शब्द सोन्याचा पिंपळ/साने गुरुजींच्या दैनंदिनी :चाळता चाळता...


साने गुरुजींच्या दैनंदिनी : चाळता चाळता...



 दोन-चार महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. मी कॉम्रेड गोविंद पानसरेंचा गौरव ग्रंथ संपादत होतो. त्याचे मुद्रण न्यू एज प्रिंटिंग प्रेस मुंबईत चाललं होतं. त्यासाठी मुंबईच्या वाच्या सुरू होत्या. एका भेटीत तिथले प्रकाश विश्वासराव साने गुरुजींचं वस्तुसंग्रहालय करत असल्याचे ओघाने कळलं. मी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात वि. स. खांडेकरांचं स्मृती संग्रहालय उभारल्याचं सांगितल्यावर त्यांनी साने गुरुजी वस्तुसंग्रहालयाचा आराखडा, संग्रहित छायाचित्रं दाखवली. आम्ही चर्चा करत राहिलो अन् मी त्या उभारणीत केव्हा कसा सामील झालो ते कळलंच नाही.

 मी, प्रकाश विश्वासराव, गजानन खातू या वस्तुसंग्रहालयाच्या साधन संग्रहासाठी धुळे, जळगाव, फैजपूर, अंमळनेर असा दौरा करून आलो. तिथं अनेक दुर्मीळ हस्तलिखितं, छायाचित्रं हाती लागली. अन् संग्रहालय उभारता येईल असा विश्वासही निर्माण झाला. वडघरच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातर्फे हाती घेण्यात आलेला हा प्रकल्प. त्याचे अध्यक्ष सुधीर देसाई प्रभृती मंडळी मोठ्या उत्साहाने संग्रहालयातील स्वतंत्र इमारत उभी करत आहेत. प्रा. चंद्रकांत पाटगावकरांकडून या प्रकल्पाबद्दल ऐकून होतो. त्यांची भेट घेतली. त्यांनी आपल्याकडील सर्व साहित्य (साधना, जुने अंक, छायाचित्रे, पंढरपूर उपोषण इ.) देण्याची तयारी दर्शविली.

 ‘साने गुरुजी जीवनगाथा' लिहिताना जमवलेली सारी कागदपत्रे, दैनंदिनी, हस्तलिखिते, जुने अंक, पत्रे इत्यादी साहित्य राजाभाऊ मंगळवेढेकर यांनी जमवले होते. ते त्यांच्या पश्चात 'साधना'मध्ये जमा झाल्याचं कळल्यावरून साधनेशी संपर्क साधला. पुणे विद्यार्थी गृह, राष्ट्रसेवा दल, मध्यवर्ती कचेरी इत्यादी ठिकाणी ही प्रयत्न केले, चाचपणी केली. सगळीकडे आशेची

किरणं दिसून आली. पंढरपूरला तनपुरे महाराजांच्या मठात उपोषण कालावधीतील छायाचित्र असल्याचं कळल्यावरून संपर्क केला. शक्यतांचं क्षितिज विस्तारतं आहे. प्रकाश विश्वासराव, गजानन खातू, जनसंपर्क, मुलाखती, व्हिडिओ शूटिंग कितीतरी प्रकारे जीवाचं रान करत आहेत.

