शब्द सोन्याचा पिंपळ/वि.स.खांडेकरांच्या रूपककथा

वि. स. खांडेकरांच्या रूपककथा



 वि. स. खांडेकर हे मराठीतील चतुरस्र साहित्यिक होत. त्यांनी मराठीत कथा, कादंबरी, लघुनिबंध, नाटक, विनोद, काव्य, पटकथा, समीक्षा, व्यक्तिचित्रे - असं सर्व प्रकारचं लेखन केलं. पण मराठी साहित्य खांडेकरांचं ऋणी राहील ते त्यांच्या रूपककथा लेखनामुळे. रूपककथा ही खांडेकरांनी मराठी साहित्याला दिलेली अनमोल देणगी होय.

 रूपककथा आपणास जगातील सर्व भाषांत कमी-अधिक प्रमाणात आढळून येतात. रूपककथेची सुरुवात मात्र भारतातच झाली. रूपककथेचं पहिलं बीज आपणास ऋग्वेदाच्या उषा-सूक्तात आढळतं. दृष्टांतातूनही सांगितलेलं मर्म, हे रूपककथेचं वैशिष्ट्य असतं. अशा कथा उपनिषद व महाभारतातही दिसून येतात. विश्व साहित्यात विष्णू शर्मा, इसाप, खलील जिब्रान, स्टीफन झ्वाइग, ख्रिश्चन जेलर्ट, टॉलस्टॉय, ट्राहर्न, ब्लॅकसारख्या कथाकारांनी रूपककथा रूढ केली. भारतीय साहितयातील आधुनिक काळात रवींद्रनाथ ठाकुरांप्रमाणे वि. स. खांडेकरांनी पिपुल रूपककथा लिहिल्या आहेत.

 खांडेकरांच्या रूपककथा कशा सुरू झाल्या हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यांनी पहिली रूपककथा हेतुतः लिहिली नाही. सन १९३० चा तो काळ होता. भारतात धार्मिक दंगे सुरू होते. त्या दंग्यांनी दुःखी झालेल्या खांडेकरांनी ‘स्वप्नातले स्वप्न' नावाची एक सामाजिक कथा लिहिली. ती 'यशवंत' मासिकाच्या सन १९३२ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर अंकात प्रकाशित झाली. ती कथा ते लिहीत गेले आणि त्या कथेच्या उत्तरार्धाने प्रतीकांचं रूप धारण केलं. हा उत्तरार्ध म्हणजेच 'चकोर आणि चातक' ही खांडेकरांची पहिली रूपककथा, काही समीक्षक ‘सागरा, अगस्ती आला' कथेस पहिली रूपककथा

मानतात. मी संपादित केलेल्या 'स्वप्न आणि सत्य' या कथासंग्रहात ‘स्वप्नातले स्वप्न' ही मूळ कथा वाचता येईल.

 वि. स. खांडेकर मृत्यूपर्यंत रूपककथा लिहीत राहिले. योगायोगाने त्यांच्या अंतिम रूपककथेचं नाव ही 'मृत्यू'च आहे. आपल्या जीवनकालात खांडेकरांनी सुमारे दोनशे रूपककथा लिहिल्या. 'कलिका’, ‘मृगजळातील कळ्या', 'वनदेवता' आणि मी संपादित केलेल्या 'क्षितिजस्पर्श' मध्ये त्या संग्रहित आहेत. निसर्गातील मानवेतर प्रतीकांच्या माध्यमातून मोजक्या पात्रांद्वारे मानवी जीवन संबंधातील एखाद्या बाबींचा ठसा रूपककथा आपल्या मनावर उमटविते. या कथेत एक ध्वनित अर्थ असतो. कल्पकतेवर ती उभारलेली असते. व्यक्तिगतता हा तिचा आधार असतो. चमत्कृतीपूर्ण शेवट हे रूपककथेचं आगळे वैशिष्ट्य असतं. रूपक अलंकारासारखी ही कथा. म्हणून तिला ‘रूपककथा' म्हणतात. ही कथा नीतिकथा, प्रतीककथा, दृष्टांतकथा, काव्यकथा, गद्यकाव्य म्हणूनही ओळखली जाते.

