सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या १३०१ ते १४००

<poem> दूषित देहा त्यागिलें । शकलें स्त्रीपुरुष रूप जालें । तोचि स्वायंभूमनु नामें बोलिले । शतरूपा कामिनी ॥१॥ऐसें ब्रह्मदेवें कल्पितां । निर्माण होती प्रजा समस्ता । परी ते ब्रह्मयाची नव्हे सत्ता । सामर्थ्य ईशाचें ॥२॥जरी स्वसत्तेनें ब्रह्मदेव । उत्पन्न करिता प्रजा सर्व । तरी हें दुःखरूप अपूर्व । वाटतें कां तया ॥३॥हे काय हो दुष्ट प्रजा जाली । तेव्हां खेदें नकोशी वाटली । मन्वादि पाहतां वृत्ति तुष्टली । तस्मात् खरी पराधीनता ब्रह्मदेवें अमुकसें कल्पावें । तें ईश्र्वरें आणून उभें करावें । जैसें बाळानें छंदें रडावें । तें पुरवावें जननीनें ॥५॥जें जें होणार तें तें कल्पिता । उत्पन्न होतसे ईशसत्ता । न होणार तें येणें दांत खातां । काय होतें ॥६॥ जेवी व्हावयाजोगा छंद घेतला । तो बाळाचा मातेनें पुरविला । न होणार छंदें तो ताडिला । मुखावरी करें ॥७॥जरी म्हणतील कोणी ब्रह्मयासी । न होणें हे वाणी कायसी । तरी पहा होणार जालियासी । पुढें खुंटली मानसिक ॥८॥पुढें मैथुनसृष्टीच चालतां । मग मानसिका न ये उभवितां । होत असती जरी आतां । तरी प्रत्यया कां न येती ॥९॥तस्मात् होणार तितुकें मात्र जालें । न होणार कल्पना न चले । म्हणोनि हें ईशसृष्ट जितलें । मैथुनी कीं मानसिक कल्पित भावना ते जीवाची । जी मागें निरोपिली मनोमयाची । प्रत्यक्षता करणें जे तृणाची । ती ईशाची कृति ॥११॥येथें विरोध तो असे कोण । भास तितुका जीवनिर्माण । प्रत्यक्ष होणें तो मायावी ईशान । करी मायिकत्वें ॥१२॥असो ब्रह्मदेवाचे कल्पनेस्तव । ईश्र्वरें निर्मिल्या प्रजा सर्व । तितुक्या ब्रह्मदेवापुढें स्वभाव । उभ्या तिष्ठती ॥१३॥पाहें रविदत्ता पूर्वीचा । प्रणवरूप जो वेद साचा । जो सांगितला पंच अंगांचा । त्याचाचि हा परिणाम ॥१४॥हे जितुकीं मानससृष्टि । उंच नीच योनींची दाटी । ब्रह्मादि कीटकांत थाटी । वरी येका प्रणवाच्या ॥१५॥प्रवणरूप द्रव्याचें जाहलें । या इतुकियांत प्रणवेंचि व्यापिलें । तेंचि कैसें पाहिजे ऐकिलें । प्रणवचि येक अवघियां ॥१६॥सर्वांचा साकार जो दिसे । तो येक अकार मात्र विलसे । सर्वांचा लिंगदेह चळतसे । तो भासरूप उकार ॥१७॥सर्वही आपणातें न जाणती । यास्तव दों देहां जाहली उत्पत्ति । तोचि मकार अज्ञान भ्रांति । मात्रा तिसरी ॥१८॥पुढें प्रवृत्ति पाहते जाले । तेंचि ज्ञान अन्यथा भाविलें । तया ज्ञानाचे प्रकार विभागले । सामान्य विशेष ॥१९॥