवाय दैनिकाची पुरवणी वा नियतकालिक नसते हे पण आपण लक्षात ठेवले पाहिजे.

 अनुवादक/दुभाषी

 माहिती व संपर्क क्रांतीच्या या युगात दळणवळण व संपर्क माध्यमात इतकी गती आली आहे की जगाचे अंतरच संपून गेले आहे. जग World Wide Web (www) मुळे खेडं बनून एक झालंय. त्यामुळे माणसाचं बहुभाषी होणं आवश्यकच नाही तर अनिवार्य झालं आहे. भारतीय माणूस एका दिवसात देशाच्या या टोकापासून ते दुस-या टोकापर्यंत जाऊन परत

येणं शक्य झालं आहे. तीच गोष्ट विदेशाची. विदेशी जाण्याचं, फॉरेन रिटर्न म्हणून घ्यायचा काळ केव्हाच मागे पडलाय. या बदलत्या स्थितीमुळे प्रत्येक भारतीयास सर्व भारतीय प्रांतभाषांची ओळख आवश्यक वाटू लागली आहे. भारतीयांचं ‘आंतरभारती' असणं व त्याचवेळी तो ‘आंतरराष्ट्रीय असणं काळाची गरज होते आहे. माणसात शेकडो भाषांच्या संपादनांची बौद्धिक क्षमता असली तरी व्यवहारात ते अन्य व्यवधानांमुळे उतरणे अशक्यप्राय होते. अशा वेळी अनुवादक व दुभाषा असणं वरदान ठरतं. अनुवाद व दुभाषी होण्यासाठी पदवीशिक्षणानंतर अनेक विद्यापीठात प्रमाणपत्र पदविका व पदवी पाठ्यक्रम आहेत. तुम्ही अनुवादक व दुभाषी म्हणून प्रावीण्य संपादन केल्यानंतर तुम्हास विदेशी सेवा विभाग, पत्रकारिता, पर्यटन, प्रकाशन, भाषा संपर्क इ. क्षेत्रात तर गलेलठ्ठ पगार मिळतोच पण आज विधी व वैद्यक क्षेत्रात लिप्यंतरण (ट्रान्स्क्रीप्शन), लिपिसर्जन/अनुवाद (ट्रान्सक्रियेशन), रूपांतरण, भाषांतर, द्विभाषिक संवाद इ. क्षेत्रे म्हणजे शब्द व मिनिटावर पैसे मोजणारी क्षेत्रे बनली आहेत. अनुवादकास आज पानावर दर ठरवून पैसे दिले जातात. दुभाषी मिनिटावर आपलं मूल्य वसून करतो. स्त्रियांना घर, मुलं-बाळं सांभाळून इंटरनेट, संगणक, ई-मेलद्वारे अनुवाद, लेखन कार्य करून हजारो रुपये मिळतात. पत्रकारिता, वाहिन्या, वृत्तसंस्था, आकाशवाणी, दूरदर्शन या विभागातही मोठी मागणी आहे. युवकांपेक्षा या क्षेत्रात युवती, महिला आघाडीवर असल्याचे सार्वत्रिक चित्र बनले आहे. त्यामुळे नर्स'सारखे हे क्षेत्र महिलांचे एकाधिकार क्षेत्र बनले आहे. जागतिक पर्यटन व्यवसाय हा पूर्णपणे भाषेच्या जोरावर चालतो. संपर्क, प्रचार, समुपदेशन, मार्गदर्शन, सहल संयोजक सर्व ठिकाणी अनुवाद व दुभाषी अशी जोड भूमिका वठवणाच्या व्यक्तींना प्राधान्याने घेऊन अधिक वेतन दिले जाते. सिनेमा, दूरदर्शनमध्ये ध्वनिमुद्रणात अनुवाद (डबिंग) चे महत्त्व वाढते आहे. चित्रपट अनेक भाषांत एकाच वेळी प्रकाशित करणे केवळ अनुवादामुळे शक्य झाले आहे. हिस्ट्री, नॅशनल जिऑग्राफी, कार्टून्स इ. चॅनल्स केवळ अनुवादाने बहुभाषिक, बहुदेशी झालीत.

 पत्रकारिता/माध्यम विकास

 विधी पालिका (विधिमंडळ/संसद), न्यायपालिका (न्यायालये), कार्यपालिका (प्रशासन) या देशाच्या तीन आधारभूत स्तंभानंतर चौथा स्तंभ मानला जातो पत्रकारितेस. यात मुद्रित पत्रकारितेबरोबर महाजालीय पत्रकारिता (आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तवाहिन्या) ही अंतर्भूत असते. हे

क्षेत्र आज जीवनातील सर्वाधिक प्रभावी माध्यम मानले जाते. याची सारी मदार असते ती भाषेवर. वृत्त लिहिणे, वृत्त संपादणे, वृत्त चित्रीकरण, वृत्त प्रक्षेपण, वृत्त निवेदन, वृत्त विश्लेषण, वृत्त संवाद, मुलाखती सर्वासाठी लागते ती भाषा. मुद्रित माध्यमात पत्रकार व संपादकांचा भाव रोज वधारतो आहे. एका वृत्तसंस्थेतून दुस-या संस्थेत गेले की किमान दहा हजार रुपयांची वाढ होते. इथले वेतनही शिक्षक, प्राध्यापकांशी स्पर्धा करणारे ठरले आहे. शिवाय समाजात मान्यता, आदर मिळतो तो वेगळा. इथे वार्षिक वेतन लाखांच्या घरात बोलले जाते. ही क्षेत्रे कार्पोरेट वा बहुराष्ट्रीय बनत चालल्याने ही भाषा प्रभुत्वावर इथलं मोल व मूल्य ठरतं.

