शब्द सोन्याचा पिंपळ/जहाल वेदनांची विषण्ण गीते:‘ज्वाला आणि फुले'

जहाल वेदनांची विषण्ण गीते : ‘ज्वाला आणि फुले'



 ज्यांचे कार्य हेच एक जिवंत महाकाव्य होतं, अशा बाबा आमटे यांनी समाजकार्याइतकंच साहित्य क्षेत्रात मोठे योगदान दिलं आहे, हे फार कमी लोकांना माहीत असावं. बाबा आमटे यांचं जीवन, कार्य, वक्तृत्व सारं काव्यभारीत होतं. विचार व आचारांची सुसंगती हे त्यांच्या महात्म्याचं खरं रहस्य. त्यांनी जे लिहिलं ते सारं विचारप्रवण, कृतीकेंद्री नि म्हणून वाचकास अंतर्मुख करणारं ठरलं. गद्य नि पद्य अशा दोन्ही शैलीत लिहिलेलं त्यांचं समग्र साहित्य - कृती, विचार नि कलात्मकतेचं संयुक्त रूप होतं. माती जागवील त्याला मत', रेतीचे बंध', ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी' (श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ), ‘सार्वजनिक संस्थांचे संचालन' हे त्यांचं गद्य लेखन म्हणून सांगता येईल. पैकी 'माती जागवील त्याला मत' हा सन १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी लिहिलेला ‘मतदाराचा जाहीरनामा' होय. तर ‘सार्वजनिक संस्थांचे संचालन स्वयंसेवी संस्थांच्या अनागोंदी कारभारावर क्ष किरण म्हणावं लागेल. 'वर्कर्स युनिव्हर्सिटी' आहे त्यांची दीर्घ मुलाखत. वि. स. खांडेकरांनी त्याचं वर्णन ‘ज्वलंत व्यक्तिमत्त्वाचा काव्यात्मक आविष्कार' असं केलं आहे. एका कृतिशील कार्यकत्र्याचं प्रकट चिंतन म्हणून सर्व काळात मार्गदर्शक ठरावा असा दस्तऐवज होय. पण साहित्यिक, चिंतक, कलाकार, कार्यकर्ता म्हणून बाबा आमटे ज्यांना समजून घ्यायचे आहेत, त्यांना त्यांचा काव्यसंग्रह ‘ज्वाला आणि फुले' वाचायलाच हवा.

 माझ्या वाचन विकासात साने गुरुजी, वि. स. खांडेकर, खलील जिब्रान, स्टीफन झ्वाइग, प्रेमचंद, यशपाल असे अनेक भाषिक साहित्यिक भेटले, भिडले. प्रत्येक साहित्यिकाची एखादी उल्लेखनीय रचना तुमच्या आयुष्यात अविस्मरणीय बनून जाते. ती साहित्यकृती तुमच्या आयुष्यात

अढळपद मिळवते. त्याची अनेक कारणे असतात. ती गाजलेली असते, ती तुम्हास आवडते, ती तुम्हास अस्वस्थ करते, ती तुम्हास प्रेरणा देते, जीवनदृष्टी देते, ती तुम्हास अंतर्मुख करते, संकटात ती मार्गदर्शक होते, एकांतात मित्र होते, प्रत्येक वाचनात ती कॅलिडोस्कोपसारखं नवं काहीतरी दाखवते, देते. अशी एक ना अनेक कारणं असतात, ही अशी जीवश्च-कंठश्च साहित्यकृती प्रिय, अविस्मरणीय होण्याची. बाबा आमटेंची ‘ज्वाला आणि फुले' कविता संग्रह माझ्या आयुष्याचा असा ठेवा होय.

 ‘ज्वाला आणि फुले' मधील कविता आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर मला भेटत राहिली. ती मला सर्वांत प्रथम भेटली ती बहुधा सन १९६३६४ मध्ये. मी इयत्ता आठवीत होतो. प्राथमिक शिक्षण संपवून मी वि. स. खांडेकरांनी स्थापन केलेल्या आंतरभारती विद्यालय, कोल्हापूरमध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी ती ध्येयवादी शाळा म्हणून स्थापन करण्यात आली होती. त्या वेळी तिचा तसा लौकिकही होता. त्या शाळेत नवी असली तरी पुस्तकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं यांची रेलचेल होती. 'माणूस', 'मनोहर', ‘साधना', 'अमृत', 'बहुश्रुत माला' सारखी नियतकालिकं नियमित येत असत. शाळेत वाचनास प्रोत्साहन असायचं. वर्गात अभ्यासक्रमाबरोबर अवांतर (पाठ्यपूरक) शिकवण्यावर भर असायचा- हे वाचा, हे ऐका, हे पाहिलं का? (चित्र, सिनेमा, शिल्प, देश-प्रदेश, निसर्ग असं बरंच काही) त्या वेळी 'साधना' साप्ताहिकही नियमित येत होतं. ते वाचायचं वय नव्हतं पण चाळायचो. त्याची अनेक कारणं होती. आमची शाळा साने गुरुजींचं स्वप्न म्हणून सुरू झालेली. 'साधना'चे संस्थापक असं त्यावर छापलेलं असे (आजही अधेमधे छापलेलं असतं). त्यावर तीन मेणबत्त्याचं बोधचिन्ह असायचं (आज ते गायबच!) तेच चिन्ह आमच्या फळ्यांवर, कार्यक्रमात असायचं. कार्यक्रमात तीन मेणबत्त्या असायच्याच. तर त्या वेळी साप्ताहिक ‘साधना'मध्ये ‘ज्वाला आणि फुले' मधील कविता छापून येत. त्यानुस्त्या पाहायचो. वाचल्या तर डोक्यावरून जायच्या. पण वर्गात बाबा आमटेचा घोष असायचा. त्यामुळे या कविता पाहायचो. शालान्त शिक्षण पूर्ण केलं नि बहुधा त्याच सुट्टीत माझ्या इतर मित्रांबरोबर मी ‘सोमनाथ श्रम शिबिरात गेलो नि बाबा आमटे भेटले, ते चांगले पंधरा दिवस. त्या भेटीने माझा कायाकल्प झाला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. आपल्या पलीकडे पाहण्याचा, करण्याचा विचार, संस्कार घेऊनच मी परतलो. पुढे गारगोटीच्या मौनी विद्यापीठात असताना कोयना भूकंप निवारण कार्यात सहभागी झालो.