हे दोन्हीही कीटकांत असती । विशेष तया अर्धमात्रा बोलती । सामान्य प्रकाश बिंदु निश्चिती । एवं पंच अंगी प्रणव ऐसा एकला प्रणव सर्वांमाजी । ब्रह्मादि कीटकांत सहजीं । येथें परी नसे किमपि दुजी । सर्वही वेदरूप ॥२१॥ऐसा सर्वही वेद असतां । त्या कीटकादिकांच्या अतौता । जेथें प्राणवायु जाला चळता । तेथें सोहं शब्दही उठे ॥२२॥सोहं अक्षरें हाचि प्रणव । मांगें निरोपिला वेदराव । तोचि या सर्वात स्वयमेव । सर्वदा चाले ॥२३॥हें असो पुरुषदेह जितुके । देवऋृषिमानवादिकें । तेथें मातृकासहित कौतुकें । शब्दब्रह्म प्रगटला ॥२४॥परा पश्यंति मध्यमा तिसरी । ह्या तीन वाणी कीटकांत निर्धारी । यया पुरुषदेहीं चौथी वैखरी । प्रगटती जाली ॥२५॥मागें पुढें मातृका उमटती । तयाचे शब्द अनंत होती । ऐसा अनंतरूप वेद निश्चिती । पुरुषदेहीं वसे ॥२६॥पहिला प्रणवरूप वेद । तो कीटकांत सोहं शब्द । परी तेथें प्रवृत्ति निवृत्ति विशद । दोन्ही न होती ॥२७॥आहार निद्रा आणि मैथुन । पशुदेहीं हे व्यापार तीन । होत असती पराधीन । म्हणोनि ते निकृष्ट ॥२८॥पुरुषदेहीं मात्रा उमटल्या । वैखरीनें स्पष्ट जाल्या । तयाच्या श्रेणी प्रगटल्या । व्हावया प्रवृत्ति निवृति ॥२९॥म्हणून पुरुषदेह उत्तम । प्रवृत्ति निवृत्तीचें धाम । जागृतिआदि मोक्षांत सम । करूं इच्छी तें घडे ॥१३३०॥असो प्रणव आणि शब्दरूप । सांगितले वेदाचें स्वरूप । या उभयांसी किंचित् अल्प । जीवकृत्यता नसे ॥३१॥हा प्रणवरूप जो वेद साचा । हाचि ईश्र्वर प्रेरक सर्वांचा । तथापि कर्ताही त्रिमात्रांचा । ईशचि मायावी ॥३२॥दुसऱ्या मात्रा पन्नास असती । ज्या नादस्वरास्तव उमटती । हाही शब्द ब्रह्मयाची उद्भूति । ईश्र्वरापासुनी ॥३३॥आतां तुझी आशंका मुख्य चित्ताची । कीं प्रवृत्तिनिवृत्तिरूप रचना ज्याची । तया मार्गप्रदर्शक वेदाची । उत्पत्ति कोणीं केली ॥३४॥हे जीवें केली तरी सामर्थ्यहीन । ईश करी तरी त्या नसे योजन । म्हणून या रचनेसी कर्ते आपण । उभयतां जीवेश ॥३५॥तरी हेंचि कैसें तें ऐकावें । कवणेपरी वेदें प्रगटावें । बोलिजे तें जैसें स्वभावें । यथातथ्य असे ॥३६॥जितक्या मानसिक प्रजा जाल्या । त्यांत पश्र्वादि स्वव्यापारा लागल्या । पुरुषाकृति जितक्या उरल्या । त्या तिष्ठती ब्रह्म्य़ासमीप ॥३७॥प्रजापति देव ऋृषि संपूर्ण । मनु आदि मानवजन । ते ब्रह्मदेवासी कर जोडून । विनविते जाले ॥३८॥तूंचि आमुचा मातापिता । तूंचि धाता स्वामी देवता । तरी आम्हांसी अज्ञापीं आतां । काय करावें तें ॥३९॥करावें काय न करावें कोणतें । कोठें रहावें काय खावें तें । काय गावें काय घ्यावें चित्तें । आज्ञापिसी तें करूं ॥