शब्द सोन्याचा पिंपळ/खांडेकरांचा पत्रसंवाद


खांडेकरांचा पत्रसंवाद



 वि. स. खांडेकरांचा नि माझा परिचय सन १९६३ पासूनचा. त्यावेळी त्यांनी आंतरभारती विद्यालय कोल्हापुरात सुरू केलं. त्या शाळेच्या पहिल्या विद्यार्थ्यांपैकी मी एक. ते शाळेत येत, व्याख्याने देत, प्रसंगी शिकवतही! नंतर मी त्याच शाळेत शिक्षक झालो नि त्यांचा माझा तिथल्या चळवळीच्या अनुषंगाने संबंध आला. नंतर कधीमधी त्यांची पत्रं लिहायला गेल्याचंही आठवतं! त्यांच्या मृत्यूशी झुंजीच्या काळात मिरजेला केलेल्या फे-याही आठवतात. त्यांच्या शेजारच्या खोलीत त्यावेळी क्रांतिसिंह नाना पाटीलही आपले शेवटचे क्षण मोजत होते... त्यांच्या कॉटच्या शेजारच्या खुर्चीवरील विठोबा-रखुमाईची तसबीरही मी पंढरपूरचा असल्याने अजून लक्षात आहे. (लक्षात असल्याचं आणखी एक कारण, त्यांचं कम्युनिस्ट असून भक्त असणं!) खांडेकर निवर्तले तेव्हा ती बातमी सर्वदूर पसरण्यापूर्वी मी शशिकांत महाडेश्वरांच्या निरोपामुळे त्यांच्या घरी दत्त होतो. अंत्ययात्रेतील महानगरपालिकेच्या सजवलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये अंत्येष्टीचा माठ, त्यात चंदन, फुलं, कापूर, पान, सुपारी इ. साहित्य मांडीवर घेऊन बसलो होतो... ही जबाबदारी माझ्यावर प्राचार्य अमरसिंह राणेंनी सोपवली होती. (बहुधा आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून!) जणू मी त्यांच्या जीवनाचा अमृतकुंभच जपत जागवत होतो. पुढे मी एम. ए., पीएच.डी. झालो. मंदाताईंच्या स्नेहामुळे मला त्यांच्या कथा, कादंबरी, रूपककथांचे हिंदी अनुवाद करता आले. नंतर त्यांच्याच प्रेम व विश्वासामुळे मी भाऊंचं अप्रकाशित, असंपादित, असंग्रहित साहित्य मराठी वाचकांना देऊ शकलो... सतरा पुस्तकं झाली. आणखी आठ होतील इतकं साहित्य वि. स. खांडेकरांच्या शोधयात्रेत हाती आलंय... काही मंदाताईंकडून, काही समकालीनांकडून तर काही प्रकाशक,

संपादक, वाचक, स्नेही, नातलग, आप्तेष्ट, संस्था, संघटना, वाचनालयं, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, शासन प्रकाशन विभाग, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, आकाशवाणी, दूरदर्शन, साहित्यिक. ज्यांनी दिलं नाही ते आळशी वाटावे असा सुखद अनुभव। छायाचित्रे, ध्वनिफिती, सीडी, पत्रे, जुने अंक, पुस्तके संदर्भ, फाईल्स, एका लेखकाचा समग्र अभ्यास करून एक संग्रहालय करता येईल असं पूर्वी वाटायचं... शिवाजी विद्यापीठ, खांडेकर कुटुंबीय व अन्य वरील सर्व स्रोतांच्या मदतीतून ते उभारल्यानंतरही रोज माझ्या व्यक्तिगत संदर्भ संग्रहात, साधनात भरच पडते आहे. आता वाटतंय की, वि. स. खांडेकर संशोधन विद्यापीठ उभारता येईल असं त्यांचं भारतीय, वैश्विक रूप आहे... हे कुणाला अतिशयोक्तीचे वाटेल तर तो त्या व्यक्तीच्या मर्यादेचा, कोतेपणाचाच भाग मानता येईल.

