शब्द सोन्याचा पिंपळ/कारंथीय नाट्यमीमांसा


कारंथीय नाट्यमीमांसा



 ‘साप्ताहिक सकाळ' च्या दिवाळी -२000 च्या अंकात भारतातील श्रेष्ठ रंगकर्मी बी. व्ही. कारंथ यांची एक दीर्घ मुलाखत प्रकाशित झाली आहे. सुविख्यात नाट्यदिग्दर्शक व समीक्षक श्री. माधव वझेनी ती घेतली आहे. मुलाखतीचे स्वरूप कारंथांच्या जीवन व कार्याचा आढावा असं आहे. या मुलाखतीत कारंथांनी नाटक, संगीत, अभिनय, रंगमंच इत्यादी संबंधाने जे विचार व्यक्त केले आहेत ते वर्तमान नाटकाशी निगडित असलेल्या सर्वांचा विचार करायला लावणारे आहेत. नाटकाचा भूत, वर्तमान व भविष्य असा त्रिविध वेध घेणारी ही मुलाखत आहे. वर्तमान नाटकापुढे ठाकलेलं वैश्विकीकरणाचं आव्हान पण यातून सुटलेलं नाही. म्हणून नाटकाविषयी जिव्हाळा असणाच्या सर्वांनी कारंथांच्या विचारांची नोंद घेऊन नाटकाच्या विकास, उत्कर्षासंबंधी क्रियात्मक पावले उचलायला हवीत, असे वाटते.

 रंगकर्मी घडायला लागतो. नाटकाच्या सर्वांगाची त्याला माहिती हवी. जसं त्याला नाटक जगता यायला हवं, तसं नाटक हे त्याचं जीवनही व्हायला हवं. रंगकर्मी म्हणून कारंथ असे वाढले व घडले. त्यामुळे नाटकासंबंधीच्या त्यांच्या विचारांना अनुभव व समृद्धीची झालर आहे. नाटक हा त्यांचा आचारधर्म होय. भजन व किर्तनात ते वाढले. गळा लागत गेला. भारतातील सर्व भाषिक नाटके संगीतावर वाढली. त्यामुळे ती लोकाभिमुख झाली नि लोकाश्रयीही. पूर्वीचं नाटक लोकनाटक व लोकसंगीत असा दहेरी बाज घेऊन येणारं असायचं. ते प्रेक्षणीय होतं. गतीने बदलणारी दृश्यं असायची. नाटक खेळ होता. रंगकर्मीना पारख होती. परीक्षा नसायच्या. उमेदवारीच उभारी द्यायची. खेळ रोज नसायचे. तालमी मात्र नित्याच्या.

आठवड्याला एक रुपया बिदागी मिळायची. कंपनीतील सगळ्यांना सगळं आलं पाहिजे असा दंडक होता. सर्वांना गाणं, बजावणं, अभिनय, नेपथ्य, सान्याची जाण यायची.

 नाटकातलं संगीत ‘सेक्युलर' होतं. कर्नाटकी, हिंदुस्थानी, लोकसंगीत, कव्वाली, गझल सगळे प्रकार नाटकात मोकळेपणाने वापरले जात. अगदी पाश्चात्य संगीताचंही वावडं नसायचं. भारतात कथात्मक संगीत विपुल आहे. त्यांचा शोध घेऊन वापरायची दृष्टी हवी.

 नाटक कंपन्या ‘सार्वभौम' होत्या. एकेका प्रांतात, भाषेत त्याचं एकाधिकार राज्य असायचं. आपल्या कंपनीत, नाटकात नवं-नवं आणण्याची हौस नि इर्षा असायची. १८८४ च्या काळात नाटक कंपन्यांकडे ऑर्गन, पियानो, व्हायोलीन, पेटी, क्लेरोनेट, बासरी, टूगल असा संच असायचा. गुंडाळत खाली वर करणारे पडदे असायचे. अस्सल दागिने वापरायचे. नाटकात मंडळींना खरेखुरेपणाचा सोस असायचा. एवढं सारं करूनही ही मंडळी म्हणायची ‘आम्ही करतो ती ‘कारागिरी' ‘कलागिरी' नाही. लोक मात्र म्हणायचे नाटक मंडळी 'नाटक' नाही ‘सिनेमा' दाखवतात. नाटक मंडळीत नाटक अनुवंशिक असायचं. तीन-तीन पिढ्या नाटकातच असायच्या. नाटक पाहणं स्वस्त असायचं.