१३४०॥हें ब्रह्मदेवें सर्वांचें ऐकोन । करिता जाला अंतरीं मनन । यासी काय सांगावें आपण । तें कृत्याकृत्य नेणें ॥४१॥आणि हे मजलाचि कर्ता म्हणती । नेणती कवणाची सामर्थ्यशक्ति । आतां प्रवृत्तीच सांगू या प्रति । तरी निवृत्ति कळे कैसी निवृत्ती जरी सांगावी । तरी पुढें उत्पत्ति केवीं व्हावी । ऐसी रजोगुणें पडली गोवी । ब्रह्मदेवासी ॥४३॥तेव्हां दुश्चितपणें स्तब्ध ठेला । कांहीं सुचेना वेडावला । तंव अंतरांतून भडाडिला । शब्दांचा वोघ ॥४४॥हे प्रेरणा नव्हे विरिंचीची । कल्पना तों खुंटली जीवाची । परी अंतर्यामीं मायावी ईशाची । वस्ती जे असे ॥४५॥मुख्य स्फूर्ति जे निर्विकल्पक । त्यांत भासला जो प्रकाशक । जो कर्तेपणाचा मायिक । इक्षणशक्ति जयाची ॥४६॥तया ईश्र्वरापासून । उद्भवला हा वेद संपूर्ण । बुद्धि किंवा नसतां मन । संकल्पासहित ॥४७॥संकल्पेविण जीवत्व मंदलें । योजना कैशी कांहीच न चले । जैसें निजेलें मनुष्य वोसणलें । तें बोले परी कळेना ॥४८॥तैसा ब्रह्मदेव संकल्पासहित । मूर्छितापरी जाहला भ्रांत । परी शब्द उठताति अनंत । जेवीं भरतें समुद्रा ॥४९॥अनंत शब्द दाटले अपार । फुटों पाहें सर्व शरीर । एका मुखांतून नव्हे वार । म्हणून चौमुखीं निघती ॥१३५०॥एकदांचि चौमुखांची गर्जना । होती जाला शब्दरचना । ते कवणें आकळावी अवधारणा । येवढी कवणाची ॥५१॥परी तेही सर्व बुद्धिमंत । आकळिते जाहले शब्दजात । अर्थासी मात्र पारंगत । न होती कोणी ॥५२॥असो ऐसा मार्गदर्शक । निर्माण जाला वेद सकळिक । इतुक्याचा कर्ता तो एक । ईश अंतर्यामीं ॥५३॥आतां जीवाची कृति तेही कैशी । प्रस्तुत बोलिजे अल्पशी । सर्वों ग्रहण करून शब्दासी । योजना करिते जाहले ॥५४॥अमुक शब्दाचा अमुक अर्थ । अमुक नामाचा हा पदार्थ । ऐसें कल्पोनिया आवडता स्वार्थ । योजना करिती ॥५५॥नाना लिंगभेद केले । नाना वित्पत्तीतें वाढविलें । नाना तर्कें विभक्तीतें स्थापिलें । न्यायध्याकरणादि करोनी ॥५६॥छंद निरुक्त ज्योतिषादि । अंगें उपांगें नानाविधि । प्रतिपादिती निर्णयबुद्धि । करणें हें न करणें ॥५७॥पुढें पुढें तों व्यासादिक । आचार्य जाहले अनेक । तेणें तो वेद सूत्रादि कौतुक । रचिला विस्तार ॥५८॥हा ऋृग्वेद हा यजुर्वेद । हा अर्थवण हा सामवेद । उदात्त अनुदात्तादि विशद । कल्पना केली ॥५९॥ऐशी योजना जे जे कल्पनेची । अनेकधा रचनाही शब्दाची । तितुकीही कृति असे जीवाची । एवं द्विविध कर्ते यया ॥११६०॥ऐसा वेद रचनात्मक । निर्माण जाला मार्गप्रवर्तक । त्यांत कर्मचि प्रतिपादून येक । निश्चयें बैसले ॥