 या प्रयत्नात ‘साधना' मधून हाती आलेल्या साने गुरुजींच्या डायच्या सहज चाळल्या. त्या डायच्या, वह्या साधारणपणे १९३९ ते १९५0 च्या दरम्यानच्या आहेत. त्या पाहताना लक्षात येतं की 'साधना' साप्ताहिक सुरू करण्यापूर्वी साने गुरुजींनी लेखनाच्या क्षेत्रात मोठी मजल मारली होती. चळवळ, प्रबोधन, व्याख्यान इत्यादी माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ, आंध्र, तमिळनाडू पाहिला, अनुभवला होता. तुरुंगवास भोगला होता. स्वातंत्र्याचा ध्यास होता. त्यासाठी काँग्रेस साप्ताहिक', 'सेवा', 'प्रदीप', ‘कर्तव्य' इत्यादी नियतकालिकांचे संपादन केले होते. या सर्व अनुभवांच्या पाश्र्वभूमीवर साधना साप्ताहिकास स्थैर्य लाभावे म्हणून कोण तळमळ होती. साने गुरुजींच्या मनात जसा भारत स्वतंत्र झाला तसा स्वतंत्र भारताचे सुराज्य व्हावे म्हणून साधना साप्ताहिकास ते त्यांचे साधन बनवू इच्छित होते. काँग्रेस, कर्तव्य, प्रदीपसारखी नियतकालिकं चालवताना त्यांना मोठी आर्थिक तोशीस सोसावी लागली होती. 'साधना' चालेल तर कर्तव्य'चे कर्ज भागवू शकू, असा भाबडा आशावादही त्यांच्या धडपडीत होता. यासाठी अर्थसहाय्य ते ठेवी व वर्गणीतून जमा करत. त्यांचे एक निवेदन यापैकी एका डायरीत आहे. ते ‘जीवनगाथा' मध्येही पृ. ३६५वर आहे. ते वाचलं की साने गुरुजींची 'साधना' जीवनसाधना होती हे लक्षात येतं. आशावाद इतका की, साधना प्रेस कर्जमुक्त झाली की राष्ट्र सेवादलाला नि समाजवादी पक्षाला मदत देण्याची योजना. हे सारं साने गुरुजींमध्ये अनंत ध्येयासक्तीमुळेच निर्माण व्हायचं.

 साने गुरुजीं डाय-यांचा वापर नोंदी, नियोजन, योजना इत्यादींसाठी करत. डायरी नित्य वा रोज ते लिहीत नसत. त्यामुळे दिवस व वर्षाचा... काळाचा मेळ घालणे कठीण. जुनी डायरीपण ते नोंदीसाठी वापरत. यात काटकसरीचा गांधी संस्कार असावा. सन १९३९ ची सर्वांत जुनी डायरी आहे. ती आहे Burroughs Wellcome & co., Londonची. ती आहे डॉक्टरांसाठीची Medical Diary. डॉक्टरांना आपल्या visits लिहिता याव्यात म्हणून तयार करण्यात आलेली ही इंग्रजी डायरी. साने गुरुजींनी चक्क तिचा वापर बालकविता लिहिण्यासाठी केलेला दिसतो. त्या अर्थाने

ती त्यांची कवितेचीच वही. पंचवीस पानं भरलेली. उर्वरित कोरी. या कविता प्रकाशित झाल्यात का ते पाहायला हव्यात. नसल्यास त्या प्रकाशित करायला हव्यात. साधनेने याबाबत पुढाकार घ्यायला हवा. संपादन, श्रमदान कोणीही करेल. गरज आहे संशोधनाची!

 अशीच या वर्षाची आणखी एक डायरी आहे. ती आहे गुजराथी. डेली अकाऊंट बुक असं तिचं स्वरूप. श्री भारत विजय प्रिंटिंग प्रेस, मोदीखाना, बडोद्याची ही डायरी. साने गुरुजींनी त्यात वेगवेगळ्या नोंदी केल्यात. इंग्रजी, हिंदी, गुजराथी नोंद असलेली ही डायरी. हिंदी माणसाला हिंदीत लिहावं, गुजराथी माणसास गुजराथी - असा साने गुरुजींचा ‘आंतरभारती' ध्यास यातून स्पष्ट होतो. साने गुरुजी स्वास्थ्यानं लिहीत तेव्हा त्यांचे हस्ताक्षर मोत्यासारखं, जेव्हा ते गडबडीत उतरून घेतात (विशेषतः भाषण ऐकताना) तेव्हा तेच अक्षर ‘खुद लिखे खुदा पढे होऊन जाते. ते वाचायला एकतर पोस्टमन हवा किंवा मेडिकल स्टोअरमधला सेल्समन... दिव्य अक्षरांचा शोध लावणारे किमयागार ते! यातही कविता भरलेल्या आहेत. या डाय-यांमधील लेखन असंबद्ध असलं तरी त्यांची संगती लावता येते, हा माझा वि. स. खांडेकर शोधातला अनुभव. यातली प्रत्येक पानं साने गुरुजींच्या जीवन, साहित्य, विचार, कार्य इत्यादीवर नवा प्रकाश पाडू शकतील.