 हे सारं आठवायचं कारणही तसं आहे. परवा ‘गमभन' प्रकाशनाचं पत्र आलं. त्यांचे प्रकाशन दरवर्षी मराठी साहित्यकारांची चित्रं असलेलं कॅलेंडर प्रकाशित करतं... आगामी वर्षाच्या कॅलेंडरसाठी वि. स. खांडेकरांवर मी लिहावं अशी त्यांची इच्छा होती... अट होती हजार शब्दांची... अगणित शब्दांचा माणूस हजार शब्दांत सामावणं अशक्य वाटत होतं. एका प्रकाशनासाठी त्यांचं छोटेखानी चरित्र, दुस-या एका प्रकाशनासाठी स्मारक ग्रंथ तयार करत असताना मी अनुभवलं आहे की, वि. स. खांडेकरांचा लोकसंग्रह प्रचंड होता... पत्रव्यवहार अफाट, लेखन अखंड (मध्ये दुस-या महायुद्धाच्या सावट वर्षात प्रकाशन खंड असला तरी लेखन खंड नव्हता!) वक्तृत्व अटकेपार... मी त्यांच्या पटकथांचं संपादन हातावेगळं केलं नि व्यक्तिचित्रे, पत्रे, भाषणे वाचतो आहे. व्यक्तिचित्रं खांडेकरांनी लिहिलेली व खांडेकरांची इतरांनी चितारलेली... पत्रं खांडेकरांनी लिहिलेली व खांडेकरांना इतरांनी लिहिलेली. लेख, समीक्षा खांडेकरांनी लिहिलेल्या व खांडेकरांच्या साहित्यावर इतरांनी लिहिलेले लेख समीक्षा,

 वि. स. खांडेकरांचा पत्रव्यवहार, वि. स. खांडेकरांचे साहित्यिक ऋणानुबंध, संशोधन, पीएच.डी. होऊ शकेल... पण वेळ कुणाला आहे? (सुदैवानं मी नुकताच निवृत्त झाल्यानं मला मात्र नक्की!) वि. स. खांडेकरांचं मोठेपण समजून घेताना मला शेक्सपिअरचं मोठेपण लक्षात येत राहतं... सर विन्स्टन चर्चिल एकदा म्हणाले होते की, 'आम्ही एकवेळ आमचं

साम्राज्य बहाल करू पण शेक्सपिअर नाही देणार. वि. स. खांडेकरांचं जीवन व कार्य मला शेक्सपियरपेक्षा तसूभरही कमी नाही वाटत.

 वि. स. खांडेकरांचं मोठेपण त्यांना इतरेजनांनी लिहिलेल्या त्यांनी इतरांना लिहिलेल्या पत्रव्यवहारातून प्रकर्षाने जाणवतं. वाचक, साहित्यिक, संपादक, प्रकाशक, स्नेही, राजकारणी (अपवाद) सर्वांची पत्रं त्यांना येत. सा-यांना उत्तरं पाठवायचा त्यांचा प्रघात होता. आलेल्या पत्राला उत्तर पाठवल्याची नोंद ते आलेल्या पत्रावर करीत. त्यावर पाठवलेल्या उत्तराचे मुद्दे टिपून ठेवत. समकालीन साहित्यिक वि. स. खांडेकरांना आपल्या नवप्रकाशित रचना पाठवत. अभिप्राय विचारत. परीक्षणं लिहिण्याची विनंती करीत. मासिकांचे संपादक वि. स. खांडेकरांचे लेखन गृहीत धरूनच विशेषांकाची योजना करीत.
 कथाकार य. गो. जोशी साहित्यिक होते तसे संपादक व प्रकाशकही. त्यांना एक लघुकथा संग्रह संपादित करून प्रकाशित करायचा होता, पण मानधन द्यायची परिस्थिती नव्हती. त्यांनी इतर लेखकांबरोबर वि. स. खांडेकरांना पत्र लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं की, 'माझ्या मनात येत्या दिवाळीत एक लघुकथा संग्रह प्रसिद्ध करावयाचा आहे आणि तो म्हणजे प्रत्येक लघुकथा लेखकाची एक एक त्याची आवडती गोष्ट. अशा चोवीस गोष्टी, म्हणजे चोवीस लेखक... आपणही एक गोष्ट पाठवा. सदर संग्रहाकरिता मी ‘विनामोबदला' गोष्टी मागणार आहे. याचा अर्थ कोणाला काही द्यायचे नाही असा नसून चोवीस लेखकांशी संबंध येणार असल्यामुळे जबाबदारी अंगावर न घेता, मोबदला कबूल न करता पुस्तक विक्री होताच मला शक्य व इष्ट वाटेल तो मी देणार आहे. लेखकाचे श्रम व अपेक्षा मी जाणतो. पण माझ्या परिस्थितीनुरूप मला सावधपणाने वागायला हवे.' वि. स. खांडेकरांनी त्यांना गोष्ट पाठवली होती हे वेगळे सांगायला नको. यातून वि. स. खांडेकर व य. गो. जोशी यांच्यातील जवळीक व जिव्हाद्यळा असा व्यकत होतो तसाच य. गो. जोशी यांची स्थिती, प्रकाशन व्यवसायाची सन १९३४ ची ओढग्रस्तताही स्पष्ट होते.