६१॥उपासना कोणी श्रेष्ठ म्हणती । परी आवडी ऐशी भिन्न स्थापिती । एक म्हणती ज्ञानाचि गति । परी ज्ञेय निर्धारा नये ॥६२॥पहिला प्रणवात्मक वेद । दुसरा मात्रात्मक शब्द । ययाची हेळणा करून प्रसिद्ध । म्हणती वेदाक्षरें खरें ॥६३॥नाना वर्ण नाना आश्रम । विस्तारिले भिन्न अनुक्रम । ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे उत्तम । अधिकारी वेदाचे ॥६४॥हे स्त्रीशुद्रादि अनधिकारी । अंत्यवसाई तो दूरीच्या दूरी । ऐशी कल्पनाच वाढवून अंतरीं ।साभिमानें बद्ध होती ॥६५॥असो बहू बोलतां न सरे । हें अनावरचि असे सारें । परी जीवकल्पित बाधक निर्धारें । विचारावें मुमुक्षु ॥६६॥तंव विनवितसे रविदत्त । जी जी निवडिलें जीवेश द्वैत । परी ईशनामाचा संकेत । कवणासी असे ॥६७॥चतुराननाचे अतरांतून । शब्द प्रेरिता जाहला ईशान । येणें शब्दें ब्रह्मा आपण । ईश्र्वर नव्हे ॥६८॥आणि पराधीनत्वें सृष्टि निर्मिली । तेव्हां ते स्वतंत्रत्वें कोणें केली । तया ईशासी व्यक्तता आली । किंवा अव्यक्त ॥६९॥जनाचे तर्क तरी अनेक । तैसेंचि स्थापिती शास्त्रकारक । कीं ईश्र्वर असे कोण येक । तो चालक सर्वांचा ॥१३७०॥परी तो रहात असे कोठें । सूत्रें केवी हालवी नेटें । हें न कळे कवणापरी बोभाटे । प्राणिमात्र व्यर्थ ॥७१॥उत्पत्ति करी चतुरानन । विष्णु जगाचें करी पालन । संहारीतसे रुद्र आपण । सर्वांलागीं ॥७२॥त्यांत ब्रह्मदेवाचें पराधीनत्व । कळलें असे कीं आरोपितत्व । परी विष्णु सदाशिव स्वतंत्र अपूर्व । असती कीं कैसें ॥७३॥ऐसा प्रश्र्न रविदत्ताचा । ऐकोन श्रीगुरु बोलती वाचा । अरे स्वतंत्रपणा कवणासी कैंचा । आकारा आले तयां ॥७४॥साकारत्व जीवालागीं न ये । मा अवयवी ईश कैसा होय । जितुकें दृश्य तें भूतमय । जरी स्वतां प्रगटती ॥७५॥स्वतां प्रगटती ते अयोनिसंभव । म्हणती परी तो मिथ्या गौरव । दृश्यासी कारणें असती सर्व । स्फुरणादि पृथ्व्यंत ॥७६॥कारणासीच म्हणावें योनि । तेथून कार्याची उभवणी । तया संभवा मानावें अयोनि । तरी वृक्षादिकां न म्हणावें ॥७७॥असो विष्णु आणि सदाशिव । गुणमायेचे स्वभाव । पालन संहार जगाचा सर्व । करणें हें परतंत्र ॥७८॥विष्णु जरी पालनकर्ता । तरी होणारा स्वाधीन न होतां । ऋृषि यज्ञामाजीं प्रगटतां । अहंभोक्ता भाविलें ॥७९॥तत्क्षणीं निजकरींचें सुदर्शन । तेणें स्वशिराचें जाहलें कृंतन । मग सर्वों बैसविले अश्र्वाचें आनन । तो हयग्रीव अवतार तस्मात् स्वशरीर रक्षवेना । तो काय संरक्षी अन्य जना । म्हणोनि परतंत्रता चतुरानना । तेवींच विष्णूची ॥