शब्द सोन्याचा पिंपळ/वि.स.खांडेकर:समग्र मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत


वि. स. खांडेकर : समग्र मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत



 मराठीस भारतीय ज्ञानपीठाचा पहिला सन्मान मिळवून देणाच्या वि. स. खांडेकरांचे २ सप्टेंबर १९७६ ला मिरज येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनास यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अर्थाने आगामी वर्ष (२००१-२००२) हे खांडेकरांचे ‘रजत स्मृती वर्ष' १९९८९९ मध्ये देशभर त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे झाले. हा अपवाद वगळता गेल्या पंचवीस वर्षांत मराठी वाचकांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी खांडेकरांना विस्मृतीच्या गर्तेत ढकलल्याचे जाणवले. प्रेमचंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने (१९८०-८१) उत्तर प्रदेश' या हिंदी नियतकालिकात डॉ. प्रभाकर माचवे यांचा एक तुलनात्मक लेख वाचल्यानंतर मला जाणवले की, प्रेमचंदांपेक्षा कितीतरी विपुल नि वैविध्यपूर्ण लेखन करणारे खांडेकर मूल्यांकनाच्या- समग्र मूल्यांकनाच्या पातळीवर उपेक्षितच राहिले. एके दिवशी माझ्या हाती जया दंडकरांची ‘वि. स. खांडेकर वाङ्मय सूची अचानक लागली आणि लक्षात आले की, खांडेकरांच्या बाबतीत मराठी वाचकांची, अभ्यासकांची, संशोधकांची स्थिती दिव्याखाली अंधार अशीच आहे. खांडेकरांबद्दल आपली आजवरची धारणा, मतमतांतरे, मूल्यांकन हे प्रकाशित व संकलित रूपात समोर आलेल्या त्यांच्या साहित्याच्या आधारावर आहे. खांडेकरांच्या जीवनाचे व साहित्याचे असे अनेक पैलू आहेत की, ज्यांना मराठी अभ्यासकांनी, संशोधकांनी अद्याप स्पर्शही केलेला नाही.

 ‘कथासम्राट' म्हणून खांडेकर मराठी वाचकांना परिचित आहेत. सुमारे साडेतीनशे कथा आपल्या तीस मौलिक संग्रहांतून मराठी वाचकांना देणाच्या खांडेकरांची पहिली कथा ‘घर कोणाचे ?' अद्याप असंकलित आहे. खांडेकरांच्या कथा नि घर यांचे अतूट नाते आहे. पहिल्या कथेप्रमाणेच

त्यांच्या अंतिम कथेचे नावही 'घर'च. त्यांच्या अनेक कथांत घर येते. त्याचा 'संबंध' त्यांच्या व्यक्तिगत घटनांशी आहे. त्याचा अभ्यास व्हावयास हवा. त्यांच्या पन्नासावर कथा अद्याप असंकलित आहेत. त्यांत 'चकोर आणि चातक' या रूपककथेचा मूळ मसुदा असलेली स्वप्नातले स्वप्न कथाही असंकलित आहे. ही मूळ कथा वाचल्यावर लक्षात येईल की, खांडेकरांच्या कलात्मक नि काव्यात्मक रूपककथांमागे सामाजिक संदर्भ असायचे. 'चकोर आणि चातक' कथेच्या निर्मितीमागे १९३०-३२ च्या दरम्यानचे हिंदू-मुसलमान दंगे कारणीभूत होते, हे किती जण जाणतात?
 ‘सागरा, अगस्ती आला' या कथेने खांडेकरांनी १९३१ मध्ये रूपककथा लेखनास प्रारंभ केला. मृत्यूपर्यंत ते रूपककथा लिहीत राहिले. १९७६ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या अखेरच्या रूपककथेचे नाव योगायोगाने ‘मृत्यूच होते. खांडेकर रूपककथांना छोटा हस्तिदंती ताजमहाल मानत. ताजमहालातील कलात्मकता व त्याच्या निर्मितीमागील भावकाव्य यांचा सुरेश संगम म्हणजे रूपककथा. आजवरच्या प्रकाशित चार रूपककथासंग्रहांतून त्यांनी सुमारे दीडशे छोटे-छोटे ताजमहाल मराठी वाचकांना दाखविले. अद्याप त्यांचे असे पन्नास एक ताजमहाल विखुरलेले आहेत. ते जमवून, जोडून आपल्यासमोर येतील, तर मराठी रूपककथेच्या शहेनशहाचे एक आगळे वैभव अनुभवता येईल. खांडेकरांनी अजाणतेपणी रूपककथालेखनास प्रारंभ केला खरा; पण जाणतेपणी जाणीवपूर्वक त्यांनी हा कथाप्रकार जोपासला, फुलवला. विष्णू शर्मा, इसाप, खलील जिब्रान, रवींद्रनाथ ठागोर, स्टीफन झ्वाइग, चेकॉफ, ख्रिश्चन जेलर्ट, ला फॉन्टेन, सोलोगब, चॉसर स्पेंसर, जॉन बन्यनसारख्या जगप्रसिद्ध रूपककथाकारांच्या मुशीत तयार झालेले खांडेकरांचे हे कथाशिल्प वैश्विक कथेचे क्षितिज स्पर्शिण्याची ताकद व ईर्षा घेऊन येते. याचे खरे मूल्यांकन कोणी केले आहे?