 लोक न येणा-या भाषेतीलही नाटकं पाहायचे. नाटक पाहणं याला महत्त्व होतं. शब्द न का कळेनात, नाटक मात्र कळायचं. आता नाटकं अनुवादित होतात. भावांतरित होत नाहीत. त्यामुळे ती भावतसुद्धा नाहीत. रंगकर्मीबद्दल नाट्यरसिकांत आदरयुक्त भीती असायची.

 सकाळ झाली, डोळे उघडले की गायकास केव्हा एकदा गळा मोकळा करू असं व्हायचं. गुरूची शिकवण असायची, गायन असं करा की, वाटावं तुम्ही बोलता आहात, बोलाल तर असे बोला की वाटावं तुम्ही गात आहात.

 कारंथांनी नाट्यदिग्दर्शक म्हणून उमेदवारी सुरू केली ती मुलांची नाटकं बसवण्याने. प्रयोग हा त्यांचा पिंड. दोन-तीन मिनिटांचे चुटके, चुटकुले घेऊन नाटकं बसवली. दोन-तीन मिनिटांचे चुटके, चुटकुले घेऊन नाटकं बसवली. एकांकिकेच्या धर्तीवर त्यांनी आपल्या छोट्या नाटकांचं नामकरण केलं होतं ‘चुटकुलांकी'. नाटक बसवताना - विशेषतः मुलांची नाटकं, कार्यक्रम बसवताना निवड नसावी. नाटक ही एक समृद्ध कृती होय. तीत सगळ्यांना भाग घेता यायला हवा. तेव्हाच नाटक सर्वांचं होणार ना!

 कारंथांनी नाटकं लिहिली नाहीत. बसवली, खेळली, देशात नि परदेशातही, तशीच ती विविध भाषांतही. आपल्या अनुभवातून त्यांना वाटतं की, समर्थ रंगकर्मी घडायचा, तर त्यास नाटक, रंगभूमीचं सैद्धांतिक ज्ञान हवंच. आधुनिक नाटकात संगीताची झालेली फारकत त्यांना मान्य नाही, मधल्या काळात नाटकात दृश्यासच असाधारण महत्त्व आलं होतं. कारंथांनी नाटकास संगीताचा पूर्वसंस्कार बहाल केला.

 कारंथ आपल्यावरील आद्य रंगाचार्यांचा प्रभाव मान्य करतात. त्यामुळे त्यांची नाटकं, 'Art is not Logic, it's magic' ची प्रचिती देतात. त्यांच्या दृष्टीने रंगमंच सजीव, जिवंत (Living) असतो. रंगभूमीला भूतकाळ असत नाही. असतो तो फक्त वर्तमानकाळ. 'इथं आणि आता' असा रंगभूमीचा अनुभव असतो.

 नाटक कळायचं तर नाटककार, रंगकर्मी, दिग्दर्शक कळायला हवेत. आद्यरंगाचार्य, गुब्बी वीरण्णा, मुनीअप्पा, अल्काझी, शेक्सपिअर सारे कळायला हवेत, कोळून प्यायला हवेत. ‘ए डॉल्स हाऊस', 'अँटिगनी', ‘राजा ईडिपस' सारं माहीत हवं. त्यातून रंगभूमीला प्रतिष्ठा मिळते. नाट्यप्रयोगाची संरचना असायला हवी. त्याचे नियोजन असावं. अभिनय उत्कृष्टच असायला हवा. नाटक नुसतं वाचून चालणार नाही. त्याचे प्रात्यक्षिक पाहायला, अनुभवायला हवं. अभिनयाचा ‘स्तानिस्लाव्हस्कीचा सिद्धांत माहीत हवा. तरच नाटकातील भव्यदिव्य हाती येतं. मग सारी सृष्टीच नाटकमय वाटायला लागते. दर्शनी पडदा ‘यवनिका' होतो. आकाश ‘गगनिका' होते. सारा भूगोल रंगमंच, 'रंगपंचांग' होतो. वरिष्ठ रंगकर्मीच्या मनात नाट्यांबद्दल दुष्टपणा नसायचा. असेलच तरे तो कौतुकाचा भाग नि तोही ते कौतुकाने व्यक्त करायचे. नाट्यांबद्दल त्याच्या मनात आस्था असायची.