त्यातून विधायक वृत्तीचा विकास झाला असं आज लक्षात येतं. या साच्या संस्कारांनी मी शिक्षक व्हायचं ठरवलं. शिक्षकाच्या पहिल्या पगारात माझे मित्र घड्याळ, कपडे घेत होते. माझ्या चांगलं लक्षात आहे की मी ठरवून ज्वाला आणि फुले' घेतलं. कारण पदवीधर झाल्यावर, समज आल्यावर वाचलेलं नि मला प्रगल्भ करणारं ते पहिलं पुस्तक होतं.

 ‘ज्वाला आणि फुले' आपलं वाटण्याचं आणखी एक कारण होतं. त्याला वि. स. खांडेकरांची विचारोत्तेजक प्रस्तावना होती. एव्हाना मी त्यांच्या कथा, कादंब-या वाचू लागलो होतो. त्यांच्या लेखनाचं गारूड तयार होण्याचा तो काळ! त्या प्रस्तावनेचं बाबा आमटे आणि त्यांची कविता कळण्यास मोठी मदत झाली होती असं आजही आठवतं. मी घेतलेलं ते पुस्तक ‘ज्वाला आणि फुले'ची दुसरी आवृत्ती होती. त्यात खाडेकरांच्या एक नाही तर चांगल्या दोन प्रस्तावना होत्या. खांडेकरांच्या प्रस्तावना म्हणजे हितगुज असतं. तो असतो एक जिवाभावाचा संवाद... ‘हे हृदयिचे ते हृदयी घालण्याची विलक्षण ताकद घेऊन येणा-या या प्रस्तावना नमना आधी घडाभर तेल' कधीच वाटल्या नाहीत... या प्रस्तावना तर उघडिले स्वर्गाचिये द्वार' अशाच!

 ‘ज्वाला आणि फुले' मधील कवितांचं एक आगळे वैशिष्ट्य आहे. हे एका कृतीशील कार्यकत्र्यांचं प्रगट चिंतन होय. त्याचं शब्दांकन रमेश गुप्ता यांनी केलं आहे. बाबा आमटेंच्या दीर्घ सान्निध्यामुळे त्यांना हे शक्य झालं असावं. माझ्या वाचनातील शब्दांकनाचा हा पहिला व शेवटचाच असा प्रयोग. “ज्वाला आणि फुले' मधील कवितांचे वर्णन वि. स. खांडेकरांनी ‘लोक विलक्षण आत्म्याचे ऊर्जस्वल शब्दविलसित' असं केलं आहे, ते यथोचितच म्हणावं लागेल. या संग्रहात चोवीस कविता आहेत. खरं तर चोवीस प्रकारच्या या कविता, प्रत्येक कविता नवा विचार, व्यक्ती, चरित्र, संस्कार, मूल्य, दृष्टी घेऊन येते. काव्यात्मकता, नाटकीयता, मिथक, प्रतीक, गद्यशैली, समाजचिंतन अशी कितीतरी वैशिष्ट्ये घेऊन येते ती! या कविता लिहिल्या नाहीत... त्या झाल्यात. सहकाच्यांशी केलेल्या संवादाची ती इतिःश्री होय. बावनकशी अनुभवातून उमटलेली ही कविता विचार व शब्दशक्ती दोन्ही अंगांनी ज्वालामुखी ठरावी अशी. या कवितेस काव्य समीक्षेची शास्त्रीय परिमाणे भले लागू पडत नसतील, पण ती वाचक प्रमाणित होतात खरी! ही समीक्षा जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाला इतिहास, पुराणाचा दाखला देत ती वर्तमानाची चिकित्सा करत भविष्यवेध घेते. असं

त्रिकालाबाधित आकलन घेऊन येणारी ‘ज्वाला आणि फुले' कविता... तिच्यात फुलांचं लालित्य जसं आहे तसंच ज्वालेतील प्रखरताही! तो कवीचा अंतर्यामी उद्गार असल्याने त्यात अनुभवजन्य तत्त्वज्ञान आपसूक असतं.

 ‘शतकाचे शुक्र' ही संग्रहातील पहिली कविता. ती वाचत असताना लक्षात येतं की, कवी बाबा आमटे आपल्या काव्य लेखनाची भूमिका, प्रस्तावनाच मांडत आहेत. एखादा कवी, आपल्या कवितेची भूमिका सांगतो तीही काव्यातून असं मी पहिल्यांदाच (अन् शेवटचंही!) पाहिलं. या कवितेत तुम्हास कवीच्या काव्याचे शुक्रतंतू (जंतू नव्हे!) दिसतात. माणूस शतकांचे संस्कार देऊन जन्मतो तशी त्याची कविताही! या कवीच्या कवितांचे स्वरूप प्रेरणा गीतांसारखं आहे. त्या तुम्हास वाचताना जागोजागी थांबवतात... विचार करायला भाग पाडतात अन् पुढे मग तुम्ही कालौघात, आनुषंगिक कृतीही करता. ती असते या कवितेची फलश्रुती. बाबा आमटेंची कविता एकाच वेळी चित्र, शिल्प, गीत बनून येते. ती गुणगुणत येत नाही, कारण तो गद्यमय आविष्कार असतो. पण ती कविता तुमची मती गुंग करून सोडते. पिंगा घालते... पिच्छा करते... मानेवर बसते. ही असते त्या कवीच्या प्रतिभेची ताकद. ही शब्दांच्या पकडीतून... खरं तर मगरमिठीतून येते. आशयघन शब्दांचा वापर, हे बाबा आमटेंच्या कवितेचं बलस्थान म्हणून सांगता येईल. शीलाक्षय, अभावपूजक, श्रमतंत्र, कथाकथित, गिधाड झेप, क्षाळणे, हरणटप्पेसारखे शब्द या कवितांतून आपणास पहिल्यांदा भेटतात. ते नुसते शब्द असत नाहीत तर आशयघनतेतून त्या प्रत्येक शब्दकळेला मिथकाचं रूप येऊन जातं. असं लिहिता येत नाही... ते लिहिलं जातं. म्हणून बाबा आमटेंची कविता तुम्हाला सरळ बसून, सावरून वाचावी लागते. ‘शतकांचे शुक्र' द्वंद्वगीत आहे. गीत-संगीत, विचार-आचार, दृष्टांत-मिथक, व्यक्ती-चरित्र, चरित्र-चारित्र्य, अक्षर-आकृती, शब्द-अर्थ अशा द्वंद्वांचं अद्वैत होणारी ही कविता. त्यांचा एक एक शब्द हा अर्थाचा शब्द होऊन उठतो.' या कवितेत ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल'प्रमाणे ‘या ज्वालामय क्षणात शतकांचे शुक्र साठलेले आहेत, उद्याच्या गर्भधारणेसाठी'. बाबा आमटेंच्या ‘ज्वाला आणि फुले' मधील कविता हा काही वांझ शब्दांचा विस्तार, बाजार नाही. असेल तर तो आपल्या बांधिलकीचा पंचनामा नि स्वतःच स्वतःची घेतलेली झाडाझडती. कवी स्वतःला या कवितेत उसवून, तपासून घेतो. वाचक या कविता वाचताना

आपोआप स्वतःस त्या ओळींवर... तिच्या कसोटीवर पारखू लागतो. हे असतं कवी नि वाचकांचं एक होणं, हे जिथं घडतं तिथंच कवितेचं भिडणं होतं. तेच कवितेचं यश होऊन जातं.