 सन १९३६ ची गोष्ट. शिरोड्यातील ट्यूटोरियल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकाची नोकरी सोडून खांडेकर हे मास्टर विनायकांच्या 'हंस' पिक्चर्समध्ये कथालेखक म्हणून दाखल झाले होते. 'छाया' या पहिल्या पटकथेचं लेखन सुरू होतं. त्यात वि. स. खांडेकरांना एका प्रसंगात कवी भा. रा. तांबे ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ आणि ‘माझे कोडे' या

कवितेची काही कडवी वापरायची होती. भाऊंनी त्यांना तसं विनंती पत्र लिहिलं. उत्तरात भा. रा. तांब्यांनी लिहिलं होतं, ‘मी या कार्डाने माझी पूर्ण संमती कळवीत आहे. मला वाटते एवढ्याशा गोष्टीसाठी संमती ती कशाला हवी? आपला मजवर एवढाही अधिकार नाही का?' यातून एकाची नम्रता तर दुस-याची उदारता स्पष्ट होते. हंस, प्रफुल्ल, नवयुग, रघुवीर चित्र निकेतन, फेमस फिल्म यासारख्या चित्रपट संस्था व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध कागदपत्रे, पत्रव्यवहार यातून वि. स. खांडेकरांचे मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर, आचार्य अत्रे, अमृतलाल नागर, बा. भ. बोरकर प्रभृतींशी व त्यांचे खांडेकरांशी असलेले दृढ संबंध, घनिष्टता स्पष्ट होते.

 त्यावेळी अधिकांश लेखक कार्डावर लिहीत. स्वहस्ताक्षरात अधिकांश लिहीत. पण प्रा. ना. सी. फडके यांचा रुबाब व शिस्त और होती. सहसा छापील लेटरहेडवर लिहीत. पत्रे इंग्रजी असत. स्वाक्षरी इंग्रजी. लेटरपॅडही इंग्रजीत छापलेले असे. प्रा. ना. सी. फडके व वि. स. खांडेकर यांच्या विचारांत, दृष्टीमध्ये फरक, मतभेद असले तरी व्यक्तिगत जीवनात, पत्रव्यवहारात सख्य होतं. सन १९३७ च्या दरम्यान वि. स. खांडेकर ‘ज्योत्स्ना ' मासिकाचे संपादन करीत. (खरं तर वा. रा. ढवळे ते करीत व वि. स. खांडेकर त्यात नियमित लिहीत.) ऑक्टोबर १९३७ च्या अंकात त्यांनी प्रा. ना. सी. फडके यांच्या साहित्य आणि संसार' बद्दल परीक्षण लिहिलं होतं. ना. सी. फडके यांनी ते वाचून लिहिलं होतं. "I read your review of my book with great interest. Your conteintion that I have acted like an expert lawyer and brought only supporting evidence in the court would apply to anyone making out his case, wouldn't it? What do you do when maintaining the opposite view? Apart from this however your review is very appreiciative and I must sincerely thank you for it." या पत्रातून दोन समकालीनांचे मतभेद एकमेकांचा अनादर न करता ज्या भाषा-संस्कार व सभ्यतेने व्यक्त होतात त्यातून दोघांची ऋजुता स्पष्ट होते. त्यातील प्रा. फडके यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व जसं व्यक्त होतं तसा करारीपणाही. या पत्राच्या शेवटी प्रा. फडके यांनी वि. स. खांडेकरांना दिलेलं चहाचं आमंत्रण केवळ खानदानी सौजन्य व्यक्त करणारं!