 कथात्मक साहित्याइतकेच खांडेकर गंभीरपणे वैचारिक, साहित्यिक लेख लिहीत. त्यांचे किती तरी लघुनिबंध, वैचारिक लेख, साहित्यिक निबंध अहिल्येच्या शिळेप्रमाणे उपेक्षित नि अस्पर्श आहेत. ते ‘अभ्यासकरामा'ची प्रतीक्षा करीत आहेत. अशा निबंधांची-लेखांची संख्या सव्वाशेच्या घरात आहे. महात्मा गांधी, विनोबांसारख्या विभूतींवरील त्यांचे लेख म्हणजे प्रगल्भ विचारधनच. खांडेकर श्रेष्ठ लेखक होते तसे ज्येष्ठ समीक्षक नि प्रस्तावनाकार खांडेकर म्हणून त्यांचे मूल्यांकन व्हावयास हवे. खांडेकरांनी स्वतःच्या शंभर पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनांतून साहित्यकार खांडेकर

कसे दिसतात, भावतात, उमगतात हे अभ्यासणे विलोभनीय ठरावे. कविवर्य कुसुमाग्रजांनी, त्यांच्या निवडक प्रस्तावनांचा संपादित केलेला एक संग्रह ‘विचारधारा' प्रकाशित झाला आहे. त्याला कुसुमाग्रजांनी लिहिलेली प्रस्तावना वाचताना हे प्रकर्षाने लक्षात येते. खांडेकरांनी स्वतःच्या साहित्याबद्दल लिहिलेले लेख मराठी सारस्वताचा अमूल्य ठेवा होय. लेखक जेव्हा स्वतःच्या साहित्याबद्दल लिहितो, तेव्हा त्यास दस्तुरखुद्द बळ येते. त्यातून अनेक शंकांचे समाधान जसे होते, तसे साहित्यकृतीच्या निर्मितीप्रक्रियेबद्दलही विस्ताराने उकल होण्यास मदत होते. अशा लेखांच्या संकलनातून आजवरच्या खांडेकरांच्या साहित्य मूल्यांकनास नवा छेद, नवे परिमाण लाभण्याची शक्यता आहे.

 ‘ते दिवस, ती माणसे' सारख्या पुस्तकामुळे खांडेकर शब्दचित्रकार होते, हे लक्षात येते. व्यक्तिचित्रणात खांडेकरांची शब्दकळा अशी फुलो-यात येते की, कोणती वेचावी नि कोणती नाही असे होऊन जाते. 'ते दिवस, ती माणसे' मधील व्यक्तिरेखांना नाही म्हटला तरी व्यक्तिगत गडगा (कुंपण) आहे. खांडेकरांनी सुमारे पन्नासएक व्यक्तिचित्रात्मक लेख वेगवेगळ्या निमित्ताने लिहिले आहेत की, ज्यामुळे खांडेकरांचा मनुष्यसंग्रह लक्षात येतो. तद्वतच माणसांकडे पाहण्याची त्यांची निकोप, अनुकरणीय वृत्ती प्रत्ययास येते. शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, राजनीतिक, साहित्यिक क्षेत्रांतील व्यक्तींवर लिहिलेले त्यांचे गौरवलेख मराठीतील कसबी शब्दचित्रकार सिद्ध करतील. यांचा संकलित स्वरूपात अभ्यास झाल्यास महाराष्ट्रातील समाज, साहित्य, विकासावरही प्रकाश पडू शकेल.