 ज्वाला आणि फुले' मधील कविता म्हणजे बाबा आमटेंच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या पंचशीलाचं खुलं समर्थन. त्यामुळे बाबा आमटे अध्यात्माऐवजी विज्ञान श्रेष्ठ मानतात. आचार्य विनोबांबद्दल पूर्ण आदर व्यक्त करूनही त्यांचं सूक्ष्मात जाणं, अतींद्रिय होणं बाबांना पटत नाही.

 ‘जग उड्डाण घेत असता

 अजूनही तुझी प्रज्ञा स्थितच का?'

 असा प्रश्न करून स्पष्ट बजावतात

 ‘स्थितप्रज्ञ नको आहेत आज

 आकाशगामी प्रज्ञामती हवे आहेत आता

 ‘पंखांना क्षितिज नसते' कवितेतील हा संवाद म्हणजे बाबा आमटेंच्या विचार स्पष्टतेचा दाखला. कवीचं तत्त्वज्ञान यातून स्पष्ट होतं. धर्म, अध्यात्मासारख्या गोष्टी अफूची गोळी असते तशी व्रतबद्धतेची शृंखलाही असते ती. ती माणसास आत्मवंचक बनवते. त्यामुळे माणूस अभागी, अभावपूजक होतो. माणसापुढे आदर्श असले पाहिजेत, ब्रह्मांड कवेत घेऊ पाहणा-या व्हेलेंटिना तेरेश्कोव्हा, कॉनरॅड हिल्टन यांचे उदाहरण देऊन माणूस विज्ञाननिष्ठ जोवर होणार नाही तोवर तो ‘आनंद पक्षी' होणार नाही, हे बाबा आमटे या कवितेत निःशंकपणे समजावतात. ही कविता नव्या मनूचं आवाहन होय. या आवाहनाला आकाशभेदी कर्तृत्वाचा अर्थ आहे. गाभा-यात करंजीच्या तेलाचे दिवे जाळून युगे गेली... माणसाच्या आत्म्याचे घर उजळले नाही मग विश्वाचे घर कसे उजळणार? असा प्रश्न करणारी ही कविता मुळातून वाचणे यासारखा दुसरा अनुभव नाही.

 उत्तरवाहिनी’ रचना म्हणजे गंगा विवरण! वरील कवितेच्या पार्श्वभूमीवर ‘ज्वाला आणि फुले'तील ही कविता गंगेपेक्षा श्रमगंगा कशी श्रेष्ठ ते सांगते. या कवितेत उद्याच्या श्रमयुगाचे स्पंदन आहे. यात श्रमतंत्राचा विस्तार आहे. विध्वंसाजागी विधायक बीजे पेरणारी श्रमगंगा व श्रमवीर हवे आहेत आज असे सांगणारी ही कविता वाढत्या लोकसंख्येवर श्रमानेच विजय मिळवता येईल, गंगाप्राशनाने नाही, हे पटवून देते. 'वीज वैराणातून फुलवावयाचे आहेत सौभाग्याचे द्राक्षमळे' म्हणत बाबा आमटे सांगतात - ‘गोगलगाईच्या

गतीन साथीला आलेले दैन्य पळवायचे असेल तर अणुयुगातील नवतंत्रांचे हरणटप्पे हवे आहेत. त्यासाठी ते आनंदवनातील कुष्ठपीडितांचे सामर्थ्य दाखवून माणसास कृतिप्रवण करतात.
 पुढे जाऊन मग ते 'वधस्तंभाच्या छायेत' मध्ये कुष्ठपीडितांच्या पुनर्वसन कार्यामागची आपली भूमिका समजावतात. बाबा आमटेंच्या लेखी अजंठावेरूळमधील पाषाणांच्या भग्न मूर्तीतील सौंदर्यापेक्षा हाताची बोटे, तळवे झडल्याने निर्माण होणारे कारुण्य अधिक महत्त्वाचे असते. 'मरण भोगुनि हसत राहती ते मृत्युंजय' म्हणून त्यांना कुष्ठपीडित धडधाकट माणसापेक्षा जास्त आश्वासक, पराक्रमी भगीरथ वाटतात. मी माझ्या ऐन उमेदीत बाबा आमटेंकडे सोमनाथच्या जंगलात बोटं झडलेली दोन माणसं दोन तळव्यात प्रहार पकडून काळ्याकभिन्न पत्थराला पाझर फोडत विहीर खोदताना पाहिली आहेत... त्या दिवसापासून मी स्वतःला स्वस्थ बसू दिलेले नाही. माणसास अस्वस्थ आत्मा बनविणारी ही कविता सामाजिक वधस्तंभावरील फाशीपासून तुम्हाला वाचवते. बाबा आमटेंच्या कविता शिळोप्याचे वाचन म्हणून वाचता येत नाही. कारण संघर्षातील येणा-या निराशेतही त्यांचं चालत राहणं... ‘एकला चलो रे'चं कृतिशील तत्त्वज्ञान असतं.