 वि. स. खांडेकर हे मराठी रूपककथेचे जनक म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांना मराठीचा विष्णू शर्मा म्हणून ओळखलं जातं. प्रारंभी त्यांनी खलील जिब्रानच्या रूपककथांचे अनुवाद केले. रवींद्रनाथांच्या अनेक रूपककथांची रूपांतरेही केलीत. मग ते मौलिक रूपककथा लिहू लागले. १९३0 ते १९४0 या दशकातील रूपककथा ‘कलिका' संग्रहात आहेत. या कथा आकाराने छोट्या आहेत. दोन मिनिटात वाचून होणा-या पण दोन वर्षं अस्वस्थ करणा-या या कथा. खांडेकरांच्या रूपककथा परिणामकारक असतात. त्यांचा शेवट मार्मिक असतो. त्या जितक्या रंजक तितक्याच विचारोत्तेजक असतात. ‘छोटा दगड’, ‘तीन कलावंत', ‘स्वप्ने' यांसारख्या या संग्रहातील कथा वाचनीय आहेत. या कथांवर इसाप, विष्णू शर्मा, खलील जिब्रान, रवींद्रनाथ ठाकुर यांच्या कथांचा प्रभाव दिसून येतो.

 ‘मृगजळातील कळ्या' मधील ‘फुले आणि दगड’, ‘दोन पतंग', ‘क्षितिज', 'निसर्ग आणि माणूस', कथा तृणांकुरांप्रमाणे आकर्षक व कलात्मक आहेत. 'वनदेवता' रूपककथासंग्रहात १९५०-६० च्या रचना संकलित आहेत. 'शांती', 'वनदेवता', ‘अनाथ' यांसारख्या श्रेष्ठ कथा अविस्मरणीय आहेत. 'क्षितिजस्पर्श' मधील ‘मृत्यू', 'बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी', ‘वृद्ध प्राजक्त', 'पाऊस' या कथांमध्ये 'चकोर आणि चातक' चं सौंदर्य भरलेलं आहे.

 खांडेकरांच्या रूपककथांत आत्यंतिक जीवनवाद भरलेला दिसून येतो. ते ‘जीवनासाठी कला' मताचे समर्थक होते. त्याचे प्रत्यंतर रूपककथांतही येते. या कथा अल्पाक्षरी असल्या तरी जीवनाचं त्यांचं भाष्य मोठं गहिरं असतं. एका अर्थाने रूपककथा ही भाष्यकथाच असते. तिच्यात वाचकांशी हळुवार साद घालण्याची शक्ती असते. खांडेकरांनी अनेक गुजगोष्टी लिहिल्या. त्यामुळे वाचकांशी संवाद साधण्याचं मोठं कसब त्यांच्या लेखणीत आढळतं. खांडेकरांच्या रूपककथांत माणसाच्या विसंगतीवर, वर्मावर बोट ठेवण्याची अचूकता दिसून येते. त्यात प्रहाराची आक्रमकता नसते. संवादातील गोडवा व गांभीर्य यांचा सुंदर मिलाफ खांडेकरांच्या रूपककथांत दिसून येतो. शोभादर्शकाप्रमाणे शत-शत बिंबे निर्माण करण्याची कला साधलेल्या खांडेकरांच्या रूपककथा म्हणजे चमत्कृत नृत्य असतं. ती माणसाच्या दांभिकपणाचा बुरखा फाडते तशी माणसाची संवेदनाही रेखांकित करते. तिच्यात एक आश्वासक वृत्ती असते. ती नवे किरण दाखवते. खांडेकरांच्या रूपककथा केवळ मृगजळातील कळ्या असत नाहीत. त्या जीवनाला फुलविणा-या कलिका असतात. जीवनाच्या सोनेरी सावल्या दाखवत त्या जीवनाच्या वेचलेल्या फुलांचे सर्वंकष सौंदर्य घेऊन येतात. वानगीदाखल एक-दोन रूपककथा वाचल्या, ऐकल्याशिवाय त्यांची नजाकत, नाजूकपणा आपल्या लक्षात येणार नाही.

▄ ▄