 अशीच एक डायरी आहे सन १९४७ ची. श्री रामदास रोजनिशी तिचे नाव. केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाची ही डायरी. यात अनेक लेखन संकल्प, कविता, नोंद, औषधोपचार तर आहेच, पण काही महत्त्वाची निवेदनेही स्वाक्षरीसह आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर या डायरीत २/३ जूनच्या पानावर साने गुरुजींची स्वाक्षरी असलेले निवेदन आहे. १० मे १९४७ ला त्यांचे उपोषण यशस्वी होऊन पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्व जाती-धर्माच्या लोकांना खुले झाले. ते झाल्या झाल्या तर नांदगावचे काही मातंग बांधव विठ्ठलाचे दर्शन घेऊन साने गुरुजींना भेटले. त्यांनी विठ्ठल दर्शनाचा अनुभव साने गुरुजींना कथन केला. ते आनंदात होते. ते ऐकून साने गुरुजींनी आपल्या मनाच्या झालेल्या स्थितीचे वर्णन करतान म्हटले आहे, ‘सुखावले मन! प्रेमे पाझरती लोचन!!' या पत्राचा, निवेदनाचा अभ्यास कशासाठी आवश्यक आहे की, ते जातिअंताच्या लढ्याचा मोठा पुरावा आहे.

 सन १९४७ ची आणखी एक डायरी आहे. ती आहे अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे, ही. साने गुरुजी या प्रकाशनाचे लेखक. 'पत्री' हा कविता संग्रह व 'श्यामची आई' याच प्रकाशनाची. त्या नात्याने या प्रकाशनाचे व्यवस्थापक शं. दा. चितळे यांनी ती भेट म्हणून साने गुरुजींना पाठवल्याची पहिल्या पानावर नोंद आहे. यातही कविता, नोंदी, नियतकालिक, प्रकाशनांचे आराखडे आहेत. 'प्रदीप’, ‘कर्तव्य', 'साधना'चे यातील आराखडे वाचनीय. १६ मे १९४७ च्या पानावर ‘साधना योजना' शीर्षकाखाली दहा पानांच्या साधनेचा आराखडा आहे तो असा - एक पान -अग्रलेख स्फुटे, दोन पान - सेवादल, मुले, आनंद, कविता, तीन पान - कामगार चळवळी, चार पान - विधायक कामे, किसान चळवळी, पाच पान - प्रभाकर, सहा पान - हिंदी, गुजराथी, कन्नड, तमिळ, उर्दू कवी (म्हणजे आंतरभारती), सात पान - गोष्ट, आठ पान - संकलित वार्ता (परराष्ट्रीय राजकारण), नऊ पान, दहा पान - कादंबरी, सुंदर पत्रे. याशिवाय स्त्रियांचे पान देण्याचा त्यांचा मानस होता. त्यात आहार, आरोग्य, क्रीडा, बोलपट यांचा अंतर्भाव करण्याची योजना होती. साधनेतून विनोबा वाणी, जावडेकरांची व्याख्यानमाला प्रकाशित करण्याचा मानस स्पष्ट होतो. हे पान साधनेचा ‘आरसा' म्हणून महत्त्वाचे अशासाठी की, गेल्या सहा दशकात साधनेत झालेले बदल या पानाच्या कसोटीवर अभ्यासता येऊ शकतील. या डायरीतील अन्य नोंदीही महत्त्वाच्या असून त्यांची तार्किक संगत सप्रमाण लागल्यास साने गुरुजींच्या जीवन, कार्य, साहित्याचे पुनर्मूल्यांकन नवी मांडणी शक्य वाटते. यातील संभाव्य वर्गणीदार यादी, महात्मा गांधी चरित्र रूपरेषा, साधनेचा खर्चाचा ताळमेळ, त्यांची अनेक पानांवर केलेली आकडेमोड पाहिली की, साने गुरुजी त्या काळात कसे साधनामय होऊन गेले होते याचे प्रत्ययकारी दर्शन होते.