 ‘ज्वाला आणि फुले'मध्ये एकलव्य, विश्वामित्र, प्रॉमिथियससारखी मिथक बनून येणारी चरित्रं भेटतात तसेच महात्मा गांधी, आचार्य विनोबा, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या रूपाने समाज पुरुषही! जोडीला रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी, नित्शे भेटतात. अन् त्यांच्याबरोबर येणारे वाद, विवाद, विचारधारा, तत्त्वज्ञानही! बाबा आमटेंचा ‘एकलव्य' हा केवळ कवितेचा नायक म्हणून येत नाही. तो असतो युगाचा प्रतिनिधी. ज्ञान नाकारल्या गेलेल्या शंभूकाचा तो सहोदर असतो तसा पाच हजार वर्षं शिक्षण नाकारलं गेलेल्या दलित, वंचित वर्गाचाही तो प्रतिनिधी बनून येतो. जन्मजात प्रतिष्ठेची कल्पना झुगारत ‘मदा यतुं पौरुषम'ची तो मोहर उठवतो. जन्मवान श्रेष्ठ की ‘कर्मवान असा प्रश्न विचारतो. स्पर्धेचं आव्हान स्वीकारतो नि प्रत्येक स्पर्धा जिंकतच राहतो. घटपटांची उतरंड नाकारतो. ‘पाप्याचं पोर' म्हणवून घेणं ठोकरतो. ज्याची स्पर्धा न्यूटन, आर्किमिडजशी... त्याला जिंकणार कोण? असं स्फुल्लिंग चेतवणारी ही कविता नकारघंटा न होता एक क्रांतिगीत बनून जाते.

 ही कविता एका अर्थाने बाबा आमटे यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान

बनून पुढे येते. बाबा आमटे यांचा पिंड पोसला तो महात्मा गांधी, साने गुरुजी, गौतम बुद्धाच्या करुणेवर. पण ही करुणा अश्रू घेऊन जन्मत नाही. हा कवी अश्रूच्या सागर आटवायला निघालेला आधुनिक अगस्ती होय. त्याला या गोष्टीचं मोठं दुःख आहे की या तिघांच्या जीवन दर्शनाचा पराभव त्यांच्याच अनुयायांनी केला. बाबा आमट्यांना विचारशरण अनुयायी नकोत. त्यांना श्वेत, प्रतिबद्ध कार्यप्रवण कार्यकर्ते जे स्वकर्तृत्वावर जग जिंकतील... ‘एकलव्य' त्या कांक्षेचं गर्वगीत होय. बाबा आमटे आपलं जीवन एकलव्याप्रमाणे असणारी ‘एकान्त साधना' मानतात. संगराचं निबीड अरण्य त्यांच्या पाचवीलाच पुजलं होतं. इतक्या टोकाच्या विधायक कार्याला स्थानिक विरोधाचं ग्रहण ठरलेलं होतं. ते पचवत ते विधायकता जारी ठेवतात, म्हणतात... ‘निबिडातून नवी वाट घडवण्याचे जीवनाचे आव्हान मी स्वीकारले आहे.'

 बाबा आमटे यांना ‘विश्वामित्र' आपला अंतर्यामी आवाज वाटतो. विश्वामित्र होतं 'भुकेचं झाड.' त्याला संतोष नव्हता. त्यानं एकामागून एक कांक्षा सिद्ध केल्या... त्यात पतन... पराभवही त्याला पत्कारावा लागला. त्याचं बाबा आमटे गौरवीकरण करतात नि म्हणतात ‘विश्वामित्रांच्या महापतनालाही असते मेनकेचे लावण्य' हे पतनाला येणारं सौंदर्यसृष्टीच्या निर्मितीच्या ध्यासातून आलेलं असतं हे आपण विसरतो. ज्याची स्पर्धा स्वतःशी त्याला जिंकणार कोण? अशी अपराजेय सामाजिक महत्त्वाकांक्षा घेऊन तुम्ही काय करू पाहाल तर परिवर्तनाचा एक तुकडा, तुमच्या हाती येईल. कारण इथं बदल हे गनिमी विरोधाला हुलकावण्या देऊनच मिळवावे लागतात, हे आपलं समाज वास्तव बाबा आमटे ‘ज्वाला आणि फुले' मधील अशा व्यक्तिरेखांतून आपणास समजावतात.'

 ‘ज्वाला आणि फुले' वाचत असताना बाबा आमटेंच्या वाचन, व्यासंगाचा परीघ किती व्यापक होता हे सतत प्रत्ययास येत राहातं. पुरोहित ते पोप, धनुष्य ते स्कायस्कॅपर, मनू ते कॉनरॅड, सावित्री ते तेरिश्कोव्हा, वरोरा ते वॉर्सा, गांधी ते नित्शे, झांजीबार ते बॅस्टिल, भारतीय ते मे फ्लाय संस्कृती असं चतुरस्र वाचन त्यांचं ! भारतीय समाज, संस्कृतीच्या प्रश्नांवर मांड ठोकून उभारलेला हा सामाजिक दर्यावर्दी. त्याची आकांक्षा मात्र ब्रह्मांड कवेत घ्यायची! बाबा आमटे कधी कूपमंडूक विचार करूच शकले नाहीत. त्यामुळे कुटुंबनियोजनात स्त्रियांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्यांना विरोध करणारं पोपचं वक्तव्य येताच त्यांना ग्रीक मायथॉलॉजीतील प्रॉमिथिअस

आठवतो. त्यानं मानव कल्याणार्थ स्वर्गातून अग्नी चोरून आणला होता. शिक्षा म्हणून त्याचा देह अग्यारीवर गिधाडांना खाण्यासाठी टाकला जातो. दिवसभर गिधाडे लचके तोडत राहायचे. रात्रीत तो पूर्ववत राहायचा. मनुष्य कल्याणार्थ देहत्याग करणारा प्रॉमिथिअस कुठे नि माणसास अपत्यांच्याच गतीने दारिद्रयाशी सडत ठेवणारे पोप कुठे। ‘पोप, प्रॉमिथिअस व गोळी कविता बाबा आमट्यांच्या आधुनिक, पुरोगामी विचारांचं संचित म्हणून सांगता येईल. लैंगिक संबंधांचा 'खेळ' ज्यांनी खेळलाच नाही त्यांनी त्या खेळाचा ‘अंपायर' होणं किती हास्यास्पद? -

 जो खेळ तुम्ही जीवनात खेळलाच नाही

 त्याचे नियम कसे तयार करता तुम्ही?

 आणि ज्याचे नोटेशन तुम्हाला ठाऊक नाही

 ते संगीत आम्हाला का ऐकवता बरे ?