 प्रा. ना. सी. फडके, प्रा. माधवराव पटवर्धन (कवी माधव ज्युलियन), प्रा. व्ही. के. गोकाक १९३६-३८ च्या दरम्यान कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकवत. प्रा. फडके तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, प्रा. पटवर्धन फारसी (पर्शियन) तर प्रा. गोकाक इंग्रजी शिकवत. या तिघांचा आणि वि. स. खांडेकरांचा घनिष्ठ संबंध होता. प्रा. गोकाक काही काळ सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये होते. तेव्हा सांगलीचा समावेश सातारा जिल्ह्यात होता. त्या काळात (१९३८) ते नुकतेच विदेशात दोन वर्षे राहून परतले होते. वि. स. खांडेकरांनी प्रा. गोकाकना नवप्रकाशित ‘दोन ध्रुव कादंबरी व ज्योत्स्ना' मासिकाचा अंक माईणकरांच्या हाती पाठवला होता. कादंबरी वाचून प्रा. गोकाकांसारख्या कवी, समीक्षक, शिक्षणतज्ज्ञांनी लिहिलं होतं, "I had a mind to write to you and tell you how very much I liked the novel which strove to depict the class struggle in India and the stories that were full of wisdom. But that was not possible then. I took this opportunity to pay an ungrudging tribute to your genius." पुढे योगायोग असा की वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ पारितोषिक दिलं जावं म्हणून आग्रही असणा-यांत प्रा. व्ही. के. गोकाक हे एक होते. त्या वेळी भारतीय ज्ञानपीठाचं मोठं कौतुक झालं. नि प्रा. गोकाकना त्याच वर्षी निवड समितीचा अध्यक्ष बनवलं गेलं. त्यांचे असेच संबंध माधव ज्युलियनांशीही होते. ते आपल्या रचना प्रकाशनापूर्वी वि. स. खांडेकरांना दाखवीत असत. त्यांच्या 'विरहतरंग'च्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशनपूर्व संस्करण वि. स. खांडेकरांनी केलं आहे.

 वि. स. खांडेकरांचा नि ग. त्र्यं. माडखोलकरांचा ऋणानुबंध ते न. चि. तथा तात्यासाहेब केळकर यांचे लेखनिक असल्यापासूनचा. वि. स. खांडेकरांची त्यांची मैत्री मतभेदपूर्ण लिखाणातून झाली होती. त्याचं असं झालं की, सन १९१९ च्या जुलैच्या 'नवयुग' मासिकात ग. त्र्यं. माडखोलकरांचा 'केशवसुतांचा संप्रदाय' शीर्षकाचा लेख प्रकाशित झाला. त्या माडखोलकरांनी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी) यांची ‘दसरा' कविता म्हणजे केशवसुतांच्या 'तुतारी'चे अधम अनुकरण असल्याचं लिहिलं होतं. खांडेकराच्या ते वाचनात आलं. त्यांना ते पटलं नाही. खांडेकरांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून हा हन्त हन्त' शीर्षक लेख लिहिला. तो नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना विलक्षण आवडला. हे ग. त्र्यं. माडखोलकरांनीच खांडेकरांना कळवलं. पुढे एकदा गडक-यांनी खांडेकरांची ओळख

'कोल्हटकरांच्या गादीचा वारस' म्हणून करून दिली होती. खांडेकरांचे नि माडखोलकरांचे ऋणानुबंध केवळ साहित्यिक नव्हते तर घरगुतीही होते, हे माडखोलकर - खांडेकरांचा अभ्यास करणा-यांच्या लक्षात आल्यावाचून राहात नाही. उभयता एकमेकांना जिव्हाळ्यानं लिहीत. एकदा माडखोलकरांनी वि. स. खांडेकरांची खुशाली जाणून घेताना पृष्छा केली होती की, “आपला सर्व गृहस्थिती मला कळावी अशी माझी इच्छा आहे. ‘संविभक्तं हि दुःख' ही उक्ती आपण जाणताच व मला वाटते मी आपला ‘स्निग्धजन' खचित आहे आणि त्यामुळेच हे धाडस केले. " हा काळ १९२१ चा. पुढे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. ते दैनिक ज्ञानप्रकाश, दै. तरुण भारत (नागपूर)चे संपादक झाले. दैनिक केसरीत ते टिळकांच्या मृत्यूनंतर जायचं घाटत होतं. तो मोठा इतिहास आहे. हा स्नेह इतका की दोघं समकालीन जीवन (१९९७ ते १९७६) जगले. (दोघांनाही मराठी साहित्यात ‘भाऊसाहेब' नावानंच संबोधलं जायचं हा आणखी एक योगायोग!) माडखोलकर दोन वर्षांनी लहान इतकाच फरक. १९७२ ला वि. स. खांडेकरांची मुळात अधू दृष्टी पूर्णपणे गेली. ही वार्ता सन १९७२ च्या दिवाळीत माडखोलकरांच्या कानी पडली. बंधुतुल्य माडखोलकर विकल झाले. त्यांनी खांडेकरांना धीर देत लिहिलं होतं, “मोझार्टला (जर्मन संगीतकार) बहिरेपण आणि मिल्टनला (इंग्रजी कवी) आंधळेपण उतारवयात आल्यावरही एकाने आपले संगीतरचनेचे आणि दुस-याने काव्यरचनेचे आपले व्रत अखंड चालू ठेवले होते, हे आपणास माहीत आहेच. मी हा उपदेश म्हणून लिहीत नाही. तो माझा अधिकारही नाही. पण आपला विवेक आणि धीर ही दोन्ही इतकी मोठी आहेत की, त्यांच्या जोरावर आपण शेवटपर्यंत कार्यरत राहाल अशी मला खात्री वाटते." अन् ते खरंही ठरलं. शेवटच्या दिवाळी अंकापर्यंत (१९७५) ते लिहीत राहिले होते.