 प्रत्येक रंगकर्मीस आपला प्रेक्षक शोधता यायला हवा. अनुदान, शिष्यवृत्तीतून नाटक साकारत नसतं, ते साकारतं ते फक्त नाट्यवृत्तीतून आणि नाटक ‘प्राण' व्हायच्या प्रक्रियेतून. नाटकाच्या दृष्टीने भाषा महत्त्वाची असते. रंगभूमी, नाटक भाषेशिवाय असणारच नाही. कोणतीही रंगभूमी सर्वांत अधिक स्थानिक असते. रंगभूमी राष्ट्रीय नसते आणि आंतरराष्ट्रीयही नसते. त्या त्या प्रांताची त्या त्या गावातली .(आता कलेतली ‘स्कूल' ही कल्पना लक्षात यावी.) राष्ट्रीयीकरण, वैश्विकीकरण यांच्या आजच्या वातावरणात बोलीभाषा संपणार आणि रंगभूमी हीच एक अशी जागा आहे, जिथं भाषा जिवंत राहील. त्यामुळे आपापल्या जागी काम करत राहणं

महत्त्वाचं. तिथून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जावं. झाडाचं मूळ दुस-या मातीत जगतं पण तरारत नाही हे ध्यानी घ्यावं.

 नाटकांचे महोत्सव होतात. व्हायला पण हवेत. परप्रांतात, भाषिकांत आपापल्या गावी 'आपलं' झालेलं नाटक कसं घेतलं जातं, निराळ्या प्रेक्षकांना कोणता अनुभव येतो ते पाहणं महत्त्वाचं असतं. उत्तम ते कळायला, वाढायला, रुजायला यातून मदत होते. नवे रंगकर्मी, नवे प्रयोग, नवी रंगरचना, नव्या वेशभूषांची जाण अशा महोत्सवातून होते. महोत्सव जाणकारांच्या जागराची जागा असते. तिथं सर्वसाधारण प्रेक्षक अपेक्षित नाहीत. सर्वसाधारण प्रेक्षक आपल्या जागी, प्रांतीच मिळणार. म्हणून तर नाटक स्थानिक असतं. गावचं, प्रांताचं.

 नाटकातून ऊर्जा निर्माण होत असते. ही ऊर्जा असते ती भाषेची. ती बोलण्या-ऐकण्यातून निर्माण होते. भाषेचं म्हणून एक स्थान रंगभूमीत असलं पाहिजे. नाहीतर बोलीभाषा नामशेष होईल. रंगभूमी ही भाषेची प्रयोगशाळा असते. तिथं भाषेचं सारं गर्भित फुलतं, प्रसवतं.

 नाटकाच्या दृष्टीने खुले रंगमंच चांगले. चौकोनी रंगमंच म्हणजे चौकट नाटकास, नटास चौकटीत बांधू नये. नट हाच रंगभूमीची शोभा असायला हवा. नट फैलावत जायला हवा. नाटक असतो व्यक्तिमत्त्वाचा, व्यक्तीचा विस्तार. रंगकर्मी नाटकाचा ‘निमित्त पुरुष' असतो. तसाच तो राहायला हवा. तो 'कारण पुरुष' होता कामा नये. मग त्याच्यातलं 'नाटक' संपतं! मनात येईल तसं नाटक करत राहायला हवं. नाटकाचा विकास अशातूनच संभवतो. भावस्थिती, मनःस्थितीचे अनेकविध प्रयोग होत राहिले पाहिजेत.

 नाटक एक 'उत्सव' असतो. एकाकीपण दूर करणारा. नाटकात 'सामुहिक पर्व' निर्माण करण्याची शक्ती असते. जगातलं वैभव त्यातून अनुभवायला येतं. उत्सव, मेळे, मिरवणुकांत दारिद्रय नसतं. असतं फक्त वैभव!