 रिक्षा ओढून थकलेल्या ‘अर्धमानवाच्या जीवनात लैंगिक सुखाची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही त्यांच्या वंशी जाल. शरीर, मनाच्या अनिवार ऊर्मी ‘वार' लक्षात ठेवीत नाही नि ‘पिरियड' ही पाळत नाही हे चार्टर्ड प्लेनमधून फिरणा-याला कसे समजणार? यांसारखे प्रश्न वा 'Sex is mighty' (Not food) सारखं जीवन वास्तव हेच माणसाचं जगणं असतं. नैतिकतेच्या भ्रामक चौकटी कालबाह्य असल्याचे सांगत बाबा आमटे नैतिकतेची नवी व्याख्याच करतात-

 ‘आपले भोग व त्याग

 यात निवडीचे हे स्वातंत्र्य

 समतोल ढळू न देता साधणे

 हीच खरी नैतिकता आहे.'

 याचा प्रतिवाद कोण नि कसा करेल? ज्यानं अनवाणी, अर्धपोटी आयुष्य जगलं त्याची वकिली करणारा हा युक्तिवाद बाबा आमटे मुळात व्यवसायाने वकील असल्यानेच करू शकतात, हे विसरता येणार नाही. ‘प्रकृती, विकृती फार काळ टिकू देत नाही' हा निसर्गनियम सांगायलाही हा कवी विसरत नाही.

 ‘पंखांना क्षितिज नसते' कवितेत विनोबांशी केलेला युक्तिवाद असाच बिनतोड होता. अध्यात्मातून तुम्ही विज्ञान सांगितलं, आता विज्ञानातून अध्यात्म निर्माण करा,' असं केलेलं आवाहन म्हणजे घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत नसतात हेच सांगणं ना? बाबा आमटे आपल्या

‘एकलव्य'ला एकाकी महामानव म्हणून चित्रित करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की, अरे, सॉक्रेटिस, कोपर्निकस, डार्विन, ज्ञानेश्वर, तुकाराम, गांधी, साने गुरुजी सारेच एकाकी महामानव होते. अत्युच्च मनस्वीता पेलणं हे महामानवांचं त्यांनी रेखांकित केलेलं लक्षण, ठरवलेली कसोटी... त्यावर वरील सर्वांना पारखणं शक्य आहे. अशाच परंपरेत ‘गांधी : एक युगमुद्रा' ही कविता ठेवावी लागेल. महात्मा गांधींच्या किती युगमुद्रा बाबा आमटे ‘ज्वाला आणि फुले'मध्ये अधोरेखित करतात. महात्मा गांधींच्या युगाचा चेहरा, हिमनग, कलाकार, जहाज, हिकमती माणूस, नंगा फकीर, संतमानव, काळावर उठलेली तप्त मुद्रा असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व! महात्मा गांधींच्या सर्व जीवन, कार्य, विचार, व्यवहारात एक 'Vergin line of Action होती असं आपण कवितेत वाचतो तेव्हा बाबा आमटेंच्या प्रतिभेच्या विजेनं चकित व्हायला होतं. महात्मा गांधींवर वि. स. खांडेकरांनी गांधी जन्मशताब्दी वर्षात विपुल लिहिलं. त्याचे संकलन, संपादन करून मी ‘दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी' असं पुस्तक सिद्ध केलं, तेव्हाही माझ्या हे लक्षात आलं होतं की, महात्मा गांधी आपल्या प्रत्येक विचार, व्यवहारात ‘विवेकाची लक्ष्मणरेषा' ठरवत नि पाळत. गांधींचं मोठेपण या 'Vergin line of Action' मध्येच होतं, हे वाचकास पटतं.

 ‘त्याने प्रथम मिठाच्या पुडीला हात घातला

 आणि मग एक साम्राज्य

 मिठाच्या सातासमुद्रापलीकडे फेकून दिले.

 त्याने सुतावरून सुरुवात केली

 आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला.

 याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि

 एक देशच्या देश बांधून दाखवला.'

 म्हणून बाबा आमटे आपलं आकलन स्पष्ट करतात तेव्हा महात्मा गांधी हे त्यांच्या विचार, वृत्तीचे अधिष्ठान कसं होतं, ते सिद्ध होतं.

 तीच गोष्ट लाल बहादुर शास्त्रींची. “जय हे, सामान्य महामानव' मध्ये बाबा आमटेंनी शास्त्रीजींची गायलेली थेरवी त्यांच्या प्रती वाहिलेली श्रद्धासुमने होत. लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या कविता अशीच श्रद्धा-सुमने होत. ‘गांधी : एक युगमुद्रा' ही याच पठडीतील. एडवर्ड वॉक या पाश्चात्य विचारवंताने एके ठिकाणी लिहिलंय, ‘पहाड, सागर आणि जीव ओतून

आपले काम करणारा कोणताही माणूस या जगातल्या तीन थोर गोष्टी होत. त्यांच्या शक्तीगर्भतेला परिमाण नाही.' बाबा आमटे लालबहादूर शास्त्रींना या कसोटीवर ‘सामान्य महामानव' म्हणजे सामान्य असून महामानव वाटतात. एका शास्त्रीचं शास्ता (शासक) होणं, हवं तेव्हा त्याचं शस्त्रधारी नि शांतिदूत होणं, लौकिक उंची कमी असून अलौकिकतेनं प्रतिष्ठेचं शिखर सर करणं, अन्नान्न दशा झालेल्या देशाला दिश देणं... किती मोठा माणूस हा - सामान्य तरी असामान्य!

 ‘मी जवाहरलाल' या संग्रहातलं एक मनस्वी काव्य! ही कविता म्हणजे नेहरूंच्या भ्रमभंगाचं शोकगीत. या मातीला दिलेलं अभिवचन आपण पूर्ण करू न शकल्याचं शल्य नेहरुंनी आपल्या अस्थी, राख गंगेत न टाकता शेतात टाकण्याची इच्छा व्यक्त करून व्यक्त केली होती. ‘हिंदी-चिनी भाई भाई'च्या सहअस्तित्वाचा चीन आक्रमणाने झालेला अंत, देशांतर्गत उद्भवलेली विविध शीतयुद्धे या सर्वांत हा गुलाब होरपळला... कवितेतील प्रत्येक ओळ म्हणजे अनिवार शोकतप्त भावनांची स्वरलिपी! ‘संतांचे मृत्यूपत्र' काव्य तुकडोजी महाराजांच्या मृत्यूपत्राला समर्पित काव्य! तुकडोजींची ‘ग्रामगीता' कवीला ‘टेस्टामेंट'पेक्षा कमी वाटत नाही. तुकडोजी महाराजांचे महत्त्व कवीला वाटतं कारण त्यांनी सामान्य माणसास समाजसक्रिय केलं. सामान्य माणूस समाजाची 'Front Line of Action' होणं हे त्यांच्या भक्ती संगठन कौशल्याचं फलित वाटतं. देहदान, नेत्रदान, हृदयदान इतकंच नव्हे तर शाबूत असेल ते समाजास देण्याची शपथ साच्या समाजाकडून वदवून घेणारा हा संत स्वतःच रोगग्रस्त होऊन विकल, जर्जर होतो तरी झटण्याचं समाज जहाज सोडत नाही याचं कवीला कोण अप्रूप? अशा सर्वातून ते वाचकास थोरांची थोरवी सांगत सामान्यांना असामान्य बनविण्यासाठी आपली प्रतिभा खर्च करतात.

