शब्द सोन्याचा पिंपळ/मराठी वंचित साहित्य :उद्गम आणि विकास




मराठी वंचित साहित्य : उद्गम आणि विकास



 पार्श्वभूमी-

 जगातील सर्व भाषा व साहित्याचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून येते की, त्या-त्या भाषा व साहित्यात प्रथम तत्कालीन पुढारलेल्या वर्गाचे लोक लिहितात. हे लेखन ज्या वर्ग व व्यवस्थेमध्ये लेखन, वाचनाचे संस्कार विकसित होत असतात, त्यांच्याकडून प्रथमतः होते. लेखन-वाचनाचा पाझर विकासांच्या कालखंडात उच्चवर्गीयांकडून पाझरत पाझरत तो समाजातील तळागाळाच्या वर्गापर्यंत पोहोचत राहतो. त्यामुळे सर्व भाषांतील लेखन व्यवहारात प्रारंभीच्या काळात शोषक, सत्ताधारी, सामंत, सरंजामदार, दरबारी, आश्रित आदी कलाकार लिहितात. पुढे हा प्रवास जनसामान्यांपर्यंत पोहोचतो.

 भारतासारख्या खंडप्राय देशातील भाषा व साहित्याचा व्यवहार हा धर्म, जात, वर्ग, व्यवस्थेने मोठ्या प्रमाणात नियंत्रित केलेला आढळतो. भारतीय साहित्याचा मूलाधार संस्कृत भाषेचे साहित्य असल्याने आपोआपच प्राचीन साहित्याचा धांडोळा घेतल्याशिवाय आधुनिक साहित्याची मांडणी करता येत नाही. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत अशा सर्व साहित्याचा अभ्यास करताना हे लक्षात येते की, प्रत्येक काळात समाजाच्या सर्व वर्ग व वर्णाचे प्रातिनिधिक असे चित्रण असते. आपल्या साहित्याचा प्रारंभ देवादिकांच्या कथांनी झाला. त्यात अवतार आणि चमत्कारांचे आश्चर्य जसे होते तसे त्या व्यवस्थेतील उपेक्षिताचे अश्रूपण!

 महाभारता राजा, राजकुमार यांच्या कथा जशा आढळतात तशा दासदासीच्या शापित जीवनाचे उद्गारही! इथे समाजमान्य विवाह संबंधाची चर्चा आढळते तशी विवाहपूर्ण संबंधातील संततीची पण. तिथं निपुत्रिक

राजाने एखादं बाळ दत्तक घेतल्याची जशी कथा आढळते तशी कर्णाच्या रूपाने सांभाळलेल्या सूतपुत्राची पण... इथे कुमारीमाता कुती आढळते. इतर धांडोळ्यात शकुंतला, मेनका आणि विश्वामित्रही दिसून येतात. राजाच्या गादीला वारस मिळावा म्हणून कुमारसंभवाद्वारे पुत्रप्राप्तीच्या कथांनी भारताचा प्राचीन इतिहास भरलेला आढळतो. दुसरीकडे वंश सातत्यासाठी नियोगाची परंपरा आढळते. हे सारं जात, धर्म, वंश, परंपरा यांच्या सातत्याच्या आग्रहातून घडत राहतं.

 या सगळ्या व्यवहारात नैतिक-अनैतिकतेचे प्रश्न सर्रास सोईस्करपणे वापरल्याचे दिसून येते. ब-याचदा खोट्या प्रतिष्ठेचा बाऊ करून पापावर पांघरूण घालण्याच्या कथा पुराण व इतिहासात काही कमी नाहीत.