 कोणत्याही नाटकाचा प्रयोग 'थोर' असत नाही. कारण हवा बदलते. रंगभूमी ही आत्ताची असते, वर्तमानाची. या काळाची, या क्षणाची, कोणत्याही क्षणाचं, घटकेचं महत्त्व कितीसं टिकून राहणार! नाटक झाल्याक्षणी 'ते' नाटक संपतं. परत नवं नाटक. ते शोधायला हवं, शोधत राहायला हवं! कुमार गंधर्व गायचे. वर्षभरात दहा ते बारा कार्यक्रम व्हायचे. मैफल सुरू करताना म्हणायचे, ‘काल' या गंधर्वानं गाणं म्हटलं होतं तो संपला. गेला! आज गाणार आहे तो ‘नवा गंधर्व' आहे! नाटकाचंही असंच असतं.

 संगीत दिग्दर्शकाला शास्त्रीय संगीत माहीत असायला हवं असं नाही.

त्याला माहीत असायला पाहिजे फक्त व्याकरण, सारेगमपधनिसा, मंद्र, मध्य, तार... बस्स! व्याकरण म्हणजे निव्वळ व्याकरण नाही, रागदारीतील ‘स्वरकारी' पण. रंगभूमीवर संगीतास स्वतंत्र अस्तित्व नसतं. ते उपयोजित असतं. लोकसंगीतातही ते तसंच आहे. शास्त्रीय संगीतात शब्द कुठेही जोडता येतात. रंगभूमीमध्ये तसं नसतं. तिथे अर्थ महत्त्वाचा असतो. रंगभूमीवर कुणी ओरडलं तरी त्याला अर्थ असतो. हावभाव व आवाजाच्या टोनमधून भाषा प्रगट होते. तेच रंगभूमीचं संगीत असतं. रंगभूमीवरचं संगीत असतंच मुळी संप्रेषणासाठी, संवादासाठी (कम्युनिकेशन). ब्रेख्तनं म्हटलं आहे, रंगमंचावर संगीताची ‘इडियम' असते. ती काही सांगीतिक रचना नसते. नाटक आपल्या वाटेनं जातं. त्याचा जितका संबंध लोकसंगीताशी आहे तितका शास्त्रीय संगीताशी नाही. रंगभूमीवर स्वरांचा विस्तार जादापणानेच असतो. त्याशिवाय थिएटर असणारच नाही. हजारो लोक नाटक बघत उभे किंवा बसलेले असतात. यातला प्रत्येक घटक ‘नाट्य' अधोरेखित करत असतो. नाटक केवळ खोलीतल्या मैफिलीपुरतं नसतं, नसावंही. नव्या नाटकातून रंगभूमीने आपलं संगीत निर्माण करावं. लोकसंगीत, शास्त्रीय संगीतापेक्षा वेगळं असं रंगभूमीचं संगीत'. वाद्येदेखील रंगभूमीनं आपली निर्माण करावीत. ध्वनींचे नवे आकृतीबंध शोधून काढावेत. रंगभूमीवर संवादी, विसंवादी असा भेद असत नाही. संगीत म्हटलं, की 'नोस्टेल्जिया' पाहिजेच, नाहीतर वाढच खुटणार!

 नटाला तालाची जाणीव हवी. नृत्यही यायला हवं. नटाचं निरीक्षण हवं. प्रसंगातून नि प्रसंगातलं नाट्य त्याला शोधायला आलं पाहिजे. नाट्यप्रशिक्षणाला फारसा अर्थ नसतो. मुळात नटात नाट्य ही वृत्ती, प्रेम, लगन म्हणून असायला हवी. दुसरी कोणतीही अट असूच शकत नाही. संगीत शिकायचं तर आवाज कसा आहे हे पाहिलं जातं. नाटकाचं तसं नाही. तो 'माणूस' हवा बस्स! प्रेक्षकही माणूस असतो. नटानं जे करायचं ते ‘आदमियत की खुशीसे और कलात्मक ढंग से' केलं की झालं. उपजत ज्ञान, उपजत वृत्ती, आपली बुद्धिमत्ता सान्यांचा उपयोग केला तरी पुरेसा. रंगभूमीवर कोणी गुरू असत नाही की शिष्य. फिट्झ बेनविट्झच्याच शब्दात सांगायचं तर ‘नट अनौरस असतो. किती आणि कुठल्या कुठल्या बापाकडून तो काय काय मिळवत असतो.