 ज्वाला आणि फुले'च्या कितीतरी कविता सामाजिक प्रश्न, कृतिप्रवणता, श्रम माहात्म्य, शेतकरी, श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ, सोमनाथ श्रम संस्कार छावणी, घामाचे महत्त्व विशद करणा-या आहेत. या संदर्भात जिथे आत्म्याचेही अन्न विकेल', '... या सीमांना मरण नाही!' ‘वसुंधरेचा पुत्र', ‘श्रम-सरितेच्या तीरावर' सारख्या कविता लक्षात येतात. पण बाबा आमटे ‘आदिमानव उठला आहे' मध्ये ते अण्वस्त्राचा प्रश्न हाताळतात. सागाड्यांचं शहर' हे काव्य औद्योगिकरणातील भयावह स्थिती चित्रित करतं. एक खिंड मी लढवीन'मध्ये ते तमाम ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतरही

समाजकार्यासाठी प्रवृत्त राहण्याचे आवाहन करतात. असं विषय वैविध्य घेऊन येणारं ‘ज्वाला आणि फुले' सामाजिक प्रश्नांच्या ज्वालांची दाहकता दाखवतात. जहाल कवितांतूनही समाज मांगल्याची भावना बाबा आमटे तसूभरही कमी होऊ देत नाही हे विशेष! या रचनांतून ‘सडलेल्या पंखांना उडण्याचा ध्यास लावायची त्यांची तळमळ प्रत्येक ओळीत प्रतिबिंबित आहे. ‘झुंजत राहा, ढासळू नका'चा संदेश देणारं हे काव्य-

 फुलांचे व मधमाश्यांचे नाते आहे

 ते रक्ताचे व जळवांचे नाते नाही

 म्हणत मनुष्यसंबंधाचं महत्त्व सार्वकालिक असल्याचं ते बिंबवतात. ‘आनंदवन' हे बाबा आमटेंचे कार्यकर्तृत्व! त्याची महती त्यांच्याच शब्दात सांगायची तर-

 'येथे नांदतात श्रमर्षी, या भूमीला शरण नाही

 येथे ज्ञान गाळते घाम, विज्ञान दानव शरण नाही

 येथे कला जीवनमय, अर्थाला अपहरण नाही

 येथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही'

 वाचत असताना आपल्या निष्क्रियतेची शरम आल्यावाचून राहात नाही. श्रम, जिद्द, अभाव, उपेक्षा यांचं वरदान ज्यांना लाभतं तेच काही करू शकतात. यातनाहीनांना पुरुषार्थ करता येत नाही. अधिक करायचं तर (आधी) अधिक, सोसावं लागतं' सारखी या कवितांमधील सुभाषितं केवळ शब्दांची फेक नसते, तर संघर्ष भोगण्यातून उडालेल्या त्या ठिणग्या असतात. त्या वाचकांत क्रियाशीलतेचा वन्ही पेटवतात... त्याला प्रज्वलित, प्रभावित करतात म्हणून ज्वाला आणि फुले' वाचलेला माणूस कधी स्वस्थ झोपू शकत नसतो.

 “ज्वाला आणि फुले' काव्य वरील तपशिलांमुळे तर महत्त्वाचे खरेच. पण त्यापलीकडे जाऊन या काव्याची काही बलस्थाने आहेत ती वाचताना लक्षात येते की, ही कविता ज्या प्रदेशात फुलली त्या मातीला मिळालेल्या निसर्ग उपेक्षेमुळे व (राजकीय दुर्लक्षामुळेही असेल कदाचित!) इथले सारे कवी असामान्य कलंदर, कलाकार, बाबा आमटेंच्या निमित्ताने मला आठवले ग्रेस, सुरेश भट नि आता वसंत आबाजी डहाके हेसुद्धा. या सा-यांच्या कवितेतलं कला, विचार, बंडाचे निशाण आपण नाही खांद्यावर घेऊ शकत. विदर्भाचा अनुशेष आर्थिक, राजकीय, सामाजिक असू शकेल. प्रतिभेच्या प्रांतात सरशी त्यांचीच. त्या मातीतच रोखठोक प्रश्न करायचं धारिष्ट्य

असावं. त्याचंही एक थेट सौंदर्य आहे. ते मला अधिक लोभस वाटतं ते पश्चिमेकडील (युरोपातील नव्हे महाराष्ट्रातील) आमच्या लेचेपेचेपणामुळे. जीवनाबद्दलची कलासक्त विजिगीषू वृत्ती ही या ज्वालांतही आहे नि फुलांतही. विचारस्पष्टता व पारदर्शिता तशीच आकर्षणारी मिथक म्हणजे इतिहास नि दृष्टांत नसतो तर वर्तमानास चेतवण्याचे प्रचंड सामर्थ्य असते, हे ज्यांना आजमावून पाहायचं आहे त्यांनी या कविता एकदा समजून घ्यायलाच हव्यात. पण त्यासाठी एक पूर्वअट आहे. तुम्ही स्वतःला जगापासून स्वीच ऑफ करून घेतलं पाहिजे. त्याशिवाय ज्वाला आणि फुले' ऑनलाईन होतच नाही. या कवितेत पारंपरिक प्रतीकं फार कमी आढळतात. इथं तुम्हाला विज्ञानपंखी मनुष्य, निर्मितीचे वेद, ज्वालेचा आनंदपक्षी, श्रम युगाचे निःश्वास (कळ्यांचे नाही!), दिक्कालाचे जख्खड, अजाण थरथर असं सारं कल्पनातीत भेटत राहातं अन् तुम्ही शहारत राहाता. कारण या कवितेतलं सारं अनुभवविश्व, भावविश्व, प्रश्न तुमच्या सुरक्षित कप्पेबंद वातानुकूलित समाज परीघाबाहेरचे! हे अनवाणी जग, इथं अर्धमेली माणसं जगतात, त्याचं जीवन तुम्हाला उसवतं. ज्यांना जागतिकीकरणातील आपल्या स्वस्थ जीवनातलं वैयर्थ समजून घ्यायचा आहे त्यांना यातलं सांगाड्यांचं शहर' डोळ्याखालून घालायलाच हवं. लंच आणि डिनर डिप्लोमसीमध्ये एक भुकेचं झाडही असतं, याचं भान देणारी ही कविता तुम्हाला स्वतःकडे नि समाजाकडे पाहण्याची एक विधायक दृष्टी देते. त्यापेक्षा सोशल नेटवर्किंगमध्ये मग्न असलेल्यांना ही कविता सोशल शेअरिंगचा वस्तुपाठ, संस्कार देते. ते मला अधिक महत्त्वाचं नि कालसंगत वाटते.