 छायाचित्रण/छायांकन/ध्वनिमुद्रण

 ही कौशल्य व तांत्रिकदृष्ट्या नाजूक क्षेत्रे व पत्रकारिता व माध्यमांची अंग असली तरी भाषिक प्रतिभा व प्रभुत्वाच्या बळावर इथे तुम्ही राज्य करू शकता. इथेही राज्य, राष्ट्र, जग अशी विस्तारणारी साम्राज्य तुम्ही भाषेच्या जोरावर पादाक्रांत करू शकता. चांगले प्रश्न विचारता येणं, मुलाखत खुलवता येणं, वृत्ताचं कमी वेळात प्रभावकारी विश्लेषण करता येणं, प्रतिस्पध्र्यावर मात ही सारी राजकीय कौशल्ये आता छायाचित्रकार, मुलाखतकार, ध्वनिमुद्रणकार, छायांकनकार (व्हिडिओशूटर) यांच्यात केंद्रित झाली ती भाषिक साधन व सामथ्र्यावर. भाषा फिरवणे, वळवणे, वापरणे ज्याना लीलया जमते तो चांगला अँकर, डी. जे., आर. जे. होऊ शकतो तीच गोष्ट छायाचित्रण व ध्वनिमुद्रणास लागू पडते. कार्यक्रम होत असताना पाहणे, युद्धाचा प्रत्यक्ष थरार अनुभवणे या गोष्टी छायाचित्रकारांमुळे शक्य होतात. गौतम राजाध्यक्ष हे या क्षेत्रातलं उदाहरण. सत्यजित रे हा आदर्श. यामुळे या क्षेत्रास आज सोनेरी दुनिया म्हटले जाते ते उगीच नाही. आवाजाची अमीन सयानी जाद कोण नाकारेल?

 जाहिरात क्षेत्र

 पूर्वी जाहिरात केवळ मुद्रित असायची. तीत चित्र नसायची. असायचे ते फक्त शब्द आणि शब्द. आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने' असं ते रूप होतं. मग जाहिरात सचित्र झाली. बोलकी व दृष्य झाली. ध्वनिमुद्रण किमयेमुळे रेडिओ जाहिरातीचं प्रभावी माध्यम बनलं. श्रव्य जाहिरात (जिंगल्स) आज कोट्यवधीची उलाढाल करत आहे. दूरदर्शन, चित्रपट, वाहिन्या (चॅनल्स) मुळे जाहिरात दृक्-श्राव्य बनली तशी जाहिरातीतील भाषेचं सामर्थ्य वाढलं. 'हूँढते रह जाओगे', ‘कर लो दुनिया मुट्ठी में’, ‘श्री

इन फ्री' यांसारख्या जाहिराती आबाल-वृद्धांच्या तोंडी एकाच वेळी घोळतात. ते भाषिक बळावरच, जाहिरात विश्वात एका शब्दाला एक कोटी रुपये मिळतात. या क्षेत्रात कल्पना, प्रतिभा, दृष्टी, भाषा, संगीत, वादन, गायन, भाषण, लेखन सान्याला सारखं महत्त्व असतं. जाहिरातींची उलाढाल अब्जावधी रुपयांची आहे. वृत्तपत्रे व वाहिन्या चालतात त्या जाहिरातीवरच. इथं भाषा सर्वस्व असते. सत्ता जाहिरातीवर चालते व जाहिरातीमुळे कोसळते म्हणतात, त्यात भाषाई जादूच असते.

 या प्रमुख क्षेत्रांशिवाय कार्यक्रमांचे सूत्र संचालन, कार्यक्रम संयोजन (इव्हेंट मॅनेजमेंट), ध्वनी अभिनय (व्हाइस ओव्हर), सजावट, फॅशन, आकाशवाण, दूरदर्शन, संगणक, गायन या क्षेत्रातही भाषेचं असाधारण महत्त्व असतं. तिथंही तुम्हास कीर्ती, प्रसिद्धी, मान्यता, प्रतिष्ठा, संपत्ती मिळते तिचा आधार भाषाच असतो. व्यापार, उद्योगात, प्रवास, पर्यटनात ही भाषेचं संवाद कौशल्याचं महत्त्व वाढतं आहे. शब्द ‘शस्त्र आहे. त्याचा जपून वापर करा' असं शाळेच्या तुळईवर लिहिलेलं सुभाषित आज जगण्यात ब्रह्मवाक्य होतं.

 यावरून भाषेचं महत्त्व अधोरेखित होतं. भाषा हृदयाचा ठाव घेणारी असते. ती मधुर हवी. ती संवादी हवी. असं जे आज वारंवार सांगितलं जातं ते वक्तृत्वास जगण्यात आलेल्या महत्त्वामुळे. आज आपलं जीवन राजकारण केंद्रित झालं आहे. राजकारणाची सारी मदार, उतार-चढ़ाव सारं भाषिक प्रयोगांवर बेतलेलं असतं म्हणून नव्या पिढीने उच्च शिक्षणात प्राधान्याने भाषिक अभ्यासक्रम निवडले पाहिजे. भाषेतील पदवी म्हणजे जगण्याचा सुखी जीवनाचा परवाना मानून नवी क्षितिजे कवेत घेण्यासाठी भाषिक अभ्यासक्रमांना जगण्याचं सशक्त साधन म्हणून स्वीकारावं तर त्यांच्या आयुष्याचं सोनं होईल!

▄ ▄