 प्रारंभी देव लोकांच्या कथात सूर-असूर अशा विभाजनाने तत्कालीन व्यवस्था विभाजित दिसते. नंतरच्या काळात हे विभाजन राजा आणि प्रजेच्या रूपात येतं. धर्माचे प्राबल्य असलेल्या काळात हे विभाजन धर्मार्थी व धर्माश्रित अशा रूपात आढळते. मध्यकाळानंतरच्या आधुनिक काळात विशेषतः एकोणिसाव्या शतकात ही व्यवस्था जात केंद्रित बनलेली दिसून येते व समाज सवर्ण व अवर्णाच्या श्रेणीत विभागलेला दिसून येतो. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात सर्वत्र जाती, धर्माच्या कुंपणापलीकडील वंचित व उपेक्षितांच्या व्यथा वेदनांचा स्वर सर्वभाषिक साहित्यात चढ्या आवाजात वेशीवर टांगू पाहतो. एके काळी समाजव्यवस्थेने कायम रकान्यात ठेवलेल्या दलित व वंचितांच्या वर्गापर्यंत अक्षराची पहाट पोहोचल्यावर अंधार गुहेत ठिणगी पडावी तसे समाजातील नवे अनुभवविश्व उदयाला येत जागतिक साहित्यपटलावर निग्रोंच्या साहित्याने जशी सरंजामी व्यवस्थेविरुद्ध तुतारी फुकली त्यातून ‘ब्लू साँग्ज' उदयाला आली. मराठी साहित्याच्या संदर्भात हाच उद्गार दलित साहित्याच्या स्वरूपात विकसित झाला. पुढे दलितेतर वर्गातील उपेक्षित समाज समुदाय लिहिते झाले आणि त्यातून वंचित साहित्याचा विकास झाला. ग्रामीण साहित्य चळवळ, आदिवासी साहित्य, स्त्रीमुक्तीवादी, जनवादी, पुरोगामी साहित्य अशा अनेक नवसाहित्याप्रमाणेच मराठी साहित्यात वंचितांच्या व्यथा-वेदनांना स्वर देणार एक सशक्त साहित्य प्रवाह आपली वेगळी मुद्रा मराठी साहित्यावर प्रभावीपणे उठवत आहेत. ही आता सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ गोष्ट झाली आहे.

 वैश्विक इतिहास

 समाजामध्ये दलितेतर वंचितांचा असा एक मोठा प्रवाह मनुष्य विकासाच्या प्रारंभापासून दिसून येतो. जो प्रारंभापासून आज अखेर अल्पसंख्य,

समाज मान्यतेपासून दूर, उपेक्षित जात व धर्म वास्तवाच्या परिघाबाहेर सतत जागण्याचा संघर्ष करणारा व अस्तित्वाची निकराची लढाई लढताना दिसून येतो. त्यात अनाथ, निराधार, पोरके, परित्यक्ता, अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर, वृद्ध, कुष्ठरोगी, देवदासी, विधवा, वेश्या, कुमारीमाता, हुंडाबळी, बलात्कारी, दुभंगलेली कुटुंबे, विस्थापित अशा अनेक प्रकारे उपेक्षेचं जीवन जगणारी मंडळी वेद, उपनिषदांपासूनच्या काळात जशी दिसतात तशी आजही. दया, करुणा, कणव, सहाय, भूतदया इत्यादीसारख्या वृत्तीमुळे हा मनुष्य समुदाय सामान्य मनुष्य समुदायापासून सतत वेगळा व उपेक्षित राहिलेला आहे. समाजाने दाखविलेल्या दया व धीरावर जगत हा समाजवर्ग धैर्याने संघर्ष करत आज स्वाभिमान व स्वत्वाची लढाई खेळत अधिकार आणि हक्काच्या जाणिवेने जागृत व प्रगल्भ होत समाजविकासात आपला वाटा मागू पाहात आहे. वेळोवेळी लिहिलेल्या साहित्यातून त्यांचा हा उद्गार दिवसेंदिवस आग्रह, आक्रोश यापुढे जाऊन अधिकाराची भाषा बोलताना दिसतो.