 या कवितेचं सौंदर्य, लक्स, डिलक्स अजिबात नाही. या कवितेला काव्यशास्त्राचं कोणतंच माप बसवता येणार नाही की मोजपट्टीही लावता येणार नाही. 'वसुंधरेचा पुत्र असलेल्या शेतक-याचं दुःख मोजणारं तापमापक कोणत्या सौंदर्यशास्त्रात सापडणार? पाटणकर, पाध्ये, कुलकर्णी यांची सौंदर्य प्रतिमाने शरद जोशी नि राजू शेट्टींच्या आंदोलकांनी केव्हाच उखडून टाकली आहेत. साहित्याला आता सौंदर्यशास्त्रापेक्षा समाजशास्त्र, मानसशास्त्र, हवामानशास्त्रांनी निर्माण केलेल्या नव्या सामाजिक पर्यावरणाची गरज आहे, हे जोवर आपण समजून घेणार नाही तोवर ‘ज्वाला आणि फुले'चं सौंदर्य नाही आपणास समजणार! सोमनाथच्या आंतरभारती श्रमसंस्कार छावणीत बाबा आमटे म्हणाले होते, ‘मन का कुष्ठ शरीर के कुष्ठ से भयंकर होता है।' साहित्याची स्थिती या वाक्यावर तपासली की

काय हाती येतं? आपलं समग्र काव्य नि काव्यशास्त्र बदलू मागणाच्या या कवितेचं महत्त्व मला अशासाठी वाटतं की, ही कविता नवी रचना करू मागते आहे. ही कविता गद्यातही काव्यानुभूती देते. नवी शब्दकळा घेऊन येते. ती वैश्विक भाष्य करते. या अंगांनी पण तिचं अभिजात रूप (classicness) मूल्यांकित करता येईल. गांधीवाद, मार्क्सवाद, हिंदुत्ववाद, फॅसिझम या सर्वांपलीकडे असलेला विशुद्ध मानवतावाद घेऊन येणारी ही कविता म्हणून मला वैश्विक वाटते. दुःख, दैन्य, उपेक्षेला जात, धर्म, देश, प्रांत, भाषा नसते, असतो फक्त चेहरा. या संग्रहात ‘क्रांतीची पावले शीर्षकाची सुंदर कविता आहे. ती क्रांती करणारे अनेक देश व इझम (वाद/ विचार) चित्रित करते व शेवटी इस्रायलचा किबुत्झ समजावते अन् म्हणते क्रांती सीतेसारखी आहे. तिचे चार चेहरे असतात - अत्याचाराचा, समतेचा, बंधुतेचा, स्वातंत्र्याचा. पण त्यापलीकडे एक चेहरा असतो निर्मितीचा. या नव्या चेह-याची गरज सांगणारी ही कविता 'Hands to make, not to break'चं तत्त्वज्ञान सांगते अन् म्हणते 'वनवासी रामाची साथ करणारी क्रांतीची पावले म्हणून सीतेसारखी असतात... मौन, सक्रिय, समिर्पित, एकनिष्ठ आणि तरी अप्रसिद्ध! माध्यमांच्या झगमगाटात ‘मरणं' हा इव्हेंट होतो नि ‘जगणं' रकान्यात जातं याचं भान देणारी ही कविता.

 दुस-या महायुद्धानंतरही, त्याच्या भीषण परिणामानंतरही आपण अण्वस्त्रांचे कारखाने उभारत राहिल्याचं शल्य संवेदनशील कवी म्हणून व सजग सामाजिक कार्यकर्ता म्हणून बाबा आमटेंना होतं. दुस-या महायुद्धानंतरचं जग पंचखंडी न राहता ते द्विखंडी झालं. एक श्वेत खंड तर दुसरा अश्वेत... कृष्ण... काळा खंड. म्हणजे सारं अविकसित, विकसनशील जग विशेषतः आफ्रिका, आशिया, प्रगत राष्ट्रे शस्त्र शक्तीवर निःशस्त्र, गरीब देशांना गुलाम बनवू पाहातात याचं शल्य बाबा आमटे यांनी 'आदिमानव उठला आहे' कवितेत फार प्रभावीपणे मांडले आहे. ते वाचत असताना बाबा आमटेंचं आंतरराष्ट्रीय प्रश्न व राजकारणाचा व्यासंग, आकलन लक्षात येतं. तीच गोष्ट ‘ग्रस्त स्वातंत्र्यास सलामी'मध्ये प्रत्ययास येते. झेकोस्लोव्हाकियावर रशियाने केलेल्या आक्रमणानंतर व्यथित, विकल होऊन लिहिलेली ही कविता, साम्राज्यवादाचा पराभव करण्यासाठी जन्मलेल्या कम्युनिस्ट राजवटींनी आक्रमक होणं बाबा आमटेंसारख्या पंचशील पुरस्कारणाच्या कवीला पटणारं, मानवणारं नव्हतं. त्याचा प्रखर शब्दांत विरोध करताना ते म्हणतात-

 साम्यवादाच्या वेदीवर हंगेरीचा बळी घेऊन

 हा नरभक्षक संतुष्ट होईल असे वाटले होते

 पण नवसंस्कृतीच्या गप्पा मारणारा हा जुनाच

 नरभक्षक अजून माणसाळलेला नाही.

 पण रणगाड्यांनी स्वातंत्र्य कधी गाडले जाते काय?

 प्रश्न विचारत ते ‘जग मिटल्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही' असे स्पष्ट शब्दांत ठणकावतातही.