 अभिनय कलेचे ठोस असे सिद्धांत नाहीत. अभिनय शिकवायचा नसतो. तो शिकायचा असतो. नाटकातील व्यक्तिरेखेचा अभ्यास करून

नटाने पैलू शोधायचे. प्रयोगाच्या दृष्टीने विचार करायचा. मग अभिनय येतो. प्रेक्षकांना आपलंसं करणं यासाठी नाट्यप्रयोग असतो. ते सारं यातूनच साधतं. रंगभूमीवर बौद्धिक गुलामी कामाची नसते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. मुळात सारी रंगभूमी एक माध्यम म्हणून जरी तिचा सर्वंकष (Total) विचार केला तरी शिकवण्याची गोष्ट नाही, हे स्पष्ट होईल. ‘सात्त्विक अभिनय' आता इतिहासजमा झाला. रंगभूमीशी प्रत्येकानं आपल्याला जागृत ठेवायला हवं. प्रत्येकानं प्रत्येक क्षण शिकत राहायला हवं. 'रंगसाधना' ‘स्वयंशिक्षणाचं' दुसरं नाव होय. नाटकवाला स्वभावानं साधा, सरळ हवा. तो अप्रामाणिक, कपटी असता कामा नये. आपण आपल्याला खुलं ठेवायलाही हवं. कुणी काही सांगो, विवेक जागा ठेवून काय घ्यायचं, काय नाही, ठरवावं. सारी रंगभूमी खरोखर विनशीलतेच्या पायावरच उभी आहे.

 प्रशिक्षण, पाठ्यक्रम व शिबिरं यात फरक असतो. शिबिरं व्हायला हवीत. त्यातून एक 'रंग बिरादरी' तयार होते. शिबिराची निष्पत्ती नाट्यप्रयोगात व्हायला हवी. प्रयोगाशिवाय प्रेक्षकांशी नातं जुळून येत नाही. असं नातं जुळून येणं, आयुष्यभर पुरणारा अनुभव असतो.

 नाटकाच्या आशयाचं आधुनिक संवेदनेशी नातं असावं. जी नाटके ते ठेवतात, ती तरतात. कमजोर मरतात. 'नौटंकी' संपली. पण 'यक्षगान', ‘जत्रा' जिवंत आहेत. रंगभूमीमध्ये पुनरुद्धारही नसतो. नवनिर्मिती जरूर असते. पुनर्स्ष्टी असते. गरज, मागणीनुसार रंगभूमी आर्थिक दृष्टीने अनुत्पादक आहे. नाटक करून काही पोट भरता येत नाही. खेळ आहे तो आनंदासाठी केलेला. रंगभूमी 'संस्कार' आहे. तो होत असतो, करायचा नसतो. नाटक अमर आहे. मरेल असं वाटत नाही. पूर्वी नाटकात 'आकाशवाणी' व्हायची. आज ‘आकाश भाषण' (Telephonic Talk) आहे. ती रूपांतरित होईल. जोपर्यंत माणूस आहे, तोवर रंगभूमी राहणार. ती नवोन्मेष घेऊन येत राहणार. चित्रपट आले, तेव्हा वाटलं होतं, नाटक संपलं. पण असं झालं नाही. आज दूरदर्शनचं आव्हान उभं ठाकलंय! पण तरी रंगभूमी तरारतेच आहे ना? मुळात ती माणसाची संवेदना, सहजप्रवृत्ती आहे. नाटकातील मानसिक वर्णाश्रम दूर व्हायला हवा. सारेच रंगकर्मी-रंगयात्री, दिग्दर्शक ब्राह्मण, नट क्षत्रिय, पडद्यामागचे शूद्र असं काही नसावं. रंगयात्रा ही लोकयात्रा, लोकोत्सव, लोककला व्हायला हवी.

▄ ▄