 भारताचा सारा सामाजिक विकास हा येथील राजकीय वास्तवामुळे नेहमीच ब्रिटिशांच्या इतिहासावर आधारित विकसित होत राहिला आहे. येथील समाज वास्तव, समाज परिवर्तन, सामाजिक कायदे, राजकीय व आर्थिक परिवर्तन या सर्वांमागे ब्रिटिश राजसत्ता व समाजसत्ता पायाभूत राहिली आहे. भारतीय राज्यघटनेने स्वतःला कल्याणकारी राज्य (Welfare State) म्हणून घोषित केले. त्यामागेही ब्रिटिश राज्यघटना कारणीभूत आहे, हे विसरता येणार नाही. ब्रिटनमध्ये चौदाव्या शतकात झालेल्या प्लेगच्या प्रादुर्भावात हजारो लोक मृत्युमुखी पडले व त्यातून निर्माण झालेल्या अनाथ, वृद्ध व विधवांच्या प्रश्नातून वंचितांच्या संगोपन, संरक्षण, पुनर्वसन इत्यादी यक्षप्रश्न सोडविण्याचे आव्हान निर्माण झाले. त्यातून इ. स. १३५१ मध्ये इंग्लंडमध्ये गरिबांचा कायदा (Poor law) अस्तित्वात आला. पुढे १४९५ मध्ये भिक्षेकरी व भटक्यांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी 'Tuber Act' अस्तित्वात आला. सोळाव्या शतकात प्रबळ धर्मव्यवस्थेने चर्चसारख्या संस्थांच्या माध्यमातून गरिबांना अन्न, वस्त्र, आरोग्य, शिक्षण देण्याच्या उद्देशाने कल्याणकारी संस्थेचे जाळे विणले. पुढे सन १७८२ मध्ये बेरोजगारांचा प्रश्न मिटविण्यासाठी ‘गिल्बर्ट अॅक्ट' आला. मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी इंग्लंडच्या धर्तीवर भारतात १८५७ मध्ये ‘डेव्हिड रिफॉरमेटरी स्कूल'ची स्थापना झाली. म. फुले, पंडिता रमाबाई, महर्षि कर्वे, महर्षि विठ्ठल रामजी

शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील या सर्वांनी केलेल्या वंचितांच्या संगोपन शिक्षण व पुनर्वसन कार्यामागे ब्रिटिश मिशनरीचे कार्य प्रेरणा म्हणून कार्य करत होते, हे नाकारून चालणार नाही.

 समाज संक्रमणाचा हा आलेख पाहता असे लक्षात येते की, प्रत्येक काळात ‘सबाल्टर्न' व्यवस्था कार्यरत असते. ही व्यवस्था वरिष्ठ व कनिष्ठ यांच्यामधील उतरंड अधोरेखित करीत असते. अभिजन वर्ग वर्चस्वाने सुरू झालेल्या समाज विकासाची परिणती बहुजनवर्ग विकासाकडे अग्रेसर होत, ती सर्वजनकेंद्री होते, हा या देशाचा इतिहास आहे. सर्वजनांचे अधिनायकत्व ज्या समाजव्यवस्थेत येते तो समाज प्रगल्भ खरा. सर्वजनांचे वर्चस्व म्हणजेच वंचित विकासाचा अंत्योदय होय.

 ‘वंचित' : व्युत्पत्ती व व्याप्ती

 वंचित शब्दाचा अर्थ फसलेला, अंतरलेला, उपेक्षित, समाज परीघाबाहेरील अशा अर्थाने सर्वसाधारणपणे वापरला जातो. संस्कृतमध्ये त्याची व्युत्पत्ती वंच्+निय्+कत् अशा प्रकारे सांगितली जाते. त्याचा अर्थ अपेक्षित न मिळालेला, कमतरता असलेला, संकटात सापडलेला, फसवलेला असा होतो. इंग्रजीत याला Deprive हा पर्यायवाची शब्द आढळतो. त्यांचे अनेक अर्थ शब्दकोशात आढळतात. त्यानुसार उपेक्षित समाजवर्ग, गरीब, निराधार, गरजू, तणावग्रस्त, अधिकार वंचित, मूलभूत गरजांपासून उपेक्षित असा घेतला जातो. या सर्व अंगांनी विचार केला तर समाजातील अनाथ, निराधार, अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर, वृद्ध, कुष्ठरोगी, देवदासी, हंडाबळी, विधवा, परित्यक्ता, कुमारीमाता, बालविवाहिता, भिक्षेकरी, बालगुन्हेगार, वेश्या, दुभंगलेल्या कुटुंबातील मुले, विस्थापित, रोगजर्जर असे सर्व दुःखी पीडित बळी या सर्वांचा समावेश वंचित संज्ञेत होतो. हे पाहता वंचित हा समाजातील संख्येने मोठा परंतु उपेक्षेमुळे दुर्लक्षित राहिलेला असंघटित, अल्पसंख्य वर्गात विखुरलेला विकास अपेक्षी व विकासलक्ष्यी समाजगट होय. या वर्गाने व या वर्गासाठी वेळोवेळी मराठी साहित्याच्या वेगवेगळ्या इतिहास पर्वात सर्व प्रकारचे लेखन आढळते. ते पाहता वंचितांचे साहित्य आजही मराठी साहित्याच्या प्रांतात मध्यप्रवाह बनू पाहात असले, तरी गंगोत्रीच्या रूपाने ते गेले शतकभर विकसित होत राहिले आहे.

 अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेत असताना वंचित साहित्याच्या पाऊलखुणा नाटक, कथा, कादंबरी, आत्मकथा, आठवणी, पत्र, दैनंदिनी

इत्यादी अनेक रूपात आढळतात. वंचित वर्गाचे गद्य साहित्य प्रारंभी समाजहितैषी कार्यकर्त्यांनी कल्याणाच्या भावनेने केलेल्या कार्याची नोंद म्हणून केले. पुढे अशा वर्गातून विकसित झालेल्या लाभार्थी व आश्रितांनी आपल्या अनुभव कथनाद्वारे याला आधुनिक बनवले. त्यामुळे वंचित साहित्याचे वर्गीकरण करत असताना स्थूलरूपाने ते नाटक, कथा, कादंबरी, अनुभवकथन, आत्मकथन, वैचारिक व समीक्षात्मक अशा स्वरूपाचे आढळून येते. सांगितल्याप्रमाणे आधुनिक वंचित साहित्य इतिहासाच्या वर्गवारीच्या दृष्टीने पाहाता तीन कालखंडात ते विभगता येईल.

 १. स्वातंत्र्यपूर्व वंचित साहित्य

 २. स्वातंत्र्योत्तर वंचित साहित्य

 ३. उत्तर आधुनिक काळातील वंचित साहित्य

 १. स्वातंत्र्यपूर्व वंचित साहित्य

 त्र्यंबक नारायण अत्रे यांचे 'गावगाडा' (१९४१) हे पुस्तक स्थूलरूपाने ग्रामीण समाजशास्त्र समजाविते, तसेच ते खेड्यातील समस्या अधोरेखित करते. हे पुस्तक ग्रामीण व दलित साहित्याचा मूलाधार म्हणून पाहिले जाते. तसे ते वंचित साहित्याचा मूलाधार म्हणून पाहता येईल. पण खच्या अर्थाने वंचित साहित्याचा प्रारंभ हा महात्मा फुले समग्र साहित्य, महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मवृत्ताने सुरू होतो. त्यात ते स्वतःचे जीवन चरित्र जसे विस्ताराने सांगतात तसेच ते अनाथ मुले-मुली, विधवा स्त्रिया, परित्यक्ता, कुमारी माता यांच्यासाठी केलेल्या समाजकार्याचे वृत्तही सादर करतात. त्यांच्या सहकारी पार्वतीबाई आठवले या 'माझी कहाणी' (१९२८) मध्ये अनाथ बालिकाश्रमासाठी केलेल्या निधी संकलनाचा इतिहास नोंदवत आपली अमेरिकेची वारी सांगत विसाव्या शतकाच्या प्रारंभी या कार्याच्या पार्श्वभूमीवरील समाजमन समजावितात. त्यांच्यानंतर १९३४ ते १९३६ मध्ये ‘लक्ष्मीबाई टिळक' आपल्या स्मृतीचित्राद्वारे स्त्रियांच्या व्यथा-वेदना प्रकर्षाने मांडतात. तद्नंतर १९४३ मध्ये पार्वतीबाई आठवलेंप्रमाणेच हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्य करणा-या कमलाबाई देशपांडे आपले अनुभव कथन ‘स्मरणसाखळी' (१९४३) मधून ओवताना दिसतात. एका अर्थाने स्वातंत्र्यपूर्व काळातील वंचितांचे साहित्य हे वंचितांविषयी समाजात भाव साक्षरता निर्माण करताना दिसते. या साहित्यातून वंचित वर्गाची दुरवस्था जशी स्पष्ट होते, तसे समाजाचे सनातनी व पारंपरिक रूपही त्यातून स्पष्ट होते. म. फुले, महर्षि धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, महर्षि विठ्ठल

रामजी शिंदे प्रभृतींच्या सामाजिक कार्याच्या पायावरच स्वातंत्र्योत्तर काळातील वंचितांचा विकास झाला व त्यातून कल्याणकारी कार्याचे जाळे विकसित झाले. अशा वर्गातून उभारलेल्या स्त्री-पुरुषांच्या पुरुषार्थाची कथा म्हणजेच स्वातंत्र्योत्तर वंचित साहित्य होय.