 अतिमानव आणि आदिमानव हा वर्तमानाचा खरा संघर्ष आहे, असं बाबा आमटेंना वाटतं. अतिमानवाचे परत फिरणे' कवितेत ते जगातल्या सर्व विचारधारांची चिकित्सा करतात. देववाद, दैववाद, बुद्धिवाद, अस्तित्ववाद सा-यांपेक्षा त्यांना मानवतावादच श्रेष्ठ वाटतो. यातूनही या कवीची वैचारिक बैठक स्पष्ट होते. सुख, सामर्थ्य, सत्ता, सौंदर्य सान्यांचं मानवी जीवनात महत्त्व असतं हे खरं आहे, पण जग संघर्षमुक्त करायचं असेल तर सुताराचं पोरच ते करू शकेल. कारण त्याचं साधेपण हेच त्याचं सामर्थ्य असतं, असं समजावत ते अहिंसेची शिकवण श्रेष्ठ ठरवतात.

 ज्वाला आणि फुले' हे पुस्तक मला एकविसाव्या शतकातील वाचकांनी कोळून प्यायलं पाहिजे, हे अशासाठी वाटतं की, यातील जे काव्य, संगीत, प्रश्न, विचार आहेत ते या काळाला नवं बळ नि दिशा देणारे वाटतात.

 एकोणिसाव्या शतकात आदिमानव गुलाम होता

 विसावे शतक हे त्याच्या मुक्तीचे शतक आहे

 आणि एकविसाव्या शतकात तो जगाला तारणार आहे

 यातला 'तो' म्हणजे ईश्वर नव्हे. एकविसाव्या शतकाचा तारणहार हलधर, शेतकरी, कुष्ठपीडित, दलित, वंचित, उपेक्षित स्त्रियाच आहेत कारण त्यांचे जीवन श्रमसरितेच्या काठावर एक नवी श्रमसंस्कृती, एक नवं श्रमशास्त्र, एक नवं श्रमतंत्र उभारत आहे. ते त-हेत-हेचे सामाजिक कंस काढते होतील, कारण त्यांना हे जग ‘कंसमुक्त' हवे आहे-

 ‘संप्रदायांचे कंस आणि वादांचे कंस

 वर्णीचे कंस आणि वर्गाचे कंस

 राष्ट्रांचे कंस आणि संस्कृतीचे कंस

 माणूस माणूस अलग करणारे छोटे मोठे कंस'

 दाखवत बाबा आमटे म्हणतात तीच कंसमुक्ती आज हवी आहे. बाबा आमटे द्वापर, त्रेता, कलियुगानंतर स्वतःचं कलियुग ‘माझे कलियुग

कवितेत निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त करतात तेव्हा इतिहास नाकारत एका नव्या भविष्यास लक्ष्य करतात आणि म्हणतात -

 शिवधनुष्याचा महिमा गाणारे

 ते उचलू शकत नाही

 आणि इतिहासात रेंगाळणारे

 इतिहास घडवू शकत नाही

 यातून हा नवा विश्वामित्र नवी सृष्टी निर्माण करू पाहतो, हे स्पष्ट होतं. या नवसृष्टीत ‘मे फ्लाय संस्कृती'स थारा नाही. लक्तर संस्कृतीस तिथं मज्जाव असेल. सत्त्व व रक्तशोषणास तिथं बंदी असेल. विशाल ड्रेनेज (पतनाचे) तिथे वाहणार नाही. लोखंडी हृदयांची तिथे वस्ती नसेल. डांबरी नसा तिथं असणार नाहीत. विकृतीचे बेशरम आवाहन तिथे असणार नाही (जाहिराती). गुडघ्यात मुंडी खुपसून जगण्याचं अरिष्ट निर्माण करणारं कंपल्शन तिथं नसेल. संज्ञाशून्य संस्कृती म्हणजे मे फ्लाय संस्कृती -

 ‘‘मे फ्लाय' ही एका उडणाच्या किड्याची जात आहे.

 त्यांना तोंडही नसते आणि पोटही नसते!

 फक्त विलासी इंद्रिये त्यांना असतात

 रतिक्रीडा हेच त्यांच्या अस्तित्वाचे महाकारण.

 तोंड आणि पोट यांच्यासाठी

 या मे फ्लाय संस्कृतीलाही

 आपल्या हातांनी काही करावे लागत नाही.

 हे वाचताना हा कवी क्रांतदर्शी, भविष्यवेधी होता याची खात्री पटते. कारण शब्द लिहिले गेले तेव्हा जागतिकीकरण' जन्मले नव्हते. ज्या कवी, द्रष्ट्यास काळाची पावले ओळखता येतात तोच भविष्यलक्ष्यी ना? ‘ज्वाला आणि फुले' वाचायचं यासाठी की, ते आपणास जगाकडे पाहण्याची दृष्टी, विचारधारा, संस्कार देतं ती सम्यक असते नि पुरोगामी. ती मानव कल्याणाची असल्याने मूलतःच वैश्विक असते, कारण तिथं छोट्या आडोश्यांना थारा असत नाही.

 हे पुस्तक माझ्या ख-या कमाईची पहिली खरेदी होती. ती लेवून मी जगत आल्याला चाळीस वर्षं उलटली. साठी उलटली तरी बुद्धी पालटली नाही. मूल्य संघर्षांच्या माझ्या जीवनात उद्ध्वस्त करणारे क्षण, प्रसंग आले नाहीत असे नाही. चांगलं काम करताना, जगताना विरोध अटळ असतोच. तो विरोध हीच तुमच्या चांगलेपणाची दाद, पावती असते, असं आता

माझ्या लक्षात येऊ लागलं आहे. मी अनेकदा धनुष्य खाली ठेवलं पण टाकलं नाही; कारण जीवनात चांगल्याचं समर्थन करणारा मोठा समाज आहे. तो नसेल संघटित, व्यक्त होणारा, मुठी आवळणारा पण त्याच्या मौनातून, निष्क्रियतेतून मला बळ मिळत गेलं. कारण ते रेषेपलीकडील विरोधाच्या जमेत नव्हते. ज्यांना कुणाला असं जगणं शरण करायचं आहे त्यांच्यासाठी ज्वाला आणि फुले' न्यू टेस्टमेंट, नवगीता, आधुनिक बायबल, पुरोगामी कुराण आहे. माझ्यासाठी हरणाच्या क्षणांना मृत्युंजयी करणारं हे प्रेरणागीत ठरत गेलं. तुम्हासही त्याचं वरदान लाभेल तर नव्या जगात “ज्वाला' असणार नाहीत, असतील तर फुलेच ‘फुले'!

▄ ▄