 वि. स. खांडेकर सर्व नवोदित लेखकांचं आशास्थान अन् स्थिर लेखकांचे प्रेरणा केंद्र होतं. नवं वाचायचं. त्याला अभिप्राय कळवायचा. नवोदितांची संपादक, प्रकाशकांकडे शिफारस करायची. संपादक, प्रकाशकांही ऐकलं तर पदरमोड करून अशांचं लेखन प्रकाशित करायचं हा उमदेपणा खांडेकरच करू जाणे. त्यामुळे नवलेखक, कवी, नाटककारांची नित्य उठबस, भेटणं, पत्रं नित्याची गोष्ट होती. या नवोदितांना वि. स. खांडेकर कल्पतरूपेक्षा कमी नसायचे. हे कवी समीक्षक शरच्चंद्र मुक्तिबोधांच्या उदाहरणावरून स्पष्ट होईल. ते इंदूरला राहात. वय विशीतलं. मराठी भाषा पण राहणं

मध्यप्रदेशात. मातृभाषेची विलक्षण ओढ. हिंदी, मराठीत दोन्हीत लिहीत. पण मराठीत कथा, कविता लिहूनही प्रकाशित होत नाही, हे पाहून त्यांनी एकदा खांडेकरांना लिहिलं, “नाही तर महाराष्ट्राच्या थंडगार उपेक्षेशी परत एकदा टक्कर देण्याची ताकद कुठं माझ्यात होती? मी माझ्या या दोन कृती (वाळवंटातील कळ्या आणि याचक या त्या कथा) घेऊन परत एकदा शेवटचा प्रयत्न करून पाहावा म्हणून महाराष्ट्रासमोर यायचा प्रयत्न करीत आहे. आपण जर त्याचे चीज करून ‘ज्योत्स्नेत स्थान दिलेत तरच मी मराठीत पुढे लिहीन. तसे न झाल्यास मला परत हिंदीच्या तोंडाकडे पाहावे लागेल. " पण तशी वेळ मुक्तिबोधांवरच का कुसुमाग्रज, चिं. त्र्यं. खानोलकर, रणजित देसाई प्रभृती साहित्यिकांवर आली नाही. याचे श्रेय खांडेकरांच्या साहाय्यकारी स्वभावासच द्यावे लागेल.

 अनेक साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले ते वि. स. खांडेकरांच्या पासंगामुळे. ही परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिसून येते. कुणाचे सूचक, कुणाचे अनुमोदक, कुणाचे प्रसारक, कुणाचे समर्थक तर कधी तटस्थ अशा अनेक भूमिका खांडेकरांनी पार पाडल्या, हे या संमेलनांच्या इतिहासाची पाने चाळताना लक्षात येते. तीच गोष्ट नाट्यसंमेलनांची. पण एका अर्थाने वि. स. खांडेकरांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचं सांस्कृतिक नेतृत्व केलं. त्यांनी पिढ्या घडवण्याचं कार्य केलं. 'देवाचे देवाला आणि सीझरचे सीझरला' या म्हणीनुसार विवेकानं व्यवहार केला. मतभेदाचे प्रसंग आले तरी सभ्यता सोडली नाही, पण आपल्या मतप्रदर्शनात कचखाऊपणाही दाखवला नाही. आचार्य अत्रे यांच्याशी 'ललित' मधील झटापट असो की लघुनिबंधाचे जनक कोण? याची डॉ. आनंद यादव यांनी छेडलेली चर्चा असो, साच्यात ज्याचं माप त्याच्या पदरात टाकण्याचा त्यांचा विवेक महाराष्ट्र सारस्वत विसरू शकणार नाही. वि. स. खांडेकर हे करू शकले, कारण त्यांच्यातला समाजशिक्षक नेहमी जागा असायचा.