 २. स्वातंत्र्योत्तर वंचित साहित्य

 स्वातंत्र्योत्तर वंचित साहित्याचे विहंगमावलोकन करत असताना असे दिसून येते की, स्वातंत्र्यामुळे शिक्षण प्रसार झाला. समाजसुधारणा घडून आल्या. विकास योजनांचा लाभ समाजातील सर्व उपेक्षित वर्गापर्यंत पोहोचला. परिणामी स्वातंत्र्यपूर्व काळात केवळ अनाथ, परित्यक्ता, विधवा, कुमारीमाता यांच्या प्रश्नांचा परीघ ओलांडून स्वातंत्र्योत्तर काळात हे वर्तुळ इतके रुंदावते की, यांचा मोठा अचंबा वाटत राहतो की, कुणाचे स्वातंत्र्य? कुणाला स्वातंत्र्य? कसले स्वातंत्र्य? स्वातंत्र्यानंतर वीस-पंचवीस वर्षांचा कालखंड असा आढळतो की, त्या कालखंडात सरळ अंगाने वंचितांबद्दल फारसे लिहिले गेले नाही. याला गती येते ती १९६० नंतर. सन १९६४ ला सत्यभामा सुखात्मे ‘गेले ते दिवस' सारख्या आत्मकथनेतून विवाहबाह्य पुरुष मैत्री सांगण्याचे धाडस करतात. याच काळात एकीकडे हंसा वाडकर ‘सांगत्ये ऐका' (१९७०) च्या माध्यमातून चंदेरी पडद्यामागचं स्त्री जीवनाचं वास्तव किती दारूण असतं ते शब्दबद्ध करतात. तर दुसरीकडे याचवेळी गोदावरी परुळेकर ‘माणूस जेव्हा जागा होतो' (१९७0) सारखी अनुभव कथा लिहून आदिवासी अस्मिता जागराची संघर्षकथा समजावितात. पुढे हीच वाट तुडवत अनुताई वाघ ‘दाभोळच्या जंगलातून' (१९९०) या पुस्तकातून आदिवासी स्त्री व बालकाच्या विकासासाठी वेचलेले श्रम शब्दबद्ध करतात. १९७५ च्या दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरं होतं आणि मराठीत स्त्रियांच्या आत्मकथेचा पूर वाह लागतो.

 ३. उत्तर आधुनिक काळातील वंचित साहित्य

 'वेगळ्या वाटेने जाताना' - कुमुद रेगे, ‘बिल्वदल' - अनुताई भागवत, ‘स्नेहांकित' - स्नेहलता प्रधान, ‘मी वनवासी' - सिंधुताई सपकाळ, ‘आठवणीतल्या गोष्टी' - विजया लवाटे, ‘बिनपटाची चौकट' - इंदुमती जोंधळे, ‘चाकाची खुर्ची' - नसीमा हुरजूक अशी एकामागून एक आत्मकथने प्रकाशित होत राहतात आणि मग वंचितांच्या प्रश्नांची नवनवी अंगे, स्त्रियांचे नवे प्रश्न समाजास समजणे शक्य होते. या सर्वांच्या मुळाशी लक्ष्मीबाई टिळक, विभावरी शिरूरकर, काशीबाई नवरंगे यांच्यासारख्यांचं लेखन

असतं, हे विसरून चालणार नाही. ही असते उत्तर आधुनिक वंचित साहित्याची नांदी.
 वंचित साहित्याचा खरा अंक सुरू होतो तो वंचित वर्गातून उभारलेली मुलं-मुली जेव्हा स्वतःस आपली कहाणी समाजास सांगू लागतात तेव्हा. समाजातील तथाकथित उच्चभ्रू, प्रतिष्ठित मानला जाणारा वर्ग हा कसा अनैतिक व भ्रष्ट असतो हे दिसायला लागतं. याची सुरुवात अरुण खोरे यांच्या 'पोरके दिवस'नी सुरू होते. त्यात ते पोरक्या मुलाचे अनुभव विश्व समजावतात. ते उंच भिंती आणि गजाआडचं, रिमांड होमचं जग सताड उघडे करतात. इंदुमती जोंधळे आपल्या ‘बिनपटाची चौकट'मध्ये याच पोरक्या आयुष्याची री ओढताना दिसतात.