८१॥कोणी म्हणेल अभिमान उठतां । न साहे किमपि भगवंता । म्हणोनि शिरच्छेद जाला तत्त्वता । स्वकीय इच्छेनें ॥८२॥तरी पहा कल्पना कवणा जाहली । कवणाचे हेतूनें हानि जाहली । ज्याची सत्ता तो ईश येर हे भुली । कल्पनारूप जीवाची ॥८३॥संहार करणें शिवाकडे । त्याचे सामर्थ्य जाहलें हें कुडें । येणें अर्थें तों जालें उघडें । पराधीनत्व विष्णूचें ॥८४॥आतां संहारा जरी सदाशिव । स्वतंत्र असे सर्वथैव । तरी त्रिपुरवधाचें अपूर्व । सांकडें कां पडतें ॥८५॥तस्मात् कोणीही स्वतंत्र नसे । ब्रह्मा विष्णु सदाशिव ऐसे । मा येर देव तों अपैसे । उघड परतंत्र ॥८६॥जरी म्हणेल कोणी कीं स्वतंत्र कोण । कोण करी उत्पत्ति लय पालन । तरी हे ईशाधीन गुण तीन । तेणें तिन्ही होती तेही गुण ज्याचे त्यापाशीं । ब्रह्मादि कीटकांत दिवानिशीं असती एक यतां उदयासी । दोन आच्छादती ॥८८॥जाणणें तोचि सत्त्वगुण । जाण जाणों वांचती संपूर्ण । ऐसें सत्वगुणें होतें पालन । तोचि विष्णु ॥८९॥नेणणें तमोगुण विख्यात । नेणीव विस्मरणें प्राणी मरत । ऐसाचि रुद्र संहारित । तमोगुण रूपें ॥१३९०॥जाणीव नेणीव समान जाहली । म्हणोनि रजोगुणें उत्पत्ति पावली । एवं सृष्टि ब्रह्मदेवें रचिली । रजोगुण रूपें ॥९१॥एवं रजःसत्त्वतमात्मक । त्रिगुण उत्पत्ति स्थिति लायकारक । यया तिन्ही गुणांसी प्रवर्तक । तो येक ईश्र्वर ॥९२॥तरी तो ईश्र्वर कोठें राहतसे । त्रिगुणांसी कैसा प्रेरितसे । म्हणाल तरी अवधारा अल्पसें । बोलोनि दावूं ॥९३॥ईश्र्वर जरी सावयव असता । तरी देहाबाहेरी म्हणों येता । जेवीं बुद्धि तेथें जीव ऐता । तेवीं स्फूर्ति तेथें ईश्र्वर ॥९४॥बुद्धींत अविद्येस्तव पडिलें । प्रतिबिंब तें जीवत्वा पावलें । तेवींच विद्यामायेनें चैतन्य फळलें । स्फू र्तींत तो ईश्र्वर ॥९५॥जीवांसी स्वतंत्रता असेना । कारण कीं कल्पिलें तैसें घडेना । म्हणून ईश्र्वर करीतसे प्रेरणा । प्रारब्ध उदया ऐशी ॥९६॥प्रारब्धभोग असे जीवासी । तें सुखःदुःख नव्हे ईश्र्वरासी । म्हणोनी जीव नव्हे तो स्वतंत्रत्वेंसी । प्रेरणा मात्र करी ॥९७॥जीवाचें होणार नव्हे स्वाधीन । परतंत्रत्वें भोगी आपण । म्हणून प्रेरकएक असे ईशान । चाळक बुद्धीचा ॥९८॥असो जीव जैसा बुद्धिआंत । रहात असे सदोदित । तेवींच ईश्र्वर गुणांसहित । स्फूर्तींत वसे ॥९९॥ब्रह्मादि कीटकांत येकला । अंतर्यामित्वें हृदयीं राहिला । अलिप्तपणें नियंता सर्वांला । असे स्वसामर्थ्यें ॥१४००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.