शब्द सोन्याचा पिंपळ/एकतरी पुस्तक प्रत्येक घरी

एकतरी पुस्तक प्रत्येक घरी



 माणूस आनंदला की हसतो. रुसला की मौन होतो. निराश झाला की स्वतःशी बोलू लागतो; पण एकटेपण त्याला खाऊ लागलं की तो पुस्तक हाती घेतो. अशा एकाकी मनाच्या स्थितीतूनच साहित्य जन्माला येतं. त्यामुळे एकाकीपणाचा नि पुस्तकाचा जवळचा संबंध असतो. घर, माणसं, वस्तू जशा स्वतःच्या हव्यात, तशी पुस्तकंही! मागून, ग्रंथालयातून आणलेलं पुस्तक पाहुण्यासारखं असतं. पाहुणा अल्पकाळासाठी येतो व जातो. मागून आणलेलं पुस्तक परत द्यावं लागतं.

 स्वतःचं पुस्तक मित्रासारखं असतं. ते जिवलगासारखं जीवनाच्या सर्व क्षणी तुमची सोबत करतं. ते हवं तेव्हा वाचता येतं. स्वतःच्या पुस्तकास तुम्ही हवं तसं हाताळू शकता. खुणा करणं, अधोरेखित करणं, प्रश्नचिन्ह करणं म्हणजे पुस्तकाशी संवाद करणं, वागणं असतं. त्याला छान कव्हर घालून आपण आयुष्यभर जपू शकतो. वारंवार पुस्तक वाचणं म्हणजे माणसाचं स्मरणरंजन! त्यातून एखादी गोष्ट आपणास सूक्ष्मपणे नि विस्ताराने समजते. त्यातून आपलं शहाणपण वाढतं.

शिक्षित होणं नि शहाणं होणं यात फरक आहे. शिकल्याने आपणास अंक, अक्षरांची माहिती होते.  शहाणपणानं माणसं आणि जीवन उमगतं. पुस्तकामुळे हे शक्य होते. आज माणूस संग्रही होत चालला आहे. त्याचा संग्रह असतो यंत्र, वस्तू, पैसे, संपत्ती, सुविधा यांचा. पण तरी तो सुखी होत नाही. सुखी करतं ते पुस्तक!

 म्हणून पुस्तक वाचण्याचा छंद लहानपणीच जपायला हवा. जे पालक मुलांचे लाड चॉकलेट देऊन करतात, त्यांची मुलं शेफारतात. पण जे मुलांच्या हाती पुस्तकं देतात, ती मुलं शहाणी होतात. मुलांच्या हातात

बंदूक द्यायचं का पुस्तक! हे आपणच ठरवायला हवं. एकदा का पुस्तकांवर तुमचा जीव जडला की मग तो आयुष्यभर सरत नाही. रोज त्यात भर पडत जाते. पुस्तके घरी, दारी सर्वत्र हवी. पुस्तकांना कपाट, दार, कुलूप, किल्ली यांचा जाच असता कामा नये. पुस्तकं फुलपाखराप्रमाणे हवीत. मुक्त, स्वच्छंद, सुंदर, रंगीत, सचित्र व संगीतमयही! आज पुस्तकं बोलतात, गातात हे किती जणांना माहीत आहे? टॉकिंग बुक्स, सिंगिंग बुक्स मिळतात बरं!

 पुस्तकं जमवतो तो श्रीमंत. मला माहीत असलेला पुस्तक श्रीमंत एक रद्दी विकणारा माणूस आहे. नेताजी कदम त्याचं नाव. आयुष्यभर तो नुसता वाचतच आलाय. मी त्याला कधी पुस्तकाशिवाय पाहिलेलं नाही. पुस्तकंच त्याचे नातलग! पुस्तकच त्याचा श्वास! पुस्तकच त्याचं सर्वस्व! त्याच्याकडे स्वतःची हजारो पुस्तकं आहेत. ती पण निवडक. आपण वाचतो पण निवडता येत नाहीत. निवडावं नेताजीनेच. त्याचं नावच नेताजी... तोच पुस्तकांचा नेता! साहित्य, शास्त्र, संगीत, औषधं, भाषा, शेती, भविष्य विषय कोणताही असू दे, नेताजीला त्यातलं 'चोख' काय आहे हे माहीत आहे. त्याचा मुलगा आणि त्याचे नोकरसुद्धा चांगले वाचक आहेत. नोकर तर पुस्तक वाचायला मिळतात या मोबदल्यावरच नेताजींकडे आयुष्य काढत आहेत. जे शिक्षकांनी जपायचं, जोपासायचं ते नेताजी करतोय. नेताजी आता वृद्ध झालाय. शिवाय अपंगही! शेळके पुलाच्या कडेला बसून तो एकाच चिंतेने प्राण एकवटून जगतो आहे... कोणीतरी येईल... मी आयुष्यभर जपलेलं विकत घेईल... जपेल... त्याला आपली ही सांभाळलेली पोर सुस्थळी घालवण्याचा घोर लागून आहे... हातात पुस्तक घेऊन तो प्रेषिताची वाट पाहतोय. गरज आहे शहाण्या सांताक्लॉजची! कुठे आहे तो? कोण आहे तो?
 अशा जाणिवेतून काही शहाणी माणसं एकत्र येऊन दोन वर्षांपासून कोल्हापुरात ग्रंथोत्सव भरवत आहेत. त्यांचे घोषवाक्यच आहे मुळी 'एकतरी पुस्तक प्रत्येक घरी. तुम्ही शहाणेसुरते असाल तर तुमच्या घरात पुस्तक हवंच. वर्तमानपत्र सूर्याबरोबर येतं नि जातं. साप्ताहिक रविवारी पाणी भरतं. मासिक महिनाअखेरीस शोधून सापडत नाही. पुस्तक मात्र आयुष्याची साथ-संगत करतं. शहाणी माणसं वाचनाचं साधन कोणतंही असो, जपतात. रद्दीत नाही घालत. वि. स. खांडेकर रोजचं वर्तमानपत्रही अधोरेखित करत वाचत, जपत. आयुष्यभरात एकदाही त्यांनी चिटोरसुद्धा रद्दीत घातलं नाही.

जीवन त्यांना कळले हो... त्यांना पुस्तकाचे महत्त्व उमगले! तुमच्याकडे मोबाईल, मोटारसायकल, फ्रीज, टी.व्ही., शिलाई मशीन, वॉशिंग मशीन, मिक्सर, कुकर भले नसू दे, त्यामुळे तुम्ही श्रीमंत होणार नाही. खरी श्रीमंती ती पुस्तकांची. 'एकतरी पुस्तक प्रत्येक घरी'चा संस्कार आपण आजच घेऊ या. ग्रंथोत्सवात जाऊ. पुस्तक घेऊ, साहित्यकार, कवी, कलावंतांना भेटू, बोलू ऐकू, श्रीमंती वाढवू, संस्कार, शहाणपणासाठी... एकतरी पुस्तक घरी आणू.

▄ ▄