 स्वातंत्र्यपूर्व काळात ज्याप्रमाणे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या अनुभव कथनांनी समाजजाणिवा प्रगल्भ केल्या, तसंच कार्य नसीमा हुरजूकांची ‘चाकाची खुर्ची', रेणू गावस्करांचं ‘आमचा काय गुन्हा', विजया लवाटेंचं ‘आठवणीतल्या गोष्टी', कुमुद रेगेंचं वेगळ्या वाटेनं जाताना', 'मी वनवासी' सिंधुताई सपकाळ सारखी आत्मकथन करताना दिसतात. यातून वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी, अपंग यांच्या व्यथावेदना, प्रातिनिधिक रूपात समाजापुढे येतात. ‘फिटे अंधाराचे जाळे' सारखं भालचंद्र करमरकरांचं पुस्तक त्यांची बहुविकलांग कन्या वल्लरीची संघर्षमय विकास कहाणी बनून पुढे येतं. अशाच प्रकारे मतिमंद अपत्याच्या संगोपनाची झुंजार कथा नीला सत्यनारायण यांचं 'एक पूर्ण-अपूर्ण' (२००६) पण सांगतं. वेश्यांच्या मुलांच्या संगोपनातील अनुभव विजया लवाटे यांचे अलीकडे प्रकाशित झालेलं. ‘स्पर्श मानव्याचा (२००६) सारखं आत्मचरित्र अधिक प्रभावीपणे सांगत राहतं.

 या पार्श्वभूमीवर डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी लिहिलेले ‘खाली जमीन वर आकाश' हे आत्मचरित्र सर्वथा अनाथ असलेल्या मुलाचा नेम नॉट नोन' पासून 'वेल नोन' पर्यंतचा प्रवास समजावतं. इथवरचा सारा प्रवास म्हणजेच वंचित साहित्याच्या विकासाचा प्रवास होय.

 या सर्व साहित्यातून हे स्पष्ट होतं की, आधुनिक मराठी साहित्यात वंचितांच्या व्यथा-वेदनांचं असं एक साहित्यविश्व आहे की जे, मराठी साहित्यातील अन्य माक्र्सवादी, आंबेडकरवादी, देशीवादी, जनवादी, स्त्रीवादी, अस्तित्ववादी, सौंदर्यवादी, गांधीवादी, मानवतावादी, कृषीवादी (ग्रामीण) साहित्य प्रवाहांप्रमाणेच एक स्वतंत्र व स्वायत्त साहित्य प्रवाह असून तो रोज नुसता पसरतो आणि वाहतो असा नसून तो प्रतिदिन समाजमनात

खोल-खोल रुजो आहे. जणू काही हा नवा साहित्य प्रवाह मराठी सारस्वतास असं समजावण्याचा प्रयत्न करतोय की, प्रत्येक फुलाप्रमाणे प्रत्येक माणसास विकसित होण्याचा स्वतःचा असा स्वायत्त अधिकार आहे. त्यांच्या व्यथा, वेदनांचे पाझर नव्या भावजागरामुळे समाजाच्या सर्व वर्गात जाति-धर्माच्या ओळखीपलीकडे जाऊन माणूसपणाच्या अंगाने समाजमनी नव्या खुणा रुजविते. त्यातून एक नवं सामाजिक स्वास्थ्य व सौंदर्य विकसित होतंय. बागेत गुलाबास जसा मिरविण्याचा अधिकार असतो तसाच तो लिलीच्या छोट्या फुलासही असतो. हेच वंचित साहित्य समाजास समजावतं.

 जात-धर्माच्या पलीकडे हे साहित्य ज्या माणूसधर्माची पखरण करतं त्यातून जातिअंताचा लढा पुढे जातो आहे. महात्मा फुल्यांनी कधी काळी ‘आपल्या आश्रमात आंतरजातीय लग्ने लावली जातील' असे निक्षून सांगत, जातिधर्म निरपेक्ष केवळ माणूस नामक समाजनिर्मितीचा संकल्प सोडला होता. तो ‘खाली जमीन वर आकाश'सारख्या आत्मकथनातून अधिक ठळकपणे पुढे येतो, हे नाकारून चालणार नाही. एकविसाव्या शतकातील मराठी साहित्य हे जातिधर्म निरपेक्ष वंचित धर्माचं साहित्य असेल, हे ‘खाली जमीन वर आकाश'मुळे स्पष्टपणे लक्षात येते.

▄ ▄