 चित्रकार धनंजय कीर यांची सन १९६३ च्या दरम्यान दृष्टी अधू झाली नि त्यांचे लेखन मंदावलं. (खरं तर संपलं!) खायची भ्रांत होती. हे वृत्तपत्रात आलं तसं वि. स. खांडेकर अस्वस्थ झाले. त्यांनी कीर याना पत्रांवर पत्रं लिहिली. त्यांचे एक उत्तर नाही, म्हणून त्यांचे स्नेही रमेश शिंदे यांना वि. स. खांडेकरांनी शोधून काढलं. त्यांच्याकरवी प्रयत्न केले, पण कीर काही बधले नाहीत. समदुःखी असल्याने (दृष्टिमांद्य) खांडेकरांची अस्वस्थता दिवसागणिक वाढत होती. कीर यांच्या बाजूनं नकाराचं, उपेक्षेचं

कारणही सबळ होते. यशवंतराव चव्हाण त्या वेळी मुख्यमंत्री होते. आचार्य अत्रेंंनी त्यांच्या हे कानावर घातलेलं. निवेदन द्या म्हटल्यावर ते दिल्याचं अत्रे सांगत... पण काही घडलं नव्हतं... परत हात दाखवून अवलक्षण कशाला असं धनंजय कीर यांना वाटायचं... खांडेकरांची तगमग, तळमळ पाहून एकदा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली (याच वेळी पटवर्धन बुवा, अनंतराव गद्रे प्रभृतींची अशीच परवड चाललेली.) "मी डोळ्याने अपंग, अधू झालो हे खरे, परंतु सरकारकडे मी याचना करावयास जाणार नाही. माझ्या मनास ते मानवत नाही. अर्ज करणे म्हणजेच याचना करणे. मी जे कार्य केले त्याविषयी सरकारला काही गुणग्राहकता वाटत असेल तर सरकारने त्याची दखल घ्यावी... माझे कार्य मी कोणत्या स्वार्थी हेतूने केले नाही... ‘भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे' हे अगदी सत्य आहे. डोळे उघडे आहेत, तोपर्यंत मी घेतलेले कार्य तडीस नेऊन स्वाभिमानाने जगण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन." नंतर वि. स. खांडेकरांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्वतः घरी जाऊन त्यांना अर्थसहाय्य दिले होते... कीर बहुधा त्या वेळी रत्नागिरी मुक्कामी आपल्या आप्तांकडे होते असे आठवते.

 विदुषी इरावतीबाई कर्वे, समाजसेविका नि स्त्री जीवनाची नवी क्षितिजे'च्या लेखिका सौ. कमलाबाई टिळक, मालतीबाई किर्लोस्कर, कथाकार सुशीला पगारिया- अनेकजणी भाऊंना लिहीत. भाऊही उत्तरं पाठवत. विद्यार्थिनी वाचकांची पत्रे, संवाद, भेटणं ही असायचं. भाऊ वडिलकीच्या नात्याने सर्वांना लिहीत, बोलत, भेटत. त्यांच्या साहित्यातील स्त्री पात्रे, त्यांच्या अष्टनायिका मानसकन्याच होत्या. स्त्रीजीवन सुधारावं, त्यांनी शिकावं, नुसतं शिक्षित न होता सुशिक्षित व्हावं असं त्यांना वाटायचं. त्यांची अपूर्ण कादंबरी ‘सोनेरी स्वप्नं भंगलेली' हिंदीत पूर्ण करताना आणि तशीच अपूर्ण कादंबरी ‘नवी स्त्री' मराठीत संपादित करताना वि. स. खांडेकरांचा जो पुरोगामी दृष्टिकोन प्रत्ययास आला त्यातून ते ‘वंचितांचे वाली' म्हणून समोर येतात. हीच गोष्ट दलितांविषयी. ‘ध्वज फडकत ठेवू या' मध्येही प्रत्ययास येते.

