शब्द सोन्याचा पिंपळ/दिसामाजी काहीतरी लिहावे

दिसामाजी काहीतरी लिहावे



 काही पुस्तकं तुमचं जीवन बदलून टाकतात. ज्यांनी 'दासबोध' वाचला असेल त्यांना हे पटेल. त्यातला देव, मोक्ष, आत्मज्ञान मला पटत नाही. पण या ग्रंथात माणसाचं चरित्र नि चारित्र्य घडविण्याची विलक्षण तळमळ आढळते. 'मूर्ख लक्षण दशक' वाचा. तुम्ही उत्तम लक्षणी व्हाल. पढतमूर्ख व्हायचे नसेल तर दासबोध वाचायलाच हवा. ‘मध्यस्त लिहिण्याची करणी शिकवणारा हा ग्रंथ एकदा तरी वाचायलाच हवा. असेच एक पुस्तक आहे खलील जिब्रानचे. ‘प्रोफेट'. हे ‘जीवनदर्शन' नावाने मराठीत उपलब्ध आहे. जीवनाचा सर्वांगी विचार जे पुस्तक समजावते. तसेच हे पुस्तक आहे ‘कुरल'. तमिळ भाषेतील तिरुवल्लूवर कवीनं लिहिलंय ते. मराठीत साने गुरुजींनी त्याचे भावविभोर भाषांतर केले आहे. ही नि अशी पुस्तके असतात जीवनऊर्जेचे अखंड स्रोत! ती तुम्हाला वाचायला, लिहायला शिकवतात तशी जगायलाही!
 जगायचं कशासाठी हे 'बायबल' जितकं चांगलं शिकवतं, तितकं अन्य धर्मग्रंथ नाही. कुराण' म्हणजे कर्मठपणा असं मानण्यात काय अर्थ आहे? मनुष्य दुराचारी होऊ नये म्हणून कुराणातील आयते जी तळमळ व्यक्त करतात ती घ्यावी. बाकी सोडून टाकावं. साहित्य वाचत असताना कबीरानं सांगितलेली सत्शील वृत्ती मला नेहमीच मार्गदर्शक वाटते. कबीरांनी आपल्या काव्यात सत्शील माणसास ‘साधू' म्हटलं आहे. साधू सुपासारखा असतो. कचरा, खडे तो फुकून, फेकून देतो आणि जीवनोपयोगी आपल्याकडे ठेवतो.

 महात्मा गांधींनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातली सर्वांत महत्त्वाची म्हणजे, ‘झोपण्यापूर्वी क्षणभर घालवलेल्या दिवसाचा विचार

करा. 'एका छोट्या गोष्टीत जीवन बदलण्याची विलक्षण शक्ती सामावलेली आहे, हे गांधी वाचल्यावर समजतं. वाचायला मिळालं तर लिहायला हवं. लिहायचं तर दुसन्यांनी का? मीच का नाही ? लिहिता येणाच्या प्रत्येकाला एक गोष्ट नक्की करता येणं शक्य आहे. झोपण्यापूर्वी संक्षिप्त का असेना “दैनंदिनी' लिहिणं. हेच ते ‘दिसामाजी काहीतरी लिहावे.'

 जी माणसं रोज दैनंदिनी लिहिण्याचा क्रम पाळतात ती मोठी होतात. काळ गतिशील असतो. आजचं महत्त्व उद्या नसतं. स्मरण तर क्षणिकच असतं! स्मरण अमर व्हायचं, त्याचा इतिहास व्हायचा, वर्तमान बंदिस्त करायचा तर दैनंदिनीसारखं दुसरं साधन नाही. अॅना फ्रँकची डायरी वाचा. युद्ध किती क्रूर असतं ते समजतं. नियमित दैनंदिनी लेखन हे माणसास अंतर्मुख करते. असं लेखन माणसास निर्दोषत्वाकडे नेतं.

 पत्र लिहिणं आजच्या संपर्क साधन विकासामुळे दुर्मीळ होत चाललंय. ते संवादाचं, स्वतःला व्यक्त करण्याचं, विचारांची देवाणघेवाण करण्याचं मोठं साधन होतं. त्यात माणसाचं मन मोकळं व्हायचं. क्लेश दूर व्हायचं. पत्रलेखन बंद झाल्यापासून घरं रुग्णालयं बनू लागलीत. मनोविकार वाढू लागलेत. असंवादाची घरोघरची स्थिती पाहता एकत्र असूनसुद्धा एकांत जीवन घरोघरी जगलं जातं. त्यात एसएमएस, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुटच्या अल्पाक्षरी संवादानं माणसास हाय, हॅलो इथपर्यंत औपचारिक करून टाकलं आहे. एकाच घरातील दोन माणसं प्रत्यक्ष न बोलता मोबाईल संवाद करतात.

 या असंवादित समाजजीवनास छेद द्यायचा तर माणसानं दिसामाजी... रोज काहीतरी लिहायला हवं. नित्य लेखन गायकाच्या रियाजासारखं असतं. ते तुम्हाला मोकळं करतं. रोज लिहिणारे लेखक विश्वविख्यात होतात. सॉमरेट मॉम म्हणे रोज लिहायचा. नियमित अभ्यासिकेत असायचा. काहीच सुचलं नाही तर सह्या करत बसायचा. त्याच्या सह्यांच्या चिटोच्यांनी पण संग्राहक उत्तराधिका-यांना लक्षावधी डॉलर्स मिळवून दिले. हिंदीतील यशपालही असंच नियमित लेखन करीत. जगत असताना रोज नवे प्रश्न डोके वर काढत असतात. नियमित लेखन स्वविकास, स्वमार्गदर्शनाचं प्रभावी साधन असतं. जे लेखक झालेत ते लिहिण्याचा चाळा करीत राहिले म्हणून नित्य तोच प्रवास कौशल्याकडे अग्रेसर होत राहतो. तुम्हाला लेखक व्हायचं तर वाचायला हवं. वाचायचं तर ग्रंथ खरेदी करायला हवेत. ग्रंथोत्सव, ग्रंथप्रदर्शने त्यासाठीच असतात.