 सन १९४८ ची दैनंदिनी आहे हनुमान प्रेस, पुणेची डायरी. साधनेची छपाई, बांधणी या प्रेसमध्ये होत असे. नारायण लक्ष्मणराव कोकाटे ती करत. त्यांचा हनुमान छापखाना ३00, सदाशिव पेठ, पुणे येथे होता. त्यांची काही बिले दफ्तरात आढळतात. या डायरीत महात्मा गांधी उपवास, महात्मा गांधींना अभिप्रेत उपवासाचा अर्थ आदी महत्त्वाच्या नोंदी लक्ष वेधून घेतात. यातही साधनेची आकडेमोड आहेच. महात्माजींच्या पहिल्या स्मृतीदिनाची हृद्य आठवण केवळ काव्य! यात साधनेचे बातमीदार होणेविषयी अनेकांना पत्रे लिहिल्याची महत्त्वाची नोंद आहे. कळवण, वरणगाव, पाचोरा,

निफाड, शिरपूर, श्रीगोंदे, ठाणे, डहाणू, पालघर, वसई अशी बातमीदारांची नावे वाचली की साधनेत संपूर्ण महाराष्ट्राचे (संयुक्त प्रांत) प्रतिबिंब असावे अशी योजना लक्षात येते. यात साधनेच्या एका अंकाचा खर्च (पृ. ३५ ऑगस्ट) आहे. तो पहिल्या अंकाचा खर्च म्हणून महत्त्वाची नोंद ठरते. तो खर्च असा - कंपोझिटर्स २00, कागद - ८0, भाडे - ७0, शाई - ५५, ब्लॉक्स - २0, गाडी, चहा इ. - (प्रवास) १0, किरकोळ - २० असा रुपये ४१५ चा खर्च नोंद आहे. याच डायरीत साने गुरुजींनी मार्च महिन्यात व्यक्तिगत खर्च नोंदला आहे. तो असा - इलेक्ट्रिक/गॅस - १, भाडे- ४, दुधवाला - ४, चहा- २, तेल, साबण वगैरे - १ असा मासिक खर्च १२ रुपये करणारे साने गुरुजी व्यक्तिगत जीवनातही सामाजिक व्यवहाराप्रमाणे काटकसरी होते हे सिद्ध होते.

 या दैनंदिनीच्या शेवटच्या आवरणाच्या आतील बाजूस साधनेची संभावित बोधवाक्ये नोंदली आहेत. आज साधनेत नोंदले जाते ते बोधवाक्य/ ध्येयवाक्य अंतिम खरे. पण त्यापूर्वी त्यांच्या मनात घोळत असलेली बोधवाक्य अशी होती -

 स्वतंत्र भारती आता,

 कुणा काही नसो कमी।

 साधू विकास सर्वांचा,

 करून शुभ साधना।।

 अथवा प्राप्त स्वातंत्र्य राखू या,

 करू या शुभंकर/समुज्वल।

 करू/व्हावा विकास सर्वांचा,

 साधना मंगल करू।।

 या सर्वांमधून साधना ही स्वातंत्र्यरक्षणासाठी व सर्वांच्या विकासासाठी स्थापिली हे स्पष्ट होते.

 सन १९४९ ची शेवटची डायरी - तीत फारसे लिहिलेले नसले तरी एक पान (७ जानेवारी) अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात साधनेचा चार महिन्यांचा एकत्रित खर्च आहे. जमेकडे ८९,६१४ रुपये तर खर्च ८९,१५१ रुपये. ४६३ रुपये फायद्यात आणण्यासाठी. साने गुरुजी सव्वा वर्ष रात्रंदिवस झटत होते, एक करत होते पण साधना फायद्यात आणण्यासाठी साने गुरुजींना आपल्या पुस्तक लेखन, विक्रीचे मानधन ८00 रुपये जमा करावे
लागले होते. त्यांना आनंद एकाच गोष्टीचा होता, ‘कर्तव्य'चे कर्ज ते फेडू शकले. उसनवार आणलेले ६५०० रु. ते परत करू शकले. यात कामगारांचा पगार २०,००० नोंदला असला तरी संपादकांचे मानधन नाही. ते बिनपगारी फुल्ल (फूल!) अधिकारी होते हे वेगळे सांगायला नको.

■ ■