 कथाकार जी. ए. कुलकर्णी, व्यवहाराने सार्वजनिक नव्हते, पण त्यांचा पत्रव्यवहार चोखंदळांशी नित्य असायचा, हे त्यांच्या प्रकाशित पत्रसंग्रहांवरून (जी. ए. ची निवडक पत्रे खंड १, २, ३, ४) स्पष्ट होते. जी. स. स्वतःहून फार कमी लोकांना लिहीत. त्यात आत्मश्लाघा अपवादानेच दिसून येते;

पण याला अपवाद होता वि. स. खांडेकरांचा. जी. ए.च्या ‘काजळमाया' कथांसग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभल्यावर त्यांनी स्वतःहून त्याबद्दल जर कुणाला लिहिलं असेल तर ते होते वि. स. खांडेकर. जी. एं.नी जयवंत दळवी यांना एकदा केवळ खांडेकरांवर पत्र लिहिलं होतं. जी. एं.च्या पत्रांच्या तिस-या खंडात ते समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यातूनही जी. ए.च्या मनात असलेली वि. स. खांडेकरांविषयीची 'श्रद्धा' स्पष्ट होते. खांडेकरांच्या साहित्याबद्दल, जी. एं.चे मतभेद होते पण 'माणूस' म्हणून त्याचे आतडे पायात घुटमळायचेच.

 जी. ए.सारखंच प्रा. नरहर कुरुंदकरांचं. समीक्षक म्हणून धाक असलेला व आपल्या प्रखर विचारांनी महाराष्ट्रास अंतर्मुख करणारा हा वक्ता वि. स. खांडेकरांपुढे मात्र नतमस्तक असायचा. वासुदेवशास्त्री खरे यांनी स्थापन केलेल्या मिरजेच्या वाचनालयाची व्याख्यानमाला बरीच जुनी आहे. वि. स. खांडेकर मूळचे सांगलीचे असल्याने खरे शास्त्री, नाटककार देवल प्रभृतींचा प्रभाव खांडेकरांवर होता. त्या व्याख्यानमालेस प्रा. कुरुंदकरांनी जावं म्हणून त्यांना खांडेकरांनी आग्रह केला होता. तो स्वीकारणारं एक छोटं पत्र प्रा. कुरुंदकरांनी वि. स. खांडेकरांना लिहिलं होतं. त्यात खुशालीची विचारपूस होती. शेवटी लिहिलं होतं, “दीर्घकाळ विविध प्रकारची राष्ट्राची सेवा करून झाल्यानंतर आपण आता अवभृत स्नानास मोकळे झालेले आहात. इतकाच साच्या घटनांचा मी अर्थ लावतो. या वातावरणात आपले आत्मवृत्त पूर्ण झाले तर मग बाहेरचा अंधारही आतल्या प्रकाशासमोर नमला असे मग म्हणावे लागेल."

 वि. स. खांडेकर संपादक, प्रकाशकांना वारंवार लिहीत. संपादकांना सल्ला देत. संपादक तो शिरोधार्य मानत. किर्लोस्कर मासिकाने स्त्री, दलितादी वंचितांची तळी उचलायचं धोरण जाहीर केलं होतं ते खांडेकरांच्या प्रेम नि प्रभावामुळेच. खांडेकरांचा नि किर्लोस्कर कुटुंबाचा संबंध जुना. ‘किर्लोस्कर पूर्वी त्याचं रूप ‘किर्लोस्कर खबर' होतं. प्रामुख्यानं ते जाहिरात पत्रक होतं. त्यातही खांडेकर लिहायचे. किर्लोस्कर'नी आपल्या मासिकात व्यंगचित्र प्रकाशनास प्रारंभ केला तेव्हा वि. स. खांडेकरांनी व्यंगचित्राचे अनेक विषय ‘किर्लोस्कर'ला सुचविले होते. खांडेकरांच्या अनेक लेखांना ‘किर्लोस्कर'ने व्यंगचित्रांनी सजवल्याचं दिसून येतं. खांडेकर अत्यल्प मानधन घेऊन 'किर्लोस्कर'साठी लिहीत राहिले ते कौटुंब्कि संबंधांमुळेच.