 खांडेकरांचे लेखन विनोदी शैलीने सुरू झाले, हे फार कमी लोक जाणत असावेत. त्यांचे प्रारंभिक लेखन कोटीबाज होते. गडक-यांच्या प्रभावाची ती परिणती होती. प्रारंभीच्या काळात त्यांनी ज्ञानेश्वरी'च्या धर्तीवर क्रमशः अठरा अध्यायांत चक्क 'गाढवाची गीता' लिहिली होती. ती १९२४-२५ मध्ये ‘वैनतेय' साप्ताहिकात प्रकाशित झाली होती. नाट्यछटेच्या शैलीत लिहिलेली ही आगळी गीता खांडेकरांचे एक नवे रूप दाखविते. ‘श्रीमत्कलिपुराण'च्या तीन अध्यायांतून खांडेकरांची विनोदी वृत्ती समजायला मदत होते. 'गाढवापुढे गीता’, ‘गाजराची पुंगी', ‘समुद्रमंथनातील रत्न' असे कितीतरी विनोदी लेखांचे भांडार ‘खुल जा सिमसिम' म्हणणाच्या अल्लाउद्दीनच्या प्रतीक्षेत आहेत. 'ययाति' सारखे शिवधनुष्य पेलणारा हा शब्दकार गंभीर तसेच गमतीदार लेखन करण्यातही तितकाच पारंगत होता.

हे अनुभवले की, या साहित्यकाराच्या लीलाकारी व्यक्तिमत्त्वाचा अचंबा वाटल्यावाचून राहात नाही.

 वरील मौलिक साहित्याव्यतिरिक्त खांडेकरांची व्याख्याने, मुलाखती, स्तंभलेखन, पत्रकारिता, संपादन, अग्रलेख, पटकथा, चित्रपट गीते, खांडेकरांवर लिहिलेले मान्यवरांचे लेख, खांडेकर साहित्यावरील समीक्षात्मक लेख, प्रबंध अशा दस्तऐवजांचा अक्षरशः डोंगर माझ्या डोळ्यांपुढे आहे. त्याला उचलावयास आधुनिक हनुमान जन्मावयास हवा. यातून उभे राहणारे खांडेकरांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व आजवरच्या त्यांच्या चिरपरिचित व्यक्तिमत्त्वास छेद देऊन नवे रूप सादर करील, असा विश्वास वाटतो.

 असंकलित खांडेकर संकलित करून वाचून, संपादित स्वरूपात मराठी वाचकांपुढे सादर करण्याचा संकल्प खांडेकरांच्या जन्मशताब्दी वर्षात मी मनातल्या मनात केला होता. महाराष्ट्रभर फिरून मी छापील तीन हजार पाने होतील इतका अद्याप असंकलित राहिलेला मजकूर जमा केला, वाचला. त्यातून मला समजलेले खांडेकर तुम्हाला चिरपरिचित असलेल्या खांडेकरांपेक्षा खचितच वेगळे आहेत. तुम्ही आजवर एक अष्टमांश हिमनगच पाहात आला आहात. मी थोडी खोल डुबकी मारली. मला उर्वरित सात अष्टमांश दडलेला, डुबलेला हिमनगही दिसला. त्याचे ते अद्याप अदृश्य रूप तुम्हाला एकदा दाखवायचे आहे ते दाखविता आले, तर न वाचलेले, न अभ्यासलेले, न दिसलेले खांडेकर तुम्हालाही गवसतील. त्यातून खांडेकरांची ‘पूर्ण तुला' साकारेल. खांडेकरांचे समग्र मूल्यांकन शक्य होईल. अनेक वर्षांपासून मूल्यांकनाच्या प्रतीक्षेतील खांडेकर भरून पावतील, असा विश्वास आहे. तसे झाल्यास मराठी सारस्वतातील ती ‘सुवर्णतुला' ठरेल.

▄ ▄