 वि. स. खांडेकर आणि समकालीन वाचक, साहित्यिक, संपादक,

चित्रपट सृष्टीतील कलावंत, तंत्रज्ञ असा विपुल पत्रव्यवहार अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. तो एकत्र करून त्याची वर्गवारी विषय, आशय, शैली, पत्रपद्धती, पत्रस्वरूप, मायने, प्रशस्ती, हस्ताक्षर इ. अंगाने करून त्यातून वि. स. खांडेकरांचा पुनर्णोध शक्य आहे. या व्यापातून दिसणारे खांडेकर म्हणजे माणूसपणाचं मोहोळ होय. लोकाभिमुख होणं ही खांडेकरांची उपतज वृत्ती होती. तो त्यांचा स्वभाव होता. प्रारंभी मित्रांनी गोष्टी सांगणं, नंतर लेखन, भाषण, पत्र लिहिणं, आल्या-गेल्यांशी बोलत राहणं यातून ते स्पष्ट होतं. संपर्कात आलेल्या प्रत्येकास खांडेकर आपले वाटत. याचं रहस्य त्यांच्या संवाद शैली व कौशल्यात आहे. लहान-मोठा असा भेद त्यांनी संवादात कधी केला नाही. प्रत्येकास आपल्या मनातलं सांगून निश्चित होण्याचे ठिकाण होते खांडेकर! त्यांचं हे रूप चर्चच्या त्या पाद्रयाप्रमाणे असायचं. जो तो येऊन आपला कबुलीजबाब देऊन मोकळा व्हायचा. हे केवळ वयाचं मोठेपण नव्हतं. त्यात प्रतिभेचा चमत्कार, विचार वैभव, भाषासौंदर्य व सर्वांत महत्त्वाचे आत्मीयता होती.

 आत्मीय खांडेकर कुणाच्या श्रद्धेचा तर कुणाच्या असूयेचा भाग ठरले. पण खांडेकरांनी त्याचा विचार न करता आपलं मैत्र जपलं. हे मैत्र बाबा आमटे, बाबा मोहोड, विनोबांशी होतं; तसंच डॉ. श्रीराम लागू, वसंत कानेटकर, रणजित देसाई यांच्यासाठीही होतं. नाटक आणि खांडेकर, सिनेमा आणि खांडेकर, समाजसेवक आणि खांडेकर असेही पत्रव्यवहाराच्या अभ्यासाचे विषय होऊ शकतील. वा. रा. ढवळे, अनंतराव कुलकर्णी, रा. ज. देशमुख, ग. पां. परचुरे, द. ना. मोघे, अनंत हरी गद्रे, नामदेवराव व्हटकर यांच्यासारखे प्रकाशक असोत वा किर्लोस्कर, मित्र, विरकुड, यदुनाथ थत्ते यांच्यासारखे संपादक असोत, सर्वांशी वि. स. खांडेकरांचा पत्र संवाद असायचा. वाचकांशी संवाद हे खांडेकरांचे आगळे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. चिमुरड्या वाचकासही ते लिहीत. त्यात मराठी, गुजराती, बंगाली भाषिकांचा समावेश असायचा. कोण सहमत तर कोण असहमत. असहमतांशीही सख्यपूर्ण संवादात खांडेकरांचं मोठेपण सामावलेलं दिसतं. खांडेकर कुणास सविस्तर तर कुणास त्रोटक लिहीत, पण आलेल्या प्रत्येक पत्रास उत्तर धाडायचा त्यांचा प्रयत्न असायचा. स्वतःहून लिहिण्याचीही त्यांना सवय होती. विशेषतः नवोदितांना त्यांचे लेखन वाचून प्रशस्ती कळवायची सवय केवळ अनुकरणीय होती. वि. स. खांडेकरांनी मराठी माणसाच्या मनात जे आदराचं सीन निर्माण केलं होतं, ते केवळ साहित्यातून नाही तर पत्र, मैत्री,

पत्रसंवाद हेही त्याचं मोठं कारण होतं असं अभ्यास करताना लक्षात येतं. सन १९२० ते १९७६ असा ५६ वर्षांचा खांडेकरांचा पत्रप्रपंच म्हणजे त्या काळची माणसे व मने यांचं विशुद्ध प्रतिबिंबच.

 त्यात एकविसाव्या शतकातील वाचकांनी स्वतः न्याहाळायला हवं. आजच्या असंवाद स्थितीची कोंडी कदाचित त्यातून फुटेल आणि नव्या युगाचा नवा संवाद सुरू होईल, माध्यम कदाचित वेगळे असू शकेल.

▄ ▄